Tuesday, 27 October 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 27.10.2020 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२७ ऑक्टोबर २०२० सकाळी ११.०० वाजता

****

देशात गेल्या २४ तासांत कोविड संसर्ग झालेले ३६ हजार ४६९ नवे रुग्ण आढळले, त्यामुळे देशातली कोविड बाधितांची एकूण संख्या ७९ लाख ४६ हजारावर पोहोचली आहे. यापैकी ७२ लाखावर रुग्ण या संसर्गातून आतापर्यंत बरे झाले आहेत.

****

राज्यात काल दिवसभरात आणखी तीन हजार ६४५ कोविड बाधितांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १६ लाख ४८ हजार ६६५ झाली आहे. राज्यभरात काल ८४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मराठवाड्यात कोरोना विषाणू संसर्गामुळे काल २१ रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या ३८१ रुग्णांची नोंद झाली.

****

औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना विषाणू संसर्गाचे ३७ हजार ५६५ रुग्ण आढळले आहेत. यापैकी ३५ हजार ४७४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.‌ सध्या एक हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरु असून जिल्ह्यात या विषाणू संसर्गानं मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार ५८ झाली आहे.

****

मुंबईत गेल्या चोवीस तासात नव्या ८०४ कोविड रुग्णांची भर पडली असून ३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता पर्यंत एकूण २ लाख बावन हजार ८७ रुग्णांची नोंद झाली असून १० हजार ९९ रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या १९ हजार ३५ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

****

सांगली जिल्ह्यातल्या राज्य महामार्ग परिवहन महामंडळाच्या १०६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं निष्पन्न झालं आहे. सांगली आगारातले ४२५ कर्मचारी मुंबईला बेस्ट उपक्रमात सेवा देण्यासाठी गेले होते. त्यात चालक, वाहक आदी कर्मचारी त्यांची दहा दिवसांची सेवा झाल्यानंतर ते सांगलीला परतले त्यापैकी १०६ कर्मचारी कोविड बाधित झाल्याचं आढळलं आहे.

****

ऊसाचा एफआरपी वाढीव रास्त आणि किफायतशीर दर आणि तसंच ऊस तोडणी, वाहतुकीचा दर साखर उद्योगाला परवडणारा नाही असं मत सांगली जिल्ह्यातल्या कुंडल इथल्या क्रांतीअग्रणी सहकारी कारखाण्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी म्हटलं आहे. कारखान्याच्या १९ व्या गळित हंगामाचा प्रारंभ केल्यानंतर काल ते बोलत होते. साखरेचा दर किमान ३ हजार ३५० रुपये क्विंटल केल्याशिवाय अडचणी दूर होणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं.

****

लातूर जिल्ह्यातल्या विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा ३४वा बॉयलर अग्निप्रदिपन सोहळा कारखान्याचे अध्यक्ष दिलीप देशमुख आणि लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांच्या हस्ते झाला. काळाची गरज ओळखून शेतकऱ्यांनी कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न देणाऱ्या ऊस जातीची लागवड करावी असं आवाहन दिलीप देशमुख यांनी यावेळी केलं.

****

No comments: