Monday, 2 December 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 02.12.2019 07.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 December 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक डिसेंबर २०१सकाळी ७.१० मि.
****
** दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याचं राज्य सरकारचं आश्वासन
** राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांची बिनविरोध निवड तर विरोधीपक्ष नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती
** राज्याच्या आर्थिक स्थितीचा अहवाल सादर करण्याचे आणि आरे मेट्रो कारशेड विरोधी आंदोलनात दाखल गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्याचे आदेश
आणि
** उस्मानाबाद जिल्ह्यातल्या नळदुर्ग नगरपालिकेत घरकुल बांधकाम गैरव्यवहार प्रकरणी माजी नगराध्यक्षांसह उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी, नगर अभियंता आणि दोन ठेकेदारांसह आठ जणांवर गुन्हा
****
दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याचं आश्वासन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिलं आहे. राज्य विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात काल राज्यपालांचं मराठीतून अभिभाषण झालं, त्यावेळी त्यांनी आगामी काळात सरकारकडून करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेतला. बेरोजगारी कमी करण्याबरोबरच शेती, उद्योग, आरोग्य, शिक्षण या क्षेत्रांसह राज्याच्या सर्वांगिण विकासासाठी सरकार कटिबद्ध असेल, असं ते म्हणाले. राज्याच्या सीमा भागातल्या जनतेला न्याय देण्यासाठी सरकार प्रयत्न करणार, हे सरकार शेतकऱ्यांना कर्जमुक्त आणि चिंतामुक्त करेल आणि शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी योग्य पावलं उचलेल, असा विश्वासही राज्यपालांनी व्यक्त केला. वाढती बेरोजगारी कमी करण्याला सरकारचं प्राधान्य असून, रोजगारनिर्मिती आणि भूमिपुत्रांना नोकऱ्यांसाठी शासन कायदा करेल, असं त्यांनी सांगितलं. मराठवाडा आणि विदर्भाच्या विकासासाठी विशेष स्तरावर शासनाकडून प्रयत्न केले जातील, त्याचबरोबर राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शिस्त लावण्याचा प्रयत्न सरकार करेल, असंही राज्यपालांनी आपल्या भाषणात नमूद केलं.
****
राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांची काल बिनविरोध निवड झाली तर विरोधीपक्ष नेते म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवार किसन कथोरे यांनी काल आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे पटोले यांची निवड बिनविरोध झाली. शेतकऱ्यांचं रक्षण, समाजहीत हे आपलं ध्येय असून कोणावरही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही पटोले यांनी अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाना पटोले यांचं अभिनंदन करताना, विधानसभा अध्यक्ष म्हणून काम करताना कोणावरही अन्याय होणार नाही, अशी भूमिका अध्यक्षांनी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. पटोले हे अन्याय सहन न करणारे नेते आहेत, असं ते म्हणाले.
या सभागृहाच्या परंपरेनुसार अध्यक्ष बिनविरोध निवडले जावेत, या हेतूनं भाजपनं आपले उमेदवार किसन कथोरे यांचा अर्ज परत घेतल्याचं सांगत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पटोले यांचं अभिनंदन केलं. लोकहितांच्या बाबींवर विरोधी पक्ष म्हणून प्रश्न मांडले जात असताना अध्यक्षांकडून सहकार्याची अपेक्षा असेल, असंही फडणवीस म्हणाले. शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील, काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात, यांच्यासह सभागृहातल्या इतर सदस्यांनी पटोले यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदनपर भावना व्यक्त केल्या.
****
विरोधी पक्षनेतेपदी भारतीय जनता पक्षाचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात येत असल्याचं विधानसभा अध्यक्ष पटोले यांनी काल घोषीत केलं. सर्व विधानसभा सदस्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. यावेळी बोलताना त्यांनी, देवेंद्र फडणवीस यांचं केवळ विरोधी पक्षनेता म्हणून नाही, तर सभागृहातला एक जबाबदार नेता म्हणून अभिनंदन करतो, असं म्हटलं. यापुढच्या काळात विरोध हा शब्द बाजुला काढून सर्वजण मिळून जनतेच्या हितासाठी व्यापक कार्य करुया, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते जयंत पाटील, छगन भुजबळ, अजित पवार, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, प्रहारचे नेते बच्चू कडू, बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर, समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनी देखील अध्यक्ष पदावर नाना पटोले, तर विरोधीपक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं.
अभिनंदन प्रस्तावाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेतेपदी निवड केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. जनतेच्या हिताच्या योजना पूर्ण करण्याकरता विरोधी पक्ष म्हणून आम्ही सरकारला सहकार्य करु, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. 
****
राज्याच्या आर्थिक स्थितीचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांकडून मागितला आहे, विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर वार्ताहरांशी बोलतांना याबाबत त्यांनी माहिती दिली. राज्याची आर्थिक स्थिती जाणून घेतल्यावरच पुढचे निर्णय घेणं सोपे जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. त्याचबरोबर आरे मेट्रो कारशेड विरोधी आंदोलनात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचे आदेशही देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. सत्तेवर येताच ठाकरे यांनी आरेतल्या मेट्रो कारशेडच्या बांधकामास स्थगिती दिली होती. त्यानंतर आता आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. विकास आणि पर्यावरण हे दोन्हीही सोबत असले पाहिजे, अशी आपली भूमिका असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. येत्या एक-दोन दिवसात खाते वाटप जाहीर केलं जाईल, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
दरम्यान, मेट्रो रेल्वेसाठीचं कारशेड गोरेगावच्या राज्य राखीव पोलिस दलाच्या कवायत मैदानावर उभारण्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे. पक्षाचे प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं की, १०२ हेक्टर्सची ही जागा असून सध्या या मैदानावर केवळ लग्न सोहळे होत आहेत. कारशेडसाठी केवळ ५२ हेक्टर्स जागेची आवश्यकता असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
दरम्यान, विधिमंडळाचं विशेष अधिवेशन काल संस्थगित करण्यात आलं. पुढचं हिवाळी अधिवेशन येत्या १६ डिसेंबरपासून नागपूर इथं सुरु होणार असल्याची घोषणा विधानसभेत अध्यक्ष नाना पटोले आणि विधानपरिषदेत सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केली.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या नळदुर्ग नगरपालिकेत घरकुल बांधकाम गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन नगराध्यक्षांसह उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी, नगर अभियंता आणि दोन ठेकेदारांसह आठ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे, निर्मलाताई गायकवाड, उपाध्यक्ष नय्यर जहागिरदार, मुख्याधिकारी दिलीप देशमुख यांचा समावेश आहे. २००८ साली केंद्र शासन पुरस्कृत गृहनिर्माण आणि झोपडपट्टी विकास कार्यक्रमात मंजुर बाराशे घरकुलांच्या कामात परस्पर संगनमतानं जवळपास अडीच कोटी रूपयांचा अपहार केल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. या तक्रारीची चौकशी केल्यानंतर आढळलेल्या तथ्याच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांविरूद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. मोजमाप पुस्तिकेत बांधकामाचं बनावट मोजमाप नोंदवल्याचं चौकशीत आढळून आलं. संदर्भात याबाबत पालिका मुख्याधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
****
औरंगाबाद महानगरपालिकेला पूर्णवेळ आयुक्त देण्याची मागणी औरंगाबाद मध्यचे शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. याबाबतचं निवेदन जैस्वाल यांनी काल मुख्यमंत्र्यांना सादर केलं. शहरात डेंग्यूनं थैमान घातलं आहे. जवळपास १५ नागरिकांचा डेंग्यूनं मृत्यू झाला आहे. आयुक्त मागील दिड महिन्यांपासून रजेवर असल्यानं आरोग्यासंदर्भातील तसंच विविध विकास कामं खोळबली असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.
****
परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या रायखेडा आणि मोळा या गावातल्या पाझर तलावासाठी संपादित करावयाच्या जमिनिच्या भूसंपादनाची प्रक्रिया एका महिन्यात पूर्ण करुन शेतकऱ्यांना मोबदला द्यावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत. या शेतजमिनी २००७ - २००८ या वर्षाता रोजगार हमी योजनेअंतर्गत पाझर तलावासाठी संपादित करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतर जमिनींचा मोबदला या शेतकऱ्यांना मिळाला नाही. यासंदर्भात या गावांमधल्या शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठानं हे आदेश दिले. येत्या एक महिन्यात सुनावणीअंती न्यायालयानं प्रतिवादींना नोटीस जारी करण्याचेही आदेश दिले आहेत. यासंदर्भातली पुढची सुनावणी नऊ डिसेंबरला होणार आहे.
****
जागतिक एड्स दिनानिमित्त हिंगोली शहरात काल विविध कार्यक्रम झाले. जिल्हा सामान्य रुग्णालयापासून प्रभातफेरी काढण्यात आली. जिल्हा शल्य चिकित्सक किशोरप्रसाद श्रीनिवास यांच्यासह विविध आधिकारी, आरोग्य कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक या फेरीत सहभागी झाले. सर्वांना यावेळी शपथ देण्यात आली. जनजागृती साठी विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमही या निमित्त घेण्यात आले.
परभणी शहरातही एड्स दिनानिमित्त काल प्रभात फेरी काढण्यात आली होती. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. एस. नागरगोजे यांनी या फेरीला हिरवा झेंडा दाखवला. तसंच जिल्हा रुग्णालयात एड्स जनजागृतीपर पथनाट्य, गीत गायन आदी कार्यक्रम पार पडले.   
****
लातूर जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातल्या तळेगाव इथल्या जागृती साखर कारखान्याच्या आठव्या गळीत हंगामाचा शुभारंभ काल कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दिलीप देशमुख यांच्या हस्ते झाला. मांजरा परिवाराच्या परंपरेनुसार साखर कारखाना अधिक भाव देणार असून, शेतकर्यांनी ऊस गाळप करण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन देशमुख यांनी यावेळी केलं.
****
परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा पंचायत समितीनं काल बानेगाव ग्रामपंचायतीला भेट देऊन नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी प्रबोधन केलं. यावेळी या गावातल्या नागरिकांनी स्वच्छतेशी प्रेरित होऊन डिसेंबर अखेर गाव पाणंदमुक्त करण्याचा निर्धार केला.
****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...