Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati
Sambhajinagar
Date – 29 November
2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ नोव्हेंबर २०२५ सायंकाळी ६.१०
****
·
छत्तीसगडमधे रायपूर इथं
पोलिस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्या अध्यक्षतेखाली विविध सत्रांचं आयोजन
·
सैन्य दलात दाखल होणाऱ्या
छात्रांनी सक्षम असण्याची आवश्यकता, यूपीएससीचे प्रमुख डॉ. अजय
कुमार यांच्याकडून व्यक्त
·
येत्या निवडणुकांसाठी
राजकीय पक्षांचा प्रचार शिगेला-मतदार जनजागृतीसाठी सर्वत्र विविध कार्यक्रम
आणि
·
भारतीय हॉकी संघाची सुलतान
अजलनशाह चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक
****
छत्तीसगडमधे रायपूर इथं आयोजित पोलिस महासंचालक आणि पोलीस
महानिरीक्षकांच्या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली विविध
सत्रं आज पार पडली. देशाची सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम आणि बळकट करण्याच्या
दृष्टीने या सत्रांमध्ये उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा होत आहे. या
परिषदेत उद्या रविवारीही आयोजित अनेक सत्रांचं अध्यक्षपद पंतप्रधान
भूषवणार आहेत. विशिष्ट सेवेसाठीची राष्ट्रपती पोलिस पदकंही पंतप्रधानांच्या हस्ते
विजेत्यांना प्रदान केली जाणार आहेत.
****
दरम्यान, पंतप्रधान उद्या रविवारी सकाळी ११ वाजता
आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या
मालिकेचा हा १२८वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शन नेटवर्क, वेबसाइट
तसंच न्यूजऑनएआयआर मोबाइल ॲपवर प्रसारित केला जाईल.
****
बदलत्या तंत्रज्ञानानुसार आत्मनिर्भर होण्यासाठी सैन्य दलात
दाखल होणाऱ्या छात्रांनी सक्षम असण्याची आवश्यकता, केंद्रीय लोकसेवा
आयोगाचे प्रमुख डॉ. अजय कुमार यांनी व्यक्त केली आहे. आज पुण्यात राष्ट्रीय
संरक्षण प्रबोधिनी- एनडीएच्या १४९ व्या तुकडीच्या दीक्षांत सोहळ्यात ते बोलत
होते. यावेळी ३२९ स्नातकांना पदवी प्रदान
करण्यात आली. विज्ञान शाखेचं रौप्य पदक कार्तिक महेश्वरी, संगणक
विज्ञानातलं रौप्य पदक अनन्या बालोनी, कला शाखेतलं रौप्य पदक
अनुराग गुप्ता,
बी टेक रौप्य पदक पुण्याचा विश्वेश भालेराव यांना यावेळी
प्रदान करण्यात आलं.
****
राज्यातल्या २४३ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या
निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. विविध पक्षांचे ज्येष्ठ नेते प्रचार सभा
तसंच प्रचार फेऱ्या काढत मतदारांना आपापल्या उमेदवारांना मत देण्याचं आवाहन करत
आहेत. मुख्यमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ
नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज भंडारा, चंद्रपूर
तसंच गडचिरोली इथं प्रचार सभा घेतल्या.
उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी
लातूर जिल्ह्यात उदगीर इथं शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतली. या
ठिकाणी परिवर्तनाचे वारे सुरू असल्याचा दावा करत, उदगीर तसंच
लातूरच्या विकासाचा त्यांनी आढावा घेतला.
उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार
यांनी माजलगाव इथं आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. तालुक्यात
पायाभूत सुविधांसह दळणवळणाच्या सुविधांबाबत त्यांनी यावेळी चर्चा केली.
येत्या दोन डिसेंबरला मतदान होणाऱ्या या निवडणुकीसाठी एक
तारखेच्या रात्री दहा वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे.
****
धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष विकासाची पंचसूत्री राबवणार आहे. पक्षाचा वचननामा आज आमदार राणाजगजीतसिंह
पाटील,
जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या उपस्थितीत प्रकाशित
करण्यात आला. त्यावेळी ही माहिती देण्यात आली.
****
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर
इथं स्वीप मतदान जनजागृती फेरी काढण्यात आली. शहरातील २३ शाळांचे सुमारे तीन हजार
सातशे विद्यार्थी या फेरीत सहभागी झाले. शिक्षक तथा स्वीपचे सदस्य अशोक चव्हाण आणि
त्यांच्या विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीपर विविध गीते तसंच पथनाट्य सादर करून
सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
परभणी जिल्ह्यात सेलू इथल्या नूतन विद्यालयात दोन हजार शंभर
विद्यार्थ्यांनी तब्बल २० हजार चौरस फुटांची ‘वोट फॉर सेलू’ मानवी साखळी उभारून
मतदान जनजागृतीचा संदेश दिला.
**
केंद्र सरकारच्या चार नव्या कामगार कायद्यांवर शिवसेना
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी टीका केली आहे. हे कायदे
कामगारांचे अधिकार नष्ट करून अनिश्चितता तयार करतील, असे सावंत म्हणाले.
भारतीय कामगार सेना या कायद्यांच्या अंमलबजावणीला विरोध करेल. या कायद्यांना
न्यायालायात आव्हान दिले जाईल, असे त्यांनी माध्यमांना सांगितले.
****
शैक्षणिक संस्थांनी शिक्षित, दीक्षित आणि उत्तम
नागरिक घडवण्याचं आवाहन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केलं आहे. आज मुंबईत
शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत एका राष्ट्रीय संघटनेच्या वतीनं राज्यपालांचा सत्कार
करण्यात आला,
त्यावेळी ते बोलत होते. आजच्या शिक्षण पद्धतीत
विद्यार्थ्यांना माहिती मिळत आहे, परंतु जीवनाचं उद्दिष्ट सांगितलं जात
नाही. त्यामुळे शिक्षण संस्थांमधून अपूर्ण व्यक्तिमत्त्व निर्माण होत असल्याकडे
राज्यपालांनी लक्ष वेधलं.
****
मानवी जीवन सुखी व्हावं, असं साहित्यसृजन लेखकांनी
करण्याचं आवाहन,
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी
केलं आहे. नागपूर इथं रेशीम बाग मैदानावर सुरू असलेल्या नागपूर बुक फेस्टिवल मध्ये
भारत बोध हा युवा लेखक संवाद कार्यक्रम आज पार पडला, या संवाद सत्रात
भागवत बोलत होते. लेखक हे शब्दसृष्टीचे ईश्वर असतात, या शब्दांत
साहित्यकांचा गौरव करत, आपल्याला मिळालेली माहिती
ही व्यवहारिक जीवनात उपयुक्त असली पाहिजे, याकडे भागवत यांनी लक्ष
वेधलं.
****
दृष्टिबाधितांच्या टी ट्वेंटी विश्वचषक विजेत्या महिला
क्रिकेट संघाची आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भेट घेतली. या संघाने मिळवलेला
विजय इतरांसाठी प्रेरणादायक ठरेल, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला.
संघाने आपल्या स्वाक्षरींची एक बॅट राष्ट्रपतींना भेट दिली. संघाने दिलेल्या एका
चेंडूवर राष्ट्रपतींनीही स्वाक्षरी केली.
****
भारतीय हॉकी संघाने सुलतान अजलनशाह चषक स्पर्धेच्या अंतिम
फेरीत धडक मारली आहे. मलेशियात इपोह इथं आज झालेल्या उपान्त्य फेरीच्या सामन्यात
भारतानं कॅनडावर १४ विरुद्ध ३ अशा गोलफरकाने दणदणीत विजय मिळवला. जुगराज सिंगने
चार, अन्य तीन खेळाडूंनी प्रत्येकी दोन तर चार खेळाडूंनी प्रत्येकी एक गोल केला.
उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची लढत बेल्जियम सोबत होणार आहे.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट
मालिकेला उद्यापासून प्रारंभ होत आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेतला पहिला सामना
उद्या रांची इथं,
दुसरा सामना तीन डिसेंबरला रायपूर इथं तर तिसरा सामना सहा
डिसेंबरला विशाखापट्टणम् इथं खेळवला जाणार आहे. या मालिकेपाठोपाठ दोन्ही संघात पाच
टी ट्वेंटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. मालिकेतला पहिला सामना नऊ
डिसेंबरला कटक इथं होणार आहे.
****
पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगडच्या नगराध्यक्षाला पोलिसांनी
आज अटक केली. त्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे १११ कोटी रुपये हडपण्याचा प्रयत्न
केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने ही कारवाई करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम
विभागाचं बनावट पत्र बँकेत सादर करुन हे पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र
बँकेतल्या कर्मचाऱ्यांना शंका आल्यानं त्यांनी पडताळणी केली असता, हा
प्रकार उघडकीस आल्याचं,
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
दिल्लीतल्या विशेष न्यायालयानं कुख्यात गँगस्टर अनमोल
बिश्नोईच्या एनआयए कोठडीत ७ दिवसांची वाढ केली आहे. अमेरिकेतून प्रत्यार्पण
झाल्यानंतर तो ११ दिवस एनआयए कोठडीत होता. आता त्याची कोठडी ५ डिसेंबर पर्यंत
वाढवण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या, अभिनेता
सलमान खानच्या घरावर झालेला गोळीबार यासह अनेक गुन्ह्यांमध्ये त्याचा हात असल्याचा
आरोप आहे.
****
धुळे इथं राज्य राखीव पोलिस दलाच्या मैदानावर गुरुवारपासून
सुरू असलेल्या तीन दिवसीय वीरांगना प्रशिक्षणाचा आज समारोप झाला. विद्यार्थिनींनी
या प्रशिक्षणाचा वापर आत्मरक्षणासाठी करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी भाग्यश्री
विसपुते यांनी केलं. या शिबीरात विविध विषयातल्या तज्ज्ञ मान्यवरांनी
विद्यार्थिनींना अनेक विषयांवर मार्गदर्शन केलं.
****
अंबाजोगाई इथं यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या तीन दिवसीय
यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचा काल समारोप झाला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां
डॉ. कमलताई गवई यावेळी उपस्थित होत्या. समितीचे विविध पुरस्कार त्यांच्या हस्ते
यावेळी प्रदान करण्यात आले. कृषीसाठीचा पुरस्कार विजया घुले यांना, केशव
वसेकर–प्रभावी यांना साहित्य, पं. मुकेश जाधव यांना संगीत, तर
प्रियंका इंगळे यांना युवा क्रीडा गौरव पुरस्कार देण्यात आला. स्मृतिचिन्ह, आणि
पाच हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा
वारसा जपण्याचं काम यशवंतराव चव्हाण स्मृती समिती करत आहे, ही
अतिशय आनंदाची बाब असल्याची भावना कमलताई गवई यांनी यावेळी व्यक्त केली.
****
छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेच्या मतदार
यादीत संभ्रम असल्याचा आरोप जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. ते
आज पत्रकार परिषदेत बोलत होते. महानगर पालिकेचे प्रशासक तथा
आयुक्त जी. श्रीकांत यांनी याकडे तत्काळ लक्ष देत, योग्य उपाय
योजना करण्याच्या सूचना पालकमंत्री शिरसाट यांनी केल्या आहेत.
****
श्रीलंकेत दित्वा चक्रीवादळामुळे झालेल्या दुर्घटनांमधल्या
मृतांचा आकडा ६९ वर पोहोचला असून, ३४ जण अजूनही बेपत्ता आहेत. श्रीलंकेच्या मदतीसाठी भारतानं ऑपरेशन सागर
बंधू ही मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान, हे चक्रीवादळ तामिळनाडूचा
उत्तर भाग,
पुदुच्चेरी, आणि आंध्र प्रदेशाच्या
दक्षिण भागाजवळ पोहोचण्याची शक्यता आहे. परिणामी तामिळनाडू, आंध्रप्रदेश, केरळ
आणि कर्नाटकाच्या दक्षिण भागातही जोरदार पावसाची शक्यता आहे.
****
हवामान
राज्यात आज सर्वात कमी १० पूर्णांक दोन अंश सेल्सियस तापमान
गोंदिया इथं नोंदवलं गेलं. नागपुरात अकरा, जळगाव इथं साडे अकरा तर
नाशिक तसंच अहिल्यानगर इथं सुमारे साडे बारा अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.
मराठवाड्यात परभणी इथं बारा, छत्रपती संभाजीनगर इथं साडे तेरा तर बीड
इथं चौदा अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.
****
No comments:
Post a Comment