Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 12 December 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १२ डिसेंबर २०२० सकाळी ७.१० मि
****
**
शासकीय कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन पेहरावासंदर्भात
राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी
**
राज्यातल्या १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान; आचारसंहिता लागू
**
मिक्सोपॅथीच्या विरोधात भारतीय वैद्यक संघटना
-आयएमएची काल सर्वत्र बंद पाळून निदर्शनं
**
चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा
देणार - सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख
**
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज औरंगाबाद इथं विविध विकास कामाचा शुभारंभ
**
राज्यात काल चार हजार २६८ नवे कोविडग्रस्त; मराठवाड्यात दहा रुग्णांचा मृत्यू तर नव्या
२६३ रुग्णांची नोंद
आणि
**
परभणी इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी
जागा हस्तांतरीत करण्याचे प्रशासनाला निर्देश
****
राज्यातल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या
कार्यालयीन पेहरावासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने काल मार्गदर्शक सूचना जारी केली.
नियमित तसंच कंत्राटी स्वरूपातील अधिकारी, कर्मचारी आणि सल्लागार पुरुष कर्मचाऱ्यांनी
शर्ट, ट्राउझर, पॅन्ट तर महिला कर्मचाऱ्यांनी साडी, चुडीदार - कुर्ता, ट्राउझर पॅन्ट,
शर्ट तसंच आवश्यकता असल्यास दुपट्टा असा पेहराव ठेवावा. खादीला प्रोत्साहन देण्यासाठी
आठवड्यातून एकदा दर शुक्रवारी खादी कपड्यांचा पेहराव असावा. महिलांनी कार्यालयात शक्यतो
चप्पल, सॅन्डल, बूट, शूज यांचा तर पुरुषांनीही बूट, शूज, सॅन्डलचा वापर करावा. आपला
पेहराव स्वच्छ आणि नीटनेटका असावा याची दक्षता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घ्यावी,
अशा सूचना याबाबत जारी परिपत्रकात करण्यात आल्या आहेत. कार्यालयात जीन्स आणि टी-शर्टचा
वापर टाळावा, गडद रंगांचे चित्रविचित्र नक्षीकाम आणि चित्र छापलेले कपडे घालून कार्यालयात
येऊ नये, तसंच कार्यालयात स्लीपरचा वापर करू नये, असं या परिपत्रकात नमूद आहे.
****
राज्यातल्या
१४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगानं काल जाहीर केला.
त्यासाठीची आचारसंहिता लागू झाली असल्याचं, राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान
यांनी सांगितलं. या निवडणुकीसाठी २३ डिसेंबर ते ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल
करता येणार आहेत. ३१ डिसेंबरला उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार असून चार जानेवारी
पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. मतदान १५ जानेवारीला होणार असून, मतमोजणी १८ जानेवारीला
केली जाणार आहे. मराठवाड्यात निवडणुका होत असलेल्या चार हजार १३४ ग्रामपंचायतींमध्ये
औरंगाबाद जिल्ह्यातल्या ६१८, बीड १२९, नांदेड- एक हजार १५, उस्मानाबाद- ४२८, परभणी-
५६६, जालना- ४७५, लातूर-४०८, तर हिंगोली- जिल्ह्यातल्या ४९५ ग्रामपंचायतींचा समावेश
आहे.
दरम्यान, राज्यात छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण
कार्यक्रम सुरू आहे. त्याअंतर्गत मतदार नोंदणी, तसंच
दुरुस्तीसाठी आज आणि उद्या, १२ आणि
१३ तारखेला विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.
****
मिक्सोपॅथीच्या विरोधात भारतीय वैद्यक
संघटना - आयएमएनं काल राज्यभरात बंद पाळून आपला निषेध नोंदवला. आयुष मंत्रालयाकडून
आयुर्वेदीक डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्याची परवानगी नुकतीच देण्यात आली आहे. मात्र
या शस्त्रक्रिया फक्त तज्ज्ञ शल्यचिकित्सक करु शकतात. या परवानगी मुळे रुग्णांच्या
जीवावर बेतू शकतं, असं मत आयएमएनं व्यक्त केलं आहे.
औरंगाबाद इथं बहुतांश वैद्यकीय व्यावसायिकांनी
काल बंद पाळला. शहरातल्या मोठ्या खासगी रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांवरचे उपचार तसंच
अत्यावश्यक सेवा वगळता बाह्य रुग्ण विभागही काल बंद असल्याची माहिती आयएमएच्या औरंगाबाद
शाखेचे अध्यक्ष डॉ संतोष रंजलकर यांनी दिली. नांदेड इथं आयएमएच्या वतीनं जिल्हाधिकारी
कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली, डॉक्टरांच्या एका शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना
आपल्या विविध मागण्यांचं निवेदन सादर केलं.
उस्मानाबाद जिल्ह्यातले डॉक्टर संपात
सहभागी झाले, मात्र आपत्कालीन सेवा सुरू होती, असं आयएमएच्या उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष
डॉ. सचिन देशमुख यांनी सांगितलं.
मुंबईत महापालिकेच्या रुग्णालयातल्या
डॉक्टरांनी काल काळ्या फिती लावून काम केलं. तर ठिकठिकाणच्या आयुर्वेदिक तसंच होमिओपॅथीच्या
डॉक्टरांनी मात्र आयुष मंत्रालयाच्या या निर्णयाचं स्वागत करत, गुलाबी फिती लावून काम
केलं.
****
थॅलेसेमिया तसंच सिकलसेल यासारखे आजार
समूळ नष्ट करण्यासाठी संशोधन करण्याची आवश्यकता केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी यांनी
व्यक्त केली आहे. थॅलेसेमिया तसंच सिकलसेल जनजागृती सप्ताहांतर्गत ऑनलाईन एज्युकेशन
प्रोग्राम सिरीज या चर्चासत्राचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते काल करण्यात आलं, त्यावेळी
ते बोलत होते. सिकलसेलच्या रुग्णांना सातत्यानं रक्तांची आवश्यकता असते. त्यांना रक्ताचा
तुटवडा भासू नये यासाठी सिकलसेल रुग्णांची स्वतंत्र रक्तपेढी सुरू करता येईल का, याचा
विचार करावा, असंही गडकरी यांनी नमूद केलं.
****
कोरोना
विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन औरंगाबाद
महानगरपालिकेचे प्रशासक अस्तिककुमार पाण्डेय यांनी केलं आहे.
****
चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा
दर्जा देण्यासंदर्भातला प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात येणार असल्याचं
सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं आहे. ते काल मंत्रालयात याबाबतच्या
बैठकीत बोलत होते. या बैठकीला चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक मनीषा वर्मा यांच्यासह
अनेक पदाधिकारी तसंच अधिकारी उपस्थित होते. चित्रपट, मालिका, ओटीटी यांच्यासह रंगमंच,
लोककला, माहितीपट, जाहिरातपट यासाठीही एक धोरण आखण्यात येत असल्याची माहिती देशमुख
यांनी यावेळी दिली.
****
सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य
विभागाने ' महाशरद '
या दिव्यांग सहाय्यक उपकरणासंबंधीचं ॲप तयार केलं आहे. या विभागाचे
मंत्री धनंजय मुंडे यांनी ही माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष
खासदार शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज या डिजिटल प्लॅटफॉर्मचं लोकार्पण करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि
प्रशिक्षण संस्थेच्या ' ई-बार्टी ' या
ॲपचंही आज लोकार्पण होणार आहे.
****
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर
येत आहेत, औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करण्यासाठीच्या
नव्या जलवाहिनीसह विविध विकास कामाचा शुभारंभ आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
यामध्ये शहरातल्या मिटमिटा परिसरात प्राणी संग्रहालयासाठी सफारी पार्क, हिंदुह्रदयसम्राट
बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक तथा स्मृतीवन आणि शहरात सुरू असलेल्या तसंच प्रलंबित
१५२ कोटी रुपयांच्या रस्ते कामांचा शुभारंभही मुख्यमंत्री करणार आहेत. दुपारी एक वाजेदरम्यान
मुख्यमंत्र्यांचं औरंगाबाद इथं आगमन होईल. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत असलेल्या गरवारे
क्रीडा संकुलावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या चारही कामांचा शुभारंभ होईल. दुपारी सव्वा
दोन वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री मुंबईकडे प्रयाण करतील.
या कार्यक्रमासंदर्भात प्रशासनाच्या तयारीची माहिती जिल्हाधिकारी
सुनील चव्हाण, महानगरपालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय आणि पोलिस आयुक्त निखील गुप्ता
यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. कार्यक्रम ठिकाणी फक्त २०० निमंत्रितांना प्रवेश असेल.
नागरिकांनी याठिकाणी न येता सामाजिक संपर्क माध्यमांद्वारे या कार्यक्रमात सहभागी व्हावं,
असं आवाहन जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केलं आहे.
दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याच्या
पार्श्वभूमीवर दुपारी बारा वाजेपासून तीन वाजेपर्यंत या परिसरातली सर्वसामान्य वाहतुक
बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी या काळात पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचं आवाहन
वाहतुक शाखेकडून करण्यात आलं आहे.
****
दरम्यान,
एक हजार ६८० कोटी रुपयांच्या नव्या पाणी पुरवठा योजनेत औरंगाबाद महापालिकेचा वाटा ६३३
कोटी निर्धारित केला आहे. मात्र महापालिकेची आर्थिक परिस्थिती ही बिकट असून ही रक्कम
राज्य शासनानेच भरावी, अशी मागणी आमदार अतुल सावे यांनी केली आहे. ते काल औरंगाबाद
इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेला
मंजुरी दिली होती, मात्र तिचा शुभारंभ वर्षभरानंतर होत असल्याची टीका सावे यांनी केली.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोविड संसर्गाच्या
वाढत्या धोक्याची शक्यता लक्षात घेऊन सतर्कतेने सर्व उपाय योजना सुरू ठेवाव्यात, तसंच
जिल्ह्यातील विविध विकास योजनांची अंमलबजावणी विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री
सुभाष देसाई यांनी दिले आहेत. काल जिल्हाधिकारी कार्यालयात विकास कामांच्या आढावा बैठकीत
देसाई बोलत होते. विविध योजनांच्या सद्यस्थितीचा देसाई यांनी यावेळी आढावा घेतला.
****
राज्यात
काल चार हजार २६८ नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या
१८ लाख ७२ हजार ४४० झाली आहे. राज्यभरात काल ८७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला,
राज्यात या विषाणू संसर्गामुळे झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या ४८ हजार ५९ झाली
आहे. तर मृत्यू दर सध्या दोन पूर्णांक ५७ शतांश टक्के एवढा आहे. राज्यात काल २ हजार
७७४ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १७ लाख ४९ हजार
९७३ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा राज्याचा दर ९३ पूर्णांक
४६ शतांश टक्के एवढा झाला आहे. सध्या राज्यात ७३ हजार ३१५रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात
काल दहा कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा मृत्यू झाला, तर नवे २६३ रुग्ण आढळले.
बीड
जिल्ह्यात तीन, जालना तसंच नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी दोन, तर औरंगाबाद, उस्मानाबाद
आणि परभणी जिल्ह्यात काल प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्यात काल
७० नवे रुग्ण आढळले, लातूर जिल्ह्यात ५१, नांदेड ४३, उस्मानाबाद २८, जालना २४, परभणी
२३, बीड २२, तर हिंगोली जिल्ह्यात काल दोन नवे कोविडबाधित रुग्ण आढळले.
****
कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर
जेजुरी इथली खंडोबाची सोमवती अमावस्या यात्रा यंदा रद्द करण्यात आली आहे. सोमवती यात्रेनिमित्त
होणारा पालखी सोहळाही रद्द करण्यात आला आहे. १२ ते १४ डिसेंबरपर्यंत भाविकांना जेजुरीत
प्रवेश दिला जाणार नाही. मंगळवारनंतरच भाविक गडावर जाऊ शकणार आहेत.
****
लातूर
जिल्ह्यातल्या औस्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी नागरिकांना कोरोना विषाणू प्रादुर्भावापासून
बचावासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.
****
परभणी इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी
५० एकर जागा हस्तांतरीत करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. परभणीचे खासदार
संजय जाधव यांनी काल याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची भेट घेतली. देशमुख
यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाचे महासंचालक डॉ.तात्याराव लहाने आणि सचिव सौरभ विजय यांच्याशी
चर्चा केली. त्यानंतर देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या महाविद्यालयासाठी जागा हस्तांतरित
करण्याचे निर्देश दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
सोलापूर
जिल्ह्यात अंजनडोह इथं बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या जयश्री शिंदे यांच्या पतीला
वनविभागात नोकरी देण्याचं आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलं
आहे. भरणे यांनी काल या कुटुंबांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं, शिंदे कुटुंबियांना
वन विभागातर्फे पाच लाख रुपयांचा धनादेश यापुर्वी देण्यात आला आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या स्वातंत्र्यसैनिकांनी
आपल्या विविध मागण्यांसंदर्भात एक पत्रक जारी केलं आहे. स्वातंत्र्यसैनिकांची जन्मगावं
स्मार्ट गाव म्हणून घोषित करावीत, स्वातंत्र्य सैनिकांचे घर संरक्षित स्मारक म्हणून
जाहीर करावं, खऱ्या तसंच पात्र स्वातंत्र्य सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना एकाच
वेळी अनुदान रक्कम देऊन त्यांचा सन्मान करावा, आदी मागण्या या पत्रकातून करण्यात आल्या
आहेत. राज्य सरकार तथा केंद्र सरकारनं या मागण्यांची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी
करण्यात आली आहे.
****
औरंगाबाद
पोलीस मुख्यालयात कार्यरत पोलीस उप - निरीक्षक राजकुमार चांदणे याला सहा हजार रुपये
लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल अटक केली. पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या
दोन कर्मचाऱ्यांची रात्रपाळी न लावण्यासाठी चांदणे यानं प्रत्येकाकडून दोन हजार रुपये
लाचेची मागणी केली होती.
****
नांदेड-अमृतसर-नांदेड सचखंड
एक्सप्रेसच्या नव्या वर्षापासून बदल होणार आहे. येत्या १ जानेवारीपासून ही
विशेष गाडी अंबाला, चंदिगढ आणि सानवाल मार्गे धावेल. पूर्वी
ही गाडी अंबाला, सरहिंद, सानवाल या
मार्गाने धावत होती. या गाडीचा राजपुरा, आणि खन्ना
इथला थांबा रद्द करण्यात आला आहे. या गाडीच्या वेळेतही बदल करण्यात आला
असून, आता ही गाडी अमृतसरहून पहाटे चार वाजून २५ मिनिटांनी सुटेल, औरंगाबाद इथं दररोज
सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी पोहोचेल.
दरम्यान, आज ही गाडी दिल्ली ते
अमृतसर दरम्यान रद्द करण्यात आली आहे. उद्या ही गाडी दिल्लीहूनच नांदेडला परणार
आहे.
****
येत्या फेब्रुवारी महिन्यात इंग्लंडचा
क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात भारत आणि इंग्लंड संघादरम्यान
चार कसोटी, पाच टी ट्वेंटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिका खेळवल्या जाणार आहेत.
पाच फेब्रुवारीला पहिला कसोटी सामना चेन्नई इथं होणार आहे. १२ मार्च ते २० मार्च दरम्यान
पाच टी ट्वेंटी सामने अहमदाबाद इथं तर २३, २६ आणि २८ मार्चला होणारे एकदिवसीय सामने
पुण्यात खेळवले जाणार आहेत.
****////****
No comments:
Post a Comment