आकाशवाणीऔरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
२७ फेब्रुवारी २०१७ सकाळी १०.०० वाजता
****
विख्यात साहित्यिक कुसुमाग्रज - वि. वा. शिरवाडकर यांची जयंती आज मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरी करण्यात
येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. मराठीला
तीचं वैभव, प्रतिष्ठा आणि हक्क प्राप्त करुन देण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहणं
आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. डिजिटल माध्यमातून
मराठी भाषेचा साहित्य व्यवहार विस्तारला जावा, तरच खऱ्या अर्थानं तीला जागतिक भाषा
म्हणून गौरव प्राप्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुंबई इथं आज यानिमित्त राज्य वाड्मय पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
यानिमित्त आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीनं
मराठी साहित्य आणि संस्कृती समृद्ध करण्यात योगदान देणाऱ्या साहित्य, संगीत, चित्र,
नाट्य आणि लोककला क्षेत्रांतील दहा व्यक्तिमत्वाचा सन्मानचिन्ह आणि ग्रंथ देउन गौरव
करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला पद्मश्री डॉ. यू.म.पठाण प्रमुख पाहुणे, तर विद्यापीठाचे
कुलगुरू डॉ.बी.ए.चोपडे अध्यक्षस्थानी म्हणून
उपस्थित राहणार आहेत.
****
बीड जिल्ह्यातल्या परळी इथं आज चौथं जिल्हा शिक्षक साहित्य
संमेलन होत आहे. ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक नागनाथ बडे हे या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी
असतील तर संमेलनाचं उद्घाटन युवा साहित्यिक प्राध्यापक वीरा राठोड करतील. सकाळी ग्रंथ
दिंडीनं सुरु होणाऱ्या या साहित्य संमेलनात शिक्षक गौरव पुरस्कारांचं वितरण, साहित्य
तसंच शिक्षण क्षेत्रातल्या तज्ञांशी परिसंवाद, कथाकथन आदी कार्यक्रम होणार आहेत.
****
देशातल्या शेतकऱ्यांच्या विकासासाठी तरुणांनी पुढे येण्याची
गरज असल्याचं प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलं आहे. ते बीड जिल्ह्यातल्या
तेलगाव इथं एका कार्यक्रमात बोलत होते. शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस खालावत चालली
असून, समाजातून सेवाभाव संपला असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
****
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातलं मतदान
आज होत आहे. १२ जिल्ह्यातल्या ५१ मतदारसंघांसाठी हे मतदान होत असून, ४० महिलांसह ६०७
उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
//****//
No comments:
Post a Comment