Friday, 26 April 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:26.04.2024 रोजीचे सकाळी: 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 26 April 2024

Time: 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २६ एप्रिल २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या 

·      लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्यात मतदानाला प्रारंभ;राज्यात नांदेड, परभणी, हिंगोलीसह आठ मतदार संघात २०४ उमेदवारांमध्ये लढत

·      चौथ्या टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली;बीड-जालना आणि औरंगाबाद लोकसभा मतदार संघासह राज्यात अकरा मतदारसंघात ६१८ अर्ज दाखल

·      आचारसंहिता भंग प्रकरणी निवडणूक आयोगाची, ज्येष्ठ भाजप नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस

आणि

·      राजकीय पक्षांच्या प्रचाराला वेग-प्रशासकीय यंत्रणेकडूनही मतदार जागृतीसाठी विविध उपक्रमांचं आयोजन

सविस्तर बातम्या

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्यातल्या मतदानाला नुकतीच सुरुवात झाली. या टप्प्यात १३ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या ८८ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यामध्ये राज्यातल्या नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ-वाशिम या मतदारसंघांचा समावेश आहे. राज्यातल्या आठ मतदारसंघात एकूण २०४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मतदारसंघात एकूण १६ हजार ५८९ मतदान केंद्र उभारण्यात आली असून, सर्वाधिक दोन हजार २९० मतदान केंद्रं परभणीत तर सर्वात कमी एक हजार ९६२ मतदान केंद्र बुलडाण्यात आहेत.

 

हिंगोली लोकसभा मतदार संघात १९ आदर्श मतदान केंद्र, तर सात महिला कर्मचारीद्वारे संचलित सखी आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत. हिंगोली मतदारसंघातून महायुतीचे बाबुराव कदम कोहळीकर आणि महाविकास आघाडीचे नागेश पाटील आष्टीकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

परभणी मतदार संघात दोन हजार २९० मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. या मतदारसंघातून महायुतीकडून महादेव जानकर, तर महाविकास आघाडीकडून संजय जाधव निवडणूक लढवत आहेत.

नांदेड जिल्ह्यात दोन हजार ६८ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, १० हजार ६०० हून अधिक कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. संवेदनशील केंद्रांसह ५० टक्के मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग यंत्रणा बसवण्यात आली आहे. या मतदारसंघात महायुतीचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर, तर महाविकास आघाडीकडून वसंतराव चव्हाण निवडणूक लढवत आहेत.

यवतमाळ -वाशिम मतदार संघात दोन हजार २२५ मतदान केंद्र असून, एकूण १९ लाख ४० हजार ९१६ मतदार आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघात दोन हजार ६५ मतदान केंद्रांवर मतदान होत असून,  एकूण १८ लाख ७५ हजार ६३७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

आज दिवसभर हवामानाची स्थिती सामान्य राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला असल्यानं, मतदारांना मतदानाच्या वेळी तीव्र हवामानाचा त्रास भासणार नाही. मतदारांच्या सोयीसाठी सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक व्यवस्था करण्यात आल्या आहेत.

मतदारांनी मतदान केंद्रांवर मोठ्या संख्येने उपस्थिती लावून जबाबदारीने मतदान करावं, असं आवाहन निवडणूक आयोगानं केलं आहे.

****

निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत काल संपली. यामध्ये राज्यातल्या औरंगाबाद, जालना, बीडसह अकरा मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघात एकूण ४४७ उमेदवारांचे ६१८ अर्ज दाखल झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली. औरंगाबाद लोसकभा मतदारसंघात ५१ उमेदवारांचे ७८ अर्ज दाखल झाले. जालना - ४७ उमेदवारांचे ६८ अर्ज, बीड लोकसभा मतदारसंघात ७६ उमेदवारांचे ९९ अर्ज, नंदुरबार - १८ उमेदवारांचे ३१ अर्ज, जळगाव- २४ उमेदवारांचे ३६ अर्ज, रावेर - ३१ उमेदवारांचे ४५ अर्ज, मावळ - ३८ उमेदवारांचे ५० अर्ज, पुणे- ४२ उमेदवारांचे ५८ अर्ज, शिरूर- ४६ उमेदवारांचे ५८ अर्ज, अहमदनगर- ४३ उमेदवारांचे ५५ अर्ज, तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात ३१ उमेदवारांचे ४० अर्ज दाखल झाले आहेत.

औरंगाबाद लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांनी काल मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते रावसाहेब दानवे तसंच डॉ भागवत कराड यांच्या उपस्थितीत काल अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी काल दुसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला. पिपल्स पार्टी ऑफ इंडियाचे नारायण जाधव, अपक्ष उमेदवार जीवन राजपूत, मनोज घोडके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

जालना लोकसभा मतदार संघात एकूण १९ उमेदवारांनी २८ अर्ज दाखल केले आहेत.

बीड इथं काल ५५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, आतापर्यंत एकूण ९९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी काल १७ उमेदवारांनी २१ अर्ज भरले तर रावेर लोकसभा मतदार संघासाठी ११ उमेदवारांनी १८ अर्ज दाखल केले. या दोन्ही मतदार संघातून महायुतीच्या अनुक्रमे स्मिता वाघ आणि रक्षा खडसे यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला.

दरम्यान, कालपर्यंत दाखल झालेल्या या अर्जांची आज छाननी होणार असून २९ तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. या टप्प्यासाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे.

****

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याची अधिसूचना आजपासून लागू होत आहे. यामध्ये राज्यातल्या धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतल्या सहा मतदारसंघांचा समावेश आहे. या टप्प्यात आजपासून तीन मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून, चार मे रोजी अर्जांची छाननी होणार आहे. सहा मे पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असून, २० मे रोजी मतदान होणार आहे. 

****

उत्तर-मध्य मुंबई मतदार संघातून काँग्रेस पक्षाकडून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष के. सी. वेणुगोपाल यांनी काल याबाबत पत्रक जारी केलं.

****

आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. यासंदर्भात आयोगानं दोन्ही नेत्यांना २९ एप्रिलपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी निवडणूक प्रचारादरम्यन, धर्म, जात, समुदाय किंवा भाषेच्या आधारावर द्वेष आणि फूट निर्माण केल्याचा आरोप करत आयोगानं ही नोटीस बजावली आहे.

****

राज्यात होणाऱ्या मतदानाचा आढावा घेणारा विशेष रेडिओ ब्रिज कार्यक्रम, मतदानाचा मागोवा, आज आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरुन ऐकता येईल.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा आढावा घेणारा लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम, आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

६० व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्रवेशिका सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ३१ मे पर्यंत प्रवेशिका सादर करता येणार आहेत. निर्मात्यांनी सन २०२२ या वर्षात सेन्सॉर प्राप्त झालेल्या मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका दिलेल्या मुदतीत सादर करण्याचं आवाहन महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी केलं आहे.

****

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांच्या प्रचारार्थ काल मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा झाली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल अहमदनगर इथं महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ सभा घेतली.

****

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा काल पुण्यात प्रसिद्ध झाला. शपथनामा नावानं प्रसिद्ध झालेल्या या जाहीरनाम्यात जातनिहाय जनगणना, कृषी कल्याण आयोगाची स्थापना, महिलांना नोकऱ्यांमध्ये ५० टक्के आरक्षण, शिकाऊ उमेदवार म्हणून नोकरीचा अधिकार, याबरोबरच जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याला पूर्ण पाठिंबा या मुद्द्यांचा समावेश आहे. नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणी, दहशतवादाविरोधातला युएपीए कायदा इत्यादी कायद्यांचा फेर आढावा घेऊन त्यात बदल करण्याचं आश्वासन पक्षानं जाहीरनाम्यातून दिलं आहे.

****

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं देखील काल जाहीरनामा प्रसिद्ध केला. शेतकरी केंद्रबिंदू असलेला हा जाहीरनामा शेतमालाला हमीभाव देणारा असल्याचं पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं, राज्यात उद्योगस्नेही वातावरण तयार करणं, शेतकऱ्यांना शीतगृह, गोदाम बांधून देणं आदींचा या जाहीरनाम्यात समावेश आहे.

****

धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथं काल मतदान जनजागृती फेरी काढण्यात आली. शहरातल्या २४ शाळा, महाविद्यालयातले जवळपास दोन हजार ४०० विद्यार्थी सहभागी झाले होते. 

****

लातूर तालुक्यातल्या मुरूड इथं देखील काल मतदार जनजागृती फेरी काढण्यात आली. या फेरीत चित्ररथासह, पोवाडा आणि पथनाट्याच्या माध्यमातून नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं.

****

लातूर जिल्ह्यात बोगस बियाणं तसंच खतांची विक्री होवू नये, यासाठी पथक स्थापन करून आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी दिल्या आहेत. खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठकीत त्या काल बोलत होत्या. शेतकऱ्यांना विविध पिकांच्या पेरणीची योग्य वेळ आणि पद्धत, पिकांवरील रोग, त्यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना याविषयी माहिती देण्यासाठी, कृषी विभागानं विशेष मोहीम राबवण्याची सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली. २० एप्रिलपर्यंत जिल्ह्यात ७७ हजार ३५३ मेट्रीक टन रासायनिक खते उपलब्ध झाली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

****

नांदेडहून आज सुटणारी नांदेड - अमृतसर सचखंड एक्स्प्रेस तिच्या निर्धारित वेळेत सकाळी साडेनऊ ऐवजी दुपारी तीन वाजता सुणार आहे. तर नांदेड - जम्मू तावी हमसफर एक्सप्रेस आज सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांऐवजी सायंकाळी सहा वाजता सुटेल. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली. 

****

छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात काल अवकाळी पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरात काल रात्री मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता.

****

No comments: