Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 October
2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ ऑक्टोबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
·
राज्यातील तीन हजार अंगणवाडी
मदतनीसांच्या पदोन्नतीची कार्यवाही लवकरच पूर्ण करण्याचं केंद्रीय महिला आणि बालविकास
मंत्री स्मृती इराणी यांचं आश्वासन
·
माझी माती माझा देश अभियानाचा
राज्य शासन स्तरावर समारोप;अमृत कलश दिल्लीला रवाना
·
जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात
गांजाची पावणे चार क्विंटल झाडं जप्त
आणि
·
पॅरा आशियायी क्रीडा स्पर्धेत
भारतीय खेळाडूंकडून पदकांची शंभरी
****
राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीसांच्या पदोन्नतीची कार्यवाही लवकरच पूर्ण केली
जाईल, असं आश्वासन केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री
स्मृती इराणी यांनी दिलं आहे. त्या आज मुंबईत प्रधानमंत्री मातृवंदना योजना जनजागृती
कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याच्या
महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे, यांच्यासह अनेक मान्यवर
उपस्थित होते.
अंगणवाडी सेविकांना मोबाईल फोन खरेदीसाठी १२ हजार ८०० रुपये देण्यात येणार असून
अंगणवाडी ताईच्या सुरक्षेसाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजनेचा हप्ता केंद्र
शासनाकडून भरण्यात येईल, असंही ईराणी यांनी सांगितलं. शहरी भागामध्ये
रोजगारासाठी जाणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी एक हजार पाळणाघरे सुरू करण्यास केंद्र शासनामार्फत
लवकरच आदेश निर्गमित करण्यात येतील. तसंच राज्य शासनाच्या निर्भया फंडाबाबत केंद्र
सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, असंही ईराणी यांनी सांगितलं.
****
'माझी माती माझा देश अभियान' हे देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या
वीरांच्या त्यागाला, बलिदानाला नमन करण्याची संधी देणारा कार्यक्रम
असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. राज्य शासनाच्या
स्तरावर आज मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानावर या अभियानाच्या समारोप सोहळ्यात ते बोलत
होते. केवळ पायाभूत सुविधा, मोठे प्रकल्प, भौतिक सुविधाच महत्त्वाच्या नाहीत, तर मातृभूमीविषयी
प्रेम आणि संस्कृतीविषयी आदर तितकाच महत्त्वाचा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
राज्यभरातल्या सर्व जिल्ह्यांमधून आलेल्या ३८१ अमृत कलशांचं, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पूजन झालं. हे सर्व कलश विशेष रेल्वेने दिल्लीला
रवाना झाले. सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास मुंबई स्थानकावरून निघालेली ही रेल्वे
उद्या दुपारी दोन वाजून २० मिनिटांनी दिल्ली इथं हजरत निजामुद्दीन स्थानकावर पोहोचणार
आहे.
****
माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे यांचं काल रात्री निधन झालं. ते ८७ वर्षांचे
होते. न्यूमोनियाने आजारी असलेले ढाकणे यांच्यावर गेल्या तीन आठवड्यांपासून अहमदनगर
इथल्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. काल रात्री त्यांना हृदयविकाराचा तीव्र
झटका येऊन त्यांचं निधन झालं. त्यांच्या पार्थिव देहावर पाथर्डी तालुक्यातील त्यांचे
मूळ गांव पागोरी पिंपळगाव इथं उद्या दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ढाकणे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून
यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश दिले आहेत. उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनीही ढाकणे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
****
ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांच्या पार्थिव देहावर नेरुळ इथं शासकीय
इतमामात अंत्यंसंस्कार होत आहेत. बाबा महाराज यांचं वयाच्या ८९ व्या वर्षी काल निधन
झालं.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नेरुळ
इथं विठ्ठल रुक्मिणी मंदिराला भेट देऊन बाबा महाराज यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन
घेतलं. बाबा महाराजांचं स्मारक तर होईलच मात्र त्यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी
त्यांच्या विचारांचं स्मारक कसं करता येईल, याबाबत प्रयत्न करणार
असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
****
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्या टप्प्यात घेतलेल्या
उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातल्या
बहुतांश गावांमध्ये मराठा समाजाकडून साखळी उपोषण करण्यात येत आहे. घनसावंगी तालुक्यातील
४५ गावे या साखळी उपोषणात सहभागी झाली आहेत. तसंच राजकीय पुढाऱ्यांना गावबंदीचे फलकही
गावोगावी लावण्यात आली आहेत.
****
नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या दोन वाहनांची काल रात्री तोडफोड
झाली. खासदार चिखलीकर हे गुरुवारी रात्री कंधार तालुक्यातील अंबुलगा इथं माजी जिल्हा
परिषद सदस्य मनोहर तेलंग यांच्या भेटीसाठी गेले होते. राजकीय नेत्याने गावात प्रवेश
केल्याने संतप्त झालेल्या मराठा तरुणांनी त्यांच्या दोन वाहनांची तोडफोड केली. त्यानंतर
खासदार चिखलीकर हे पोलीस वाहनातून नांदेडकडे रवाना झाले. आरक्षणावर राज्य सरकार निश्चितच
तोडगा काढेल, मात्र मराठा समाजाने संयम राखावा, असं आवाहन खासदार चिखलीकर यांनी केलं आहे.
****
बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातील आपेगांव मध्ये राजकीय पक्षाच्या नेत्यांना
प्रवेश बंदी करण्यात आली आहे. मराठा आरक्षण मिळेपर्यत गावात कोणत्याही नेत्याला प्रवेश
नसल्याचं, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच,
सदस्य आणि सकल मराठा समाजानं जाहीर केलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र
देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी गठीत केलेल्या समितीनं आज धाराशिव जिल्ह्याचा
आढावा घेतला. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं समितीला माहिती देण्यात आली. अनेक नागरिकांनीही
समितीची भेट घेतल्याचं वृत्त आहे.
****
जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात येणोरा इथं कापसाच्या शेतात तुरीसह लावलेली
गांजाची झाडं परतूर आणि आष्टी पोलिसांनी आज संयुक्त कारवाई करत जप्त केली. या झाडांचं
वजन तीन क्विंटल ७० किलो असून त्याची बाजारभावाप्रमाणं किमंत सुमारे ३५ लाख रुपये असून, या प्रकरणी शेतकरी लक्ष्मण बोराडे याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सहायक
पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके यांनी दिली आहे.
****
पॅरा आशियायी क्रीडा स्पर्धेत भारतानं पदकांची शंभरी गाठली आहे. आज सकाळी तीरंदाजीच्या
कंपाउंड स्पर्धेत शीतल देवी हिने वैयक्तिक सुवर्णपदक पटकावलं. बॅडमिंटनच्या पुरुष दुहेरीत
नीतेश कुमार आणि तरुण यांच्या जोडीने तसंच सुहास यतिराज याने याच स्पर्धेच्या एकेरीत
सुवर्णपदक मिळवलं. बॅडमिंटनच्या एस एल थ्री प्रकारात पुरुष खेळाडूंनी सुवर्ण तसंच रौप्यपदक
तर महिलांच्या एस यू पाच प्रकारात तुलसीमतीने सुवर्णपदक पटकावलं. पंधराशे मीटर टी ३८
स्पर्धेत रमन शर्माने, थाळीफेक प्रकारात देवेंद्र कुमारने तर गोळाफेक
प्रकारात मनू याने सुवर्णपदक पटकावलं आहे. आतापर्यंत २५ सुवर्ण, ३० रौप्य आणि ४५ कांस्यपदकांसह भारतानं एकूण शंभर पदकं पटकावली आहेत. इंडोनेशियात
झालेल्या मागच्या स्पर्धेत भारताच्या पॅरा संघाने ७२ पदकं जिंकली होती.
****
एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई इथं सुरू असलेल्या सामन्यात पाकिस्ताननं
दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २७१ धावांचं आव्हान दिलं आहे. पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून
प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत ४७व्या षटकांत सर्वबाद २७० धावा केल्या. पाकिस्तानच्या
सऊद शकीलनं सर्वाधिक ५२ धावा केल्या तर आफ्रिकेच्या तबरेज शम्सीनं सर्वाधिक चार बळी
घेतले.
****
गोवा इथं सुरू असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या
महिला हॉकी संघात छत्रपती संभाजीनगरच्या क्रीडा प्रबोधिनीच्या तीन खेळाडूंची निवड झाली
आहे. काजल आटपाडीकर, निर्जला शिंदे आणि शालिनी साकुरे अशी निवड झालेल्या
खेळाडूंची नावं आहेत. यापूर्वी काजल आटपाडीकर हिनं भारतीय ज्युनिअर संघातून जर्मनी
आणि आयर्लंड इथं झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवलेला आहे. हॉकी संघटनेचे
छत्रपती संभाजीनगर इथले अध्यक्ष श्रीकांत जोशी, सचिव पंकज भारसाखळे
यांनी या निवडीबद्दल खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे.
****
सोलापूर जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याची अग्रीम २५ टक्के दिवाळीपूर्वी
मिळणार आहे. येत्या १० नोव्हेंबर पासून ही अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर
जमा होणार आहे.
****
येत्या ३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह साजरा
करण्यात येणार आहे. या सप्ताहाकरता 'भ्रष्टाचाराला
नाही म्हणा ; राष्ट्रासाठी वचनबध्द व्हा' ही
संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात या सप्ताहाअंतर्गत विविध उपक्रमाचे
आयोजन करण्याबाबत परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांनी
परिपत्रकात नमूद केल्यानुसार कार्यवाही करुन अहवाल शासनास आणि जिल्हाधिकारी कार्यालयास
सादर करावा, असं जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीनं कळवण्यात
आलं आहे.
****
राज्य तसेच केंद्र शासनाचे विविध विभाग त्यांचे उपक्रम आणि योजना उद्योग संचालनालयामार्फत
राज्यात राबवत आहेत. या सर्व योजनांची माहिती उद्योजकांना एकाच व्यासपिठावर उपलब्ध
होण्यासाठी लातूर इथं येत्या दोन नोव्हेंबर रोजी एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात
आली आहे. लातूर जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक पी. डी. हणबर यांनी ही माहिती
दिली. इच्छुकांनी या कार्यशाळेचा लाभ घेण्याचं आवाहन हणबर यांनी केलं आहे.
****
No comments:
Post a Comment