Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 April 2021
Time 7.10AM to 7.25AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ एप्रिल २०२१ सकाळी ७.१०
मि.
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण
काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा
उपायांचं पालन करावं. ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण
करुन घ्यावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात
वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब
करा आणि सुरक्षित रहा.
****
·
राज्यात १८ वर्षावरील सर्वांना कोविड लस मोफत मिळणार - नवाब
मलिक.
·
कोरोना विषाणू संसर्गाच्या साथीवर मात करणं याला प्रथम प्राधान्य
- पंतप्रधान नरेंद्र मोदी.
·
केंद्र सरकारनं हात आखडता घेतल्यामुळे राज्यात लसीचा तुटवडा
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा आरोप.
·
राज्यात ६७ हजार १६० नविन कोविड रुग्णांची नोंद; मराठवाड्यात
१४४ जणांचा मृत्यू तर सहा हजार ९९९ बाधित.
आणि
·
प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित राजन मिश्रा, लोककवी हरेंद्र
जाधव आणि माजी मंत्री संजय देवतळे यांचं निधन.
****
राज्यात
१८ वर्षावरील सर्वांना कोविड लस मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. राज्याचे
अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या गेल्या
बैठकीत यासंदर्भात चर्चा घेऊन, एकमतानं मोफत लसीकरणाचा निर्णय झाल्याचं, मलिक यांनी
सांगितलं. या लसीकरणासाठी स्वस्त दरात, चांगली लस उपलब्ध व्हावी, म्हणून जागतिक निविदा
काढण्यात येणार आहे, राज्य सरकारच्या तिजोरीतून हा कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याची
माहिती, मलिक यांनी दिली. या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी संमती दिली असल्याचं ते म्हणाले.
मागच्या कॅबिनेटमध्ये या विषयावर चर्चा झाली होती.
सर्वांमध्ये एकमत झालं होतं की, कुठेतरी आपण आपल्या या राज्यातल्या प्रत्येक नागरिकाला
मोफत लवकरात लवकर व्हॅक्सीन द्यायचं आहे. त्याबाबतीत मुख्यमंत्री यांचा होकार होता.
उपमुख्यमंत्री महोदयांनी कालच जाहीर केलेलं आहे की, लस खरेदीसाठी जागतिक टेंडर बोलावून
जी चांगली लस असेल स्वस्त दरात आम्हाला उपलब्ध करुन देईल, महाराष्ट्र सरकार आपल्या
तिजारीतून हा कार्यक्रम हाती घेणारच आहे. लवकरात लवकर त्या बाबतीत टेंडर काढण्यात येणार
आहे.
****
सर्व
रुग्णालयांमध्ये प्राणवायूची उपलब्धता वाढवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
निर्देशानुसार, पंतप्रधान केअर निधीतून, देशभरात ५५१ पी एस ए वैद्यकीय प्राणवायू निर्मिती
प्रकल्प उभारायला निधी पुरवण्यासाठी, सरकारनं तत्वतः मान्यता दिली आहे. राज्य आणि केंद्रशासित
प्रदेशांच्या जिल्हास्तरीय रुग्णालयांमध्ये, हे प्रकल्प उभारले जाणार आहेत. राज्यात,
३४ जिल्ह्यांमध्ये हे प्रकल्प असतील. हे सर्व प्रकल्प तातडीनं कार्यान्वित करावेत,
असे निर्देशही पंतप्रधानांनी दिले आहेत.
दरम्यान,
वैद्यकीय वापराशिवाय इतर कोणत्याही उद्योगांना ऑक्सिजन पुरवठा न करण्याचे निर्देश केंद्रीय
गृह विभागानं दिले आहेत. देशात वाढता कोरोना विषाणू संसर्ग आणि ऑक्सीजनची वाढती मागणी
लक्षात घेता, हा निर्णय घेण्यात आला असून, गृह विभागानं काल यासंदर्भातला आदेश जारी
केला.
****
कोरोना
विषाणू संसर्गाच्या साथीवर मात करणं याला आपलं सर्वात प्रथम प्राधान्य असल्याचं, पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात ते काल बोलत
होते. कोरोना विषाणू संसर्गाच्या पहिल्या लाटेचा यशस्वीपणे सामना केल्यानंतर, देश आत्मविश्वासानं
भारलेला होता, मात्र या दुसऱ्या लाटेनं पुन्हा देशाला हादरवून टाकल्याचं ते म्हणाले.
आपल्याला हे युद्ध जिंकण्यासाठी, तज्ञ आणि वैज्ञानिकांच्या सल्ल्याला प्राधान्य द्यायचं
आहे, राज्य सरकारंही आपापली जबाबदारी निभावण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत असून, राज्य
सरकारांच्या प्रयत्नांना पुढे नेण्यासाठी, केंद्र सरकार पूर्ण शक्तीनं त्यांच्या पाठिशी
खंबीरपणे उभं असल्याचं, पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी कालच्या भागात देशातल्या
डॉक्टर्स, परिचारिका, रुग्णवाहिका चालक यांच्याशी थेट संवाद साधला. मुंबईच्या भारतीय
डॉक्टर्स महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शशांक जोशी यांचे अनुभव पंतप्रधानांनी जाणून
घेतले. डॉ.जोशींनी आकाशवाणीशी बोलताना आपला अनुभव या शब्दांत कथन केला.
कोविडची दुसरी लाट आलेली आहे. या दुसऱ्या लाटेमध्ये
आपल्याला ही लाट सामोरे जाऊन याच्यातून आपल्याला सुरक्षित बाहेर यायचं आहे. आपल्या
कुटुंबाची आपल्याला काळची घ्यायची आहे. आपल्याला स्वत: जबाबदारीने कोविडच्या बाहेर पडायचं आहे आणि याच्यासाठीच आपण
सगळे प्रयत्नशील आहोत. मला खूप आनंद झाला की, आज माननीय प्रधानमंत्री बरोबर मला बोलायची
एक संधी मिळाली आणि याच्या बद्दल मी त्यांचा आभारी आहे.
****
राज्याला
काल कोविशिल्ड लसीचे ५० हजार डोस प्राप्त झाले. केंद्र सरकारनं हात आखडता घेतल्यामुळे
राज्यात लसीचा तुटवडा निर्माण झाल्याचं, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
दैनंदिन आठ लाख डोस ची गरज असताना, केवळ ५० हजार मिळाले, ४५ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण
करण्यासाठी केंद्रानं मुबलक लसींचा पुरवठा करावा, अशी मागणी टोपे यांनी केली आहे.
औरंगाबाद
जिल्ह्यासाठी काल कोव्हिशिल्ड लसीचे ४० हजार डोस प्राप्त झाले. यात ग्रामीण भागासाठी
१५ हजार, तर महानगरपालिका क्षेत्रासाठी २५ हजार डोस प्राप्त झाले. त्यामुळे औरंगाबाद
महानगर पालिकेच्या सर्व ११५ प्रभागातली लसीकरण मोहीम आज सुरळीत होणार आहे. लसीचा तुटवडा
असल्यानं, फक्त आठ केंद्रांवरच लसीकरण सुरू होतं. मात्र आता मनपाला कोविड लसीच्या २५
हजार मात्रा प्राप्त झाल्यामुळे, आजपासून सर्व केंद्रांवर लसीकरण पूर्ववत सुरू राहणार
असल्याचं, उपायुक्त तथा कृतीदल प्रमुख अपर्णा थेटे तसंच आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ
नीता पाडळकर यांनी सांगितलं.
दरम्यान,
हिंगोली जिल्ह्याला दहा हजार, जालना १८ हजार आणि परभणी जिल्ह्याला २० हजार डोस प्राप्त
झाले.
****
जालना
शहरात अग्रसेन भवन इथं उभारण्यात आलेल्या ११० खाटांच्या सुसज्ज कोविड केंद्राचं, आरोग्यमंत्री
राजेश टोपे यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं. आमदार कैलास गोरंट्याल, विभागीय आयुक्त
सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांवेळी उपस्थित होते. या कोविड केंद्रात
सौम्य आणि मध्यम स्वरुपाची लक्षणं असलेल्या बाधितांना ठेवण्यात येणार असल्याचं, टोपे
यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यात
काल ६७ हजार १६० कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची
एकूण संख्या ४२ लाख २८ हजार ८३६ झाली आहे. काल ६७६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ६३ हजार ९२८ झाली असून,
मृत्यूदर एक पूर्णांक ५१ शतांश टक्के झाला आहे. काल ६३ हजार ८१८ रुग्ण या संसर्गातून
मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ३४ लाख ६८ हजार ६१० रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून
मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८२ पूर्णांक २ दशांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात
सहा लाख ९४ हजार ४८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात
काल सहा हजार ९९९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १४४ जणांचा या संसर्गानं
मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद आणि नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येकी २७, लातूर २५,
बीड २०, उस्मानाबाद १६, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी दहा, तर जालना जिल्ह्यातल्या
नऊ रुग्णांची समावेश आहे.
औरंगाबाद
जिल्ह्यात काल एक हजार ८१ रुग्ण आढळले. लातूर जिल्ह्यात एक हजार ५२२, बीड एक हजार २३७,
नांदेड एक हजार १०५, जालना ७५६, परभणी ६३९, उस्मानाबाद ५६९, तर हिंगोली जिल्ह्यात ९०
नवे रुग्ण आढळून आले.
****
नांदेड
शहरात गृह विलगीकरणात असलेल्या कोरोनाविषाणू बाधित रुग्णाला हवेतला प्राणवायू उपलब्ध
करून देणारं संयत्र, निःशुल्क उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी
९४ २१ १७ ११ ९१ किंवा ९८ ९० ९६ ६० ६२ या क्रमांकावर संपर्क साधल्यास मदत मिळू शकते,
असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
परभणी
शहरासह जिल्ह्यात कोविड बाधितांचा उपचार सुरु असलेल्या शासकीय आणि खाजगी रुग्णालयांना,
जिल्हा प्रशासनानं प्राणवायूचा पुरवठा केला आहे. पुणे जिल्ह्यातल्या चाकण इथून आलेला
प्राणवायूचा टँकर, पोलिस बंदोबस्तात औद्योगिक वसाहतीतल्या साठवणुकीच्या ठिकाणी नेला
गेला. त्या टँकरमधून १८ किलो लीटर एवढा प्राणवायू उपलब्ध झाला. त्यामुळे जिल्ह्यात
सध्या प्राणवायूचा तुटवडा नाही, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान,
परभणी जिल्ह्यात शासकीय कोविड केंद्रावर खासगी डॉक्टरांचं पथक रुग्णांच्या सेवेत दाखल
झालं आहे. जिल्हा शासकीय रुग्णालय, आयटीआय तसंच जिल्हा परिषद नूतन इमारतीसह, अन्य शासकीय
कोविड केंद्रातली मनुष्यबळाची कमतरता ओळखून, खासदार संजय जाधव, आमदार डॉ.राहुल पाटील,
जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी खासगी डॉक्टरांबरोबर घेतलेल्या बैठकांमधून, वैद्यकीय
सेवा उपलब्ध करण्याचं आवाहन केलं होतं, त्या आवाहनाला खाजगी डॉक्टरांनी प्रतिसाद दिला.
****
नांदेड
सहकारी औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या द्रवरूप प्राणवायू निर्मिती प्रकल्पाचं
काल आमदार मोहन हंबर्डे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. २० के. एल. औषधी प्राणवायू निर्मिती
क्षमता या प्रकल्पाची असून, दररोज ६०० ते ८०० वाढीव ऑक्सीजन सिलेंडर मिळणार आहेत.
****
उस्मानाबाद
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोविड संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर पावलं
उचलली आहेत. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर –
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या
ग्रामीण भागात ज्या गावात पाच किंवा दहापेक्षा जास्त कोविडग्रस्त रुग्ण आढळून आलेले
आहेत, अशा आठ तालुक्यातील १३७ गावांत जिल्हा प्रशासनानं शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू
लावून खेडेगावांत वाढत असलेल्या कोविडची साखळी तोडण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत.
या गावात ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात अंतर्गत प्रत्येक
कुटुंबाची आरोग्य तपासणी प्राधान्यानं केली जात असून ४५ वर्ष आणि यापुढच्या नागरिकांना
रक्तशर्करा, रक्तदाब यासारखे आजार असणाऱ्यांचं प्राधान्यानं लसीकरण यासह या गावांत
कोरोनाची लक्षणं आढळणाऱ्यांच्या चाचण्या वाढवण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती
उस्मानाबादचे जिल्हाधिकारी श्री.कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली आहे.
देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर,
उस्मानाबाद.
****
राज्यात
रक्ताचा तुटवडा पाहता, विविध संस्था संघटनांकडून रक्तदान शिबिरांचं आयोजन केलं जात
आहे.
यशवंतराव
चव्हाण प्रतिष्ठानच्या औरंगाबाद विभागीय केंद्र, आणि औरंगाबाद इथल्या गजानन महाराज
संस्थानच्या विशेष सहकार्यानं, काल रक्तदान शिबीर घेण्यात आलं, या शिबिरात ११५ जणांनी
रक्तदान केलं. शासकीय रक्तपेढीनं रक्तसंकलन केलं.
बीड
जिल्ह्यात अंबाजोगाई इथं, भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या रक्तदान शिबिरात,
३१ जणांनी रक्तदान केलं. भारतीय जैन संघटनेच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला.
लातूर
महानगरपालिकेनं रक्तदान केल्याचं प्रमाणपत्र दाखवणाऱ्यांना कोविड लसीकरणात प्राधान्य
देण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातल्या कोणत्याही रक्तपेढीत रक्तदान करण्याचं आवाहन
लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केलं आहे.
****
बीड
जिल्हा रुग्णालयात रुग्णांना दिला जाणारा ऑक्सिजन पुरवठा अज्ञात व्यक्तीने बंद केल्यामुळे,
दोन रुग्णांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत तातडीने चौकशी करण्याचे निर्देश,
जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांना दिले आहेत.
संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याची सूचना पालकमंत्री मुंडे यांनी
केली आहे.
****
परभणी
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आरटीपीसीआर तसंच अँटीजन चाचणी प्रत्येक गावात उपलब्ध करून
देण्यासाठीच्या अभियानाला, शिवसेनेच्या वतीने सुरुवात करण्यात आली. आमदार डॉक्टर राहुल
पाटील यांनी ही माहिती दिली. झरी, बोबडे टाकळी, जोड परळी तसंच पिंगळी कोथाळा इथं काल
कोरोना विषयक जनजागृती अभियानाचा प्रारंभ आमदार पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
****
प्रसिद्ध
शास्त्रीय गायक पंडित राजन मिश्रा यांचं काल दिल्लीत निधन झालं, ते ७० वर्षांचे होते.
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर कोविड संसर्गासाठीचे उपचार सुरू होते. बनारस घराण्याच्या
शास्त्रीय गायकीचं प्रतिनिधीत्व करणारे राजन मिश्रा, यांनी आपले धाकटे बंधू साजन मिश्रा
यांच्या संगतीने, देशविदेशात गायनाचे अनेक कार्यक्रम सादर केले. संगीत क्षेत्रातल्या
योगदानासाठी त्यांना तानसेन सन्मान, संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह, २००७ मध्ये पद्मभूषण
या नागरी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. पंडित राजन मिश्रा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान
नरेंद्र मोदी, माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह, अनेक मान्यवरांनी
दु:ख व्यक्त केलं आहे.
****
ज्येष्ठ
गीतकार आणि आंबेडकरी चळवळीला दिशा देणारे, जलसाकार, लोककवी हरेंद्र जाधव यांचं काल
दीर्घ आजारानं निधन झालं. पाहा पाहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा, बाबासाहेब आंबेडकर
- नाव हे गाजतंय हो जगभर यासारखी जवळपास दहा हजार गाणी त्यांनी लिहिली. गेल्या काही
वर्षांपासून ते पक्षाघातानं आजारी होते. मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण खात्यात ते
३३ वर्ष शिक्षक म्हणून कार्यरत होते. फुले, शाहू, आंबेडकरवादी, विचारांची मशाल सदैव
प्रज्वलित ठेवत, चौफेर लिखाणाच्या माध्यमातून, सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळ निस्वार्थीपणे
त्यांनी खेड्यापाड्यात पोहोचवली. तमाशा, जलसा, कव्वाली, जयंतीचे कार्यक्रम, आकाशवाणी-दूरदर्शनवरील
कार्यक्रम, तबकड्या, कॅसेट, सीडी, व्ही-सीडी ऑडिओ-सीडी आणि अलीकडच्या काळात नुकत्याच
एका ई बुक साठीही, त्यांनी काही गझल लिहिल्या.
****
माजी
मंत्री भाजप नेते संजय देवतळे यांचं काल दुपारी नागपूर इथं हदयविकाराच्या धक्क्यानं
निधन झालं. गेल्या सहा दिवसांपासून त्यांच्यावर नागपूर इथं कोविडसंसर्गावर उपचार सुरु
होते. त्यांनी सलग वीस वर्षे काँग्रेसकडून वरोरा विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व
केलं. आमदार, पालकमंत्री या पदांसह राज्याच्या पर्यावरण मंत्रिपदाची जवाबदारी, देवतळे
यांनी यशस्वीपणे सांभाळली. त्यांनी २०१४ मध्ये भाजपाकडून, तर २०१९ मध्ये शिवसेनेकडून
निवडणूक लढवली होती, मात्र या दोन्ही निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. नुकताच
त्यांनी पुन्हा भाजपात प्रवेश केला होता. त्यांच्या निधनानं राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून
शोकभवना व्यक्त होत आहे.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यातल्या लोहारा पंचायत समितीचे माजी सभापती असिफ मुल्ला यांचं काल निधन झालं,
ते ५२ वर्षांचे होते. मुल्ला हे काँग्रेस पक्षाच्या प्रशिक्षण विभागाचे मराठवाडा समन्वयक
होते.
****
No comments:
Post a Comment