आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
Sunday, 30 November 2025
Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.11.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati
Sambhajinagar
Date – 30 November
2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० नोव्हेंबर २०२५ सायंकाळी ६.१०
****
·
‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ ची भावना बळकट करणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचं
पंतप्रधानांचं `मन की बात`मध्ये आवाहन
·
संसदेचं हिवाळी अधिवेशन
उद्यापासून
·
राज्याच्या मुख्य सचिवपदाची
सुत्रं राजेश अग्रवाल यांनी स्वीकारली
आणि
·
राज्यातल्या २४३ नगरपरिषदा
आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला
****
‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ ची भावना बळकट करणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचं
आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या आकाशवाणीवरच्या `मन
की बात` या कार्यक्रमातून देशवासियांना केलं. या मालिकेतला हा एकशे अठ्ठावीसावा भाग
होता. युवकांची निष्ठा हेच विकसित भारताचं सामर्थ्य असल्याचं त्यांनी नमुद केलं.
तीव्र इच्छा,
सामूहिक शक्ती, आणि संघभावनेनं काम
करण्यावर विश्वास असेल तर कठीण कामातही यश मिळतं असं ते म्हणाले. या संदर्भात
त्यांनी इस्त्रोनं मंगळ ग्रहासारख्या वातावरणात जीपीएस प्रणालीशिवाय ड्रोन
उडवण्याच्या स्पर्धेची चित्रफित पाहिल्याचा अनुभव सांगितला. या स्पर्धेत
पुण्यातल्या एका संघानं यश मिळवल्याचा उल्लेख त्यांनी केला. हैदराबाद इथं
विमानांच्या देखभाल,
दुरुस्ती आणि संपूर्ण तपासणी केंद्राचं उद्घाटन, नौदलाच्या
ताफ्यात स्वदेशनिर्मित आयएनएस माहे या युद्धनौकेच्या समावेशाचा उल्लेखही त्यांनी
केला. कृषी क्षेत्रातली देशाची प्रगतीही त्यांनी अधोरेखित केली. देशानं ३५७ दशलक्ष
टन इतक्या प्रमाणात अन्नधान्याचं उत्पादन करून ऐतिहासिक विक्रम केला असल्याचं ते
म्हणाले. गेल्या काही वर्षांत मधाची निर्यात तीन पटीपेक्षा जास्त झाली आहे, देशाचं
मध उत्पादन दीड लाख टनांपेक्षा जास्त झालं आहे, मध अभियानाअंतर्गत खादी
ग्रामोद्योगानं सव्वा दोन लाखापेक्षा जास्त मधमाशी पालन पेट्यांचं वाटप केलं आहे
अशी माहिती त्यांनी दिली. क्रीडा क्षेत्रातल्या यशाचा उल्लेखही त्यांनी केला.
महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धेचं जेतेपद, जपानमधल्या डेफ ऑलिम्पिक, तसंच
जागतिक मुष्टीयुद्ध चषक स्पर्धेत भारतानं मिळवलेलं यश याविषयी त्यांनी सांगितलं.
दृष्टीहीन महिलांनी जिंकलेला पहिलाच टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक म्हणजे देशाच्या
क्रीडा इतिहासातल्या सर्वात मोठ्या यशांपैकी एक आहे असं त्यांनी सांगितलं.
ते म्हणाले…
बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधानांनी देशाचा गौरव वाढवणाऱ्या सांस्कृतिक आणि इतर
घडामोडींचाही उल्लेख केला. काही दिवसांपूर्वीच साजरा झालेला संविधान दिन, तसंच
वंदे मातरम् या गीताला दीडशे वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल देशभरात होत असलेले
कार्यक्रम,
अयोध्येत राम मंदिरावर धर्मध्वजाचं
आरोहण, कुरुक्षेत्रातल्या पांचजन्य स्मारकाचं लोकार्पण यांविषयी त्यांनी सांगितलं.
आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवानिमित्तानं विविध देशांत झालेल्या कार्यक्रमांची
माहिती त्यांनी दिली. राष्ट्रीय संग्रहालयातल्या भगवान बुद्धांच्या पवित्र
अवशेषांच्या दर्शनाला जगभर मोठा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती पंतप्रधानांनी
यावेळी दिली.
ते म्हणाले…
बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी
नुकत्याच झालेल्या जी ट्वेंटी परिषदेच्या निमित्तानंही आपण
जागतिक नेत्यांना दिलेल्या भेटवस्तूंमध्ये स्थानिक भावनेवरच भर दिला असं ते
म्हणाले. आगामी ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या खरेदीसाठीही नागरिकांनी देशात बनलेल्या
वस्तुंची खरेदी करावी असं आवाहन त्यांनी केलं. देशाच्या हिवाळी पर्यटन
क्षमतांबद्दल सांगताना हिवाळी पर्यटनासाठी हिमालयातील
डोंगररांगाचा विचार करावा असं आवाहन पंतप्रधानांनी केलं.
****
संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत असून त्या
पार्श्वभूमीवर सरकारने आज सकाळी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या अधिवेशनात मतदार
पुनरिक्षण,
दिल्ली बाँम्बस्फोट तसंच परराष्ट्र संबधांबद्दल विरोधी पक्ष
प्रश्न उपस्थित करतील अशी
शक्यता आहे. अधिवेशनात अनेक नवीन विधेयके आणली जाणार आहेत, या
पार्श्वभूमीवर संसदेचं कामकाज सुरळीत चालावं अशी भूमिका सरकारतर्फे संरक्षणमंत्री
राजनाथ सिंग,
संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू तसंच राज्यमंत्री अर्जुन
राम मेघवाल यांनी मांडली. जयराम रमेश, गौरव गोगोई, प्रमोद
तिवारी या काँग्रेसच्या नेत्यांनी तसंच डीएमके चे टी आर बालू, तृणमूलचे
डेरेक ओ ब्रायन तसंच `आययूएमएल`चे ई टी मोहम्मद बशीर यांनी विरोधी पक्षांची भूमिका मांडली. आरजेडीचे मनोज झा, संयुक्त
जनता दलाचे संजय झा,
शिरोमणी अकाली दलाच्या हरसिम्रत कौर हे नेतेही या बैठकीला
उपस्थित होते.
****
एनडीए अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४९ व्या
तुकडीचं दीक्षांत संचलन पुण्यात खडकवासला इथं आज सकाळी झालं. कॅडेट सिद्धार्थ सिंग
यांनी या संचलनाचं नेतृत्व केलं. याप्रसंगी ३२९ कॅडेट्स संरक्षण दलात दाखल झाले.
नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी या संचलनाचं निरीक्षण केलं. याप्रसंगी
कॅडेट दीपक कांडपाल यांना सुवर्णपदक, सिद्धार्थ सिंग यांना रौप्य
पदक तर सिद्धी जैन यांना कांस्यपदक प्रदान कऱण्यात आलं. या तुकडीतल्या ३२८
कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी मिळाली. ७२ जणांना विज्ञान, ९२
जणांना संगणक विज्ञान,
आणि ५२ जणांना कला शाखेतली पदवी प्रदान करण्यात आली.
****
राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आज
पदभार स्वीकारला. मुंबई इथं मुख्य सचिवांच्या दालनात झालेल्या या कार्यक्रमात, मावळते
मुख्य सचिव राजेशकुमार यांच्याकडून हा पदभार स्विकारण्यात आला.महाराष्ट्राचा विकास
आणि गौरव वाढवण्यासाठी प्रभावीपणे कार्यरत राहीन असं राजेश अग्रवाल यावेळी
म्हणाले. राजेश अग्रवाल हे मूळचे पंजाबमधील जालंधर इथले असून ते भारतीय प्रशासकीय
सेवेतील महाराष्ट्र कॅडरचे १९८९ चे अधिकारी आहेत.
****
राज्यातल्या २४३ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या
निवडणुकीसाठी सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते आपापल्या उमेदवारांचा राज्यभर प्रचार
करत आहेत. प्रशासनाकडून २ डिसेंबरला होणाऱ्या मतदानाची तयारी सुरू असून काही
ठिकाणी टपाली मतदानाला सुरुवात होत आहे. बीड जिल्ह्यातल्या सहा नगरपालिकांच्या
निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातल्या बीड, गेवराई, माजलगाव, धारूर, परळी
आणि अंबाजोगाई या सहा नगरपरिषदांमधे दोन तारखेला मतदान होणार आहे. यासाठी
जिल्हाभरात एकूण ४३४ मतदान केंद्रं उभारण्यात आली आहेत. यात सर्वाधिक म्हणजे १७९
मतदान केंद्र बीड शहरात आहेत. जिल्ह्यातल्या सर्व मतदान केंद्रावर सुरक्षा
व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांची सभा उद्या सकाळी दहा वाजता बीडमध्ये होणार आहे. नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड आणि धर्माबाद
नगरपरिषदा तसंच भोकर,
लोहा आणि कुंडलवाडी नगरपरिषदांमधल्या तीन प्रभागांमधली
निवडणूक प्रक्रिया नगराध्यक्षपदासाठी अपील असल्यामुळे पुढे ढकलण्यात आली असून या
ठिकाणी २ डिसेंबर ऐवजी २० डिसेंबरला मतदान होणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या चार
नगरपरिषदांमधे टपाली मतदानाला सुरुवात झाली आहे.
****
विराट कोहलीच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर भारतानं दक्षिण
आफ्रिकेसमोर पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात विजयासाठी ३५० धावांचं लक्ष्य
ठेवलं आहे. झारखंडमध्ये रांची इथं सुरु असलेल्या या सामन्यात भारतानं ५० षटकांत आठ
बाद ३४९ धावा केल्या. विराट कोहलीनं १२० चेंडुंमध्ये १३५, कर्णधार
के. एल. राहुलनं ५६ चेंडुंमध्ये ६० आणि रोहित शर्माच्या ५१ चेंडुंमधील ५७ धावा यात
प्रमुख ठरल्या. रोहित आता एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक ३५२ षटकार मारणारा
फलंदाज ठरला आहे.
****
एअर बस कंपनीच्या ३३८ विमानांपैकी ३२३ विमानांच्या
सॉफ्टवेअरचं अद्ययावतीकरण पूर्ण झालं असल्याची माहिती नागरी हवाई वाहतूक
महासंचालनालयानं दिली आहे. अद्ययावतीकरण झालेली विमानं इंडिगो, एअर
इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या विमान कंपन्यांची असल्याचं त्यांनी कळवलं आहे.
एअरबस थ्री ट्वेंटी प्रकारातल्या विमानांच्या नियंत्रक सॉफ्टवेअर मधे बिघाड
झाल्याचं समजल्यावर त्या सर्व विमानांचं उड्डाण तात्काळ थांबवण्याचे आदेश
महासंचालनालयानं काल दिले होते.
****
नांदेड जिल्ह्यात वन विभागानं बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी
पंधरा पथकं तैनात केली आहेत. नायगाव तालुक्यात कृष्णूर एमआयडीसी भागात काल एका
बिबट्यानं,
एका मजूरावर तसचं वनविभागाच्या कर्मचाऱ्यावर हल्ला केला
होता, यानंतर वनविभागानं विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
****
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.11.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 30 November
2025
Time 01.00 to 01.05
PM
Language Marathi
आकाशवाणी
छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० नोव्हेंबर
२०२५ दुपारी
१.०० वा.
****
‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ ची भावना बळकट करणाऱ्या उपक्रमांमध्ये
सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या आकाशवाणीवरच्या `मन की बात` या कार्यक्रमातून देशवासियांना केलं. काशी-तमिळ संगमम उपक्रमाचा त्यांना यानिमित्त
गौरवपूर्ण उल्लेख केला. आपल्या देशामध्येही हिवाळी पर्यटनाच्या दृष्टीनं मोठी क्षमता
असून नागरिकांनी पर्यटन करावं असं ते म्हणाले. स्थानिक उत्पादनांसाठी आग्रही होण्याचा
पुनरुच्चार करत पंतप्रधान मोदी यांनी भारतात निर्मित साहित्य खरेदी करावं आणि देशांतर्गत
व्यापाराला चालना द्यावी असं नमुद केलं. २५ तारखेला अयोध्येतल्या श्री राम मंदिरावरील
धर्मध्वजाच्या आरोहणासह नोव्हेंबर महिन्यात देशभरात झालेल्या महत्वपूर्ण घडामोडींचा
आढावा त्यांनी आज घेतला. पांचजन्य ज्योतिसर, हैदराबाद इथे विमानांची देखभाल, दुरुस्ती आणि संपूर्ण तपासणी
या क्षेत्रातली लीप इंजिन सुविधा, मुंबईत भारतीय नौदलात समावेश
करण्यात आलेलं संपूर्ण भारतीय बनावटीचं माहे जहाज यावर त्यांनी प्रकाश टाकला. स्कायरुट
इन्फिनिटी कॅम्पसनं भारताच्या अवकाश परिसंस्थेला गाठून दिलेली नवी उंची, भारतानं ३५७ दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादन करून स्थापित
केलेला ऐतिहासिक विक्रम आणि त्यायोगे १० वर्षांपूर्वीच्या
आकडेवारीच्या तुलनेत भारतातील १०० दशलक्ष टनांनी वाढलेलं अन्नधान्य उत्पादन, राष्ट्रकुल स्पर्धांचं भारताला देण्यात आलेलं यजमानपद
याचा पंतप्रधांनांनी यावेळी गौरवपूर्ण उल्लेख केला. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोच्या
एका अनोख्या ड्रोन स्पर्धेचाही त्यांनी उल्लेख केला. या स्पर्धेमुळे तरुणांमधली कल्पनाशक्ती
आणि तंत्रज्ञानाविषयी जिज्ञासा तसंच कौशल्य बघायला मिळालं असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
यातील पुण्याच्या स्पर्धकांच्या प्रयत्नांची त्यांनी याद्वारे दखल घेतली. जम्मू-काश्मीरच्या
डोंगराळ भागात वन तुळशीपासून तयार करण्यात आलेल्या रामबन सुलाई मधाला मिळालेल्या मान्यतेची
त्यांनी माहिती दिली. देशात मधाच्या उत्पादनात झालेल्या दीड लाख टनाच्या विक्रमी वाढीबद्दल
त्यांनी समाधान व्यक्त केलं. कुरुक्षेत्रात त्रिमीतीय, प्रकाश आणि ध्वनीयोजना तसंच डिजीटल तंत्राने सादर होत असलेल्या महाभारत गाथेचा
आणि या ठिकाणी आयोजित आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवातील त्यांच्या सहभागाचा आणि जगातल्या
अनेक देशातल्या व्यासपीठांवर सादर होत असलेल्या गीता पठणाचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख
केला. दक्षिण भारतात नैसर्गिक शेतीसंदर्भात सुरु असलेले उपक्रमांची पंतप्रधानांनी प्रशंसा
केली. भूतान, रशिया, मग़ोलिया, व्हिएतनाम आणि थायलंडला पाठवण्यात आलेल्या भगवान तथागत
बुद्धांचे पवित्र अवशेष आणि त्यामुळं भारताचे या देशांशी निर्माण झालेले चांगले संबंध
याचाही पंतप्रधानांनी `मन की बात` मध्ये उल्लेख केला.
भारताच्या महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्व चषक जिंकून जगाच्या पटलावर
आपलं नाव कोरलं असल्याचं ते म्हणाले. कबड्डी स्पर्धांमधलं महिला खेळाडूंचं यश, आणि क्रीडाक्षेत्रातल्या भारताच्या एकूण कामगिरीबाबतही
पंतप्रधानांनी प्रशंसा केली. इंड्युरन्स स्पोर्ट्स या नवीन क्रीडाप्रकाराचा उल्लेख
करत पंतप्रधानांनी या नव्या क्रीडाप्रकारांचा अनुभव घेण्याचं आवाहन खेळाडूंना केलं.
हिवाळ्यात नागरिकांनी आपली आणि आपल्या कुटुंबांच्या आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहनही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज `मन की बात`च्या माध्यमातून देशवासियांना केलं आहे.
****
संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून
सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकार आज सर्वपक्षीय बैठक घेत आहे. लोकसभा आणि राज्यसभेतल्या
सर्व पक्षांच्या नेत्यांशी संसदीय कार्य मंत्री किरेन रीजिजू यामध्ये चर्चा करणार आहेत.
हे अधिवेशन १९ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
****
आज तंत्रज्ञानात वेगानं बदल
होत आहेत. या बदलत्या जगात आपण पदार्पण करत आहात या बदलत्या जगाला सामोरं जाण्यासाठी
आत्मविश्वास, धैर्य आणि शिस्त हे तीन सद्गुण उपयोगी पडणार असल्याचं
प्रतिपादन नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी केलं आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या
१४९व्या तुकडीचा दिमाखदार दीक्षांत संचलन सोहळा प्रबोधिनीच्या खेत्रपाल मैदानात झाला, त्यावेळी नौदल प्रमुख बोलत होते. दीक्षांत संचलन सोहळ्यातून
३२९ छात्र सैन्यात दाखल झाले.
****
धाराशिव नगरपालिका निवडणुकीत
न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या शहरातील तीन प्रभागातील निवडणूक कार्यक्रम निवडणूक
आयोगानं जाहीर केला आहे. या तीन प्रभागातील मतदारांना नगराध्यक्ष पदासाठीचं मतदान पूर्व
नियोजित वेळेनुसार म्हणजे दोन डिसेंबरलाच करता येणार असून मतमोजणी तीन डिसेंबरला होणार
असल्याची माहिती निवडणूक प्रशासनानं दिली आहे.
****
Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 30 نومبر 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10
Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.11.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 30 November
2025
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
उद्यापासून सुरू होणाऱ्या
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठक
·
मन की बातमधून पंतप्रधान नरेंद्र
मोदी आज देशवासियांशी संवाद साधणार
·
केवळ सव्वा तीन लाख शेतकऱ्यांनी
घेतला रब्बी हंगामासाठी पीक वीमा
·
येत्या निवडणुकांसाठी राजकीय
पक्षांचा प्रचार शिगेला-मतदार जनजागृतीसाठी सर्वत्र विविध कार्यक्रम
आणि
·
सुलतान अजलनशाह चषक हॉकी स्पर्धेत
आज विजेतेपदासाठी भारत – बेल्जियम लढत
****
संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्या सोमवारपासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारनं
आज सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. लोकसभा आणि राज्यसभेतल्या सर्व पक्षांच्या नेत्यांशी
संसदीय कार्य मंत्री किरेन रीजिजू चर्चा करणार आहेत. अधिवेशनाचं कामकाज सुरळीत चालावं
यासाठी सरकार सर्व पक्षाच्या सदस्यांना सहकार्याचं आवाहन करेल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं
आहे. हे अधिवेशन १९ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून
देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा १२८वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी
आणि दूरदर्शन नेटवर्क, वेबसाइट तसंच न्यूजऑनएआयआर मोबाइल ॲपवर प्रसारित केला जाईल.
****
बदलत्या तंत्रज्ञानानुसार आत्मनिर्भर होण्यासाठी सैन्य दलात दाखल होणाऱ्या छात्रांनी
सक्षम असण्याची आवश्यकता, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे प्रमुख डॉ. अजय कुमार यांनी व्यक्त केली. काल पुण्यात
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी- एनडीएच्या १४९ व्या तुकडीच्या दीक्षांत सोहळ्यात ते बोलत
होते. यावेळी ३२९ स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली. विज्ञान शाखेचं रौप्य पदक कार्तिक महेश्वरी, संगणक विज्ञानातलं रौप्य पदक अनन्या बालोनी, कला शाखेतलं रौप्य पदक अनुराग
गुप्ता, तर बी टेक अभ्यासक्रमाचं रौप्य
पदक पुण्याचा विश्वेश भालेराव यांना प्रदान करण्यात आलं.
****
महाराष्ट्रासह तीन राज्यातल्या पायाभूत सुविधांसाठी आशियायी विकास बँक कर्जपुरवठा
करणार आहे. याबाबतचे कर्ज प्रस्ताव काल मंजूर करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातल्या
वीज वितरण व्यवस्थेसाठीच्या पन्नास कोटी डॉलर कर्जाचा समावेश आहे.
****
रब्बी हंगामातील पीक विम्यासाठी आत्तापर्यंत केवळ ३ लाख २६ हजार १६८ शेतकऱ्यांनी
२ लाख ६ हजार ९९५ हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवला आहे. गेल्या वर्षी सुमारे ५५ लाख शेतकऱ्यांनी
हा विमा उतरवला होता. राज्यातील विमा उतरवलेल्या क्षेत्राची एकंदर विमा रक्कम ८२० कोटी
रुपये आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार परभणी जिल्ह्यात सर्वाधिक ५० हजार ४६२ शेतकऱ्यांनी
३३ हजार १२ हेक्टरवरील क्षेत्राचा विमा उतरवला आहे. त्यापाठोपाठ बीड आणि लातूर जिल्ह्याचा
क्रमांक आहे. शेवटच्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात अर्ज येतात. त्यामुळे तांत्रिक
समस्या निर्माण होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी मुदत संपण्यापूर्वीच
पीक विमा उतरवण्याचं आवाहन कृषी विभागानं केलं आहे.
****
राज्यातल्या २४३ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला
आहे. विविध पक्षांचे ज्येष्ठ नेते प्रचार सभा तसंच प्रचार फेऱ्या काढत मतदारांना आपापल्या
उमेदवारांना मत देण्याचं आवाहन करत आहेत. मुख्यमंत्री
तथा भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भंडारा, चंद्रपूर तसंच गडचिरोली इथं
प्रचार सभा घेतल्या.
उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी लातूर जिल्ह्यात उदगीर
इथं शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतली. या ठिकाणी परिवर्तनाचे वारे सुरू
असल्याचा दावा करत, उदगीर तसंच लातूरच्या विकासाचा त्यांनी आढावा घेतला.
उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी माजलगाव इथं आपल्या
उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. तालुक्यात पायाभूत सुविधांसह दळणवळणाच्या
सुविधांबाबत त्यांनी यावेळी चर्चा केली.
परवा दोन डिसेंबरला मतदान होणाऱ्या या निवडणुकीसाठी उद्या एक तारखेच्या रात्री
दहा वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे.
**
धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष विकासाची पंचसूत्री राबवणार
आहे. पक्षाचा वचननामा काल आमदार राणाजगजीतसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या उपस्थितीत प्रकाशित
करण्यात आला. त्यावेळी ही माहिती देण्यात आली.
****
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर इथं स्वीप मतदान जनजागृती
फेरी काढण्यात आली. शहरातल्या २३ शाळांचे सुमारे तीन हजार सातशे विद्यार्थी या फेरीत
सहभागी झाले होते. शिक्षक तथा स्वीपचे सदस्य अशोक चव्हाण आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी
मतदान जनजागृतीपर विविध गीते तसंच पथनाट्य सादर करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
**
परभणी जिल्ह्यात सेलू इथल्या नूतन विद्यालयात दोन हजार शंभर विद्यार्थ्यांनी तब्बल
२० हजार चौरस फुटांची ‘वोट फॉर सेलू’ मानवी साखळी उभारून मतदान जनजागृतीचा संदेश दिला.
****
केंद्र सरकारच्या चार नव्या कामगार कायद्यांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे
खासदार अरविंद सावंत यांनी टीका केली आहे. हे कायदे कामगारांचे अधिकार नष्ट करून अनिश्चितता
तयार करतील, असं त्यांनी म्हटलं आहे. भारतीय
कामगार सेना या कायद्यांच्या अंमलबजावणीला विरोध करेल, या कायद्यांना न्यायालायात आव्हान दिले जाईल, असं त्यांनी माध्यमांना सांगितलं.
****
शैक्षणिक संस्थांनी शिक्षित, दीक्षित आणि उत्तम नागरिक घडवण्याचं आवाहन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केलं
आहे. काल मुंबईत शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत एका राष्ट्रीय संघटनेच्या वतीनं राज्यपालांचा
सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. आजच्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांना माहिती मिळत आहे, परंतु जीवनाचं उद्दिष्ट सांगितलं
जात नाही. त्यामुळे शिक्षण संस्थांमधून अपूर्ण व्यक्तिमत्त्व निर्माण होत असल्याकडे
राज्यपालांनी लक्ष वेधलं.
****
मानवी जीवन सुखी व्हावं, असं साहित्यसृजन लेखकांनी करण्याचं आवाहन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
यांनी केलं आहे. नागपूर इथं रेशीम बाग मैदानावर सुरू असलेल्या नागपूर बुक फेस्टिवल
मध्ये, भारत बोध हा युवा लेखक संवाद
कार्यक्रम काल पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. लेखक हे शब्दसृष्टीचे ईश्वर असतात, या शब्दांत साहित्यकांचा गौरव
करत, आपल्याला मिळालेली माहिती
ही व्यवहारिक जीवनात उपयुक्त असली पाहिजे, याकडे भागवत यांनी लक्ष वेधलं.
****
मलेशियात होणाऱ्या सुलतान अजलान शाह चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारत
आणि बेल्जियम संघात लढत होणार आहे. काल झालेल्या उपान्त्य सामन्यात भारतानं कॅनडावर
१४ विरुद्ध ३ अशा गोलफरकाने दणदणीत विजय मिळवला. जुगराज सिंगने चार, अन्य तीन खेळाडूंनी प्रत्येकी
दोन तर चार खेळाडूंनी प्रत्येकी एक गोल केला.
****
बॅडमिंटनपटू किदंबी श्रीकांत याने सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत
धडक मारली आहे. पुरुष एकेरीच्या उपांत्य लढतीत श्रीकांतने मिथुन मंजूनाथचा २१-१५, १९-२१, २१-१३ असा पराभव केला. महिला
दुहेरीत गायत्री गोपीचंद आणि त्रिशा जॉली यांनीही मलेशियन जोडीचा पराभव करत अंतिम फेरी
गाठली. त्यांचा आज जपानच्या जोडीसोबत अंतिम सामना होणार आहे.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेला आजपासून प्रारंभ
होत आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेतला पहिला सामना आज रांची इथं, दुसरा सामना तीन डिसेंबरला
रायपूर इथं तर तिसरा सामना सहा डिसेंबरला विशाखापट्टणम् इथं खेळवला जाणार आहे. या मालिकेपाठोपाठ
दोन्ही संघात पाच टी– ट्वेंटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.
****
दिल्लीतल्या विशेष न्यायालयानं कुख्यात गँगस्टर अनमोल बिश्नोईच्या एनआयए कोठडीत
७ दिवसांची वाढ केली आहे. अमेरिकेतून प्रत्यार्पण झाल्यानंतर तो ११ दिवस एनआयए कोठडीत
होता. आता त्याची कोठडी ५ डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे
नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या, अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेला गोळीबार यासह अनेक गुन्ह्यांमध्ये त्याचा हात
असल्याचा आरोप आहे.
****
छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेच्या मतदार यादीत संभ्रम असल्याचा आरोप जिल्ह्याचे
पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. ते काल पत्रकार परिषदेत बोलत होते. महानगरपालिकेचे
प्रशासक तथा आयुक्त जी. श्रीकांत यांनी याकडे तत्काळ लक्ष देत, योग्य उपाय योजना करण्याच्या
सूचना पालकमंत्री शिरसाट यांनी केल्या आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत कालपासून गोविंदभाई श्रॉफ
संगीत महोत्सव सुरू झाला. यावेळी उत्कर्षा बोरीकर आणि त्यांच्या चमूने भरतनाट्यम चं
सादरीकरण करून रसिकांची मनं जिंकली. यानंतर उस्ताद दिलशाद खान यांच्या सारंगीवादनाचा
कार्यक्रम पार पडला. आज या महोत्सवाचा समारोप होणार आहे.
****
नांदेड जिल्ह्यात नायगाव तालुक्यातल्या कृष्णूर औद्योगिक वसाहत परिसरात बिबट्याने
एका कामगारावर हल्ला चढवला, त्यानंतर या बिबट्याच्या शोधात निघालेल्या वनविभागाच्या कर्मचार्यांवरही त्याने
हल्ला केला. काल संध्याकाळी ही घटना घडली. नागरिकांनी खबरदारी बाळगावी, असं आवाहन जिल्हा उपवनसंरक्षक
केशव वाबळे यांनी केलं आहे.
****
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 December 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 24 January 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी ...
-
आकाशवाणी औरंगाबाद. संक्षिप्त बातमीपत्र ३० जून २०१७ सकाळी १०.०० वाजता **** देशातली सर्वात मोठी कर सुधारणा म्हणून ओळखली जाणारी...