आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०४ मे २०२१ सकाळी ११.०० वाजता
****
देशात कोविड-19च्या संकटाचा
मुकाबला करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावं यादृष्टीनं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण
निर्णय घेतले. यामुळे कोविड रुग्णावर उपचार करण्यासाठी,
वैद्यकीय व्यावसायिकांची वाढ होण्यास मदत होणार आहे. राष्ट्रीय पात्रता आणि
प्रवेश परीक्षा- नीट पदव्युत्तर परीक्षा, किमान चार महिने स्थगित
करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
****
माजी केंद्रीय मंत्री आणि जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन यांचं आज नवी दिल्लीमध्ये
अल्पशा आजारानं निधन झालं, ते ९४ वर्षांचे होते. जगमोहन यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल
म्हणूनही काम केलं होतं. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी दळणवळण, शहर
विकास, पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. भारत सरकारनं
त्यांचा १९७१ मध्ये पद्मश्री, १९७७ मध्ये पद्मभूषण आणि २०१६ मध्ये पद्मविभूषण सन्मान
देऊन गौरव केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख
व्यक्त केलं आहे.
****
बेकायदा फोन टॅपिंग आणि संवेदनशील कागदपत्र उघड केल्याच्या आरोपाखाली प्रथम माहिती
अहवाल दाखल झाल्यानं, आणि याप्रकरणी सायबर पोलिसांनी चौकशीसाठी दोन वेळा समन्स बजावल्यानं,
वरीष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी, मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली
आहे. आपण भ्रष्टाचार समोर आणला असल्यानं, राज्य सरकारनं खोटा आणि चुकीचा एफआयआर करुन,
आपल्यावर दबाव टाकायला सुरुवात केल्याचा आरोप शुक्ला यांनी केला आहे.
****
महाविकास आघाडी सरकारने आदिवासी कुटुंबांसाठीची खावटी वाटप योजना पुनरूज्जीवित
केल्यामुळे नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत १० हजार २८४ अर्ज मंजूर झाल्याची माहिती पालकमंत्री
अशोक चव्हाण यांनी दिली. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून एक मे रोजी ही योजना संपूर्ण
महाराष्ट्रात लागू करण्यात आली आहे.
****
परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या
पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं, संपूर्ण
जिल्ह्यात निर्बंध लागू केले असतांना देखील, काल शहरातल्या बाजारपेठांमध्ये नागरिकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली. वसमत रस्त्यालगत
तसंच मध्यवस्तीत नागरिकांनी केलेल्या गर्दीमुळे, वाहतुकीची
मोठी कोंडी निर्माण झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment