Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 21 December 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ डिसेंबर
२०१९ दुपारी १.०० वा.
****
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या नागरिकत्व सुधारणा
कायद्यावरून लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला आहे. तसंच त्रुणमूल काँग्रेस, आप आणि डावे
पक्ष देखील नागरिकत्व सुधारणा कायद्याला राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायद्याशी जोडून
लोकांमध्ये भय पसरवत असल्याचा त्या म्हणाल्या. सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज
उठवण्याचा नागरिकांना अधिकार असल्याचं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटलं
होतं.
****
नागरिकत्व सुधारणा कायद्याचा
मुद्दा उपस्थित करुन संकटात असलेल्या अर्थव्यवस्थेवरून जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्यात
येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. ते आज
पुणे इथं एका पत्रकार परिषदेत बोलत होते. नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन देशभरात होत
असलेल्या घटनांमुळे सामाजिक आणि धार्मिक ऐक्याला धोका असून या संदर्भात केवळ एका विशिष्ट
वर्गाला लक्ष्य करण्यात येत असल्याचं पवार म्हणाले. देवेंद्र फडणवीस सरकारनं आर्थिक
शिस्त बिघडवल्यामुळं राज्याची आर्थिक स्थिती खराब झाली असल्याच्या कॅगच्या अहवालाची
राज्य सरकारनं सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.
****
देशात दंगलीसदृश्य परिस्थिती
आहे, मात्र मोर्चे काढणाऱ्या अनेक लोकांना या कायद्यांबाबत माहिती नसल्याचं महाराष्ट्र
नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात पत्रकार परिषदेत
बोलत होते. मात्र, गृहमंत्री अमित शाह यांनी देशातल्या सर्वात मोठ्या आर्थिक मंदीवरील
लोकांच लक्ष हटवण्यासाठी नागरिकत्व कायद्याची
खेळी केला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. देशात जे १२५ कोटी नागरिक आहेत त्यांचीच सोय नाही तर मग बाहेरच्या
नागरिकांना नागरिकत्व देण्याची गरज काय असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तसंच या
देशात पाकिस्तान, बांग्लादेशातून आलेल्या नागरिकांना हकलून लावण्याची गरज असल्याचं
राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रात सत्तास्थापनेमध्ये
जे काही घडलं ते मतदारांशी प्रतारणा असल्याचं ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस आणि अजित
पवार यांनी सत्तास्थापनेसाठी केलेली युती देखील चुकीचीच होती अशी टिकाही राज यांनी
केली.
****
भारत आणि चीनच्या विशेष प्रतिनिधींची सीमारेषेबाबत
नवी दिल्लीत बैठक सुरु आहे. उभय देशांमधली ही २२ वी बैठक आहे. भारतीय शिष्टमंडळाचं
नेतृत्व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल तर चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी
चीनच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष
शी जिनपींग यांच्यामध्ये ऑक्टोबरमध्ये चेन्नईत झालेल्या दुसऱ्या अनौपचारिक बैठकीनंतर
उभय देशांच्या विशेष प्रतिनिधींची ही पहिलीच बैठक होत आहे.
****
जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात पुन्हा नव्यानं
बर्फवृष्टी झाल्यानं उत्तर भारतात थंडीची लाट कायम आहे. हिमाचल प्रदेशात हवामान खात्यानं
हिमवृष्टी आणि जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. तीव्र थंडीची लाट आणि धुक्याचं
वातावरण कायम असल्यामुळं दिल्ली विमानतळावरील १९ विमानसेवा रद्द करण्यात आल्या असून
१०० रेल्वे उशिरानं धावत असल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे. तसंच पंजाब आणि हरियानामध्येही
थंडीची लाट कायम असून हिसारमध्ये साडे अंश डिग्री सेल्सीअस तापमानाची नोंद झाली आहे.
****
युवा पिढीने इतिहासातून
प्रेरणा घ्यावी आणि जागतिक पातळीवर यश संपादन करावं असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
यांनी म्हटलं आहे. अमरावती इथं काल ते बोलत होते. राज्यपालांच्या हस्ते काल अमरावती
इथं राजमाता अहिल्यादेवी पुरस्कार देऊन समाजसेविका, गौरी सावंत, अभिनेत्री सुधा चंद्रन
आणि क्रीडापटू छाया भट तसंच प्रशासकीय अधिकारी वर्षा भाकरे यांना गौरवण्यात आलं. त्यांच्या
हस्ते काल आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचं उद्घाटनही करण्यात
आलं.
****
गाडगेबाबांच्या समाधी
मंदिराच्या विकास आराखड्याचा प्रस्ताव मंजूर करण्यासंदर्भात आपण अर्थमंत्री जयंत पाटील
यांच्याशी चर्चा करणार असून गाडगेबाबांची सेवा हे आपलं प्राधान्य राहील, असं खासदार
सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. अमरावती इथं गाडगेबाबांच्या समाधीस्थळाला भेट दिल्यानंतर
त्या काल बोलत होत्या. या विकास आराखड्याच्या मंजूरीसंदर्भात शासनस्तरावर प्रयत्न करण्यात
येतील असं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
कृषी क्षेत्राच्या विकासाच्यादृष्टीनं
शेतकऱ्यांपर्यंत शाश्वत तंत्रज्ञानाची माहिती पोहचवणारं आकाशवाणी हे एकमेव शासकीय माध्यम
आहे, असं मत आकाशवाणीच्या मुंबई केंद्राचे सहाय्यक कार्यक्रम संचालक कपिलकुमार धोरे
यांनी व्यक्त केलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment