आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२१ मे २०२१
सकाळी ११.०० वाजता
****
गडचिरोली पोलिसांच्या सी-60 जवानांशी झालेल्या चकमकीत तेरा नक्षलवादी
ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. एटापल्ली तालुक्यातल्या कसनसूर पोलिस मंदत
केंद्रांतर्गत येणाऱ्या पैडी जंगल परिसरात आज सकाळी ही घटना घडली.
****
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेची झालेली भाववाढ लक्षात घेता, सरकारनं
२०२०-२१ या वर्षातील साखर निर्यातीवरील अनुदानात कपात केली आहे. प्रति मेट्रीक टन सहा
हजार रूपयांवरून हे अनुदान चार हजार रूपयांवर आणण्यात आलं आहे. अन्न आणि सार्वजनिक
वितरण विभागानं एका प्रसिद्घी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
****
राज्यानं आधुनिक तंत्रज्ञान आणि उत्तम संशोधन यांच्या माध्यमातून दर्जेदार
पीक उत्पादन करावं, आणि आपली या क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करावी, असं आवाहन,
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. खरीप हंगामपूर्व बैठकीत ते काल बोलत होते.
कृषी मालासाठी केवळ पीक उत्पादनात वाढ महत्वाची नसून, बाजारपेठेचं संशोधन करण गरजेचं
असल्याचं, त्यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण रद्द करण्याच्या शासन
निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. पदोन्नतीची सर्व शंभर टक्के पदं
ही सेवाज्येष्ठतेनुसारच भरावी, असा आदेश राज्य सरकारनं सात मे रोजी जारी केला होता.
या निर्णयाला आरक्षण बचाव कृती समितीनं न्यायालयात आव्हान दिलं आहे.
****
दहावीची परीक्षा व्हायला हवी, परीक्षेविना विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केलं
जाऊ शकत नाही, असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे
माजी सिनेट सदस्य धनंजय कुलकर्णी यांनी जनहित याचिका दाखल केली आहे.
****
औरंगाबाद शहरातल्या ऐतिहासिक बीबी का मकबऱ्याचं सुशोभीकरण आणि परिसराचा
विकास स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत करण्यात येणार असल्याची माहिती, महापालिका प्रशासक
आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली आहे. त्यांनी काल बीबी का मकबरा आणि परिसराची पाहणी
करुन, भारतीय पुरातत्व खात्याच्या व्यवस्थापकांशी चर्चा केली, त्यावेळी ते बोलत होते.
****
शासनाच्या कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी नांदेड
शहरातल्या १३ दुकानदारांकडून दहा हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. महापालिका
आणि पोलिसांच्या संयुक्त पथकानं काल ही कारवाई केली.
****
No comments:
Post a Comment