Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 01 November 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ नोव्हेंबर
२०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी नागरिकांनी स्वतःला
समर्पित करावं-पंतप्रधानांचं आवाहन
·
सरदार पटेल यांची जयंती तसंच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी
यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातून अभिवादन; एकता दिनानिमित्तच्या विविध उपक्रमांना
नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
·
फलटण इथल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा एसआयटी
करणार तपास
·
'मिशन मौसम’ अंतर्गत परभणी विभागात नवीन सी-बँड रडार बसवण्याला केंद्राची
मंजुरी
आणि
·
दुसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर
चार गडी राखून विजय
****
विकसित
भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी नागरिकांनी स्वतःला समर्पित करावं, असं आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल
यांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंतीनिमित्त गुजराथमध्ये एकता नगर इथं राष्ट्रीय एकता दिवस
समारंभाला पंतप्रधानांनी काल संबोधित केलं. देशानं आज एकात्मतेची शपथ घेत, राष्ट्रीय एकतेला बळ देण्याचा संकल्प केल्याचं पंतप्रधान म्हणाले:
बाईट - पंतप्रधान
नरेंद्र मोदी
तत्पूर्वी, एकता नगर
इथं काल भव्य एकता दिवस संचलन करण्यात आलं. यामध्ये सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि विविध राज्यांतील पोलीस दलांच्या तुकड्यांचा समावेश
होता. हवाई दलाच्या 'सूर्य किरण' पथकानं
तिरंग्याची आकर्षक शौर्यगाथा प्रदर्शित केली. ‘विविधतेून एकता‘ या संकल्पनेवर दहा चित्ररथ
या संचलनात सहभागी झाले. त्यात महाराष्ट्राच्या चित्ररथाचाही समावेश होता. यानंतर उपस्थितांना
संबोधित करतांना, पंतप्रधानांनी, सरकारनं
२०१४ पासून नक्षलवाद आणि दहशतवादाच्या उच्चाटनासाठी निर्णायक प्रयत्न केल्याचं सांगितलं.
सर्व भारतीय भाषांचं संवर्धन करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार
केला, ते म्हणाले:
बाईट - पंतप्रधान
नरेंद्र मोदी
****
सरदार पटेल
यांची शतकोत्तर सुवर्ण जयंती देशभरात राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरी करण्यात आली.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्ली इथं सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला
पुष्पांजली वाहिली आणि देशवासियांना राष्ट्रीय एकता दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
सरदार पटेल
यांचा दृढ निर्धार आणि दूरदृष्टीमुळे विविधतेने नटलेला आपला देश लोकशाही प्रजासत्ताकात
एकत्र बांधला गेला, असं उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी समाज माध्यमावरील संदेशात
म्हटलं आहे.
****
माजी पंतप्रधान
दिवंगत इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल सर्वत्र त्यांच्या स्मृतींना अभिवादन
करण्यात आलं. ३१ ऑक्टोबर १९८४ साली दिल्लीत शासकीय निवासस्थानी अंगरक्षकाने केलेल्या
गोळीबारात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा मृत्यू झाला होता. लोकसभेचे विरोधी
पक्षनेते राहुल गांधी, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी तसंच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन
खर्गे यांनी ‘शक्तिस्थळ’ या समाधीस्थळी जाऊन इंदिरा गांधी यांना आदरांजली अर्पण केली.
****
सरदार वल्लभभाई
पटेल यांच्या जयंतीनिमित्त राज्यात सर्वत्र एकता दौड, पदयात्रा
यासह विविध कार्यक्रम घेण्यात आले.
परभणी शहरात
भाजपच्या वतीनं एकता दौड घेण्यात आली. जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी
गोमातेची पूजा करून एकता दौडचा प्रारंभ केला. परभणी पोलिसांच्या वतीनंही कृषी विद्यापीठ
गेट ते पोलीस कार्यालय अशी दौड घेण्यात आली. हिंगोली पोलिसांनीही एकता दौड घेऊन एकतेचा
संदेश दिला. व्यसनमुक्ती जनजागृतीपर अंमली पदार्थ विरोधी अभियानाचाही काल हिंगोलीत
शुभारंभ करण्यात आला.
छत्रपती
संभाजीनगर इथेही एकता पदयात्रा काढण्यात आली. तिचा समारोप राज्याचे इतर मागासवर्ग मंत्री
अतुल सावे यांच्या उपस्थितीत झाला. दौलताबाद इथं देवगिरी किल्ल्यावरही रन फॉर युनिटी
कार्यक्रम घेण्यात आला.
जालना इथं
जालना पोलिस दलाच्या वतीनं पाच किलोमीटर 'रन फॉर युनिटी' आयोजित
करण्यात आली होती. तर, बीड इथं पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यांच्या
उपस्थितीत “रन फॉर युनिटी” उपक्रम घेण्यात आला.
नांदेड
इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात इंदिरा गांधी आणि सरदार पटेल यांच्या
प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. नांदेड जिल्हा परिषदेत राष्ट्रीय
एकता दिनानिमित्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकता आणि अखंडतेची शपथ घेत देशाच्या प्रगतीसाठी
कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.
धाराशिव
जिल्ह्यातही भाजपाच्या वतीने घेण्यात आलेल्या एकता दौडला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
जिल्हा पोलीस दलातर्फे 'रन फॉर युनिटी तसंच वॉक फॉर युनिटी दौड घेण्यात आली.
****
फलटण इथं
झालेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या
नेतृत्वात विशेष तपास पथक अर्थात एसआयटी स्थापन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी पोलिस महासंचालकांना यासंबंधीचे आदेश दिले आहेत.
****
नैसर्गिक
आपत्तीत बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सरकार तातडीनं मदत पुरवत आहे. अतिवृष्टीमुळं बाधित
शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामात बियाणे आणि अनुषंगिक बाबींची खरेदी करण्यासाठी मदत
व्हावी यासाठी राज्य शासनानं विशेष मदत पॅकेज अंतर्गत, तीन हेक्टरच्या
मर्यादेत, प्रती हेक्टरी १० हजार रुपये प्रमाणे एक हजार सातशे
पासष्ट कोटी २२ लाख ९२ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. मदत आणि
पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी ही माहिती दिली.
****
'मिशन मौसम’
योजेनेंतर्गत परभणी विभागात नवीन सी-बँड रडार बसवण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने
मंजुरी दिली आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्रसिंह यांनी
पत्राद्वारे ही माहिती दिल्याचं राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी सांगितलं.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या म्हैसमाळ इथे सी-बँड प्रकारचा २५० किलोमीटर परिघ कार्यक्षेत्राचं
रडार बसवण्याचं काम सुरू असल्याचं बोर्डीकर यांनी सांगितलं. या केंद्रामुळे मराठवाड्यातल्या
शेती, पीक संरक्षण, हवामान पूर्वसूचना आणि
आपत्ती व्यवस्थापनाला मोठी मदत होणार आहे.
****
भारत आणि
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात सुरू असलेल्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतला दुसरा
सामना यजमान ऑस्ट्रेलियाने चार गडी राखून जिंकला. भारतीय संघाने दिलेलं १२५ धावांचं
आव्हान, यजमान संघानं १४ व्या षटकांत सहा गडी गमावत पूर्ण केलं.
या मालिकेतला
तिसरा टी ट्वेंटी सामना दोन नोव्हेंबरला होणार आहे. दरम्यान, महिला क्रिकेट
विश्वचषक स्पर्धेत भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातला अंतिम सामनाही याच दिवशी खेळवला
जाणार आहे.
****
नाशिक इथल्या
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार
यावर्षी प्रसिद्ध ओडिया कवी हरप्रसाद दास यांना जाहीर करण्यात आला आहे. दरवर्षी एका
अ-मराठी कवीला हा पुरस्कार दिला जातो. एक लाख रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र
असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. गेल्या वर्षीचा हा पुरस्कार नुकताच हिंदी कवी कुमार
अंबुज यांना प्रदान करण्यात आला.
****
लातूर जिल्ह्यात
उदगीर इथं काल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आणि स्मारकाचं
अनावरण करण्यात आलं. डॉ. आंबेडकर यांनी अंधारलेल्या समाजाला समतेचा दिवा देवून लोकशाहीच्या
मार्गाने चालण्याची दिशा दाखवली, भारतीय संविधानाच्या माध्यमातून त्यांनी
आपल्या समृद्ध लोकशाहीचा भक्कम पाया रचला, असं यावेळी मंत्री
बाबासाहेब पाटील म्हणाले. सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आमदार संजय बनसोडे, आमदार प्रताप पाटील चिखलीकर,
माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांची याप्रसंगी उपस्थिती होती.
****
कुंभमेळा
२०२७ च्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर, वेरूळ, पैठण आणि
आपेगाव या क्षेत्रांचा विकास आराखड्यासंदर्भात पालकमंत्री संजय शिरसाट यांनी काल आढावा
बैठक घेतली. नाशिक इथल्या आगामी कुंभमेळ्याच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या
विविध तीर्थक्षेत्रांना भाविकांकडून भेटी देण्याचा अंदाज असून त्या अनुषंगानं जिल्ह्यात
विविध सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत.
****
जालना जिल्ह्याच्या
मंठा तालुक्यात अतिवृष्टीबाधितांना जाहीर अनुदानाची रक्कम प्रशासनाला प्राप्त झाली
आहे. हे अनुदान लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा केलं जाईल, असं तहसीलदार
डॉक्टर प्रतिभा गोरे यांनी सांगितल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
****
बीडचा, गाळप परवाना
रद्द केलेला कडा सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करावा, या मागणीसाठी
काल ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. माजी आमदार
भीमराव धोंडे या आंदोलनात सहभागी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
आकाशवाणी
बीड केंद्रातील सहायक ग्रंथालय सूचना अधिकारी संजय काथवटे नियत वयोमानानूसार काल सेवानिवृत्त
झाले. काथवटे यांनी आपल्या 34 वर्षाच्या शासकीय सेवेत चंद्रपूर,
धुळे, सांगली आणि बीड केंद्रांवर ग्रंथपाल म्हणून
कार्य करत कार्यक्रम विभागातील सर्व जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या.
****
हवामान
राज्यात
आज मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली
आहे.
****
No comments:
Post a Comment