Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 29 January 2020
Time 1.00 to
1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– २९ जानेवारी २०२० दुपारी ०१.०० वाजता
****
कोरोना
विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरात आतापर्यंत १०६ जणांचा मृत्यू
झाला असून, साडे चार हजार लोकांना त्याची बाधा झाली आहे. लोकांनी घाबरुन जाऊ नये असं आवाहन WHO अर्थात,
जागतिक आरोग्य संघटनेनं केलं आहे. भारतासह जगातले सर्व देश चीनच्या हुबेई प्रांतातून आपल्या नागरिकांना परत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र तिथून परदेशी नागरिकांना
बाहेर काढण्याची गरज वाटत नसल्याचं जागतिक
आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.
दरम्यान नोवेल कोरोना विषाणूवर प्रतिबंधक
लस विकसित करत असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे.
यासाठी जागतिक आरोग्य प्राधिकरणाला चीननं सहकार्य करावं, असं आवाहन
अमेरिकेनं केलं आहे.
या लसीची पहिली चाचणी घ्यायला तीन महिने लागतील आणि त्यानंतर आलेल्या माहितीच्या पृथक्करणासाठी आणखी तीन महिने करण्यासाठी लागतील,
त्यानंतरच दुसरी चाचणी घेता येणार आहे.
****
नागरिकत्व सुधारणा कायदा तसंच राष्ट्रीय
लोकसंख्या नोंदणी या कायद्यांना
विरोध करण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चा या संघटनेच्या वतीनं आज भारत बंदची हाक देण्यात
आली होती. या बंदला कोल्हापूर जिल्ह्यात फारसा प्रतिसाद मिळाला नाही. सर्व नागरी व्यवहार, सार्वजनिक वाहतूक, शाळा महाविद्यालयं सुरळीतपणे सुरू
आहेत. बंदचा कोणताही परिणाम जनजीवनावर जाणवला नाही. संघटनेच्या वतीनं आज पोलिस बंदोबस्तात मोर्चा
काढण्यात आला.
सातारा शहर आणि जिल्ह्यातही या बंदला फारसा प्रतिसाद
दिसून आला नाही. या
ठिकाणचे सर्व व्यवहार सुरळीत सुरु आहेत.
सांगली जिल्ह्यातल्या मिरज इथं मात्र
या बंदला हिंसक वळण लागलं. आंदोलकांनी ऑटो रिक्षांच्या काचा फोडून रिक्षा
वाहतूक बंद पाडली. वाहनांची तोडफोड करणाऱ्या तरुणांपैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
नाशिक मध्ये या बंदला अल्प प्रतिसाद मिळाला.
बहुजन क्रांती मोर्चा संघटनेच्या वतीनं शहरात मोर्चा काढण्यात येत आहे.
ठाणे शहर परिसरातही बंदचा फारसा
परिणाम जाणवला नाही, मात्र उपनगरी रेल्वेसेवा काही अंशी विस्कळीत झाली. मुंबईत कांजूरमार्ग
इथं रेल्वेमार्गावर आंदोलन करणाऱ्या सुमारे शंभर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
व्यापारी उद्योजक यांची शिखर संस्था असणाऱ्या
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या संस्थेनं यापुढे कोणत्याही राजकीय बंदमध्ये
व्यापारी उद्योजक सहभागी होणार नसल्याचा निर्णय घेतला आहे, याची अंमलबजावणी आजच्या बंदपासून
सुरू करण्यात आली.
****
नाशिक जिल्ह्यात काल बस आणि ऑटो
रिक्षाच्या अपघातातली मृतांची संख्या २६ झाली आहे. काल बस आणि रिक्षाची समोरासमोर धडक
होऊन, दोन्ही वाहनं रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळून हा अपघात झाला होता.
****
शिक्षणामुळे
विद्यार्थ्यांत सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो आणि त्यांचा सर्वांगीण विकास होतो, असं मत पोलीस
अधीक्षक सुहेल शर्मा यांनी व्यक्त केलं. सांगली जिल्ह्यातल्या
मिरज इथं अटल टिंकरिंग लॅबच उद्घाटन पोलीस अधीक्षक शर्मा यांच्या हस्ते करण्यात आलं त्या वेळी काल बोलत होते. शास्त्रज्ञ
आणि तंत्रज्ञ तयार करणं,
गुणवत्ता प्रदान शिक्षणाबरोबरच शास्त्रज्ञ तयार करणं या उद्देशानं ही लॅब
तयार करण्यात आली आहे.
***
नाशिक जिल्ह्यात थंडीची तीव्रता वाढली आहे. नाशिक शहरात
आज सकाळी १३ पूर्णांक ९ दशांश इतक्या तापमानाची नोंद झाली.
***
भंडारा जिल्ह्यात सन २०१९-२० या
वर्षातल्या विकास कामांना
निधी देण्याचे तसंच पुढील आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करण्याचे
निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले. आज विधीमंडळात
विविध विभागांच्या सचिवांबरोबर पटोले यांनी बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना
केल्या.
****
बॅटमिंटनपटू
सायना नेहवालनं आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, नवी दिल्लीत भाजप पदाधिकाऱ्यांच्या
उपस्थितीत सायननं पक्षाचं प्राथमिक सदस्यत्व स्वीकारलं. सायनाची मोठी बहीण चंद्रांशू
नेहवाल हिनेही आज भाजपात प्रवेश केला.
****
पुणे इथं झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय बिलियर्ड्स स्पर्धेत
पंकज अडवाणीनं विजेतेपद मिळवलं आहे. काल झालेल्या अंतिम सामन्यात पंकजनं सौरव कोठारीचा पाच - दोन असा पराभव केला. पंकजचं हे ३३वं विजेतेपद
आहे.
****
भालाफेकपटू नीरज चोप्राने
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतला प्रवेश निश्चित केला आहे.
****
No comments:
Post a Comment