Tuesday, 28 February 2017


आकाशवाणीऔरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

२८ फेब्रुवारी २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

राष्ट्रीय विज्ञान दिन आज साजरा होत आहे. यानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आज आणि उद्या विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धां तसंच कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्त आज दुपारी ३ वाजता “सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर स्पेशली ॲबल्ड पर्सन्स” या विषयावर प्रख्यात लेखिका माधुरी शानबाग यांचे व्याख्यान होणार आहे.

****

भाषेचं संवर्धन ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी असून त्यासाठी राज्य सरकार विविध उपायययोजना राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून येत्या महाराष्ट्र दिनी महाबळेश्वर-वाई इथल्या भिलार गावात ‘पुस्तकाचं गाव’ या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात येणार असल्याची घोषणा मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मुंबई इथं आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. भिलार इथं पुस्तकाचं गाव तयार करताना सर्व घरे निवडण्यात आली असून तिथे सर्व प्रकारची पुस्तके एकाच ठिकाणी वाचण्यासाठी उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचं, तावडे यांनी यावेळी सांगितलं.

****

अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाहीचा पाया असून, आपल्या लोकशाहीचं भवितव्य त्यावर अवलंबून असल्याचं प्रतिपादन माहिती आयुक्त दिलीप धारुरकर यांनी केलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभाग आणि भारतीय समाजशास्त्रीय संशोधन परिषदेच्या वतीनं आयोजित आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात ते बोलत होते. राज्यघटनेतील तरतुदींच्या चौकटीत राहूनच सामाजिक नव माध्यमांच्या मार्फत अभिव्यक्त होण्याचं आवाहन धारुरकर यांनी यावेळी केलं.

****

राज्यातल्या १४ हजार पुलांची करणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. नाशिक इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. रायगड जिल्ह्यात महाड इथल्या सावित्री नदीवरचा पुल कोसळण्याची दुर्घटना घडल्यानंतर राज्य सरकारनं राज्यभरातील पुलांचं सर्वेक्षण केलं होतं, त्यात १४ हजार पुलांची दुरवस्था झाल्याचं आढळलं आहे. त्यातल्या जीर्ण पुलांची दुरुस्ती पहिल्या टप्प्यात हाती घेण्यात येणार असल्याचं ते म्हणाले.

//*******//

No comments: