आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२४ जुलै २०२० सकाळी ११.०० वाजता
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या ७४
रुग्णांचे अहवाल आज सकाळी कोरोनाबाधित आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातल्या कोविडग्रस्तांची
एकूण संख्या आता १२ हजार ४२१ झाली आहे. त्यापैकी ७ हजार १७८ रुग्ण बरे झाले, तर ४२६
रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात ४ हजार ८१७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
परभणी जिल्ह्यात आज दोन कोविडग्रस्तांचा
मृत्यू झाला. यापैकी एक ५० वर्षीय कोविडग्रस्त परभणी शहरात फिरोज टॉकीज परिसरातला तर
दुसरा ५२ वर्षीय कोविडग्रस्त पूर्णा शहरातला रहिवासी असल्याचं, आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
दरम्यान, राज्यात काल आणखी
नऊ हजार ८९५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या
आता तीन लाख ४७ हजार ५०२ झाली आहे.
****
गणपती उत्सवासाठी कोकणात
जाण्यासाठी बोरीवली, वसई, पनवेल, दिवा मार्गे विशेष गाडी सोडण्याची विनंती भाजप खासदार
गोपाळ शेट्टी यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. महाराष्ट्र
शासनाने सहमती दिल्यास कोरोना विषाणूचे नियम पाळून विशेष रेल्वे गाडी चालवण्यास केंद्राची
संमती असल्याचं आश्वासन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिलं असल्याचंही शेट्टी यांनी
या पत्रात नमूद केलं आहे.
****
लातूर शहराला पाणीपुरवठा
करणाऱ्या धनेगाव इथल्या मांजरा प्रकल्पात पाणीसाठा वाढत आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या
पहिल्या पंधरवड्यापासून शहरात सात दिवसाआड पाणी देता येईल का यासाठी नियोजन आणि चाचपणी
करण्याचे आदेश महापौर विक्रांत गोजमगुंडे आणि उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी महापालिका
प्रशासनास दिले आहेत. सध्या या प्रकल्पातला पाणीसाठा २७ पूर्णांक ९० दशलक्ष घनमीटर
इतका झाला आहे.
****
विजापूर आंतरराष्ट्रीय विमानतळ
उभारणीला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. या विमानतळाचा फायदा सांगली, सोलापूर तसंच
सीमाभागातल्या इतर जिल्ह्यांना होणार आहे. जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट - जेएनपीटीच्या
धर्तीवर सांगली जिल्ह्यातील रांजणी इथं ड्रायपोर्ट उभारण्याची तयारी सुरू आहे.
****
सांगली जिल्ह्यातल्या जतचे
माजी आमदार मधुकर कांबळे यांचं अल्पशा आजारानं सांगलीत निधन झाले.
****
No comments:
Post a Comment