आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
०७ जून
२०२० सकाळी ११.०० वाजता
****
देशातला कोरोना संसर्ग घटत
असून, रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण ४८ पूर्णांक ३६ टक्के झालं असल्याचं केंद्र सरकारनं
आज म्हटलं आहे. आतापर्यंत एक लाख १९ हजार २९३ जणांनी कोरोनावर मात केली असून, गेल्या
२४ तासांत देशात पाच हजार २२० लोक बरे झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी
६४ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्यानं एकूण कोरोनाबाधितांची संख्या २ हजार चौदा झाली
आहे. यापैकी १ हजार एकशे चौऱ्याऐंशी रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत ९९ जणांचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या ७३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव
रोखण्यात सरकार शंभर टक्के अपयशी ठरलं असून, राज्यातली आरोग्य यंत्रणा व्यवस्थित सेवा
देत नाही, त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी
पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. अहमदनगर इथं आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी काल
ते बोलत होते. वाढत्या रूग्णसंख्येला राज्य सरकारच जबाबदार असल्याचा आरोप ही त्यांनी यावेळी केला.
****
मुंबईत खासगी रुग्णालयांतल्या
दर आकारणीवर नियंत्रण, तसंच खाटा आणि रुग्णालयांची व्यवस्था अधिकाधिक परिणामकारक व्हावी,
यासाठी पाच सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खासगी रुग्णालय विषयक तक्रार
करण्यासाठी 'ई-मेल'द्वारे या अधिकाऱ्यांकडे थेट तक्रारही करता येणार आहे.
****
कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या
प्रमाणात आढळलेल्या मुंबईतल्या धारावीमधली रोजची रुग्णसंख्या निम्म्यानं घटली आहे.
काल दिवसभरात धारावीत १० नवीन रुग्ण आढळले. तर गेल्या सहा दिवसांत इथं एकाही रुग्णाचा
मृत्यू झालेला नाही. आतापर्यंत धारावी मध्ये १ हजार आठशे नव्व्याण्णव कोरोना विषाणू
बाधित रुग्ण आढळले आहेत.
****
बुलडाणा जिल्हयातल्या मेहकर
तालुक्यात मोळा इथं बिबट्याच्या हल्ल्यामध्ये सात जण गंभीर जखमी झाल्याची घटना काल
घडली. जखमी ग्रामस्थांना उपचारासाठी मेहकर इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment