Monday, 10 November 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.11.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 10 November 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १० नोव्हेंबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      दोन लाखापेक्षा जास्त लोकसंख्येच्या प्रत्येक शहरात नागरी सहकारी बँक उभारण्याचं केंद्रीय सहकार मंत्र्यांचं आवाहन

·      मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार

·      नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला प्रारंभ

·      अन्नदाता असलेला शेतकरी आता ऊर्जादाता झाल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन

आणि

·      प्रसिद्ध साहित्यिक डॉ. वृषाली किन्हाळकर यांना शिरीष पै जीवनगौरव पुरस्कार जाहीर

****

देशातल्या दोन लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या प्रत्येक शहरात येत्या पाच वर्षांत किमान एक नागरी सहकारी बँक उभारण्याचं आवाहन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं आज सहकारिता महाकुंभ २०२५ या, शहरी सहकारी कर्जासंबंधीच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. शहा यांनी सहकार डिजी पे आणि सहकार डिजी लोन या दोन डिजिटल मंचांचा यावेळी प्रारंभ केला. या दोन मंचांचा मोठा फायदा सहकारी बँकांना होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले

बाईट - केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा

 

अमूल आणि इफको या भारताच्या सहकार क्षेत्रातल्या कंपन्यांनी, जगातल्या आघाडीच्या सहकारी संस्था म्हणून स्थान मिळवल्याबद्दल शहा यांनी त्यांचं अभिनंदन केलं. देशातल्या सहकारी संस्था मजबूत करण्यासोबतच वंचितांना वर आणण्याचं ध्येय सहकार मंत्रालयानं ठेवलं असल्याचं त्यांनी सांगितलं. सहकार संस्थांनी कामाचा दर्जा सुधारणं, आर्थिक शिस्त कायम ठेवणं आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानात पारंगत असलेल्यांना या प्रणालीत आणणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

****

मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. ते आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. कोणताही पक्ष आघाडीचा प्रस्ताव घेऊन आला तर विचार होईल, मात्र सध्या काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणुकीची तयारी करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

नाशिक जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्रितपणे लढणार आहे. उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरद पवार गट, कॉंग्रेस, माकप, भाकप आणि मनसेच्या नाशिकमधील पदाधिकाऱ्यांच्या आज नाशिक इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

****

राज्यातल्या २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात झाली. १७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. निवडणुकीसाठीचं मतदान दोन डिसेंबरला, तर मतमोजणी तीन डिसेंबरला होणार आहे.

****

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठीचं मतदान उद्या होणार आहे. या टप्प्यात १२२ मतदारसंघासाठी मतदान होणार असून, एक हजार ३०२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तीन कोटी ७० लाख मतदार या उमेदवारांमधून आपल्या लोकप्रतिनिधींची निवड करतील. दोन्ही टप्प्यातील मतमोजणी येत्या १४ तारखेला होणार आहे.

****

हरियाणा पोलिस तसंच जम्मू काश्मीर पोलिसांनी आज एका संयुक्त कारवाईत दिल्लीजवळ फरीदाबाद इथून एका काश्मिरी डॉक्टरला अटक केली. या डॉक्टरच्या घरातून पोलिसांनी सुमारे ३०० किलो RDX, AK-47 आणि इतर सामग्री जप्त केली.

याच कारवाईच्या मालिकेत गुजरात दहशतवादविरोधी पथकाने अहमदाबादमधून आयसिसशी संबंधित तीन संशयित दहशतवाद्यांना अटक केली. हे तिन्ही आरोपी देशभरात दहशतवादी हल्ल्यांची योजना आखत असल्याचा संशय आहे.

****

आज जागतिक विज्ञान दिवस साजरा केला जात आहे. युनेस्कोने २००१ पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. विज्ञानाद्वारे शांतता, सामाजिक प्रगती आणि विकास साधणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. विज्ञान फक्त प्रयोगशाळेपुरतं मर्यादित नसून, मानवी कल्याण, समाज आणि जागतिक शांततेशी घट्ट जोडलेलं आहे. भारतातही विज्ञानाचा समाज विकासासाठी उपयोग वाढत असून, जनसामान्यात वैज्ञानिक शोधांविषयी जागरूकता वाढवण्यासाठी आज देशभरात विविध चर्चासत्रं आणि परिषदांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

अन्नदाता असलेला शेतकरी आता ऊर्जादाता झाल्याचं प्रतिपादन, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातल्या किल्लारी इथल्या श्री निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या ४२ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ आज गडकरी यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते. इथेनॉलचा इंधन म्हणून वापर वाढत असून, अनेक वाहन कंपन्या इथेनॉलवर चालणारी वाहनं तयार करत असल्याचं सांगत, शेतकऱ्यांनी इथेनॉलचे पंप सुरू करावेत, असं आवाहन गडकरी यांनी केलं. ते म्हणाले

बाईट - केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी

सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, आमदार अभिमन्यू पवार, आमदार संभाजी पाटील निलंगेकर यावेळी उपस्थित होते. ऊसाचं उत्पादन ६० टनांच्या वर नेलं पाहिजे, उत्पादन वाढलं तर भाव वाढेल आणि शेतकऱ्यांचं भविष्य उज्ज्वल होईल, असं गडकरी यावेळी म्हणाले. गडकरी यांनी लातूर जिल्ह्यातील निर्माणाधीन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा यावेळी आढावा घेतला.

****

नांदेड इथल्या प्रसिद्ध साहित्यिक आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वृषाली किन्हाळकर यांना यावर्षीचा शिरीष पै जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. आत्रेय, परचुरे प्रकाशन आणि डिंपल पब्लिकेशनच्या संयुक्त विद्यमाने येत्या १५ नोव्हेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात डॉ. किन्हाळकर यांना हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्या मराठवाड्यातील त्या पहिल्याच लेखिका ठरल्या आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्रावरील दंड तसंच विलंब शुल्क माफ करण्यात आलं आहे. येत्या ३१ जानेवारी २०२६ पर्यंत या निर्णयाचा लाभ विद्यार्थ्यांना घेता येणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

लातूर जिल्हा परिषदेनं कार्यालयात उशिरा येणाऱ्या ३५ कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कापला आहे. कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित रहावेत म्हणून जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने चेहरा ओळख प्रणाली बसवली आहे. तरीही कर्मचारी कार्यालयात वेळेत उपस्थित राहत नसल्याने ही कारवाई करण्यात आल्याचं प्रशासनातर्फे सांगण्यात आलं.

****

जालना इथं आज सकल ओबीसी आणि भटके विमुक्त महासंघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचं एका सभेत विसर्जन झालं. या सभेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष विधीज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी मार्गदर्शन केलं. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काढलेल्या हैदराबाद गॅजेट अध्यादेशामुळे खऱ्या ओबीसी समाजाचं नुकसान असल्याचं मत आंबेडकर यांनी व्यक्त केलं.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्हा महाराष्ट्रामध्ये लसीकरणामध्ये अग्रेसर असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अभय धानोरकर यांनी दिली आहे. एप्रिल 2025 ते मार्च 2026 च्या दिलेल्या उद्दिष्टापैकी सप्टेंबर महिन्यात पन्नासहून अधिक प्राधिकरणाचे काम पूर्ण झाले असल्याचेही धानोरकर यांनी सांगितले.

****

लातूर इथं आज शहर भाजपच्यावतीनं राष्ट्रीय एकता दौड घेण्यात आली. या दौडमध्ये पाच हजारापेक्षा अधिक स्पर्धकांनी भाग घेतला. दोन टप्प्यात घेण्यात आलेल्या या दौडचा शुभारंभ जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, शहर निवडणूक प्रमुख अर्चना पाटील चाकूरकर, यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.

****

छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिरी दिलीप स्वामी यांनी नुकतीच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. जिल्ह्यातील सहा नगरपरिषद आणि एक नगरपंचायतीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे.

****

चिलीतील सॅंटियागो इथं येत्या २५ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या FIH महिला ज्युनियर हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी हॉकी इंडियाने २० सदस्यीय संघाची आज घोषणा केली. ज्योती सिंग संघाचे नेतृत्व करणार आहे तर माजी हॉकी खेळाडू तुषार खांडकर हे संघाचे प्रशिक्षक आहेत.

****

राज्यात आज जळगाव इथं सर्वात कमी ९ पूर्णांक पाच अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. त्या खालोखाल नाशिक इथं १० पूर्णांक आठ अंश तापमान नोंदवलं गेलं. मराठवाड्यात बीड इथं ११ पूर्णांक पाच अंश, छत्रपती संभाजीनगर इथं ११ पूर्णांक आठ अंश, परभणी इथं १४ अंश तर धाराशिव इथं १४ पूर्णाक चार अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

****

No comments: