Monday, 22 May 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 22.05.2017 - 10.00


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२२ मे २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

 मुंबई- गोवा अतिजलद तेजस रेल्वे गाडी अत्याधुनिक सुविधेसह सज्ज असून, रेल्वे मंत्री सुरेश प्रभू या गाडीला आज हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या गाडीमुळे मुंबई गोवा प्रवास साडे आठ तासांत पूर्ण करता येणार आहे. आठवड्यातून पाच दिवस ही रेल्वे चालणार आहे. या गाडीला रायगड जिल्ह्यात पेण किंवा रोहा इथं थांबा द्यावा, अशी मागणी या भागातल्या नागरिकांकडून केली जात आहे.

****

लातूर महानगर पालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक होणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं दोन पदांसाठी चार तर काँग्रेसकडून दोन जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. लातूर महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे.

****

सरकार गोरक्षेचं समर्थन केतं, मात्र कादद्याचं उल्लंघन करणाऱ्यांशी आमचा संबंध नाही, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं एका मुलाखतीदरम्यान ते बोलत होते. गोरक्षेच्या नावावर होणाऱ्या मारहाणीचा तपास सुरु असून, दोषींवर कारवाई करण्यात येईल, असं ते म्हणाले.

****

तिन्ही संरक्षण दले देशाच्या संरक्षणासाठी सक्षम असल्याचा निर्वाळा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिला आहे, ते नाशिक इथं अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या राष्ट्रीय अधिवेशनात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. भारतीय सैनिक प्राणाची परवा न करता रात्रंदिवस सीमेवर खडा पहारा देत असल्याचं ते यावेळी म्हणाले.

****

कोयना धरणाच्या नदीपात्रात असणाऱ्या स्लुईस गेट मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं कर्नाटक साठी सोडण्यात येणारं पाणी काल दुपारी १२ च्या सुमारास बंद करण्यात आलं. बिघाड झालेल्या गेटची दुरुस्ती यांत्रिकी विभाग करत असून ती पूर्ण झाल्यानंतर आज चाचणी घेवून पाणी सोडण्याचं नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, अशी माहिती कोयना धरणाचे कार्यकारी अभियंता ज्ञानदेव बागडे यांनी दिली. महाराष्ट्रातून कर्नाटकला दररोज चार टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे.

****

No comments: