Tuesday, 13 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 13.12.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 13 December 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १३ डिसेंबर  २०२२ सकाळी ७.१० मि.

****

·      जी -२० च्या विकास कार्य गटाची आजपासून मुंबईपहिली बैठक

·      महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्र्यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी अहमदाबादमध्ये भेट

·      महापुरुषांबद्दल  कथित अवमानकारक वक्तव्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र

·      उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची महापुरुषांबद्दल अनावधानाने केलेल्या विधानाबद्दल पुन्हा एकदा माफी

·      माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या जामीनाला १० दिवसांसाठी स्थगिती

·      शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगापुढे आता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी

णि

·      महाराष्ट्र फाउंडेशनचा ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांना साहित्य जीवनगौरव पुरस्कार जाहीर, भूमिहिनांच्या हक्कासाठी केलेल्या कार्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते शांताराम पंदेरे यांना विशेष पुरस्कार

****

जी -२० च्या भारताच्या अध्यक्षतेखालील विकास कार्य गट- डेव्हलमेंट वर्किंग ग्रुपची पहिली बैठक आजपासून मुंबईहोणार आहे. या बैठकीसाठी मुंबईत दाखल झालेल्या सर्व देशी-विदेशी पाहुण्यांचं महाराष्ट्रीयन पद्धतीनं स्वागत झालं. त्यांच्या स्वागताचे फलक संपूर्ण मुंबईत जागोजागी झळकले आहेत. गेल्या दशकामध्ये आलेल्या आर्थिक संकटानंतर जी २० मध्ये डेव्हलमेंट वर्किंग ग्रुप स्थापन झाला. २०३० पर्यंत शाश्वत विकासाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ठरवलेली लक्ष्य गाठण्याच्या दृष्टीने हा समुह कार्यरत आहे.

याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी

‘‘मुंबईत सुरू होणाऱ्या तीन दिवसीय बैठकीच्या पहिल्या दिवशी आज २ महत्त्वपूर्ण सत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे. यात २०३० पर्यंत शाश्वत विकासाचं उद्दिष्ट साध्य करताना त्यात जी २० ची भूमिका आणि डेटा यावर एक चर्चासत्र होईल. दुसऱ्या सत्रात जीवनशैलीतील बदलातून हरित विकास साध्य करण्यासाठीच्या प्रयत्नांवर चर्चा होईल.  इंटरनेट ऑफ थिंग्ज, बिग डेटा, आर्टिफिशियल इंटिलिजन्स यासारख्या विषयांवरही आजच्या सत्रात मार्गदर्शन केलं जाईल. या बैठकीसाठी मुंबईत आलेल्या पाहुण्यांना महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा, हस्तकला आणि नृत्य यांचाही अनुभव घेता येईल. गेट वे ऑफ इंडिया आणि कान्हेरी लेण्यासारख्या ऐतिहासिक स्थानांना भेटी देऊन या पाहुण्यांना देशाचा समृद्ध इतिहास जाणून घेण्याचीही संधी मिळेल.’’

आकाशवाणी बातम्यांसाठी मुंबईहून जीवन भावसार

****

महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद सुरु असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची काल अहमदाबाद विमानतळावर भेट झाली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये सीमावादावर चर्चा झाल्याचं वृत्त आहे. दोन्ही बाजूंनी प्रक्षोभक विधानं न करण्याची काळजी घेण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते.

****

महापुरुषांबद्दल केलेल्या कथित अवमानकारक वक्तव्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून आपली भुमिका स्पष्ट केली. महापुरुषांचा अनादर करण्याचा विचार आपल्या स्वप्नातही येणार नाही, मात्र आपल्या भाषणातला काही भाग सोयिस्कररित्या समाजापुढे मांडून त्याचं राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं, राज्यपालांनी या पत्रात म्हटलं आहे.

****

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील महापुरुषांबद्दल अनावधानाने झालेल्या विधानाबद्दल काल पुन्हा एकदा माफी मागितली. याबाबत एक संदेश जारी करून त्यांनी, महापुरुषांविषयी बोलताना आपल्याकडून बोली भाषेतले शब्द अनवधानाने निघाले, यात कोणालाही दुखवायचा हेतू नव्हता, असं स्पष्ट केलं. शाई फेक झाल्यानंतर घडलेल्या घटनांबाबत आपली कोणाबद्दलही तक्रार नाही, या मुद्द्यावरून महाराष्ट्र अशांत होऊ नये असं वाटतं, त्यामुळे आता हा वाद थांबवावा असं आवाहन पाटील यांनी केलं.

****

दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि सत्ताधारी मंत्र्यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या विरोधात काल बीड शहरात बंद पाळण्यात आला. शिवप्रेमींनी शहरातून याविरोधात रॅली काढली. यावेळी जिल्हाधिकार्यांमार्फत सरकारला निवेदन देण्यात आलं.

****

निर्भया निधीतून खरेदी केलेली वाहनं महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातच मंत्र्यांच्या ताफ्यात दिली गेली, असं भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सांगितलं. त्या काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होत्या. महाविकास आघाडी सरकारने निर्भया निधीतून २२० वाहनं खरेदी केली होती, यातली १२१ वाहनं फेब्रुवारी २०२२ मध्ये मुंबईतल्या ९४ पोलीस ठाण्यांना देण्यात आली, तर ९९ वाहनं मे २०२२ मध्ये राज्य सरकारच्या वेगवेगळ्या विभागांना देण्यात आली. खासदार सुप्रिया सुळे यांच्या सुरक्षा ताफ्यातही याच निधीतून खरेदी केलेली वाहनं होती, असंही वाघ यांनी सांगितलं. ही सर्व वाहनं पुन्हा निर्भया पथकात दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून आठवडाभरात ती पूर्ण होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

****

शिंदे-फडणवीस सरकारनं चार महिन्यातच राज्याचा नावलौकिक रसातळाला मिळवला असल्याची टीका, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. राज्यात महापुरुषांचा अपमान सातत्याने केला जात असूनही कारवाई होत नसल्याचं ते म्हणाले. महापुरुषांच्या अपमानासह राज्यातल्या विविध समस्यांप्रश्नी महाविकास आघाडी येत्या १७ तारखेला मुंबईत महामोर्चा काढून सत्ताधाऱ्यांना जाब विचारणार असल्याचं पटोले यांनी सांगितलं. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन अनेक वर्षांच्या कालखंडानंतर होत आहे. हे अधिवेशन किमान तीन आठवड्यांचं असावं अशी काँग्रेसची मागणी असल्याचं ते म्हणाले.

****

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे, मात्र आपल्या या निर्णयाला न्यायालयानं पुढच्या १० दिवसांसाठी स्थगिती दिली आहे. देशमुख यांच्या विरोधात भ्रष्टाचार विरोधी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल असून, या प्रकरणी न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या समोर गेल्या आठवड्यात सुनावणी झाली होती. त्यानंतर न्यायालयानं देशमुख यांना काल जामीन मंजूर केला. न्यायालयाच्या या निर्णयाला केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढचे १० दिवस देशमुख यांची कोठडी कायम राहणार आहे.

****

उद्योगातील कुशल मनुष्यबळासाठी नवीन अभ्यासक्रमांची गरज असल्याचं मत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं आहे. जर्मनीचे वाणिज्यदूत अचिम फॅबिग यांनी काल मुंबईत केसरकर यांची सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. जर्मनीसह जगातल्या विविध देशातले उद्योगसमूह महाराष्ट्रात गुंतवणूक करत आहेत. या उद्योगांना लागणारी कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागानं त्या दृष्टीनं पाऊलं उचलावीत, असं केसरकर यांनी सांगितलं.

****

रुग्णालयांशी संलग्न औषध दुकानांतून औषध खरेदी करणं बंधनकारक नसल्याचा निर्वाळा अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी याबाबतचं पत्र नुकतंच जारी केलं. रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना हा निर्णय दिलासादायक ठरणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांनी काल शपथ घेतली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप आणि मित्रपक्ष शासित राज्यांचे मुख्यमंत्री या शपथग्रहण सोहळ्याला उपस्थित होते.  पटेल यांचा मुख्यमंत्रिपदाचा हा सलग दुसरा कार्यकाळ आहे.

****

शिवसेना पक्षाबाबत आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत काल केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी झाली. दोन्ही बाजुंच्या प्रतिनिधींचं म्हणणं ऐकून घेत आयोगानं ही सुनावणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुढे ढकलली आहे.

****

मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारने काल यासंदर्भात अधिसूचना जारी केली.

****

अरुणाचल प्रदेशात तवांग भागात भारत आणि चिनी सैन्यात चकमक झाल्याचं वृत्त आहे. नऊ डिसेंबरला झालेल्या या चकमकीत दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाले आहेत. मात्र चकमकीनंतर दोन्ही कडचं सैन्य माघारी परतल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

अमेरिकेतल्या महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा साहित्य जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार निवड समितीने काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. साहित्याच्या क्षेत्रात एकूण सहा, सामाजिक कार्याच्या क्षेत्रात चार आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार, असे एकूण अकरा पुरस्कार यंदा दिले जाणार आहेत. भूमिहिनांच्या हक्कासाठी केलेल्या कार्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते शांताराम पंदेरे यांना विशेष पुरस्कार तर शरद बावस्कर यांच्या भुरा या कादंबरीला पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या २८ जानेवारी रोजी पुण्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

****

माजी केंद्रीय मंत्री आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त काल त्यांना अभिवादन करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांनी ट्विट संदेशातून मुंडे यांना आदरांजली वाहिली. माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी परळी नजिक गोपीनाथ गड इथं मुंडे यांच्या समाधीवर आदरांजली अर्पण केली.

****

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त काल त्यांना सर्व स्तरातून शुभेच्छा देण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

****

महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात केंद्र सरकारच्या योजना हेतुपुरस्सर अडवल्या जात होत्या, असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. ते काल हिंगोलीत बोलत होते. राज्यात शिंदे - फडणवीस सरकारचं काम उत्कृष्ट पद्धतीने सुरु असून, पुढील तीन वर्षात शेतकर्यांना दिवसाही वीज मिळेल, असा विश्वास बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला.

****

औरंगाबादमध्ये होणार्या अकराव्या अखिल भारतीय दलित नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार प्रकाश त्रिभूवन यांची निवड करण्यात आली आहे. नाट्यपरिषदेचे अध्यक्ष मधुसूदन गायकवाड यांनी काल पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. ११ आणि १२ फेब्रुवारीला शहरातल्या तापडिया नाट्यमंदीरात हे संमेलन होणार आहे.

****

विद्यार्थ्यांनी नवनवीन कौशल्ये आत्मसात करावीत, असं आवाहन मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी केलं आहे. सोलापूर इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या १८ व्या दीक्षांत समारंभात ते काल बोलत होते. विद्यार्थ्यांनी आत्मपरीक्षण केलं तर पुढं जाण्याचा मार्ग प्रशस्त होऊ शकतो असंही ते यावेळी म्हणाले. विद्यापिठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, प्र-कुलगुरू डॉ. राजेश गादेवार यावेळी उपस्थित होते.यावेळी ५० संशोधक विद्यार्थ्यांना पीएच. डी पदवी तर ५७ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदके देऊन सन्मानित करण्यात आलं. विविध विद्याशाखांच्या एकूण १७ हजार ११९ विद्यार्थ्यांना पदवी बहाल करत असल्याचं कुलगुरूंनी घोषित केलं.

****

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्र अभ्यासक्रमाच्या परीक्षेला आजपासून प्रारंभ होत आहे. विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी ही माहिती दिली. राज्यातल्या एकूण १७१ केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी सुमारे ४६ हजार पेक्षा अधिक विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. ३० डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या परीक्षेचं वेळापत्रक विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

****

अन्न पदार्थ निर्मिती व्यवसायात कार्यरत असलेले हॉटेल, रेस्टाँरट, आणि इतर उद्योगांकडून पात्रतेचे निकष पूर्ण होत आहेत किंवा नाही, याची तपासणी करण्याचे निर्देश औरंगाबादचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिले आहेत. जिल्हास्तरीय सुरक्षित अन्न आणि पौष्टिक आहार सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. नागरिकांना पौष्टिक आणि सुरक्षित अन्न पदार्थ उपलब्ध व्हावेत याची खबरदारी अन्न औषध प्रशासन विभागानं घ्यावी, भेसळयुक्त अन्नपदार्थ निर्मितीवर कारवाई करुन प्रतिबंध करावा, असं पाण्डेय यांनी सांगितलं. शालेय स्तरावर ‘चला पौष्टिक आहार घेऊया’ या उपक्रमाअंतर्गत समिती स्थापन करण्याची सूचना त्यांनी केली. याअंतर्गत विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार देण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन तसंच शालेय शिक्षण विभागाने एकत्रित उपक्रम राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी दिले.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात दोन टप्प्यात गोवर रुबेला विशेष लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा समन्वय समितीच्या काल झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी ही माहिती दिली. १५ ते २५ डिसेंबर २०२२ हा पहिला टप्पा, तर १५ ते २५ जानेवारी २०२३ असा दुसरा टप्पा असेल. या दरम्यान नऊ महिने ते पाच वर्ष वयोगटातल्या बालकांचं प्राधान्यानं लसीकरण करण्यात येणार आहे.

****

परभणी जिल्ह्यातल्या हुतात्मा सैनिकांच्या वीरमाता, पत्नी, पिता किंवा माजी सैनिकांच्या समस्या सोडवण्याला जिल्हा महसूल तसंच पोलीस प्रशासनाचं प्राधान्य असेल, शी ग्वाही, जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिली. सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा प्रारंभ केल्यानंतर त्या काल बोलत होत्या. सर्वसामान्य नागरिकांना हुतात्म्यांचा इतिहास माहीत व्हावा, यासाठी हुतात्मा स्मारकासाठी पान्हेरा या गावी जागेची पाहणी केली असून, त्याठिकाणचं काम लवकरच पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं. दहावी आणि बारावी परीक्षेत ९० टक्यांपेक्षा जास्त गुण मिळालेल्या माजी सैनिकांच्या पाल्यांना रोख दहा हजार रुपये आणि प्रशस्तीपत्र तसंच वीरपत्नीला जमिनीचा सातबारा वाटप गोयल यांच्या हस्ते काल करण्यात आलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यात लासूर स्टेशन इथं आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते काल शवविच्छेदन गृहाचं भूमिपूजन करण्यात आलं. आमदार बंब यांच्या निधीतून या शवविच्छेदन गृहासाठी सात लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

****

औरंगाबाद शहरात काल तुरळक पाऊस झाला. ढगाळ वातावरणामुळे शहरात थंडीचा कडाका काही प्रमाणात कमी झाला आहे. येत्या दोन दिवसांत कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता असून, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 May 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती...