Sunday, 7 June 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 07.06.2020 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 07 June 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ७ जून २०२० सायंकाळी ६.००
****

Ø  निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या रत्नागिरी जिल्ह्याला ७५ कोटी, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला २५ कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर. मुख्यमंत्र्यांची घोषणा.
Ø कोरोना विषाणू प्रादुर्भावाची आपत्ती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा आरोप
Ø टाळेबंदीचे नियम शिथिल करून दिल्लीच्या सीमा उद्यापासून होणार खुल्या.
Ø औरंगाबादेत दिवसभरात आढळले ७० कोरोनाबाधित रुग्ण. तीन जणांचा मृत्यू.
****

 निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याप्रमाणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही मोठा फटका बसला आहे. यसंकटकाळात सरकार पूर्ण ताकदीनं कोकणवासीयांच्या पाठीशी उभं राहील, सं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीला ७५ कोटी, तर सिंधुदुर्गला २५ कोटी रुपयांची तातडीची मदत आज जाहीर केली. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात तुलनेनं कमी नुकसान झालं आहे. मात्र या ठिकाणीदेखील आढावा घेऊन मदतीसंबंधी निर्णय घेतला जाईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले. दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून त्यांनी या चार जिल्ह्यांमध्ये झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला.

 चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. नुकसान भरपाईची काही रक्कम जिल्हाधिकारी यांच्या ताब्यात आगाऊ देऊन पंचनामे होताच ती तात्काळ आपत्तीग्रस्तांना देण्यात येईल, असं मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सांगितलं. तसंच वीज यंत्रणेतील पायाभूत सुविधा उभारण्याचा अनुभव असलेल्या संस्था आणि कंपन्यांना तातडीने काम सुरू करण्याचे निर्देश महावितरणला दिल्याचंही ते म्हणाले.
****

 ुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं महाविकास आघाडी सरकार कोरोना विषाणू प्रादुर्भावाची आपत्ती हाताळण्यात अपयशी ठरल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. ते आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्यसभा खासदार डॉ. भागवत कराड यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. शेतकरी, लघु उद्योजक, पथारीवाले, छोटे व्यावसायिक अशा सर्व घटकांना मदतीचा हात देऊन अर्थचक्र गतिमान करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे देश कोरोनाच्या आर्थिक संकटातून बाहेर पडेल, असा विश्वास दरेकर यांनी यावेळी व्यक्त केला.
****

 कोरोना प्रादुर्भावामुळे लागलेल्या टाळेबंदीचे नियम शिथिल करून दिल्ली राज्याच्या सीमा उद्यापासून खुल्या केल्या जाणार आहेत. राजधानीतल्या नागरिकांसाठी उपाहारगृहं, सभागृहं, मॉल आणि प्रार्थनास्थळंदेखील उद्यापासून खुली करण्यात येणार असल्याचं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज जाहीर केलं. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी सुमारे १५ हजार खाटांची व्यवस्था राज्यात करण्यात आली असून, प्रादुर्भाव आटोक्यात येईपर्यंत नागरिकांवर राज्य सरकारी रुग्णालयांत उपचाराची पूर्ण तजवीज केली असल्याचंही ते म्हणाले.
****

 कोरोनाच्या लसीवर संशोधन करत असलेल्या पुण्याच्या राष्ट्रीय विषाणुविज्ञान प्रयोगशाळेला प्रयोगसाठी ३० माकडं पकडण्याची परवानगी शासनानं दिली आहे. ऱ्हीसस या जातीची ही माकडं असून, त्यांचा व्यापारी कारणासाठी वापर करण्यास प्रतिबंध, तसंच त्यांना दुखापत होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचनेसह विविध अटीही शासनानं घातल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****

 राष्ट्रीय हॉटेल मॅनेजमेंट संयुक्त प्रवेश परीक्षा परिषदेनं २०२० या वर्षासाठीच्या प्रवेश परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढं ढकलल्या आहेत. सध्याची परिस्थिती आणि उमेदवारांच्या विनंतीवरूनच हा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी म्हटलं आहे. नवी तारीख कालांतरानं जाहीर करण्यात येईल, असंही ते म्हणाले.
****

 औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळच्या सत्रात ६४, तर दुपारी आणखी सहा कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता २ हजार वीस इतकी झाली आहे. यापैकी १ हजार एकशे चौऱ्याऐंशी कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, १०२ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं आता औरंगाबादमध्ये सातशे सतीस रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे.

 दुपारी आढळलेल्या रुग्णांमध्ये भीमनगर-भावसिंगपुरा, संजय नगर, रेहमानिया कॉलनी, तारांगण-पडेगाव, अमोदी हिल-पहाडसिंगपुरा आणि घाटी परिसर या भागातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. यामध्ये चार महिला आणि दोन पुरुष रुग्ण आहेत. तर गेल्या २४ तासांत तीन जणांचा बळी गेला आहे.
*****

 हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव शरासह तालुक्यात रेड झोनमधून आलेल्या आणि विलगीकरणात असलेल्या सात जणांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं आज वैद्यकीय अहवालावरुन स्पष्ट झालं. खबरदारी म्हणून सेनगाव शहरातला प्रभाग क्रमांक ३ आणि तालुक्यातलं चोंढी गाव प्रशासनानं आज पूर्णत: प्रतिबंधित केलं आहे. हे सातही रुग्ण मुंबईतून हिंगोलीमध्ये आले होते. त्यांना कोणतीही गंभीर लक्षणं नसली, तरी विलगीकरण कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 अहमदनगर जिल्ह्यात आज ५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर १२ जण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत जिल्ह्यात १२१ कोरोनाग्रस्त बरे होऊन घरी परतले असून, जिल्ह्यात आता ८० रुग्ण उपचार घेत आहेत.
****

 रायगड जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या आज ८२ नं वाढली असून, एकूण रूग्णसंख्या १ हजार ३८६ झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ६० रूग्णांचा मृत्यू झाला असून, ८०२ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या जिल्ह्यात ५२४ रूग्ण उपचार घेत आहेत.
****

 नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ४७४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. यापैकी ९७३ रुग्ण उपचारानंतर बरेही झाले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये जिल्ह्यातल्या ० ते १२ वयोगटातल्या ८७ बालकांचा समावेश होता. यापैकी ५६ बालकं कोरोनामुक्त झाली आहेत. उर्वरित ३१ बालकेही उपचारांना योग्य प्रतिसाद देत असून ती ही लवकरच कोरोनामुक्त होऊन सुखरुप घरी परततील, असा विश्वास आरोग्य यंत्रणेनं व्यक्त केला आहे.
****

 अमरावती शहरात आज चार कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे आता कोरोना बधितांचा आकडा दोनशे एकोणऐंशी वर पोहोचला आहे. आतापर्यंत अमरावतीत १६ जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला असून, सत्त्याऐंशी रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकशे बहात्तर रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
****

 गडचिरोली जिल्ह्यात आणखी २ जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला असल्याचं आज स्पष्ट झालं. हे दोघे गेल्या ३ तारखेला मुंबईतून गडचिरोलीत आले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ४३ झाली असून, सध्या १७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. २५ जण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. तर एकाचा हैदराबाद इथं मृत्यू झाला आहे.
****

 हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यात पोहण्यासाठी गेलेल्या पाच जणांपैकी तिघांचा जामगव्हाण जवळच्या इसापूर धरणात बुडून मृत्यू झाला. आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या तिघांचेही मृतदेह सापडले असून, तिघेही हिंगोलीचे रहिवासी होते. शिवम चौंढेकर, रोहित चित्तेवार आणि योगेश गडप्पा अशी मृतांची नावं आहेत.
****

 चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूर तालुक्यात ताडोबा कोर झोन परिसरात वाघाच्या हल्ल्यात एका रिसरातीला मृत्यू झाला आहे. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. या आठवड्यातील ही दुसरी, तर मागील तीन महिन्यातली या परिसरातली ही पाचवी घटना आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळपंचनामा केला आहे.
****

 हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव इथं शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं छापा मारुन साडेतीन लाख रुपयाचा मुद्देमाल आज जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं चार ठिकाणी छापे मारुन ही कारवाई केली. या पथकानं दहा जणांना ताब्यात घेतलं आहे.
****

 कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या महिला शेतकरी कुटुंबांना खरीपाच्या पेरणीसाठी मदतीचा हात म्हणून, परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठच्या सर्वोदय लोकसंचलित साधन केंद्रानं ५० टक्के उधारीवर खत आणि बियाण्यांची विक्री सुरू केली आहे.
****

 बेस्ट या मुंबईतल्या सार्वजनिक बस वाहतूक उपक्रमानं उद्यापासून बेस्टच्या बस गाड्यांमधून, सुरक्षित अंतर राखत प्रवास करू देण्याचा निर्णय घेतला आहे.
*****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 23.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 23 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...