Thursday, 4 September 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.09.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 04 September 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०४ सप्टेंबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      येत्या काळात जगाच्या सागरी अर्थव्यवस्थेत भारत महत्त्वाची भूमिका बजावेल-जेएनपीटी दोन च्या लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

·      जीएसटी कररचनेतल्या सुधारणांचं उद्योग क्षेत्रासह समाजाच्या सर्व स्तरातून स्वागत

·      मराठवाडा साहित्य परिषदेचा पहिला रघुनाथ शिवराम बोरसे विशेष बालवाङ्गमय पुरस्कार पत्रकार संजय ऐलवाड यांना जाहीर

आणि

·      चैतन्यपर्व गणेशोत्सवाची शनिवारी सांगता-प्रशासनाकडून तयारीला प्रारंभ

****

येत्या काळात जगाच्या सागरी अर्थव्यवस्थेत भारत महत्त्वाची भूमिका बजावेल आणि तो प्रवास आजपासून सुरू झाला आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आज नवी मुंबईत उरण इथल्या जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टच्या टर्मिनल २ चं, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वाँग यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे लोकार्पण केलं, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. केंद्रीय बंदरे आणि जलवाहतूक मंत्री सर्बानंद सोनोवाल, राज्यमंत्री शांतनू ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. ही गोदी पूर्णपणे सौरऊर्जेवर चालणारी असून विशेष मार्गिका असलेल्या पोर्टवरील हे देशातलं सर्वात मोठं पहिलं कंटेनर टर्मिनल आहे. या टर्मिनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. ते म्हणाले

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

जीएसटी कररचनेतल्या सुधारणांचं सर्व क्षेत्रातून स्वागत होत आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी जीएसटीमधला बदल जीवन सुलभ आणि व्यवसाय सुलभ करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांवर मोठा प्रभाव टाकेल, अशी प्रतिक्रिया समाज माध्यमावर दिली आहे. तर जीएसटीमधली सुधारणा ही एक परिवर्तनकारी पाऊल असून शेतकरी, एमएसएमई, महिला, तरुण, मध्यमवर्गीय या सर्वांनाच दिलासादायक असल्याचं, केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

कर्करोग आणि दुर्मीळ आजारांसहह ३६ जीवनरक्षक औषधांना जीएसटीतून वगळण्यात आलं आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा आरोग्यसेवेवरचा खर्च कमी होईल आणि जीवनमान सुधारेल, असा विश्वास केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केला आहे. तर जीएसटी कररचनेतल्या सुधारणेमुळे देशातल्या प्रत्येक कुटुंबाला मदत होणार असल्याची प्रतिक्रिया माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. ते म्हणाले

बाईट - अश्विनी वैष्णव, माहिती आणि प्रसारण मंत्री

 

जीएसटी सुधारणांमुळे सर्वसामान्यांना दिलासा, महागाईवर नियंत्रण आणि लहान उद्योगांना मजबुती असे अनेक उद्देश साध्य झाले आहेत, अशी प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. जीएसटीमध्ये केलेल्या सुधारणांचं माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी स्वागत केलं, तर काँग्रेस पक्ष दीर्घकाळपासून याची मागणी करत होता, असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी म्हटलं आहे.

****

उद्योग आणि व्यवसाय जगताने जीएसटी सुधारणांचं स्वागत केलं आहे. यामुळे व्यवसाय प्रक्रिया सुलभ होईल, अशी प्रतिक्रिया भारतीय उद्योग महासंघ- सीआयआयने दिली, तर अप्रत्यक्ष कर रचना परिपक्व झाल्याचं हे द्योतक असल्याचं, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज-फिक्कीने म्हटलं आहे. असोचेम चे मनीष सिंघल यांनीही जीएसटी सुधारणांचं स्वागत केलं. ते म्हणाले

बाईट - मनीष सिंघल, असोचेम

 

ही केवळ कर आकारणीत सुधारणा नाही तर ती सहजतेने राहणीमानात सुधारणा असल्याचं सांगून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाचं स्वागत केलं, तर या सुधारणांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे कटिबद्ध असल्याचं, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.

****

जीवन विमा तसंच आरोग्य विमा योजनांना जीएसटी कररचनेतून सूट देण्यात आली आहे. यामुळे पॉलिसीधारकांना मिळणाऱ्या लाभाबाबत छत्रपती संभाजीनगर इथल्या विमा प्रतिनिधी अंजली खंडाळीकर यांनी माहिती दिली

बाईट - विमा प्रतिनिधी अंजली खंडाळीकर

****

जीएसटी सुधारणांमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्नवाढीला चालना मिळणार असून केंद्र सरकारचा हा निर्णय हे शेतकरी-केंद्रित धोरणांचं स्पष्ट उदाहरण आहे, असं भाजपाचे धाराशिवचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.

****

देशात लवकरच कोळशाच्या व्यवहारासाठी शेअर बाजार प्रमाणे स्वतंत्र मंच सुरू होणार असून, संसदेची याला मान्यता मिळाली असल्याची माहिती केंद्रीय कोळसा मंत्री जी. किशन रेड्डी यांनी दिली. ते आज मुंबईत स्टार रेटिंग पुरस्कार सोहळ्यात बोलत होते. यावेळी कोळसा आणि खाणकाम क्षेत्रातल्या विविध कंपन्यांना आणि संस्थांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. कोळसा नियंत्रकांच्या नव्या संकेतस्थळाचं अनावरण रेड्डी यांनी केलं.

****

मराठवाडा साहित्य परिषदेचा रघुनाथ शिवराम बोरसे विशेष बालवाङ्गमय पुरस्कार दैनिक केसरीचे पत्रकार संजय ऐलवाड यांना झिब्राच्या कथा या संग्रहासाठी जाहीर झाला आहे. ११ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह या स्वरुपाचा हा पुरस्कार येत्या २७ सप्टेंबर रोजी ऐलवाड यांना प्रदान करण्यात येणार आहे. उदगीर तालुक्यातील एकुर्का रोड इथले रहिवासी असलेले ऐलवाड यांचे दोन कथासंग्रह, दोन बालकवितासंग्रह, तीन बालकथासंग्रह, यांसह एकूण बारा पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

****

नागपुरात सुरू असलेल्या ओबीसी महासंघाच्या आंदोलनाला मंत्री अतुल सावे यांनी आज भेट दिली. यावेळी चर्चा करून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. सहा दिवसाच्या उपोषणात १२ मागण्या पूर्ण झाल्या असून पुढच्या महिनाभरात १२ विषय स्पष्ट होतील आणि इतर मागण्यांसंदर्भातही लवकरच निर्णय होईल, असं सावे यांनी सांगितलं. मराठा आरक्षणामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, असंही त्यांनी पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केलं.

दरम्यान, बीड जिल्ह्यात माजलगाव शहरात तहसील कार्यालयाबाहेर आरक्षणाच्या संरक्षणासाठी ओबीसी समाज बांधवांनी आज आंदोलन केलं. यावेळी हैद्राबाद गॅझेटियर शासन परिपत्रकाची होळी करण्यात आली.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्हा सहकारी दुग्ध उत्पादक संघाचा गांधेली इथल्या दुग्ध शाळेला खासदार संदिपान पाटील भुमरे यांनी आज सदिच्छा भेट दिली. दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा, दुग्ध संघाला येणारे अडीअडचणी सोडवून त्याचा जास्तीत जास्त लाभ शेतकऱ्यांना मिळावा याबाबत दुग्ध संघाचे संचालक मंडळ तसंच सर्व पदाधिकाऱ्यांसोबत भुमरे यांनी सविस्तर चर्चा केली. जिल्हा दुग्ध संघ अधिक बळकट होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्थान व्हावं, यासाठी खासदार म्हणून कायम कटिबद्ध राहण्याचं आश्वासन, खासदार भुमरे यांनी दिले.

****

गणेशोत्सवाच्या निमित्तानं संपूर्ण राज्यभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. दहा दिवसांच्या या चैतन्य पर्वाची येत्या शनिवारी अनंत चतुर्दशीला, सांगता होणार आहे. मूर्ती विसर्जनाऐवजी त्या संकलित करण्याचं आवाहन करण्यात आलं असून, ठिकठिकाणी त्यासाठी संकलन केंद्र उभारण्यात येणार आहेत. विसर्जन सोहळ्याची प्रशासनाकडून तयारी सुरू झाली आहे.

गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर इथं वाहतुक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. शहरातले मुख्य रस्ते शनिवारी सकाळपासून ते विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहतील. लातूर शहरातलेही मुख्य रस्ते शनिवारी रात्री ११ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद असतील. नागरिकांनी या काळात पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असं आवाहन शहर पोलिस प्रशासनानं केलं आहे.

****

ईद-ए- मिलादनिमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे लातूर इथल्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयातला बाह्यरुग्ण विभाग उद्या बंद राहणार आहे. परवा शनिवार पासून बाह्यरुग्ण विभाग नियमित वेळेप्रमाणे सुरु राहील, रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सचिन जाधव यांनी कळवलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेवर हरकती आणि आक्षेप दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. प्रभाग रचनेवर एकूण ३५९ हरकती दाखल झाल्याची माहिती, निवडणूक विभाग प्रमुख विकास नवाळे यांनी दिली.

****

हवामान

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना आणि नांदेडसह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणात रायगड, ठाणे, मुंबईचा काही भाग, पालघर तसंच नाशिक आणि नंदूरबार धुळ्यासह खानदेशातल्या काही भागांना आज ऑरेंज अलर्ट दिलेला आहे.

****

No comments: