आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१६ डिसेंबर २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
१९७१ मध्ये भारतानं पाकिस्तानवर मिळवलेल्या
युद्ध विजयाच्या स्मरणार्थ आज देशभरात सर्वत्र विजय दिन साजरा केला जात आहे. विजय दिनाच्या
पूर्वसंध्येला काल, नवी दिल्लीत सेना भवन इथं आयोजित कार्यक्रमात
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसंच लष्कर प्रमुख मनोज पांडे उपस्थित होते. १९७१ च्या युद्धात भारतीय लष्कराने दाखवलेलं शौर्य देश कधीही विसरणार नाही, असं पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.
****
अनुसूचित जमाती आदेशाशी संबंधित दुसरी
घटना दुरुस्ती विधेयक काल लोकसभेत मंजूर करण्यात आलं. शिवसेना खासदार विनायक राउत यांनी
या विधेयकावरील चर्चेत धनगर आरक्षणाच्या मुद्द्याकडे सभागृहांचं लक्ष वेधलं, तसंच मराठा आरक्षणाची देखील मागणी केली.
****
अग्नी पाच या आण्विक शास्त्रस्त्र वाहून
नेण्याची क्षमता असलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची काल ओडिशा मध्ल्या डॉक्टर अब्दुल कलाम बेटावरून यशस्वी चाचणी घेण्यात आली. हे क्षेपणास्त्र
उच्चतम पातळीवरून पाच हजार किलोमीटर पर्यंतच्या अंतरावरील लक्ष्यावर
मारा करण्यास सक्षम आहे.
****
राज्यात १८ हजार ३३१ पोलिसांची भरती करण्यात
येत असून या भरतीसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या मोहिमेत आतापर्यंत १४ लाख
४७ हजाराहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत.
****
हिंदुजा समूहाने
महाराष्ट्रात विविध ११ क्षेत्रांमध्ये सुमारे ३५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा
राज्य शासनाबरोबर सामंजस्य करार केला आहे. नवीकरणीय ऊर्जा, माध्यमे आणि मनोरंजन, ग्रामीण आर्थिक विकास, सायबर सुरक्षा, व्यावसायिक ऑटोमोबाईल्स, बॅंकिंग - फायनान्स, आरोग्य, पायाभूत सुविधा, शिक्षण, उत्पादन आणि नव तंत्रज्ञान या क्षेत्रात हा उद्योग
समूह गुंतवणूक करणार आहे.
****
ऊर्जा संवर्धन सप्ताहानिमित्त महाराष्ट्र
ऊर्जा विकास अभिकरणाच्या सिंगल विंडो पोर्टलचं उद्घाटन काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं.
अपारंपरिक ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात विकासाची मोठी संधी असून या
क्षेत्रात ठरवलेली उद्दिष्ट गाठण्यासाठी उद्योगस्नेही धोरणावर भर देण्यात येत असल्याचं फडणवीस म्हणाले.
//*********//
No comments:
Post a Comment