Thursday, 21 February 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 21.02.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२१  फेब्रुवारी २०१९ सकाळी ११.०० वाजता

****



 बारावीच्या परीक्षेला आजपासून राज्यभरात सुरुवात झाली. राज्यभरातून नऊ विभागीय केंद्रांच्या माध्यमातून एकूण १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. येत्या २० मार्चपर्यंत ही परीक्षा चालणार आहे. दरम्यान दहावीची परीक्षा येत्या एक मार्चपासून सुरू होणार आहे. 

****



 शेतकऱ्यांचा नाशिक ते मंत्रालय असा पायी महामोर्चा आज नाशिकहून मुंबईकडे रवाना होत आहे.  वन हक्क दावे निकाली काढावेत, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी या तसंच अन्य मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने हा मोर्चा पुकारण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लेखी हमीपत्र देणार नाही, तोपर्यंत महामोर्चा थांबणार नसल्याचं किसान सभेनं सांगितलं.

****



 सातव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चितीबाबतचे स्पष्टीकरण देणारा अध्यादेश राज्य शासनानं काल जारी केला. यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं चालू महिन्याचं वेतन सातव्या वेतन आयोगानुसार करता येणार आहे.

****

 सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये काल मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे द्राक्षमळ्यांसह फळबागांना मोठा फटका बसला.  



 जालना जिल्ह्यात जाफ्राबाद, घनसावंगी आणि भोकरदन तसंच बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यात काही भागात काल गारांचा पाऊस झाला. यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून, आंब्याचा मोहोर गळून पडल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.

****



 बांग्लादेशाची राजधानी ढाका इथं, एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू झाला. या इमारतीत रसायनिक पदार्थ तसंच प्लास्टिकचं गोदाम होतं. या रसायनांमुळे  आगीला भीषण स्वरूप प्राप्त झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण कोरियाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर सिओल इथं पोहोचले. भारताच्या सिओल इथल्या राजदूत श्रीप्रिया रंगनाथन तसंच दक्षिण कोरियाचे माहिती तंत्रज्ञान मंत्री यू यंगमिन यांनी पंतप्रधानांचं स्वागत केलं. मोदी यांच्या या दौऱ्यात त्यांना सिओल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे

*****

***

No comments: