Friday, 1 March 2024

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.03.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 01 March 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०१ मार्च २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन डॉलर करण्याच्या पंतप्रधानांच्या स्वप्नाला महाराष्ट्र एक ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेच्या रुपाने सहकार्य करेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

·      दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर ५ रुपयांचे अनुदान आणि राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी अंतरिम अर्थसंकल्पात तरतूद असल्याची अर्थमंत्री अजित पवार यांची घोषणा

·      अंतरिम अर्थसंकल्प गोरगरीब, सामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवा पिढी, मागासवर्गीय या सर्वांचा भ्रमनिरास करणारा असल्याची विरोधी पक्षांची टीका

आणि

·      दोन हजार रुपयांची नोट हे वैध चलन असल्याचा भारतीय रिझर्व्ह बँकेचा निर्वाळा

****

देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन डॉलर करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नाला महाराष्ट्र एक ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेच्या रूपाने सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ते आज विधानसभेत नियम २९३ अन्वये अंतिम प्रस्तावाला उत्तर देत होते. राज्यात सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांसह राज्यव्यापी स्वच्छता मोहिमेचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. पुढच्या दोन वर्षात मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त सिमेंट रस्ते करण्यात येतील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

सरकारनं शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. ते आज विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या सत्रात बोलत होते. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजनांतून शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत एकूण ३५ हजार कोटी रुपये जमा झाले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मराठवाडा वॉटर ग्रीड सरकारने पुन्हा कार्यान्वित केल्याचे मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी सांगितले. ग्रीन हायड्रोजनला प्रोत्साहन देणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

****

राज्याची आर्थिक स्थिती चांगली असून आर्थिक आव्हानांना तोंड देण्याची ताकद महाराष्ट्राकडे निश्चितपणे आहे. महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट निर्धारित वेळेत गाठण्यात येणार आहे. यादृष्टीने नियोजन केले असून राज्याच्या महसुली उत्पन्न वाढीसाठी उपाययोजना करण्यात येत आहेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजि पवार यांनी केले. राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी अंतरिम अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. याअंतर्गत ज्योतिबा देवस्थान प्राधिकरण स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्र्यांनी केली.

****

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर ५ रुपयांचे अनुदान देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात प्रतिदिन १ कोटी ६० लाख लिटर दूध संकलन होत असून त्यानुसार अनुदान योजनेसाठी २८३ कोटींची आवश्यकता आहे. यापैकी २०४ कोटींचा निधी पुरवणी मागणीद्वारे व उर्वरित निधी पुनर्विनियोजनाद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल. योजनेच्या अंमलबजावणीसाठी सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले असून दूध उत्पादक शेतकऱ्यांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर अनुदान वर्ग करण्यात येणार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले.

****

विधानसभेमध्ये आज सन २०१४ विधानसभा विधेयक क्रमांक नऊ महाराष्ट्र महापालिका सुधारणा विधेयक संमतीसाठी मांडण्यात आले होते. या विधेयकामध्ये मुंबई वगळून राज्यातील अन्य नगरपालिका, महानगरपालिका आणि पंचायत समितीमध्ये चार किंवा पाच सदस्य प्रभाग रचना करण्याचा असा बदल सुचवण्यात आला आहे. या बदलाला भाजप आमदार अॅड. आशिष शेलार यांनी पाठिंबा दिला आणि हा बदल योग्य असून असल्याचे त्यांनी सांगितले.

****

राज्यातील आयटीआय संस्थांमध्ये अल्पसंख्यांक आणि अनुसूचित जाती अशा दोन्ही सवलतींचा लाभ घेणारी आणि आदिवासी समाजातून धर्मांतरण करून अल्पसंख्यांक आणि आदिवासी अशा दोन्ही सवलतींचा लाभ घेणारे विद्यार्थी असल्याचे निदर्शनास आले होते. यासंदर्भातील अनियमततेचा अभ्यास करण्यासाठी एका समितीचे गठन करण्यात आले होते. आज या समितीचा अहवाल कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये मांडला. हा अहवाल बनवताना गठीत केलेल्या समितीने अनुसूचित जमाती प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या १३८५८ विद्यार्थ्यांची माहिती तपासली आणि यावेळी काही महत्वपूर्ण बाबी समोर आल्या. या १३८५८ विद्यार्थ्यांपैकी २५७ विद्यार्थ्यांनी हिंदू धर्माव्यतिरिक्त इतर धर्म नोंदवलेले आहेत. ही बाब गंभीर असून, त्यासाठी योग्य त्या उपायोजना करण्यात येणार आहेत, अशी माहिती मंत्र्यांनी दिली.

****

विरोधकांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनावर टीका केली आहे. राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प गोरगरीब, सामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवा पिढी, मागासवर्गीय या सर्वांचा भ्रमनिरास करणारा आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडला. राज्याची आर्थिक स्थिती बिघडवणारा, उधळपट्टीला आणि भ्रष्टाचाराला वाव देणारा अर्थसंकल्प असल्याने राज्यविधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कामकाज सुरू होण्यापूर्वीच विधिमंडळ परिसरात विरोधक आक्रमक होत 'अर्थसंकल्पात घोषणांचा सुकाळ शेतकऱ्यांसाठी निधीचा दुष्काळ, अर्थसंकल्पात गोलमाल कंत्राटदार मालामाल म्हणत सरकारच्या विरोधात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केली.

****

यंदाचा अंतरिम अर्थसंकल्प हा राज्यातील जनतेची फसवणूक करणारा अर्थसंकल्प असून या अंतरिम अर्थसंकल्पावर अर्थमंत्र्यांची छाप दिसत नाही, अशी टिका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी केली. सरकारनं मांडलेल्या विक्रमी पुरवणी मागण्यांमध्ये साडेसहा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी आणि अडीच हजार कोटी रुपये पिक विम्याचे असताना इतर रक्कम ही कंत्राटदारांना पोसण्यासाठी आहे का, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मते मागितली जातात, अस्मिता जपण्याच्या गोष्टी केल्या जातात मात्र त्यांचे स्मारक तयार करण्यासाठी इतका वेळ लागतो, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

****

विद्यमान सरकारच्या काळात गुंडांना राजाश्रय मिळत असल्याची टीका विधानसभा विरोधीपक्ष नेते विजय वड्डेटीवर यांनी केली. अंतिम आठवडा प्रस्तावाला वडेट्टीवार उत्तर देत होते. गुंडाकडून मंत्रालयात रिलबाजी केली जातेय आणि सामान्य माणूस मात्र मंत्रालयाबाहेर रांगेत उभा आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

****

शिवसेना आमदार अपात्रेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाला, आव्हान दिलेल्या याचिकेवर, सर्वोच्च न्यायालयात येत्या सात मार्च किंवा ११ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या आव्हान याचिकेवर, आज सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली, त्यावेळी ठाकरे गटाचे अधिवक्ता कपिल सिब्बल यांनी तातडीनं सुनावणी घेण्याची विनंती केल्यानंतर, न्यायालयानं हे आदेश दिले आहेत.

****

दोन हजार रुपयांच्या नोटा चलनरुपाने अजूनही वैध चलन असल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज स्पष्ट केलं आहे. दोन हजार रुपयांच्या एकूण नोटांपैकी ९७.६२ टक्के नोटा बँकिंग व्यवस्थेत परत आल्या असल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज दिली.

****

वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर निवडणुका लढल्या, तरी लोकसभेच्या किमान सहा जागा आपण निवडून आणू शकतो असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर जिल्ह्यात रामटेक इथं प्रसार माध्यमांशी बोलत होते. महाविकास आघाडीत लोकसभेसाठी १५ टक्के इतर मागासवर्ग ओबीसीचे उमेदवार, किमान तीन अल्पसंख्याक उमेदवार असायला हवेत यासाठी आपण आग्रही असून लोकशाहीचं सामाजीकरण करायचं असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

****

पीएम किसान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची संख्या ११ कोटींहून अधिक झाली आहे. देशात या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन लाख कोटी रुपयांहून अधिकचे हस्तांतरण करण्यात आलं असून नवीन ९० लाख पात्र शेतकऱ्यांचा यात समावेश झाला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारीत किसान ई मित्र हा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. यावर मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांसह इतर सात भाषा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

****

राज्यात येत्या तीन मार्च रोजी, सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीस पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबवण्यात येणार आहे.

या मोहिमेसाठी, धाराशिव जिल्ह्यात ग्रामीण आणि शहरी भागात एकूण एक हजार ३४१ लसीकरण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. नागरिकांनी आपल्या शून्य ते ५ वर्षे वयोगटातील बालकांचं लसीकरण करण्याचं आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास यांनी नागरिकांना केले आहे.

नांदेड जिल्ह्यात शून्य ते ५ वर्षे वयोगटात एकून तीन लाख ९९ हजार ६९८ बालके अपेक्षित लाभार्थी आहेत. लसीकरणासाठी जिल्ह्यात एकूण २ हजार ७६७ लसीकरण केंद्र तयार करण्यात आले असून यामार्फत लसीकरण करण्याचं आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केलं आहे.

लातूर शहरामध्ये एकूण २१५ पोलिओ लसीकरण केंद उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त एकूण ३ मोबाईल टिमची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

****

दुसऱ्या महिला प्रिमियर लीग क्रिकेट अंतर्गत आज गुजरात जायंट्स आणि यूपी वारियर्स यांच्यात सामना होईल. बंगळूरु इथं एम चिन्नास्वामी क्रीडासंकूलात संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होईल.

दरम्यान, या लीग मध्ये काल झालेल्या सामन्यात, दिल्ली कॅपिटलनं रॉयल चेंलजर्स बंगळुरु संघाचा २५ धावांनी पराभव केला.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...