Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 30 November
2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० नोव्हेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
·
रोजगार मेळावा तरुणांना विकसित भारताचे निर्माते बनण्याचा मार्ग
मोकळा करतो - पंतप्रधान नरेंद्र मोदी
·
भारतानं नेहमीच वसुधैव कुटुंबकम या विचारधारेला अनुसरत वाटचाल
केली - राष्ट्रपतींचं प्रतिपादन
·
राज्यात अवकाळी पावसामुळे तीन लाख ९३ हजार ३२५ हेक्टर क्षेत्राचं
नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज
आणि
·
जालना, लातूर,
धुळे जिल्ह्यात
विकसित भारत संकल्प यात्रेला नागरीकांचा उस्फुर्त प्रतिसाद
****
रोजगार मेळावा तरुणांना विकसित भारताचे निर्माते
बनण्याचा मार्ग मोकळा करतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं
आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये नियुक्त झालेल्या ५१ हजारांहून
अधिक उमेदवारांना आज पंतप्रधानांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीने नियुक्तीपत्रांचं वितरण
करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. या उमेदवारांनी नागरिकांसाठी
जीवन सुलभतेला प्राधान्य दिलं पाहिजे आणि आपलं कर्तव्य पूर्ण बांधिलकीने पार पाडलं
पाहिजे, ज्यांनी केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेतला
नाही अशा लोकांपर्यंत त्यांनी लाभ पोहोचवले पाहिजे,
असं पंतप्रधानांनी
यावेळी सांगितलं. देशभरात ३७ ठिकाणी याअंतर्गत रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले होते.
****
दरम्यान,
विकसित भारत संकल्प
यात्रेअंतर्गत पंतप्रधानांनी आज देशभरातल्या केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी
दूरस्थ पद्धतीनं संवाद साधला. विकसित भारत संकल्प यात्रेला देशवासियांनी जनआंदोलनाचं
स्वरुप दिलं असून, यात्रेला मिळणारा प्रतिसाद गेल्या नऊ वर्षात
मोदी सरकारने कमावलेल्या विश्वासाचं प्रतीक असल्याचं, ते यावेळी म्हणाले.
महिला किसान ड्रोन केंद्राचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या
हस्ते यावेळी झालं. या उपक्रमाअंतर्गत पुढच्या तीन वर्षांत १५ हजार ड्रोन्स तसंच ड्रोन
वापराचं प्रशिक्षण महिला बचत गटांना पुरवण्यात येणार आहे. २५ हजार जनौषधी केंद्र स्थापन
करण्याच्या कार्यक्रमाचा प्रारंभही पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी झाला.
****
भारतानं नेहमीच वसुधैव कुटुंबकम या विचारधारेला
अनुसरत वाटचाल केली असून, देशाच्या एकता आणि अखंडतेला सर्वोच्च प्राधान्य
दिलं आहे, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं
आहे. पुण्याजवळच्या खडकवासला इथं, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी - एन डी ए च्या
१४५ व्या तुकडीच्या दीक्षांत समारंभात आज त्या बोलत होत्या. यावर्षी संचलनात पहिल्यांदाच
महिला छात्र सहभागी झाल्याबद्दल त्यांनी विशेष आनंद व्यक्त केला.
त्यानंतर राष्ट्रपतींनी आज अहमदनगर जिल्ह्यातल्या
शनीशिंगणापूर इथल्या शनैश्वराचं दर्शन घेतलं. यावेळी राज्यपाल रमेश बैस यांची उपस्थिती
होती. अहमदनगर जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रपतींचा
सत्कार केला.
उद्या,
राष्ट्रपती मुर्मू, पुण्यातल्या सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाला मानाचा ध्वज अर्थात प्रेसिडेंट्स
कलर प्रदान करणार आहेत. त्यानंतर त्या नागपूरकडे रवाना होतील.
****
रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोटे - परशूराम
औद्योगिक वसाहतीमध्ये नव्याने सुरू होत असलेल्या हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेज लिमिटेड
कंपनीच्या प्लांटचं भूमीपूजन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. दोन हजार
५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभ्या रहात असलेल्या या प्लांटच्या माध्यमातून दोन
हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. शासनाकडून या कंपनीमध्ये स्थानिक नागरिकांना
रोजगार देण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान,
सिंधुदुर्ग किल्ल्यावर
येत्या चार तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार्या नौदल दिन कार्यक्रमाच्या
पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज किल्ल्याची पाहणी करुन तयारीचा आढावा घेतला.
****
राज्यात २६ ते २८ नोव्हेंबर दरम्यान झालेल्या
अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे तीन लाख ९३ हजार ३२५ हेक्टर क्षेत्राचं नुकसान झाल्याचा
प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४५ हजार ७८३ हेक्टर, हिंगोली ७९ हजार ४०२, परभणी एक हजार, बीड २१५, तर नांदेड जिल्ह्यात ५० हेक्टर क्षेत्रावरच्या
शेतजमिनींचं नुकसान झाल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.
****
केंद्र सरकारच्या विकसित भारत संकल्प यात्रेचं
आज जालना जिल्ह्यातल्या ढासला, बधापूर,
रेवगाव, बेथलम, पिंपळगाव थोटे इथं उत्साहात स्वागत करण्यात
आलं. यानिमित्त ढासला इथं आयोजित कार्यक्रमास पालकमंत्री अतुल सावे, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.
एलसीडी स्क्रीनवर शासकीय योजनांची चित्रफितही दाखवण्यात आली.
****
लातूर तालुक्यातल्या नागझरी इथं देखील नागरीकांनी
आज विकसित भारत संकल्प यात्रेचं स्वागत केलं. यावेळी आरोग्य विभागाकडून रक्तदाब, मधुमेह याची प्राथमिक तपासणी आणि आयुष्यमान कार्ड संदर्भातील माहिती देण्यात आली.
'आपला संकल्प, विकसित भारत' या एलईडी रथाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनाही सांगण्यात आल्या. जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यावेळी उपस्थित होते.
****
धुळे जिल्ह्यातल्या बोराडी आणि निजामपूर
गावात आज विकसित भारत संकल्प यात्रा पोहचली. यावेळी ग्रामस्थांना शासनाच्या कृषी, आरोग्य, शेतकरी,
महिला, युवा यांच्यासाठी राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती एलईडी व्हॅनमार्फत
देण्यात आली. तसंच लाभार्थ्यांकडून विविध योजनांचे अर्ज भरुन घेण्यात आले.
****
जालना जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसान
झालेल्या नुकसानीची आज पालकमंत्री अतुल सावे यांनी पाहणी केली. बदनापूर तालुक्यातल्या
राजेवाडी इथल्या कचरुसिंग गुसिंगे आणि हरिदास अंभोरे यांच्या शेतातल्या नुकसानग्रस्त
मोंसबी आणि डाळिंब फळबागेची सावे यांनी पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. संबंधित
अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त पिकांचे तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश दिले.
****
मराठा आरक्षणासाठी लोकसभा अध्यक्षांकडे राजीनामा
दिलेले यवतमाळचे खासदार हेमंत पाटील यांना राष्ट्रपतींकडून समन्स पाठवण्यात आलं आहे.
त्यांना चार डिसेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खासदार हेमंत पाटील
हे लोकसभेतल्या अनेक समित्यांवर सदस्य आहेत. मात्र २९ ऑक्टोबर रोजी त्यांनी राजीनामा
दिल्यामुळे ते एकाही बैठकीला हजर नव्हते. त्यामुळे आता चार तारखेला हजर राहून मराठा
आरक्षणाबाबत भूमिका मांडू, आपण राजीनाम्यावर ठाम आहोत, राजीनामा मंजूर झाला नाही तर संसदेच्या अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत प्रश्न उपस्थित
करणार असल्याचं हेमंत पाटील यांनी सांगितलं.
****
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीप्रवर्गात समावेश
करण्याच्या प्रमुख मागणीसाठी आज धाराशिव इथं धनगर समाज बांधवांनी भव्य मोर्चा काढला.
शहरातल्या आर्य समाज लेडीज क्लब पासून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर
धडकला. या मोर्चाच्या सुरुवातीला धनगर समाजाने आपल्या पारंपारिक व्यवसायाचं साधन असलेल्या
मेंढ्या सोबत आणल्या होत्या. तसंच खांद्यावर घोंगडी आणि धनगर समाजाचा पारंपारिक पोशाख
घालून ढोल वाजवत मोर्चेकरी या मोर्चात सहभागी झाले होते.
****
हिरडा आणि दुधाला रास्त भाव द्या या मागणीसाठी
अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तहसील कार्यालयावर किसान सभेच्या नेतृत्वाखाली आज भव्य
मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालयासमोर दूध ओतून दूध दर वाढवण्याच्या निर्णयाचा
विरोध करण्यात आला. हिरड्याची सरकारी खरेदी करण्याची मागणी मान्य करण्यात आली असून, यासाठी आवश्यक असलेल्या १०६ पेसा गावांचे ठराव आंदोलकांना गेल्या तीन दिवस सुरू
असलेल्या ठिय्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्राप्त करून देण्यात आले. राहत्या घरांच्या
तळ जमिनी शेतकऱ्यांच्या नावे करण्यासाठी केलेली प्रकरणं २० डिसेंबर पर्यंत तपासण्यात
येतील असे यावेळी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं.
****
हिंगोली जिल्ह्यात सेनगाव ते हिंगोली मार्गावरील
रिधोरा पाटीजवळ एस टी बसच्या चालकाला हृदयविकाराचा झटका आला. मात्र स्वत:ला सावरत बस
रस्त्याच्या कडेला सुरक्षित उभी केल्यानंतर चालकाने प्राण सोडल्याची घटना घडली. मारोती
नेमाणे असं या चालकाचं नाव असून, त्यांच्या समयसुचकतेमुळे १५ ते २० प्रवाशांचे
प्राण वाचले.
****
प्रवाशांची गर्दी लक्षात घेता दक्षिण मध्य
रेल्वेनं काचीगुडा-लालगढ-काचीगुडा, हैदराबाद-जयपुर- हैदराबाद आणि नांदेड ते
इरोड दरम्यान सुरू असलेल्या विशेष गाड्यांना मुदतवाढ दिली आहे. या गाड्या निजामाबाद, नांदेड, पूर्णा,
हिंगोली, वाशिम, अकोला मार्गे धावतात. काचीगुडा - लालगड ही
गाडी २७ जानेवारी पर्यंत, लालगढ-काचीगुडा ३० जानेवारी पर्यंत, हैदराबाद - जयपूर गाडी २६ जानेवारी पर्यंत, तर जयपूर - हैद्राबाद आणि नांदेड - इरोड
गाडीला २८ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
दरम्यान,
लाईन ब्लॉकमुळे
दौंड ते निझामाबाद जलदगती गाडी ३ ते १६ जानेवारी दरम्यान तर निझामाबाद - पंढरपूर गाडी
४ ते १७ जानेवारी दरम्यान निझामाबाद ते मुदखेड दरम्यान अंशत: रद्द करण्यात आली आहे.
****
No comments:
Post a Comment