आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
Saturday, 31 October 2020
Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.10.2020 रोजीचे संध्याकाळी 06.00 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 October 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ ऑक्टोबर २०२० सायंकाळी ६.००
****
· पुलवामा हल्ल्याप्रकरणी विरोधी पक्षांचा खरा चेहरा
जनतेसमोर उघड - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
· केंद्र सरकारनं लागू केलेल्या कृषी संबंधित कायद्यांच्या
विरोधात काँग्रेस पक्षाचं राज्यव्यापी सत्याग्रह आंदोलन.
· देशात कोविड १९ संसर्गाचे रुग्ण बरं होण्याचं प्रमाण
९१ पूर्णांक ३४ दशांश टक्क्यांवर.
आणि
· लोकशाहीत उत्तम विरोधी पक्ष असल्याशिवाय राज्य पुढे
जात नाही - खासदार संजय राऊत.
****
गेल्या वर्षी जम्मू आणि काश्मीरमधल्या
पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यावर विरोधी पक्षांनी घेतलेल्या भूमिकेवरून त्यांचा खरा
चेहरा जनतेसमोर उघड झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या हल्ल्यात
निमलष्करी दलाच्या ४० जवानांचा मृत्यू झाल्यानंतरही विरोधी पक्षांना त्याचं दु:ख झालं
नसल्याचं ते म्हणाले. गुजरातमधल्या केवडियामधे एकता दिनानिमित्त काढण्यात आलेल्या दौडमध्ये
सहभागीं झालेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते. पुलवामामधल्या दुर्घटनेवर
सबंध देश शोक व्यक्त करत असताना काही लोक मात्र त्यांचा स्वार्थ साधण्यात गुंतले होते,
असंही ते म्हणाले. जेव्हा शेजारी देशाच्या संसदेमधे हे सत्य स्वीकारण्यात आल्यानंतर
आता विरोधी पक्ष उघडे पडले असल्याचं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. दहशतवादाचा सामुहिक
सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला त्या विरोधात एकजूट करण्याचं आवाहन देखील
त्यांनी यावेळी केलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना १४५ व्या जयंतीनिमित्त गुजरातमधल्या
केवडिया इथं जगातल्या सर्वात उंच पुतळा असलेल्या ’स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला पुष्पांजली
अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त
आयोजित करण्यात आलेल्या फेरीची पाहणी केली. यानिमित्तानं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर
यावर्षीचं सरदार पटेल स्मृती व्याख्यानमालेचं पुष्प गुंफणार आहेत. आकाशवाणीच्या सर्व
वाहिन्यांवरून हे व्याख्यान प्रसारित करण्यात येणार आहे. सरदार पटेल हे देशाचे पहिले
माहिती आणि प्रसारण मंत्री होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ १९५५ पासून आकाशवाणीवर
या व्याख्यानाचं प्रक्षेपण करण्यात येतं. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि माहिती आणि
प्रसारणमंत्री पियुष गोयल यांनीही सरदार पटेल यांना आदरांजली वाहिली.
****
केंद्र सरकारनं लागू केलेल्या
कृषी संबंधित कायद्यांच्या विरोधात काँग्रेस पक्षातर्फे आज राज्यव्यापी सत्याग्रह आंदोलन
करण्यात आलं. सरदार वल्लभभाई पटेल जयंती आणि माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या
पुण्यतिथीनिमित्त, वर्धा मधल्या सेवाग्राम आश्रमसमोर या आंदोलनाची सुरुवात झाली. यावेळी
बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी, महात्माजींनी आम्हाला न्याय
मागण्यासाठी सत्याग्रहाचा मार्ग दाखवला, त्याच मार्गानं आम्ही जात असून, सर्व धर्मसमभावाची
प्रार्थना करून हे आंदोलन करत असल्याचं सांगितलं. केंद्र सरकारचा कृषी कायदा शेतकरी
विरोधी तर नफेखोर आणि साठेबाजांच्या बाजूनं असल्यानं आम्ही त्याचा विरोध करत आहोत,
हा सत्याग्रह शेतकरी, कामगार, बहुजन आणि गरिबांसाठी असल्याचं थोरात यावेळी म्हणाले.
****
देशात कोविड १९ संसर्गाचे
रुग्ण बरं होण्याचं प्रमाण ९१ पूर्णांक ३४ दशांश टक्क्यांवर पोहोचलं असल्याचं केंद्रीय
आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. गेल्या चोवीस तासांत ४८ हजार २६८ नवे रुग्ण आढळले असून
५९ हजारांपेक्षा अधिक रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत या संसर्गातून एकूण ७४ लाख
३२ हजारांपेक्षा अधिक रुग्ण बरे झाले आहेत. तर देशात सध्या केवळ सात पूर्णांक १६ दशांश
टक्के एवढेच बाधीत रुग्ण उपचार घेत असल्याचं भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्थेनं म्हटलं
आहे. आतापर्यंतची देशातल्या रुग्णांची संख्या ८१ लाख ४८ हजार २६८ झाली असल्याचं आरोग्य
मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
मुंबईतल्या कोविड १९ च्या
रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. तसेच लोकांमधील आजाराच्या संक्रमणाचे दुपटीचे
प्रमाण होण्याचा कालावधी देखील वाढत आहे. आता लोकांमधील संक्रमण दुप्पट होण्याचा कालावधी
हा १५७ दिवसांपर्यंत वाढला आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी हे लोकांच्या घरोघर जाऊन
रुग्णांची माहिती गोळा करत आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर
तालुक्यातल्या आंबेलोहोळ इथं एका ७० वर्षीय कोरोना विषाणू बाधित महिलेचा उपचारा दरम्यान
मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत या विषाणू संसर्गानं एक हजार ७१ जणांचा मृत्यू झाला
आहे. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता ३८ हजार ४३ झाली असून केवळ ५४८ रुग्णांवर
सध्या उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात या विषाणू संसर्गाच्या रुग्णवाढीची संख्या कमी होत
असून आतापर्यंत ३६ हजार ४२४ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना सुटी देण्यात आली आहे.
****
धुळे जिल्ह्यात आज १९ जणांचे
अहवाल कोरोना विषाणू बाधित आले. यामुळे जिल्ह्यातली एकूण बाधित रुग्णांची संख्या १३
हजार ४०५ झाली आहे. आज २३ रुग्णांना बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले. सध्या ३०० रुग्णांवर
रुग्णालयात उपचार सुरू आहे.
****
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
यांनी आज राजभवनात सरदार वल्लभभाई पटेल तसंच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यातिथीनिमित्त
त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. राज्यपाल कोशारी यांनी एकता दिनानिमित्त
कर्मचारी, अधिकारी आणि उपस्थित पोलीस जवानांसह राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेतली.
****
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांच्या जयंती निमित्त अभिवादन केले. मातोश्री
निवासस्थानी पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं. मुख्यमंत्री
ठाकरे यांनी सरदार पटेल यांच्या जयंती निमित्त साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय एकता
दिवसाच्याही जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे
यांनी बंजारा समाजाचे श्रद्धास्थान तपस्वी डॉ.रामराव महाराज यांनाही श्रद्धांजली वाहिली.
त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालत राहणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असं ठाकरे
यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
****
लोकशाहीत उत्तम विरोधी पक्ष
असायला हवेत, त्याशिवाय राज्य पुढे जात नाही. चांगल्या विरोधकांचं स्वागत करावं या
मताचा मी आहे, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं. ते आज पुण्यात एका पत्रकार
परिषदेत बोलत होते. महाराष्ट्रात विरोधकांची मोठी परंपरा आहे. पण सध्या दुर्दैवाने
आपल्या विचाराचे नाहीत त्यांना राजकारण तसंच समाजकारणात राहण्याचा अधिकार नाही अशी
घातक भूमिका तयार होताना दिसत असल्याची टीका राऊत यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री आणि
विरोधी पक्षनेत्यांमध्येही चांगला संवाद असायला हवा, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त
केलं.
****
अखिल भारतीय काँग्रेस व्यापारी
संघ - आयटक या देशातल्या पहिल्या केंद्रीय कामगार संघटनेला आज १०० वर्ष पूर्ण झाली.
या निमित्त औरंगाबाद शहरातल्या खोकडपूरा इथल्या कार्यालयात ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक
अॅडव्होकेट मनोहर टाकसाळ यांच्या हस्ते आयटकच्या झेंड्याचं ध्वजारोहण करण्यात आले.
****
परभणी तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या
आदेशानुसार नदी काठावरील गावातील आणि अतिवृष्टीमुळे ३३ टक्क्यापेक्षा जास्त नुकसान
झालेल्या शेतपिकांचे पंचनामे करण्यासाठी गावांची सर्वेक्षण यादी तयार करण्यात आली होती.
या यादीत आसोला, कारेगाव, टाकळी कुंभकर्ण, नांदापूर, साडेगाव, मिर्झापूर, वाडीदमई,
तट्टूजवळा, ताडलिंबला, पांढरी पोरजवळा, पाथरा, ब्रह्मपुरी, ब्राह्मणगाव, पारवा, कौडगाव,
जांब या नवीन सतरा गावांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष
आनंद भरोसे यांनी दिली.
****
हिंगोली जिल्हा स्थानिक गुन्हे
शाखेच्या पोलिसांनी आज खानापूर चित्ता इथं वाळू चोरी करणाऱ्या तीन ट्रॅक्टर चालकांविरुध्द
कारवाई करत वाळू आणि ट्रॅक्टर असा १७ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. तसंच वाळू
वाहतूक करणारे आणि रेती मालक अशा सहा जणांविरुद्ध बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
केला आहे.
****
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे
अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यात जिल्हा कॉंग्रेस समितीच्या वतीनं
आजचा दिवस किसान अधिकार दिवस म्हणून पाळण्यात आला. धुळे जिल्ह्यात सरदार वल्लभभाई पटेल
यांच्या पुतळ्या समोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले तसंच केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना
यावेळी विरोध करण्यात आला.
****
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 31 October 2020 Time 1.00 to 1.05pm Language Marathi
Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 31 October 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ ऑक्टोबर २०२० दुपारी १.०० वा.
****
देशाचे पहिले
गृहमंत्री-लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची १४५ वी जयंती देशभर एकता दिवस
म्हणून साजरी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी गुजरात राज्यातल्या केवडिया
इथल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पांजली
अर्पण करत अभिवादन केलं. यावेळी पंतप्रधानांनी उपस्थित असलेल्या अर्ध सैनिक
दलाच्या जवान-अधिकारी आणि नागरिकांना एकतेची शपथ दिली. तसंच विविध सुरक्षा दलांच्या
जवानांचं पथसंचलन यावेळी झालं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, केंद्रीय
गृहमंत्री अमित शाह यांनीही नवी दिल्ली इथल्या पटेल चौकातल्या सरदार वल्लभभाई पटेल
यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करीत अभिवादन केलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी गेल्या वर्षी जम्मू आणि काश्मीरमधल्या पुलवामामधे झालेल्या हल्ल्याबाबत
घेतलेल्या भूमिकेवरून विरोधी पक्षांवर टिका केली आहे. या हल्ल्यात ४० निमलष्करी
दलातल्या जवानांचा मृत्यू झाल्यानंतरही विरोधी पक्षांना त्याचं दु:ख झालं नसल्याचं
ते म्हणाले. ते आज सकाळी गुजरातमधल्या केवडियामधे एकता दिनानिमित्त काढण्यात
आलेल्या दौडमधील सहभागींना संबोधित करताना बोलत होते. पुलवामामधल्या दुर्घटनेबाबत
सबंध देश शोक व्यक्त करत असताना काही लोक मात्र त्यांचा स्वार्थ साधण्यात गुंतले
होते, असंही ते म्हणाले. जेव्हा शेजारी देशाच्या संसदेमधे हे सत्य स्वीकारण्यात
आल्यानंतर विरोधी पक्षांचा खरा चेहरा जनतेसमोर आला असल्याचं पंतप्रधान मोदी यावेळी
म्हणाले. दहशतवादाचा सामुहिक सामना करण्यासाठी त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला
एकजुट होण्याचं आवाहन देखील यावेळी केलं.
दरम्यान, आज सकाळी पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी केवडिया इथल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी‘ ते अहमदाबादमधे साबरमती
नदीचा काठ या दोन्ही ठिकाणांना जोडणाऱ्या समुद्र विमानसेवेचा प्रारंभ करणार आहेत. तत्पूर्वी
काल त्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी इथं समुद्र पर्यटन करणाऱ्या बोटसेवेचा आणि ३५ हजार
चौरस फुटांवर उभारलेल्या एकता मॉलचं देखिल उद्घाटन केलं.
*****
देशात कोविड १९ संसर्गाचे
रुग्ण बरं होण्याचं प्रमाण ९१ पूर्णांक ३४ दशांश टक्क्यांवर पोहचलं असल्याचं
सरकारनं म्हटलं आहे. गेल्या चोवीस तासांत देशात ५९ हजारांपेक्षा अधिक रुग्ण बरे
झाले आहेत. तर आतापर्यंत या संसर्गातून ७४ लाख ३२ हजारांपेक्षा अधिक रुग्ण बरे झाले
आहेत. तर केवळ ७ पूर्णांक १६ दशांश टक्के एवढेच रुग्ण उपचार घेत असल्याचं भारतीय
आयुर्विज्ञान संशोधन संस्थेनं म्हटलं आहे. गेल्या चोवीस तासांत ४८ हजार २६८ नवे
रुग्ण आढळल्यानं देशातल्या रुग्णांची संख्या ८१ लाख ४८ हजार २६८ झाली असल्याचं
आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
माजी पंतप्रधान इंदिरा
गांधी यांची आज ३६ वी पुण्यतिथी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना
अभिवादन केलं. देशाच्या एकता, अखंडता, सार्वभौमतेसाठी प्राणांचे बलिदान करणाऱ्या
सर्वकालिन महान नेतृत्वास कृतज्ञतापूर्वक अभिवादन अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित
पवार यांनीही त्यांना अभिवादन केलं.
****
बंजारा समाजाचे धार्मिक
गुरू तसंच वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी इथले मठाधिश डॉ.रामराव महाराज यांचं काल
रात्री मुंबई इथं खासगी इस्पितळात निधन
झालं. ते नव्वद वर्षाचे होते. त्यांच्यावर सोमवारी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार
करण्यात येणार आहेत.
दरम्यान, पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी रामाराव बापू महाराज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
तसंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही
त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
****
कृषि उत्पन्न बाजार
समित्यांमध्ये थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांसाठी
कांद्याची साठवणूक मर्यादा २५ मेट्रीक टनावरून १५०० मेट्रीक टन करण्यात यावी अशी
मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. या मागणीचं पत्र त्यांनी केंद्रीय
ग्राहक संरक्षण, खाद्य आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांना पाठवलं आहे.
****
औरंगाबाद महानगरपालिकेच्या
वतीने आजपासून मेगा साफसफाई मोहिम राबविण्यात येणार आहे़ महानगरपालिकेच्या नऊ झोन
कार्यालयामध्ये या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. महापालिकेने एक नोव्हेंबर ते
दिवाळीपर्यंत शहर स्वच्छता मोहिम हाती घेतली आहे. त्यासाठी ‘लव्ह औरंगाबाद’ या
मोहिमेचा पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे.
//*************//
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 31 October 2020 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 October 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ ऑक्टोबर २०२० सकाळी ७.१० मि.
****
** सरदार वल्लभभाई पटेल यांच्या
जयंती निमित्त देशभरात
सर्वत्र एकता
दौडचं आयोजन
** सार्वजनिक
क्षेत्रातल्या बँकांच्या बचत खात्यातून पैसे काढणं आणि जमा करण्यासाठी शुल्क
आकारलं जाण्याच्या वृत्ताचं केंद्र सरकारकडून
खंडन
** नाशिक
जिल्ह्यात लासलगावसह प्रमुख कृषी
उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव
पूर्ववत सुरु
** राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या
कर्मचाऱ्यांचं थकीत वेतन दिवाळीपूर्वी देण्याला प्राधान्य- परिवहन
मंत्री अनिल परब
** राज्यात
आणखी सहा हजार १९० कोविड बाधितांची नोंद, १२७ जणांचा
उपचारादरम्यान मृत्यू
** मराठवाड्यात
१७ रुग्णांचा मृत्यू, तर नव्या ४८१ रुग्णांची नोंद
आणि
** औरंगाबाद
शहरात पाच नोव्हेंबरपासून स्मार्ट सिटी बस सेवा सुरु होणार
****
देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची १४५ वी जयंती आज देशभरात
राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी होत आहे. यानिमित्त सर्वत्र एकता दौडचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातच्या नर्मदा
जिल्ह्यातल्या केवाडिया इथल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी इथं यानिमित्त
काढण्यात येणाऱ्या एकता दौडमध्ये
सहभागी होणार आहेत.
दरम्यान, पंतप्रधान कालपासून दोन दिवसीय गुजरातच्या
दौऱ्यावर असून, त्यांनी काल केवाडिया
मध्ये जंगल सफारी प्रकल्प, आरोग्य वन, एकता
मॉल आणि बाल पोषण उद्यानाचं उद्घाटन केलं. आरोग्य वनात जवळपास १५ एकर परिसरात
औषधीयुक्त वनस्पतींचं रोपण करण्यात आलं आहे. यात ३८० प्रजातींची पाच लाख रोपं
आहेत. योग आणि आयुर्वेद लक्षात घेता, याचं निर्माण करण्यात
आलं आहे. एकता मॉलमध्ये हस्तकला आणि पारंपरिक उत्पादनांचं प्रदर्शन भरवण्यात आलं
आहे. हा मॉल ३५ हजार चौरस फुटात पसरलेला असून, ११० दिवसांत
तयार करण्यात आला आहे. सी प्लेनचं उद्घाटनही आज पंतप्रधानांच्या
हस्ते होणार आहे.
****
केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्याच्या विरोधात अखिल भारतीय काँग्रेस समिती
आज राज्यव्यापी सत्याग्रह आंदोलन करणार आहे. सरदार वल्लभभाई पटेल जयंती आणि माजी
प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त, आज वर्धा मधल्या सेवाग्राम आश्रमसमोर होणाऱ्या सत्याग्रहात काँग्रेसच्या
प्रदेश अध्यक्षांसह राज्यातले अनेक मंत्री सहभागी होणार आहेत. केंद्र सरकारचा नवीन
कृषी कायदा अर्थव्यवस्थेला विस्कळीत करणारा आणि शेतकरी विरोधी आहे, अशी काँग्रेसची भूमिका आहे.
****
सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांकडून बचत खात्यातून पैसे काढणं आणि जमा
करण्यासाठी शुल्क आकारलं जाणार असल्याच्या वृत्ताचं केंद्र सरकारनं खंडन केलं आहे.
बँकांनी असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचं पत्र सूचना कार्यालयानं स्पष्ट केलं
आहे. बँकेतल्या जनधन खात्यातून नगदी रक्कम काढल्यास शंभर रुपये शुल्क आकारलं जातं, हे वृत्तही खोटं असल्याचं पत्र सूचना कार्यालयानं स्पष्ट केलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यातल्या लासलगावसह प्रमुख कृषी उत्पन्न बाजार
समित्यांमध्ये कालपासून कांदा लिलाव पूर्ववत सुरु झाले. काल लासलगाव इथं सरासरी
पाच हजार शंभर रुपये प्रतीक्विंटल तर विंचुर इथं पाच हजार तिनशे रुपये
प्रतीक्विंटल भाव मिळाला. केंद्र सरकारनं कांदा साठवणुकीवर
मर्यादा आणल्यानं गेल्या चार दिवसांपासून व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंद ठेवले
होते. काल सकाळीच लासलगाव बाजार समितीमध्ये सहाशे मेट्रिक टन कांद्याची आवक
झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
भाषावार प्रांत रचनेमुळे बेळगाव हा राज्याचा भाग कर्नाटकमध्ये गेल्यानं एक नोव्हेंबर
हा काळा दिवस म्हणून पाळला जातो. त्या पार्श्वभूमीवर
राज्याचे सीमा भाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ यांनी सीमा भागातल्या
जनतेसाठी पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
****
कोरोना
विषाणू प्रतिबंधासाठी मास्क वापरणे, वारंवार हात धुणे आणि एकमेकातल्या सुरक्षित आंतर राखण्याचं आवाहन औरंगाबाद इथल्या क्रांतीगुरु
लहुजी साळवे आरोग्य केंद्राचे संचालक डॉ. दिवाकर कुलकर्णी यांनी आवाहन केलं आहे.
****
राज्य मार्ग परिवहन महामंडळ - एसटी कर्मचाऱ्यांचं थकीत वेतन दिवाळीपूर्वी देण्याला
सध्या प्राधान्य देण्यात आलं असून, प्रसंगी महामंडळाला यासाठी कर्ज काढावं लागलं
तरी चालेल, असं परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष
अनिल परब यांनी म्हटलं आहे. महामंडळानं राज्य शासनाकडे
कर्मचाऱ्यांचे पगार सोबतच एसटीच्या दैनंदिन खर्चासाठी एकूण तीन हजार ६०० कोटी
रुपयांची मागणी केली आहे, मात्र कोविड काळात शासनाचं देखील
उत्पन्न घटल्यामुळे केवळ शासनावर अवलंबून न राहता इतर पर्यायांची चाचपणी महामंडळ
करत असल्याचं परब म्हणाले. या परिस्थितीत महामंडळाचं उत्पन्न वाढवण्यासाठी नियमित
कामकाजासोबत मालवाहतूक, टायर रिमोल्डिंग, एसटी पेट्रोल पंपावर इतर वाहनांना इंधन विक्री सारखे उपक्रम राबवत
असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
प्रवास भत्ता सवलत- एलटीसी व्हाउचर योजनेअंतर्गत केंद्रीय
कर्मचाऱ्यांना दिली गेलेली प्राप्तिकरातली सवलत राज्य सरकारी
कर्मचारी तसंच सार्वजनिक क्षेत्रातले उद्योग, आणि आस्थापना
तसंच खाजगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांनाही देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला
आहे. राज्य सरकारी कर्मचारी आणि सावर्जनिक क्षेत्रातील संस्था, बँका तसंच खाजगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना एलटिसी
योजना लागू असेल, तर ते कर्मचारी त्यांना मिळालेल्या प्रवास
भत्त्यातून केंद्रीय योजनेप्रमाणे खरेदी करू शकतात.
****
राज्यात काल दिवसभरात आणखी सहा हजार १९० कोविड बाधितांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १६ लाख ७२ हजार ८५८ झाली आहे.
राज्यभरात काल १२७ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत
४३ हजार ८३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल आठ हजार २४१ रुग्ण बरे झाल्यानं
त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १५ लाख तीन हजार ५० रुग्ण कोरोना
विषाणू मुक्त झाले असून, सध्या एक लाख २५ हजार ४१८ रुग्णांवर
उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल १७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या ४८१ रुग्णांची नोंद झाली.
जालना आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी चार बाधितांचा मृत्यू झाला. जालना
जिल्ह्यात ११३, तर लातूर जिल्ह्यात आणखी ५५ रुग्ण आढळले.
नांदेड जिल्ह्यात तीन रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या ४३
रुग्णांची नोंद झाली. बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी दोन रुग्णांचा
मृत्यू झाला, बीड जिल्ह्यात ७८, तर
उस्मानाबाद जिल्ह्यात नव्या ४१ रुग्णांची भर पडली. औरंगाबाद आणि परभणी जिल्ह्यात
प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला, औरंगाबाद जिल्ह्यात १२७,
तर परभणी जिल्ह्यात आणखी १४ रुग्ण आढळले. हिंगोली जिल्ह्यात नव्या
दहा रुग्णांची नोंद झाली.
****
मुंबईत काल आणखी एक हजार १४५ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ३२ जणांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात २५२ नवे रुग्ण, तर १४ मृत्यूंची नोंद झाली. नाशिक
जिल्ह्यात ३४४ रुग्ण आढळले, तर चार जणांचा मृत्यू झाला.
अहमदनगर जिल्ह्यात २५१, सातारा २६०, सोलापूर
१७८, रायगड १५२, गडचिरोली ११५, बुलडाणा ६६, जळगाव ५३,धुळे २८,
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येकी १२, तर वाशिम जिल्ह्यात नव्या आठ रुग्णांची नोंद झाली.
****
औरंगाबाद शहरात पाच नोव्हेंबरपासून स्मार्ट सिटी बस सेवा सुरु होणार आहे.
पालकमंत्री सुभाष देसाई यांनी काल ही माहिती दिली. औरंगाबाद इथं महानगरपालिकेच्या
आढावा बैठकीत ते काल बोलत होते. औरंगाबाद शहरास स्मार्ट सिटी बनवण्याच्या दृष्टीने
नागरिकांना रस्ते, पाणी, शिक्षण,
वाहतूक आणि मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देणं आवश्यक असल्याचं ते
यावेळी म्हणाले. कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात महानगरपालिकेनं सुरु ठेवलेल्या
उपाययोजना यापुढेही सुरु ठेवाव्यात, असं त्यांनी सांगितलं.
बाळासाहेब ठाकरे स्मृतीवन, जंगल सफारी यासह क्रांती चौक
इथल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारणीच्या कामाचाही पालकमंत्र्यांनी
यावेळी आढावा घेतला.
****
परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीनं तडाखा बसलेल्या रस्त्यांसह पुलांच्या
दुरूस्तीसाठी ५६ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री
अशोक चव्हाण यांनी दिली. ते काल परभणी इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. येत्या दोन
ते तीन महिन्यात या कामांच्या मंजुरीबरोबरचं
निविदांची प्रक्रियासुध्दा सुरू केली जाईल, अशी ग्वाही
त्यांनी दिली. या कामांकरिता आणखीन निधी हवा असेल तर तोही उपलब्ध केला जाईल,
असं चव्हाण यावेळी म्हणाले.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात
यावर्षी एम. फील. अभ्यासक्रमासाठी
प्रवेश सुरु ठेवण्यात येणार आहे. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली
झालेल्या विविध विभागप्रमुखांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विद्यापीठात एम.
फील, पीएच. डी. संशोधनासाठी राज्यभरातून अनेक विद्यार्थी येतात, विद्यार्थ्यांची
मागणी आणि फेलोशीपचं प्रमाण पाहता, यंदा प्रवेश सुरु
ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार एम.फिल. अभ्यासक्रम प्रवेशासाठी `ऑनलाईन` सामायिक प्रवेश परीक्षा येत्या २० नोव्हेंबर रोजी होणार आहे.
दरम्यान, विद्यापीठाच्या
पदवी आणि पदव्यूत्तर विषयाच्या अंतिम वर्षाच्या ते २९ ऑक्टोबर या काळात झालेल्या
परिक्षा तांत्रिक अडचणीमुळे देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची आज आणि उद्या
फेरपरिक्षा होणार आहे.
****
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्मचारी आणि गटसचिवांना दिवाळी बोनस
म्हणून एका महिन्याचा जादा पगार देण्यात येणार आहे. बँकेचे मार्गदर्शक दिलीप
देशमुख यांनी काल बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही घोषणा केली.
****
कोरोना
विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मास्क लावणं, वारंवार हात धुणं आणि सुरक्षित सामाजिक
अंतर राखण्याचं आवाहन परभणीचे प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ श्रीराम मसलेकर यांनी केलं
आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्याच्या वैजापूर
तालुक्यातल्या विरगाव पोलिस ठाण्याचा हवालदार खंडू महादेव मोरे याला दोन हजार
रुपयांची लाच घेतांना काल अटक करण्यात आली. मद्याचं अवैध दुकान सुरू ठेवण्यासाठी
त्यानं तक्रारदाराकडून मासिक हप्ता दोन हजार रुपयांची मागणी केली होती.
****
भारतीय जनता पक्षाचे लातूर जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड यांनी त्यांच्या
आमदार निधीतून तीन रुग्णवाहिकांकरता ५७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे.
लातूर तालुक्यातल्या मुरुड इथं ग्रामीण रुग्णालय, जवळा
इथलं प्राथमिक आरोग्य केंद्र तसंच रेणापूर तालुक्यातल्या पोहरेगाव इथल्या प्राथमिक
आरोग्य केंद्रासाठी या रुग्णवाहिका देण्यात येणार आहेत.
****
राज्यात काल ईद-ए -मिलाद-उन-नबी साधेपणानं साजरी करण्यात आली. इस्लाम धर्माचे
अंतिम प्रेषित हजरत मोहमद पैगंबर यांचा जन्म दिवस ईद-ए-मिलाद-उन-नबी म्हणून साजरा
केला जातो. या दिवशी ठीकठिकाणी जुलूस काढला जातो. तसंच मशिदींमधून विविध
कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. मात्र यावर्षी कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या
पार्श्वभूमीवर जुलूस तसंच जाहीर कार्यक्रम न करण्याचा निर्णय मुस्लिम संघटनांनी
घेतला होता. उस्मानाबाद इथं ईद ए मिलाद उन्नबी` निमित्त
काल रक्तदान शिबिर घेण्यात आलं. यावेळी साठ जणांनी रक्तदान केलं.
औरंगाबाद शहरातही चार ठिकाणी रक्तदान शिबिरं घेण्यात आली. शहरात जुलूस न काढता
मुस्लिम बांधवांनी घरातच दरुद शरीफचं पठण करत साधेपणानं ईद साजरी केली.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील जेष्ठ नेते तथा नांदेड नगर पालिकेचे
माजी नगराध्यक्ष मोहनराव गोडबोले यांच काल वृद्धापकाळानं निधन झालं, ते ९५ वर्षांचे होते. नांदेड
जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ते माजी अध्यक्ष होते.
****
लातूर शहरात कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात
नसल्याबद्दल भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. शहरात
ओला आणि सुका कचरा एकाच ठिकाणी टाकला जातो, त्यामुळे
दुर्गंधी पसरते परिणामी नागरिकांचं आरोग्य धोक्यात आल्याचं
युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंग कव्हेकर यांनी म्हटलं आहे. लातूर
महानगरपालिका कचरा व्यवस्थापनाचं सोंग करत असून, याबाबत
योग्य निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
****
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यानंतर चांगला परताना मिळवून देण्याचं अमिष
दाखवून बनावट वेबसाईटच्या आधारे अनेकांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य
टोळीतल्या पाच संशयितांना जालना पोलिसांनी काल मध्य प्रदेशातून अटक केली.
उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी ही माहिती दिली. जालन्यातल्या एका
शिक्षकाने शेअर मार्केटमध्ये फसवणूक झाल्याबाबत तालुका ठाण्यात फिर्याद दिली होती.
या गुन्ह्याच्या तपासात तालुका जालना पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या या टोळीचा
पर्दाफाश केल्याचं त्यांनी सांगितलं.
//*************//
Friday, 30 October 2020
AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 30 OCTOBER 2020 TIME – 18.00
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 October 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० ऑक्टोबर २०२० सायंकाळी ६.००
****
**कांदा लिलाव सुरू, लासलगांवमध्ये
क्विंटलला पाच हजार शंभर रुपये भाव
**जालना जिल्ह्यात कोरोना विषाणू
संसर्गाचे नवे ११३ रुग्ण तर चार रुग्णांचा मृत्यू
**बचत खात्यातून व्यवहारासाठी शुल्क
आकारलं जाणार नसल्याची केंद्र सरकारची माहिती
आणि
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठाची एमफील प्रवेशासाठी २० नोव्हेंबरला परिक्षा
****
नाशिक जिल्ह्यातल्या लासलगावसह प्रमुख
बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव सुरु केल्यानंतर आज पहिल्या दिवशी लासलगाव इथं सरासरी
पाच हजार शंभर रुपये क्विंटल तर विंचुर इथं पाच हजार तिनशे रुपये क्विंटल भाव मिऴाला.
केंद्र सरकारनं कांदा साठवणुकीवर मर्यादा आणल्यानं गेल्या चार दिवसांपासून व्यापाऱ्यांनी
कांदा लिलाव बंद ठेवले होते. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर
व्यापा-यांनी लिलाव सुरू करावेत असं मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यानं आज सकाळीच लासलगाव
बाजार समितीमध्ये सहाशे मेट्रिक टन कांद्याची आवक प्राप्त झाल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
जालना जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे
नवे ११३ रुग्ण आज आढळले असून एकूण रुग्ण संख्या
दहा हजार ७२९ झाली आहे. यातले नऊ
हजार ५७० रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या १५८ असून त्यांना सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या
८७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जालना जिल्ह्यात या संसर्गावर उपचार घेत असलेल्या चार
रुग्णांचा आज मृत्यू झाला. जिल्ह्यात या संसर्गामुळे मृत्यूमुखी पडलेल्या एकूण रुग्णांची
संख्या आता २८३ झाली आहे.
****
औरंगाबादमध्ये शासकीय वैद्यकीय रुग्णालयात
कोरोना विषाणू संसर्गावर उपचार घेत असलेल्या दहा रुग्णांना आज उपचार घेऊन बरे झाल्यानंतर
सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत ३६ हजार २३९ रुग्ण या संसर्गावर उपचार घेऊन
बरे झाले आहेत. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ३७ हजार ९१६ झाली असून एक हजार
६९ रुग्णांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
****
सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांकडून
बचत खात्यातून पैसे काढणं आणि जमा करण्यासाठी शुल्क आकारलं जाणार असल्याच्या वृत्ताचं
केंद्र सरकारनं खंडन केलं आहे. बँकांनी असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचं पत्र सूचना
कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. बँकेतल्या जनधन खात्यातून नगदी रक्कम काढल्यास शंभर रुपये
शुल्क आकारलं जातं, हे वृत्तही खोटं असल्याचं पत्र सूचना कार्यालयानं स्पष्ट केलं आहे.
****
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू
प्रकरणी प्रसार माध्यमांमध्ये सुरु असलेल्या वार्तांकनावर मुंबई उच्च न्यायालयानं नाराजी
व्यक्त केली आहे. माजी पोलिस अधिका-यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती
दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठानं ही नाराजी व्यक्त
केली. न्यायालयाप्रमाणे वार्तांकन करणा-या
वृत्तवाहिन्यांवरही बंधनं असली पाहिजेत, एखाद्या
तपासावर दबाव पडेल अशी बातमीदारी योग्य नाही. माध्यमांच्या दबावामुळे तपास अधिकारी
चुकीच्या व्यक्तीला अटक करू शकतात अशी चिंताही न्यायालयानं व्यक्त केली आहे.
****
योग्य प्रक्रिया न करता शहरातलं
सांडपाणी, घनकचरा आणि प्लास्टीक थेट समुद्रात मिसळल्यामुळे झालेल्या पर्यावरण हानी
प्रकरणी राष्ट्रीय हरित लवादानं मुंबई महापालिकेला २९ कोटी ७५लाख रुपयांचा दंड ठोठावला
आहे. मुंबई शहरातून समुद्रात, खाडीत अनेक ठिकाणी प्रक्रिया न करता सांडपाणी सोडलं जात
असल्यानं पाण्याचं प्रदूषण वाढल्याच्या पार्श्र्वभूमीवर वनशक्ती या पर्यावरण क्षेत्रातल्या
संस्थेचे डी. स्टालिन यांनी २०१८ मध्ये राष्ट्रीय हरित लवादामध्ये याचिका केली होती.
त्यावरून हा दंड ठोठावण्यात आला आहे.
****
भाषावार प्रांत रचनेमुळे बेळगाव
हा राज्याचा भाग कर्नाटकमध्ये गेल्यानं एक नोव्हेंबर हा काळा दिवस पाळला जातो. त्या
पार्श्वभूमीवर राज्याचे सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ यांनी सीमाभागातल्या
जनतेसाठी पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सीमाभागातला सर्व जाती -धर्माचा
मराठी बोलणारा माणूस महाराष्ट्र आपला मानतो, त्यामुळे या सर्वांचे राजकीय, आर्थिक,
सांस्कृतिक आणि सामाजिक सहभागाचे आणि प्रतिनिधित्वाचे प्रश्न आपल्याला अत्यंत महत्वाचे
वाटतात. त्यासाठीची आवश्यक ती सर्व पावलं उचलण्याची आणि उपलब्ध व्यवस्थेत सर्व मर्यादा
लक्षात घेऊन धोरणात्मक निर्णय घेण्याची शासनाची भूमिका असल्याचं त्यांनी या पत्रात
म्हटलं आहे. या सर्व बाबतीतला तपशील आपण आपल्याला वेळोवेळी कळवत राहूच. ज्या दिवशी
हा भाग महाराष्ट्रात येईल, त्या दिवशी सीमाभागातल्या जनतेचच नव्हे; तर महाराष्ट्रातल्या
बारा कोटी जनतेचं स्वप्न पूर्ण होईल, असंही मंत्री शिंदे आणि मंत्री भुजबळ यांनी या
पत्रात नमुद केलं आहे.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा
विद्यापीठात संशोनार्थी एमफिल, पीएचडी संशोधनासाठी राज्यातले सर्वाधिक विद्यार्थी असून,
विद्यार्थ्यांची मागणी आणि गौरववृत्तीचं प्रमाण पाहता या शैक्षणिक वर्षात एमफिल अभ्यासक्रमासाठी
प्रवेश सुरू ठेवण्याचा निर्णय कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी घेतला आहे. या संदर्भात
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विभागप्रमुखांची कुलगुरू डॉ प्रमोद येवले
यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. एमफिल अभ्यासक्रम प्रवेशासाठी
`ऑनलाईन` सामायिक प्रवेश परीक्षा २० नोव्हेंबर रोजी होणार असून, यासाठी एक ते दहा नोव्हेंबर
दरम्यान ऑनलाइन नोंदणी करता येईल. या परीक्षेचा निकाल २१ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात
येणार आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा इथल्या
रेल्वे पुलाचं काम संथगतीनं सुरू असून, हे काम जलदगतीनं पूर्ण व्हावं, असं राज्याचे
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. नांदेड इथून पूर्णामार्गे
परभणीला येत असताना चव्हाण यांनी रेल्वेपुलाच्या कामाची पहाणी करून माहिती घेतल्यानंतर
या संदर्भातले निर्देश दिले आहेत.
****
धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या
नव्या २८ रूग्णांची आज नोंद झाली. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता १३ हजार
३८६ वर पोहोचली आहे. उपचार घेऊन बरे झालेल्या ३४ रुग्णांना आज घरी सोडण्यात आल्यानं
जिल्ह्यात या संसर्गातून मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १२ हजार ७०८ झाली आहे. धुळे
जिल्ह्यात सध्या ३०४ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
****
कोरोना
विषाणू संसर्ग प्रतिबंधाबाबत
नियम पालन करण्याचं आवाहन सामाजिक कार्यकर्ते आणि प्रहार संघटनेचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष
भाऊसाहेब शेळके यांनी केलं आहे.
****
उस्मानाबाद इथं `ईद ए मिलाद उन्नबी` निमित्त आज रक्तदान शिबिर घेण्यात
आलं. यात साठ दात्यांनी सहभाग घेतला. तहसीलदार गणेश माळी, उपविभागिय पोलिस अधिकारी
मोतीचंद राठोड यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित होते.
****
औरंगाबाज जिल्ह्याच्या वैजापुर तालुक्यातल्या
विरगाव पोलिस ठाण्याचा हवालदार खंडू महादेव
मोरे याला दोन हजार रुपयांची लाच घेतांना आज लाचलुचपत विभागानं अटक केली. तक्रारदारा
कडून मद्याचं अवैध दुकान सुरू ठेवण्यासाठी मासिक हप्ता दोन हजार रुपयांची मागणी केली
होती.
****
गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी कायम
ठेवण्यासाठी जिल्हाभरातली गावं सरसावली आहेत. काल पर्यंत ७१३ गावांनी दारुबंदीच्या
समर्थनार्थ ठराव घेऊन ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहेत. जिल्ह्यात १९९३ पासून दारूबंदी लागू असून बंदी उठवण्याच्या हालचाली राजकीय नेत्यांकडून होत असल्याच्या
पार्श्वभुमिवर हे ठराव घेण्यात आले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
केंद्र सरकारनं मंजूर केलेलं
शेतकरी विरोधी विधेयक रद्द व्हावं, शेतकरी, शेतमजूर, हमाल, मापाडी आणि कामगारांना दिलासा
द्यावा, या मागणीसाठी जळगाव शहरात कॉंग्रेस पक्षातर्फे स्वाक्षरी अभियान राबवण्यात
आलं.
****
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 29 July 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...