Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 29 January 2024
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २९ जानेवारी २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· परीक्षा पे चर्चा` कार्यक्रमातून पंतप्रधानांचा आज संवाद-यंदा साठी यंदा सव्वा दोन कोटींपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी
· पक्षांतर बंदीसंदर्भात विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय समिती स्थापन
· मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याविरोधात येत्या एक फेब्रुवारीला ओबीसी एल्गार यात्रा
· नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्पासाठी भूसंपादनाचे वाद सोडवावेत-खासदार डॉ प्रितम मुंडे यांची सूचना
आणि
· खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत १०९ पदक जिंकून महाराष्ट्र पहिल्या स्थानावर कायम
सविस्तर बातम्या
परीक्षा पे चर्चा` या कार्यक्रमात यावेळेस सव्वा दोन कोटींपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून ही माहिती दिली. या मालिकेचा या वर्षातला हा पहिला आणि एकूण एकशे नववा भाग होता. गेल्या सात वर्षांपासून सुरु असलेल्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान आज विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं होणाऱ्या या कार्यक्रमात, चार हजाराहून जास्त विद्यार्थी प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत.
****
दरम्यान, या कार्यक्रमाबाबत धाराशिव जिल्हा परिषद शाळेतले उमरगा तालुक्यातले शिक्षक उमेश खोसे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं...
परीक्षा देत असताना मुलांनी वेळेचं व्यवस्थापन कसं करावं तसंच योग्य साहित्याची निवड कशी करावी आणि आपली तयारी झाली का नाही, याची पडताळणी कशी करावी, आपले आरोग्य कसं निरोगी ठेवावं, आपले मानसिक आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी काय करावे, याबाबत याच्यातून मार्गदर्शन केलेलं आहे. हा उपक्रम एक छान उपक्रम आहे. आपण या उपक्रमात सहभागी होऊन, आपल्यावर येणारा ताण आणि दडपण आपण दूर करु शकता.
****
संयुक्त जनता दलाचे नेते नीतीश कुमार यांनी काल बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नवव्यांदा शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यापूर्वी काल सकाळी नीतीशकुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत, राष्ट्रीय जनता दलासोबतचं आघाडी सरकार बरखास्त करण्याची शिफारस राज्यपालांकडे केली. तसंच भारतीय जनता पक्ष, हिंदुस्तान आवाम मोर्चा तसंच अपक्ष आमदारांच्या बळावर राज्यात सत्तास्थापनेचा दावा केला. नीतीशकुमार यांच्यासह आठ आमदारांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली.
****
पक्षांतर बंदीसंदर्भात भारतीय घटनेच्या दहाव्या परिशिष्टाच्या अंतर्गत असलेल्या नियमांची समीक्षा करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय पातळीवर एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या समितीच्या अहवालानंतर गरज वाटल्यास सरकार घटनादुरुस्ती करेल असं बिर्ला यांनी सांगितलं.
दरम्यान, ८४ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचा काल समारोप झाला. या समारोप सत्राला उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी संबोधित केलं. कायदेमंडळात गदारोळापेक्षा चर्चेला प्राधान्य द्यावं अशी अपेक्षा धनखड यांनी यावेळी व्यक्त केली.
****
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याऱ्या राज्य सरकारच्या अधिसूचनेविरोधात राज्यभरात येत्या एक फेब्रुवारीला ओबीसींची एल्गार यात्रा काढली जाणार आहे. मुंबईत काल झालेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीनंतर मंत्री छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली. राज्यातल्या सर्व आमदार, खासदार आणि तहसीलदारांच्या घराबाहेर आंदोलनं केली जाणार असल्याचंही भुजबळ यांनी सांगितलं. कुणबी प्रमाणपत्रांसाठीचा राजपत्राचा मसूदा रद्द करण्यात यावा, मराठा - कुणबी तसंच कुणबी - मराठा प्रमाणपत्रांच्या वितरणाला स्थगिती द्यावी, राज्य मागासवर्ग आयोग आणि न्यायमूर्ती शिंदे समिती रद्द करावी असे तीन ठराव या बैठकीत करण्यात आले
****
नाट्य रंगभूमी पुढे येण्यासाठी रसिकांनी कलाकारांच्या पाठीशी उभं राहावं, त्यामुळे नाटकांचा सुवर्णकाळ पुन्हा एकदा अनुभवता येईल, असं आवाहन, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापुरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. ते काल सोलापुरात १०० व्या अखिल भारतीय विभागीय मराठी नाट्य संमेलनाच्या हस्तांतरण सोहळ्यात बोलत होते. यावेळी अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांना नाट्य आणि संगीताचे शिक्षण दिल्यास त्यांची सांस्कृतिक जाण अधिक प्रगल्भ होईल असं ते यावेळी म्हणाले.
****
येत्या दोन ते चार फेब्रुवारी दरम्यान अमळनेर इथं नियोजित ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्यात आली आहे. संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. हे संमेलन अविस्मरणीय ठरावं, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. या संमेलनात साने गुरुजींच्या अप्रकाशित साहित्याचं प्रकाशन करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त शस्त्र प्रदर्शनही भरवण्यात येणार असल्याचं जोशी यांनी सांगितलं.
****
नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनी आणि त्यांच्या मालकी हक्काबाबतचे वाद कायदेशीर आणि तातडीनं सोडवावेत अशा सूचना बीडच्या खासदार डॉ प्रितम मुंडे यांनी केल्या आहेत. त्या काल यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होत्या. या भुसंपादनातील त्रुटी कराव्यात तसंच करुन मावेज्याचे प्रश्न सोडवून प्रकल्पाला गती द्यावी असंही मुंडे यांनी सांगितलं. शिरूर तालुक्यात विघ्नेवाडी रेल्वे स्थानकाच्या रस्त्यासंदर्भात मुंडे यांनी शिरूरच्या तहसीलदारांना तात्काळ प्रत्यक्ष पाहणी करून व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.
दरम्यान, गेवराई इथं काल दिव्यांगांना निःशुल्क सहायक साधनांचं वितरण प्रितम मुंडे यांच्या हस्ते झालं. दिव्यांगांना शासनाच्या सर्व योजना आणि सुविधांचा लाभ एकाच छताखाली मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं, त्या यावेळी म्हणाल्या.
****
विकसित भारत संकल्प यात्रेत परभणी इथं मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत शितल कच्छवे यांनी आपल्याला झालेल्या लाभाची माहिती दिली.
****
मन की बात कामगार मोर्चा के साथ, या संकल्पनेअंतर्गत काल धाराशिव इथं आनंद भालेराव यांच्या घरी मन की बात कार्यक्रमाचं सामुहिक श्रवण करण्यात आलं. यावेळी तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यासह परिसरातले नागरिक तसंच शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
****
चेन्नइ इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र एकूण १०९ पदक जिंकून पहिल्या स्थानावर आहे. यामध्ये ३७ सुवर्ण, ३२ रौप्य आणि ४० कांस्य पदकांचा समावेश आहे. काल भारोत्तोलनात मुलांमध्ये राज्याच्या साईराज परदेशीनं सुवर्ण, तर मुलींमध्ये भुमिका मोहितेनं रौप्य पदक जिंकलं.
****
हैदराबाद इथं झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारताचा २८ धावांनी पराभव केला. काल सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडचा दुसरा डाव ४२० धावांवर संपुष्टात आल्यानंतर भारतासमोर विजयासाठी २३१ धावांचं आव्हान होतं. मात्र भारतीय संघ २०२ धावांवर सर्वबाद झाला. या विजयाबरोबरच इंग्लंडनं तीन सामन्यांच्या मालिकेत एक - शून्य अशी आघाडी घेतली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यातल्या १५ पतसंस्था आणि बँकेत झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी, उद्या कृती समितीच्या वतीनं विभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. कृती समितीचे समन्वयक प्रांतोष वाघमारे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी कथित घोटाळा झालेल्या विविध बँकेचे तसंच पतसंस्थेचे ठेवीदार उपस्थित होते. खासदार इम्तियाज जलील या मोर्चाचं नेतृत्व करणार असल्याचं वाघमारे यांनी सांगितलं.
****
काँग्रेसनंच देशाला पहिल्या महिला पंतप्रधान आणि पहिल्या महिला राष्ट्रपती दिल्या, असं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. ते काल नांदेड इथं काँग्रेसच्या महिला मेळाव्यात बोलत होते. लोकसभेत ३३ टक्के आरक्षण प्रथम काँग्रेसनं दिल्याचं सांगत, विद्यमान सरकारनं महिला आरक्षणाची घोषणा केली असली तरी हे आरक्षण २०२९ मध्ये लागू होणार असल्याचं ते म्हणाले.
****
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी बिनचूक माहिती सर्वेक्षणाच्या माध्यमातून समोर यावी यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडून दक्षता घेण्यात येत असून, जालना जिल्ह्यात या सर्वेक्षणाच्या कामास गती देण्यात यावी, असे निर्देश राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ.गोविंद काळे यांनी दिले आहेत. काल जालना जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
****
लातूर जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातल्या नागरिकांचं सर्वेक्षण सुरु असून, त्यात येणाऱ्या अडचणी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदार यांच्याकडून दूरदृश्य माध्यमातून नुकत्याच जाणून घेतल्या. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ. गोविंद काळे यांनी या सर्व तांत्रिक अडचणीची दखल घेऊन तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांच्या यंत्रणेला दिल्या आहेत.
****
No comments:
Post a Comment