Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati
Sambhajinagar
Date 08 September
2024
Time 11.00 to 11.05
AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०८ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
उत्तर प्रदेशातील लखनऊ ट्रांसपोर्ट नगर इथं एक इमारत कोसळून
झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या आज आठवर पोहचली आहे, तर २८ जण या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. शोध आणि बचाव
कार्यादरम्यान, तीन नवीन
मृतदेह सकाळी ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. काल
दुपारी पावणे पाच वाजता ही इमारत कोसळून ढिगाऱ्याखाली
काही लोक दबले होते. चारच वर्षांपूर्वी उभारलेल्या या इमारतीत काही कामं सुरु
असताना त्यावेळी ही दुर्घटना घडली.
****
मुख्यमंत्री योजनादूत द्वारे राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य
नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. राज्यात ग्रामपंचायत
पातळीवर एक तर शहरी भागात पाच हजार लोकसंख्येमागं एक अशा एकंदर पन्नास हजार
योजनादूतांची सहा महिन्यांच्या कालावधीसाठी निवड केली जाणार आहे. त्यासाठी या
योजनादुतांना दरमहा दहा हजार रुपये मानधन दिलं जाणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org
या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचं आवाहन सरकारच्या
वतीनं करण्यात आलं आहे.
****
राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम विभागांतर्गत स्थापन करण्यात
आलेल्या महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीतर्फे पुण्यश्लोक
अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेसाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीची तरतूद
करण्यात आली आहे. याद्वारे एकंदर पाचशे स्टार्टअप्स् अर्थात नवोद्योगांना एक लाख ते २५ लाख रुपयांपर्यंत आर्थसहाय्य
देण्यात येणार आहे. या योजनेची अधिक माहिती www.msins.in
या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
****
राज्यातल्या दहा जिल्ह्यांत खरीपातील जवळपास साडेआठ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं पावसामुळं मोठं नुकसान झालं असून त्याचे पंचनामे सुरू असल्याची माहिती राज्याचे कृषी संचालक
विनयकुमार आवटे यांनी दिली आहे. कृषी विभागाच्या ताज्या अहवालानुसार कापूस, सोयाबीन, तूर, बाजरी, मूग, उडीद, मका, ज्वारी पिकांचं आणि कांदा, भाजीपाल्याचंही नुकसान झालं आहे.
अतिपावसामुळं पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी पीक विमा कपंनीला कळवायला हवं,
जेणेकरून पंचनामे करण्याच्या कामासही गती येईल,
असंही आवटे यांनी म्हटलं आहे.
****
निरपेक्ष अशा सेवाभावानं इतरांसाठी जगल्यास प्रगत समाजाची निर्मिती होईल, असं प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. काल मुंबई
इथं धरमपूरच्या श्रीमद राजचंद्र मिशन संस्थेतर्फे
आयोजित ‘पर्युषण महोत्सव २०२४ ’महोत्सवात ते बोलत होते. इतरांसाठी जगणं या भारतीय
तत्त्वज्ञानातल्या शाश्वत विचाराला अनुसरुन भारतानं इतर राष्ट्रांना कोविडची मोफत
लस वितरित केल्याचं राज्यपाल म्हणाले. आदिवासी विकास कार्यावर विशेष लक्ष
देण्यासाठी राजभवनातला ‘आदिवासी कक्ष’ पुनरूज्जीवित करण्यात आला असून राज्यातील साडे नऊ टक्के
लोकसंख्या असलेल्या आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी आपण कार्य करणार असल्याचं
राज्यपाल यावेळी
म्हणाले .
****
अकोला शहरात डिजे आणि लेझर किरणांचा प्रकाशझोत म्हणजेच लेझर
बीम फोकसच्या वाढत्या वापरावर नियंत्रण आणावं, अशी मागणी अकोल्यातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं जिल्हाधिकारी आणि
महानगरपालिका आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
डीजेच्या अनियंत्रित वापरामुळे ज्येष्ठ नागरिक,
आजारी व्यक्ती, लहान मुलं, गर्भवतींसह सर्वांनाच घातक परिणाम भोगावे लागत आहेत. तसंच
लेझर बीम फोकसमुळे डोळ्यांवर दुष्परिणाम जाणवत असल्याच्या या पार्श्वभूमीवर ही
मागणी करण्यात आली आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातलं ईसापूर धरण ९७ टक्के भरलं आहे. धरणाचे तीन दरवाजे सुमारे अर्ध्या फुटाने उघडून, सध्या एक हजार २१ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला
आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९५ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणातली आवक वाढल्यास, कोणत्याही क्षणी धरणातून विसर्ग करावा लागू शकतो, त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांनी सर्तक राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
दरम्यान, येत्या ७२ तासांत राज्यभरात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम
स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रासह कोकण आणि
विदर्भात आगामी १८ तासांत तुरळक ठिकाणी विजांसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर मराठवाड्याच्या परभणीसह धाराशिव जिल्ह्यात दमदार पावसाची
शक्यता आहे.
****
फ्रान्सच्या पॅरिस इथं आयोजित अपगांसाठीच्या जागतिक क्रिडा पॅरालिम्पिक स्पर्धेच्या पदकतालिकेत भारतानं सात सुवर्ण,
नऊ रौप्य आणि १३ कांस्य पदकांसह एकूण २९ पदकांची कमाई करुन
सोळावं स्थान पटकावलं आहे. स्पर्धेच्या इतिहासात भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. या स्पर्धेचा आज समारोप होत आहे. तिरंदाज हरविंदर सिंग आणि धावपटू प्रीती पाल यांनी या एकाच
पॅरालिम्पिक स्पर्धेत दोन पदकं जिंकली असून ते
समारोप कार्यक्रमात भारतीय पथकाचे ध्वजवाहक असतील.
No comments:
Post a Comment