Regional Marathi Text
Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 24 December
2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ डिसेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
· महिलांना विकासाच्या अधिक संधी मिळण्याची आवश्यकता केंद्रीय मंत्री भूपेंद्र
यादव यांच्याकडून व्यक्त.
· संपूर्ण स्वच्छता मोहीम टप्याटप्प्याने राज्यातल्या सर्व शहरांमध्ये राबवण्यात
येणार-मुख्यमंत्री.
· सावनेरचे आमदार सुनील केदार यांचं विधानसभा सदस्यत्व विधिमंडळ सचिवालयाकडून
रद्द.
आणि
· ऑस्ट्रेलियाविरोधातल्या एकमेव कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाचा दणदणीत विजय.
****
देशाच्या विकास प्रक्रियेत महिलांना
विकासाच्या अधिक संधी मिळण्याची आवश्यकता केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी
व्यक्त केली आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं विकसित भारत यात्रेदरम्यान संवाद
साधत होते. या यात्रेच्या माध्यमातून गरजूंना पायाभूत सुविधा प्राप्त होऊन पुढच्या
२५ वर्षांत देशाचा महासत्तेपर्यंत प्रवास पूर्ण होईल, असा
विश्वास यादव यांनी व्यक्त केला, ते म्हणाले...
दुनिया
का सबसे बडा देश बनना हैं. तो इस साल सरकारी योजनाओं कों सौ प्रतिशत लोगों तक पहुंचा
करके, विकास के गती को आगे बढाना है. बुनियादी चिजो का अर्थ है, यानी स्वस्थ का कार्ड
पहुंच जायेगा. गरिब के लिए स्वनिधी योजना पहुंच जायेगी. अगर उज्वला योजना पुरी हो जायेगी,घर
घर बिजली का काम पुरा हो जायेगा. हर एक के पास पंतप्रधान आवास पूरा हो जायेगा. तो इसके
बाद, पच्चीस सालों मे भारत को महाशक्ती बनाने के यात्रा की ओर ले जायेगा. हमारा विकास
ऐसा होना चाहिए देश मे, स्त्री पुरुष समानता हो,बल्की की विकास की गाडी मे महिलाओ की
आर्थिक संपन्नता, महिलाओ को रोजगार के अवसर बढने चाहिए.
गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, छत्रपती
संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यावेळी उपस्थित होते. मेरी
कहानी मेरी जुबानी अंतर्गत अनेक लाभार्थींनी आपले अनुभव कथन केले...
****
संपूर्ण स्वच्छता मोहिमेला लोकचळवळीचं
स्वरूप आलं असून लवकरच स्वच्छतेचा हा मुंबई पॅटर्न राज्यातील सर्व शहरांमध्ये
टप्याटप्प्याने राबवण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं
आहे. संपूर्ण स्वच्छता मोहिमेअंतर्गत आज सकाळी मुंबईत वरळी इथं स्वच्छता मोहिमेची
पाहणी करून मुख्यमंत्र्यांनी त्यात सहभाग घेतला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना
मुख्यमंत्री म्हणाले..
हे
अभियान यशस्वी करायचं आहे. याच्यामुळे काही दिवसांनी इथल्या दृश्य स्वरुपांमध्ये आपल्याला
बदल झालेला दिसेल. प्रदुषण कमी झालेलं दिसेल. रोगराई कमी झालेली दिसेल. आणि म्हणून
हे अभियान आपण मुंबईत राबवतोय, हा मुंबई पॅटर्न आपण हळुहळु संपूर्ण राज्यामध्ये राबवणार
आहोत.
मुंबई इथं नायर रुग्णालयांतर्गत विशेष
मुलांसाठी नव्याने सुरू झालेल्या प्रारंभिक उपचार आणि पुनर्वसन केंद्राचं
मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आज उदघाटन झालं. या केंद्राच्या माध्यमातून विशेष
मुलांवर मोफत उपचार केले जाणार असून मुंबईत पूर्व आणि पश्चिम उपनगरात प्रत्येकी एक
केंद्र सुरू करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.
****
गुलामगिरी मानसिकता झुगारून आजचा भारत
एका नव्या आत्मविश्वासासह पुन्हा उभा राहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या
नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारताचा नवा अविष्कार जगाला पाहायला मिळत असल्याचं, उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबई श्रीविद्या लक्षार्चन कार्यक्रमात
बोलत होते. भारत पुन्हा एकदा आपली हरवलेली
अस्मिता परत मिळवताना दिसत असून, विचारांबरोबर व्यवहार आणि व्यापारात तसच
सामरिक ताकदीमध्येही भारत जगात अग्रेसर होत आहे, असं फडणवीस यांनी
सांगितलं.
****
सर्वांनी आपल्या नावात वडिलांच्या
नावाआधी आईचं नाव लावण्याची विनंती, उपमुख्यमंत्री अजित पवार
यांनी केली आहे. ते आज बारामती इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता
मेळाव्यात बोलत होते. आईच्या नावाच्या समावेशानं महिलांप्रती आदर वाढेल, असं
पवार म्हणाले. कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण
मिळालं पाहीजे,
त्यासाठी राज्य सरकार योग्य कार्य करत असल्याचं पवार यांनी
नमूद केलं. अभ्यास करुन टिकणार आरक्षण देण्यासाठी थोडा वेळ लागेल, परंतू
आरक्षणासाठी सरकार योग्य प्रयत्न करत असल्याचं, पवार यांनी सांगितलं.
****
नाताळ आणि नववर्षानिमित्त राज्यपाल रमेश
बैस यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. जगातील अनेक देशांमध्ये साजरा केला
जाणारा नाताळचा सण भगवान येशू ख्रिस्तांच्या जीवन कार्याचे स्मरण देतो. भगवान येशू
ख्रिस्ताचा जन्मोत्सव असलेला हा सण जगात शांतता तसच मनामनात सामंजस्य आणि सद्भावना
निर्माण करण्यास सहाय्यभूत ठरेल, असा विश्वास वाटतो, असं
बैस यांनी म्हटलं आहे.
****
नागपूर जिल्ह्यातील सावनेर विधानसभा
मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील केदार यांचं विधानसभा सदस्यत्व विधिमंडळ
सचिवालयाने रद्द केलं आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आर्थिक गैरव्यवहार केल्या प्रकरणी नागपूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दोषी ठरवून
त्यांना ५ वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा तसच साडेबारा लाख रुपये दंड ठोठवण्यात
आला आहे. या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सुनील केदार
यांच्यासह इतर पाच जणांना देखील न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे, न्यायालयाच्या
या निर्णयानंतर सचिवालयाने केदार यांचं सदस्यत्व रद्द केलं. दरम्यान, भारतीय
जनता पक्ष सत्तेचा गैरवापर करत असून, त्यातूनच केदार यांचं
सदस्यत्व तात्काळ रद्द करण्यात आल्याची प्रतिक्रिया, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते. केदार कायदेशीर
लढाई लढतील,
आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, अस
पटोले यांनी सांगितलं.
****
राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना
कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंडे यांना खोकल्याचा त्रास होत
असल्याने दोन दिवसांपूर्वी त्यांनी कोरोना चाचणी केली, ही
चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. दरम्यान, मुंडे हे घरी विलगीकरणात
असून घरीच उपचार घेत असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
****
केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं भारतीय
कुस्ती महासंघाच्या नवनिर्वाचित अध्यक्षांसह महासंघ निलंबित केला आहे. महासंघाचे
नवनिर्वाचित अध्यक्ष संजय सिंग यांनी निवडून येताच १५ आणि २० वर्षांखालच्या
वयोगटासाठीच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धांची घोषणा केली होती. या स्पर्धा
उत्तरप्रदेशात गोंडा मधल्या नंदिनी नगर इथं होतील असं, त्यांनी
जाहीर केलं होतं. मात्र ही घोषणा महासंघाच्या घटनेतील तरतुदी आणि नियमांना धरून
नसल्याने ही कारवाई केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
क्रीडा मंत्रालयानं पुढच्या आदेशापर्यंत महासंघाला आपलं काम स्थगित
करण्याचे निर्देश दिले असल्याचंही या वृत्तात म्हटलं आहे.
****
भारतीय महिला क्रिकेट संघानं
ऑस्ट्रेलियाविरोधातल्या एकमेव कसोटी सामन्यात दणदणीत विजय मिळवला आहे. मुंबईतल्या
वानखेडे मैदानावर झालेल्या या सामन्यात आज चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियानं दिलेलं ७५
धावांचं आव्हान भारतीय संघानं दुसऱ्या डावात दोन फलंदाजांच्या मोबदल्यात पूर्ण
केलं. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २१९ आणि दुसरा डाव २६१ धावांवर संपुष्टात
आला. पहिल्या डावात भारताकडे १८७ धावांची आघाडी होती. सामन्यात ७ बळी घेणाऱ्या
स्नेहा राणा हिला सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. या कसोटी
सामन्यानंतर दोन्ही संघात प्रत्येकी तीन एकदिवसीय आणि टी ट्वेंटी सामन्यांची
मालिका होणार आहे.
****
धाराशिव इथं २२ व्या राज्यस्तरीय सब
ज्युनिअर धनुर्विद्या स्पर्धेचं आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते आज उदघाटन झालं.
धाराशिव जिल्हा धनुर्विद्या संघटना आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने आयोजित
या स्पर्धा २६ डिसेंबर पर्यंत चालणार आहेत. रिकर्व्ह राउंड प्रकारापासून स्पर्धेला
प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातून ७५० खेळाडू, पंच, संघ
व्यवस्थापक आणि मार्गदशक धाराशिव जिल्ह्यात दाखल झाले आहेत.
****
लातूर शहराचे माजी महापौर विक्रांत
गोजमगुंडे यांनी आज हर घर दस्तक मोहिमेंतर्गत घरोघरी भेट देत प्रभागातील
नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. नागरिकांना असलेल्या समस्या दूर करण्यासाठी
आवश्यक त्या उपाययोजना करण्याचं, आश्वस्त गोजमगुंडे यांनी दिल्याचं
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
No comments:
Post a Comment