Sunday, 20 December 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 20.12.2020 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20 December 2020

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २० डिसेंबर २०२० सकाळी ७.१० मि

****

·      देशातल्या कोविडबाधितांची संख्या एक कोटीवर; संसर्गमुक्तीचं प्रमाण ९५ पूर्णांक ४६ शतांश टक्के.

·      राज्यात तीन हजार ९४० नवे कोविडग्रस्त; मराठवाड्यात नव्या अडीचशे रुग्णांची नोंद.

·      राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ विचारवंत - पत्रकार मा गो वैद्य यांचं निधन.

·      येत्या पाच वर्षांत १७ हजार मेगावॅट सौरऊर्जा निर्मितीचं उद्दीष्ट उद्योग क्षेत्राला पूरक - ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत.

·      अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक आजपासून दोन दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर.

·      शाश्वत विकासासाठी मराठवाड्यातल्या चारही विद्यापीठांनी किमान समान कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा - कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांचं आवाहन.

·      परभणी इथला हजरत सय्यद शाह तुराबुल हक साहेब यांचा ऊर्स कोविड पार्श्वभूमीवर रद्द.

आणि

·      ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटीत भारताचा दारूण पराभव; भारतीय संघाकडून निच्चांकी धावसंख्येचा विक्रम.

****

देशात कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येनं एक कोटीचा आकडा पार केला आहे. काल सकाळी संपलेल्या २४ तासांत देशात नव्या २१ हजार १५३ रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे देशातली एकूण रुग्णसंख्या एक कोटी चार हजार ५९९ इतकी झाली आहे. काल ३४७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, देशात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत एक लाख ४५ हजार १३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल २९ हजार ८८५ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. देशात आतापर्यंत ९५ लाख ५० हजार ७१२ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, हे प्रमाण ९५ पूर्णांक ४६ शतांश टक्क्यांवर पोहोचलं आहे. तर या संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण १ पूर्णांक ४५ शतांश टक्के एवढं आहे.

****

राज्यात काल तीन हजार ९४० नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १८ लाख ९२ हजार ७०७ झाली आहे. काल ७४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या विषाणू संसर्गामुळे दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ४८ हजार ६४८ झाली आहे. तर मृत्यू दर सध्या दोन पूर्णांक ५७ शतांश टक्के इतका झाला आहे. काल तीन हजार १११ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १७ लाख ८१ हजार ८४१ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, राज्याचा कोविडमुक्तीचा दर ९४ पूर्णांक १४ शतांश टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात ६१ हजार ०९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल तीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या अडीचशे रुग्णांची नोंद झाली. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या दोन तर, बीड जिल्ह्यातल्या एका कोविडग्रस्ताचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात काल ६२ नवे रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात ५५, लातूर ४८, बीड २८,  उस्मानाबाद २०, परभणी १६, जालना १४, तर हिंगोली जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले सात नवे रुग्ण आढळले.

****

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ विचारवंत पत्रकार, माधव गोविंद उपाख्य मा गो वैद्य यांचं काल दुपारी नागपूर इथं निधन झालं. ते ९७ वर्षांचे होते. १९४३ सालापासूनच संघाचे सक्रिय स्वयंसेवक असलेल्या वैद्य यांनी, १९६६ पासून अनेक वर्षे पत्रकारिता केली. १९७८ ते १९८४ या कालावधीत ते राज्य विधान परिषदेचे सदस्य होते. शिक्षण, समाजकारण, संस्कृती आणि राजकारण असं बहुआयामी जीवन जगणाऱ्या वैद्य यांची विविध विषयांवरची १९ पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. दैनिक तरुण भारतच्या संपादकपदाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली. पत्रकारिता तसंच सामाजिक कार्यासाठी त्यांना ११ पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या पार्थिव देहावर आज नागपूर इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.

वैद्य यांच्या निधनानं, संघ कार्यकर्ते आपल्या ज्येष्ठ छायाछत्राला मुकले, या शब्दांत संघानं वैद्य यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी जारी केलेल्या शोकसंदेशात वैद्य यांच्या जीवनकार्याचा गौरव करण्यात आला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही वैद्य यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. वैद्य यांनी आपल्या विचारांमधून तसंच प्रखर लेखणीतून अनेक राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय विषयांवर समाजाचं सातत्यपूर्ण प्रबोधन केलं, या शब्दांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वैद्य यांच्या कार्याला उजाळा दिला. त्यांच्या निधनानं विदर्भातला ज्ञानदीप मालवला, असं राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.

एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व हरपलं, अशी शोकभावना, विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली, तर देशेसेवेसाठी संघर्ष करणारं झंझावाती वादळ शांत झालं, या शब्दांत भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

****

शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचं काल निधन झालं, ते ७२ वर्षांचे होते. गोव्याला कामानिमित्त गेले असता तिथंच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचं निधन झालं. भारतीय विद्यार्थी सेनेचे ते अध्यक्ष होते. दक्षिण मध्य मुंबईतून ते सलग पाच वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. रावले यांच्या निधनाबद्दल शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

****

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने कोरोना विषाणू संसर्गा विषयी जनजागृती मोहीम सुरु केली आहे. कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी मास्क लावणं, वारंवार हात धुणं आणि एकमेकात सुरक्षित सामाजिक अंतर राखण्याचं आवाहन मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांनी केलं आहे.

****

राज्याचं येत्या पाच वर्षांत सौर प्रकल्पांच्या माध्यमातून १७ हजार ३८५ मेगावॅट वीज निर्मितीचं उद्दीष्ट असून, राज्याच्या उद्योग क्षेत्राला हे धोरण पूरक असल्याचं ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी म्हटलं आहे. कॉन्फेडरेशन ऑफ इंडीयन इंडस्ट्रीज - सीआयआयच्या ‘कार्बनविरहित औद्योगिक वाढ - नूतनीकरण मार्ग’ या ऑनलाइन परिषदेत ते बोलत होते. या धोरणांर्गत उद्योग आणि शेतीला स्वस्त दरात वीज उपलब्ध करून देण्यात येणार असल्यानं राज्याच्या आर्थिक क्षेत्रात क्रांती घडून येईल, असं राऊत यांनी नमूद केलं. या धोरणाअंतर्गत कृषी पंपांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी येत्या ५ वर्षांत पाच लाख सौर कृषी पंप देण्याचे उद्दीष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. 

****

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक आजपासून दोन दिवस  मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहे. आज दुपारी तीन वाजता औरंगाबाद विभागीय आयुक्तालयात या पथकासमोर नुकसानाचं सादरीकरण करण्यात येणार आहे. उद्या हे पथक औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी करणार आहे.

****

सुधारित कृषी कायदे हे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकार घेत असलेल्या निर्णयाचा एक भाग आहेत, या राष्ट्र हिताच्या कायद्यांचं सर्वांनी स्वागत करावं, असं आवाहन लातूरचे खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी केलं आहे. ते काल लातूर इथं बोलत होते. या कायद्यांना काहीजण राजकीय हेतूने विरोध करत असल्याचा आरोप, श्रृंगारे यांनी केला. सरकारने आजपर्यंत कृषीसंदर्भात घेतलेल्या निर्णयांचा श्रृंगारे यांनी आढावा घेतला.

****

मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी आमदार अशोक उर्फ भाई जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीनं काल त्यांच्या नावाची घोषणा केली. माजी आमदार चरणसिंग सप्रा यांची कार्यकारी अध्यक्षपदी तर नसीम खान यांची मुंबईच्या प्रचार समिती अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई प्रदेश काँग्रेसच्या विविध समित्यांवरील अध्यक्ष आणि सदस्यांची घोषणाही काल करण्यात आली.

****

५१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवल्या जाणाऱ्या विविध भाषांमधल्या २३ चित्रपटांची तसंच २० लघुपटांची घोषणा काल करण्यात आली. ‘सांड की आंख’ आणि ‘छिछोरे’ या हिंदी चित्रपटांसह ‘प्रवास’ या मराठी चित्रपटाचा यात समावेश आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबत माहिती दिली. हा महोत्सव येत्या जानेवारी महिन्यात गोव्यात होणार आहे.

****

शाश्वत विकासासाठी मराठवाड्यातल्या चारही विद्यापीठांनी एकत्रित येऊन किमान समान कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्याचं आवाहन, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी केलं आहे. ‘महात्मा गांधी मिशन’च्या ३८ व्या स्थापना दिनानिमित्त काल मराठवाड्यातल्या कुलगुरुंच्या परिषदेत ते बोलत होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या परिषदेत ‘मराठवाड्याच्या शाश्वत विकासात विद्यापीठांची भूमिका’ या विषयावर मान्यवर कुलगुरुंनी विचार मांडले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.अशोक ढवण, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.उध्दव भोसले, ‘एमजीएम’विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.सुधीर गव्हाणे, विश्वस्त प्राचार्य डॉ.प्रताप बोराडे यांच्यासह अनेक मान्यवर या परिषदेत सहभागी झाले. हे विचार मंथन म्हणजे, सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं विद्यापीठांनी टाकलेलं पहिलं आश्वासक पाऊल आहे. ही सुरुवात अत्यंत सकारात्मक तसंच आशादायक असल्याचं मत डॉ.सुधीर गव्हाणे यांनी व्यक्त केलं.

****

परभणी जिल्हा प्रशासनानं यंदा हजरत सय्यद शाह तुराबुल हक साहेब यांचा ऊर्स रद्द केला आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव अद्यापही संपलेला नाही, या विषाणू संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं, जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. ३१ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान हा ऊर्स होणार होता.

****

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा आठ गडी राखून पराभव झाला. ॲडलेड इथं झालेल्या या सामन्यात काल तिसऱ्या दिवशी भारतीय संघानं अत्यंत सुमार फलंदाजी करत, आजवरच्या निच्चांकी धावसंख्येचा विक्रम नोंदवला. दुसऱ्या डावात भारताचे सर्व फलंदाज अवघ्या ३६ धावात तंबुत परतले. गेल्या ६५ वर्षांत जगातल्या कोणत्याही क्रिकेट संघानं कसोटी सामन्यात केलेली ही निच्चांकी धावसंख्या आहे. भारतीय फलंदाजांपैकी मयंक अग्रवालनं सर्वाधिक ९ धावा केल्या, हनुमा विहारीनं ८, तर कर्णधार विराट कोहलीनं ४ धावा केल्या. फलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे ऑस्ट्रेलिया संघासमोर विजयासाठी फक्त ९० धावांचं लक्ष्य होतं, ते त्यांनी दोन गड्यांच्या बदल्यात सहज साध्य केलं. मालिकेतला पुढचा कसोटी सामना पुढच्या शनिवारी २६ तारखेला मेलबर्न इथं होणार आहे.

****

लातूर इथल्या राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलच्या पी हरिकृष्ण या विद्यार्थ्याने टेबल टेनिस या क्रीडा प्रकारात जागतिक विक्रम नोंदवला आहे. हरिकृष्णने एका तासात न थांबता पेडलच्या साह्याने ९ हजार ५१२ स्ट्रोक यशस्वीपणे पूर्ण केले. त्याच्या या विक्रमाची गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद घेण्यात आली. याबाबतचं प्रमाणपत्र गिनीज वर्ल्ड च्या वतीनं त्याला प्रदान करण्यात आलं आहे. या यशाबद्दल  राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलच्या वतीनं काल हरिकृष्णचा सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्याचे प्रशिक्षक प्रविण शिवनगीकर यांचंही विशेष कौतुक करण्यात आलं.

****

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन औरंगाबाद जिल्ह्यातले लोककलावंत जालिंदर केरे यांनी केलं आहे. 

****

परभणी महानगरपालिकेच्या वतीने शहरात प्लास्टिक मुक्ती मोहीम राबवण्यात येत आहे. महानगरपालिकेचे आयुक्त देविदास पवार यांच्या आदेशावरून काल वसमत रस्त्यावरच्या पाच दुकानातून प्लास्टीक कॅरीबॅग, ग्लास, पिशव्या तसंच इतर वस्तू जप्त करण्यात आल्या. या पाच दुकानदारांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड लावण्यात आला. उघड्यावर कचरा फेकणाऱ्या चार व्यक्तींनाही काल प्रत्येकी दोनशे रुपये दंड ठोठावण्यात आला.

****

औसा तालुक्यात बेलकुंड इथल्या संत मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याला कर्ज परतफेड करण्यासाठी ९ वर्षांची मुदत दिली असून, सुरवातीची दोन वर्ष हप्ता भरण्यासही मुभा दिली आहे. गेल्या अनेक वर्षापासून बंद असलेला हा साखर कारखाना, कर्जापोटी लातूर जिल्हा बँकेच्या ताब्यात होता, शासनाने थकहमी घेतल्यानं, जिल्हा बँकेने या कारखान्याचा ताबा संचालक मंडळाकडे दिला आहे.

****

नांदेड जिल्ह्याच्या भोकर तसंच हदगाव तालुक्यात राज्य सहकारी कापुस उत्पादक पणन महासंघाच्या खरेदी केंद्रावर कापूस खरेदी सुरु आहे. शेतकऱ्यांनी संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नोंदणी करावी, आणि बाजार समितीचा एसएमएस मिळाल्यावर संबंधीत केंद्रावर कापूस विक्रीसाठी आणावा, असं आवाहन पणन महासंघाच्या नांदेड विभागीय व्यवस्थापकांकडून करण्यात आलं आहे. एफ.ए.क्यू दर्जाचा कापूस शेतकऱ्यांच्या घरी शिल्लक असेपर्यंत कापूस पणन महासंघाकडून खरेदी सुरू राहणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

चारित्र्याच्या संशयावरून गर्भवती पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला परभणी जिल्हा आणि सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. लक्ष्मण काशीनाथ चांडाळ असं या इसमाचं नाव असून, त्याने ११ ऑगस्ट २०१८ रोजी पत्नी कांचन हिची डोक्यात दगड घालून हत्या केली होती.

****

अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाच्या नाटयशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ संपदा कुलकर्णी यांची रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाच्या सदस्यपदी फेर नियुक्ती झाली आहे. याबद्दल योगेश्वरी शिक्षण संस्थेतल्या सर्व पदाधिकारी, संचालक, तसंच प्राध्यापक वर्गानं डॉ कुलकर्णी यांचं अभिनंदन केलं आहे

****

औरंगाबाद शहरातली नेहरू भवन ही इमारत पाडून याठिकाणी भव्य व्यावसायिक संकुल विकसित करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. यासंबंधीचा प्रकल्प विकास आराखडा तयार झाला आहे.

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 13 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 13 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...