Wednesday, 29 January 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.01.2020 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 January 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ जानेवारी २०२० सायंकाळी ६.००
****

 न्यूझीलंड इथं झालेल्या तिसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात भारतानं सुपरओव्हर जिंकून विजय पटकावला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत यजमान संघानं भारतीय संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलं. भारतीय संघानं रोहित शर्माच्या ६५ धावांच्या बळावर वीस षटकांत पाच बाद एकशे एकोणऐंशी धावा केल्या. न्यूझीलंडचा संघही वीस षटकांत सहा बाद एकशे एकोणऐंशी धावाच करू शकला, त्यामुळे सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडने सतरा धावा केल्या, रोहित शर्माच्या दोन षटकारांच्या बळावर भारतानं अठरा धावा करून, सुपर ओव्हर आणि सामनाही जिंकला. पाच सामन्यांच्या या मालिकेत तीन सामने जिंकून भारतानं मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे.
****

 राज्य शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार उषा खन्ना यांना जाहीर झाला आहे. मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि ५ लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरुप असून सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते उद्या मुंबईत उषा खन्ना यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरुष संगीतकारांचं वर्चस्व असलेल्या हिंदी चित्रपटसृष्टीत संगीत दिग्दर्शक म्हणून यशस्वी कारकीर्द घडवणाऱ्या उषा खन्ना यांनी बिन फेरे हम तेरे, लाल बंगला, सबक, हवस, हम हिंदुस्थानी, आप तो ऐसे ना थे, साजन बिना सुहागन, साजन की सहेली, अनोखा बंधन, शबनम, सौतन, आओ प्यार करे यासारख्या अनेक चित्रपटांना संगीत दिलं आहे. 
****

 नागरिकत्व सुधारणा कायदा तसंच राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी या कायद्यांना विरोध करण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चा, काही कामगार संघटना तसंच सामाजिक संघटनांच्या वतीनं आज पुकारण्यात आलेल्या भारत बंद ला राज्यभरात संमिश्र मिळाला.

 औरंगाबाद शहरातल्या काही भागांमध्ये दुकाने बंद करण्यासाठी फिरत असलेल्या जमावाला व्यापाऱ्यांनी विरोध केला असता काही काळ तणाव निर्माण झाला होता. जिल्ह्यातल्या खुलताबाद शहरातला आठवडी बाजार भरला नाही, अजिंठा चौफुली इथं मोर्चा काढण्यात आला. तर, सिल्लोड, बिडकीन, करमाड, शेकटा परिसरात बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला.

 नांदेड शहरातल्या व्यापाऱ्यांनी बंद पाळण्यास नकार देत आपली व्यावसायिक प्रतिष्ठानं सुरू ठेवली. हिंगोलीतही किरकोळ दुकानं बंद होती, मात्र त्याचा बाजारपेठेवर परिणाम जाणवला नाही. परभणी जिल्ह्यात सेलू गंगाखेड तालुक्यात बंदला काहीही प्रतिसाद मिळाला नाही, उर्वरित जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद दिसून आला. लातूर इथंही बंदला प्रतिसाद दिसून आला नसल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

 यवतमाळ तसंच धुळे शहरात मात्र बंदला हिंसक वळण लागलं, धुळ्यात आंदोलकांनी अनेक वाहनांवर दगडफेक केली तर काही वाहनं पेटवून दिल्याचं वृत्त आहे.

 यवतमाळ इथं आंदोलकांनी दगडफेक केल्यामुळे वातावरण चिघळलं, व्यापारी आणि आंदोलक आमने सामने आल्याने दोन्ही गटात वाद झाला. पोलिसांना लाठीमार करून, परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली.
****

 महाविद्यालयीन शिक्षणात गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच कौशल्य विकास प्रशिक्षणाचा अंतर्भाव केल्यास शहराकडे धाव घेणारे विद्यार्थ्यांचे लोंढे थांबतील, असं राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान - ‘रुसा’चे ज्येष्ठ सल्लागार डॉ. प्रमोद पाबरेकर यांनी म्हटलं आहे. हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापूर इथं नारायणराव वाघमारे महाविद्यालयात डॉ. पाब्रेकर यांच्या हस्ते आज पदवी प्रदान समारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. ग्रामीण भागातली गुणवत्ता तंत्रशुद्ध पद्धतीने विकसित होण्यावर डॉ पाब्रेकर यांनी यावेळी भर दिला.
****

 ग्रंथालय चळवळ तसंच शिक्षण क्षेत्रातले ज्येष्ठ कार्यकर्ते अनंतराव चाटे यांचं आज बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं निधन झालं, ते ६६ वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून आजारी असलेले चाटे यांच्यावर अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू होते, उपचारादरम्यान आज त्यांचं निधन झालं, त्यांच्या पार्थिव देहावर वरवटी इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
 लातूर इथं कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन नियमित वर्गांना सुरुवात केल्यावरच सर्व समस्या सोडवल्या जातील, असं वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाचे  कुलगुरु डॉ अशोक ढवण यांनी स्पष्ट सांगितलं आहे. कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्यांची बदली करावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसांपासून विद्यार्थी विद्यार्थिनींनी ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे.
*****
***

No comments: