Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 18 April 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १८ एप्रिल २०२६
सायंकाळी ६.१०
****
·
पंतप्रधान
नरेंद्र मोदी आज रात्री साडेआठ वाजता देशाला संबोधित करणार
·
पंतप्रधान
ग्राम सडक योजना-३ ला मार्च २०२८ पर्यंत मुदतवाढ देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
·
संसदेच्या
दोन्ही सभागृहांचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब
·
जागतिक
वारसा दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं विविध कार्यक्रम
आणि
·
मराठवाड्यासह
राज्याच्या काही भागात २० ते २२ एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित
करणार आहेत. रात्री साडेआठ वाजता त्यांचं भाषण होणार आहे.
****
पंतप्रधान ग्राम सडक योजना-३ ला मार्च
२०२८ पर्यंत मुदतवाढ देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. केंद्रीय माहिती
आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली.
बाईट – केंद्रीय माहिती आणि प्रसारण
मंत्री अश्विनी वैष्णव
केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना
महागाई भत्त्याचा आणि महागाई दिलाशाचा अतिरिक्त हप्ता जारी करण्यासही या बैठकीत मंजुरी
देण्यात आली. भाववाढीची भरपाई करण्यासाठी, मूळ वेतन किंवा पेन्शनच्या सध्याच्या ५८ टक्के दरामध्ये दोन
टक्के वाढ करण्यात आली असून, एक जानेवारी २०२६ पासून हा निर्णय लागू होईल. यामुळे सरकारी
तिजोरीवर दरवर्षी सहा हजार ७९१ कोटी रुपयांपेक्षा जास्त भार पडेल. याचा फायदा ५० लाखांहून
अधिक केंद्र सरकारी कर्मचारी आणि ६८ लाखांहून अधिक निवृत्तीवेतनधारकांना होईल,
असं वैष्णव यांनी सांगितलं.
१२ हजार ९८० कोटी रुपयांचा ‘भारत सागरी विमा पूल’ स्थापन
करण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. जागतिक अनिश्चिततेच्या काळातही भारतीय जहाजांना
आणि सागरी व्यापाराला अखंडित विमा संरक्षण उपलब्ध करून देणं हा यामागचा मुख्य उद्देश
आहे.
****
संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज
अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं असून, विस्तारित अर्थसंकल्पीय अधिवेशन आज संस्थगित झालं. २८ जानेवारीला
या अधिवेशनाला सुरुवात झाली होती. या अधिवेशनात लोकसभेच्या एकूण ४१ बैठका झाल्या,
यात ९३ टक्के कामकाज झालं असं सभापती
ओम बिर्ला यांनी सांगितलं. अधिवेशनात बारा विधेयकं सभागृहात सादर झाली,
यातली ९ विधेयकं मंजूर झाली. राज्यसभेचं
कामकाज १५७ तास चालल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
नारी शक्ति वंदन अधिनियम काल लोकसभेत
पारित होऊ शकलं नाही, त्याबद्दल
सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप–प्रत्यारोप सुरु आहेत. हे विधेयक विरोधकांनी केवळ
राजकीय हेतूने मंजूर होऊ दिलं नाही, अशी प्रतिक्रया संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दिली
आहे. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी याबाबत काँग्रेसवर
महिलाविरोधी असल्याची टीका केली.
****
१३१ व्या घटनादुरुस्तीचं विधेयक हे
महिला आरक्षणाच्या नावाखाली लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेसाठी होतं,
त्यामुळे हे विधेयक नामंजूर होणं हा
विरोधी पक्ष, राज्यघटना
आणि देशाचा विजय आहे, असं
काँग्रेस महासचिव, खासदार प्रियंका गांधी
यांनी म्हटलं आहे. त्या आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होत्या. या विधेयकाबद्दल
विरोधी पक्षांना काहीही माहीत नव्हतं, केवळ एक दिवस आधी विधेयकाचा मसुदा दिला गेला,
देशाच्या संघराज्य रचनेला बदलणं आणि
लोकशाहीला कमकुवत करण्यासाठीचं हे षड्यंत्र होतं अशी टीका गांधी यांनी केली. २०२३ ला
मंजूर झालेलं महिला आरक्षण विधेयक तात्काळ लागू करा अशी मागणीही त्यांनी केली.
****
महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याच्या
पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आज मुंबईत इंडिया आघाडीविरोधात
जोरदार निदर्शनं केली. विरोधकांकडून हा महिलांचा विश्वासघात असल्याची टीका,
पक्षाच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी यावेळी केली.
****
एटीएस अर्थात ऑटोमॅटिक टेस्टिंग स्टेशन
प्रणाली बंद असल्यामुळे रखडलेल्या वाहन परवाना नूतनीकरण प्रक्रियेला केंद्रीय मंत्री
नितीन गडकरी यांनी यावर्षी ऑक्टोबर अखेरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे राज्यातल्या
टेम्पो, स्कूलबस,
रिक्षा यांचा परवाना नूतनीकरण करण्याचा
मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात पत्र लिहून विनंती
केली होती.
****
जागतिक वारसा दिवस आज साजरा होत आहे.
सांस्कृतिक, नैसर्गिक
वारशाची विविधता जपण्यासंदर्भात जागरूकता वाढावी यासाठी हा दिवस आज जगभरात साजरा केला
जातो. ‘संघर्ष आणि आपत्तीच्या काळात ऐतिहासिक वास्तूंच्या संरक्षणासाठी आपत्कालीन प्रतिसाद’
अशी या दिनाची यंदा संकल्पना आहे.
यानिमित्त केंद्रीय सांस्कृतिक आणि
पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी भारतीय नागरिकांना ऐतिहासिक आणि वारसा स्थळांना
भेट देताना ती ठिकाणे स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्याची शपथ घेण्याचं आवाहन केलं आहे.
वारसा संवर्धन आणि जागरूकता वाढवणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य असल्याचं त्यांनी
अधोरेखित केलं.
****
जागतिक वारसा दिनानिमित्त,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. आपला गौरवशाली इतिहास, संस्कृती, कलेचा अमूल्य वारसा जपूया आणि विकसित महाराष्ट्र घडवूया,
असं आवाहन त्यांनी केलं.
आपल्या इतिहासाची,
संस्कृतीची आणि परंपरेची जपणूक करणाऱ्या
या ऐतिहासिक वास्तूंचं संवर्धन करणं ही प्रत्येकाची जबाबदारी असून,
आपल्या वारसा स्थळांचं रक्षण आणि जतन
करूया, असं
आवाहन करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या.
****
जागतिक वारसा दिनाच्या निमित्ताने छत्रपती
संभाजीनगर शहरात आज विविध कार्यक्रम पार पडले. इंटॅकच्या वतीने सकाळी सातारा परिसरात
कडेपठार खंडोबा मंदिर इथं हेरिटेज वॉक घेण्यात आला. इतिहास अभ्यासक संकेत कुलकर्णी
यांनी यावेळी यादवकालीन मंदिर,
परिसर आणि तलावाबद्दल माहिती दिली.
राज्य पुरातत्व विभागातर्फे सोनेरी
महाल परिसरात सकाळी मराठा मिलिटरी लँडस्केप्स – छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांवर
आधारित विशेष छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं.
शहरातलं शासकीय संग्रहालय आणि पुरातत्व
विभागाच्या वतीने शिवगान हा कार्यक्रम आज दिल्ली गेट परिसरात होणार आहे.
****
वीजनिर्मिती आणि वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी
ऊर्जा विभागासह संबंधित यंत्रणांनी ‘एआय’चा
वापर करून व्यवस्थापन करण्यावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
दिले आहेत. मुंबईत आज उन्हाळ्याच्या काळातील ‘पीक डिमांड’ संदर्भातल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. उन्हाळा आणि पावसाळ्याच्या
पार्श्वभूमीवर ऊर्जा विभाग आणि संबंधित यंत्रणांनी वीजनिर्मिती तसंच पुरवठा सुरळीत
राहण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना युद्धपातळीवर कराव्यात,
असे निर्देश त्यांनी दिले.
****
अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यात
वडगाव पान इथंल्या भोंदू बाबा राजेंद्र बापू गडगे यांच्यासह चार जणांवर अंधश्रद्धा
निर्मूलन कायद्यानुसार संगमनेर इथं गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्या दैवी शक्तीनं
कर्करोगासारखे दुर्धर आजार बरे करतो, यासारखे व्हिडिओ या बाबाने समाजमाध्यमांवर प्रसारित केले होते.
यासंदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव रंजना गवांदे यांनी फिर्याद दाखल
केली आहे. या भोंदू बाबासह एकाला अटक करण्यात आली आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या सेवाभावी संस्था,
रुग्णालये आणि स्वयंसेवी संघटनांनी
एकत्रितपणे कार्य केल्यास आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचू शकते,
असं मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे
राज्यस्तरीय वैद्यकीय समन्वयक डॉ. स्वानंद सोनार यांनी म्हटलं आहे. बीड इथं आज मुख्यमंत्री
सहायता निधी कक्षाच्या विशेष बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यातल्या २५ स्वयंसेवी संस्था
आणि प्रमुख रुग्णालयांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
****
नियमांचं उल्लंघन करणाऱ्या परभणी जिल्ह्यातल्या
नऊ खत विक्री केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या दालनात आज पार पडलेल्या सुनावणीमध्ये
संबंधित केंद्रचालकांनी सादर केलेले खुलासे असमाधानकारक आढळल्याने ही कारवाई करण्यात
आली.
****
बीड विभागातल्या सर्व एस टी आगारात
NCMC कार्डची नोंदणी सुरु असून,
१५ एप्रिल पर्यंत जिल्ह्यात ७५ हजार
कार्डची नोंदणी करण्यात आली आहे. याशिवाय ही नोंदणी लवकर होण्यासाठी जिल्ह्यात १४५
खाजगी वितरक नेमण्यात आले आहेत. स्मार्ट कार्ड नसलेल्या लाभार्थ्यांनाही सवलतीचा प्रवास
सुरुच आहे, कोणत्याही
अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन बीड विभाग नियंत्रक अनुजा दुसाने यांनी केलं आहे.
****
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातल्या
पूर्णा इथं, लोको
फेल्युअर समस्यांवरील ट्रबलशूटिंग तंत्र या विषयावर सुरक्षा परिसंवाद आज घेण्यात आला.
रनिंग स्टाफचं तांत्रिक ज्ञान वाढवणं तसंच ऑपरेशनल अडचणी प्रभावीपणे हाताळण्यासाठी
त्यांची तयारी बळकट करणं हा या कार्यक्रमाचा उद्देश होता,
ज्यामुळे सुरक्षित रेल्वे संचालन सुनिश्चित
होईल. लोकोमोटिव्ह संचालनाशी संबंधित विविध ट्रबलशूटिंग तंत्रांबाबत कर्मचाऱ्यांना
यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं.
****
अक्षय तृतीयेचा सण उद्या साजरा होत
आहे. त्या निमित्त खान्देश तसंच धुळे जिल्ह्यात या आखाजी अर्थात अक्षय तृतीयेनिमित्त
बाजारपेठ आंबे, डांगर
आणि मातीच्या घागरींनी सजली आहे.
****
मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्र,
खान्देश आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये
२० ते २२ एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या कालावधीत
काही ठिकाणी गारपीट होण्याची देखील शक्यता आहे. शेतकऱ्यांनी शेतीची कामं हवामानानुसार
नियोजित करावीत, काढणी
केलेली पिकं सुरक्षित ठिकाणी साठवावीत, असं आवाहन कृषी विभागाने केलं आहे.
****
No comments:
Post a Comment