Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 February 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ फेब्रुवारी २०१७ दुपारी १.००वा.
*****
देशाला अनेक शास्त्रज्ञांची आवश्यकता असून युवकांनी
विज्ञानाची कास धरावी असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून
प्रसारित होणाऱ्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या २९ व्या भागात ते आज बोलत होते.
निसर्ग सौंदर्य
आणि अनेक सणांनी समृध्द अशा वसंत ऋतू आणि चैत्र महिन्याचं आपण सगळे स्वागत करत असल्याचं,
त्यांनी सुरूवातीला सांगितलं. हे वातावरण माणुसकी आणि बंधुभावानं भारलेलं असल्याचं
ते म्हणाले.
एकाचवेळी
एकशे चार उपग्रह अवकाशात सोडण्याच्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्त्रोच्या कार्याचा
गौरवपूर्ण उल्लेख करत पंतप्रधानांनी इस्त्रोच्या अन्य महत्वाच्या उपक्रमांची माहिती
दिली. अवकाश संशोधन आणि कार्यात इस्त्रोच्या माध्यमातून आपल्या देशानं इतिहास निर्माण
केल्याचं ते म्हणाले. या एकशे चार उपग्रहांमध्ये भारतासाठी कार्य करणाऱ्या उपग्रहाचा
नागरी विकास नियोजन, जलस्त्रोत व्यवस्थापन क्षेत्रात मोठा उपयोग होणार असल्याचं पंतप्रधान
म्हणाले.
विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं मानवी जीवनात मोठं योगदान
असल्याचं सांगत प्रत्येक नवीन विज्ञान एका नव्या युगाला जन्म देतं, असं त्यांनी नमूद
केलं. चौदाव्या अनिवासी भारतीय दिनानिमित्त आयोजित नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान स्पर्धेदरम्यान
मासेमारी व्यवसाय करणाऱ्यांसाठी उपयुक्त मोबाईल ॲप तयार करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
तंत्रज्ञान आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
डिजीधन योजनेअंतर्गत रोखविरहीत व्यवहार करण्याला मोठा
प्रतिसाद मिळत असून हजारो व्यापारी आणि लाखो नागरिकांना सरकारकडून बक्षीसं मिळाली असल्याचं
त्यांनी नमूद केलं.
येत्या १४ एप्रिलला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीदिनी किमान १२५ जणांना भिम हे ॲप अंकेक्षित व्यवहारांसाठी वापरण्यास शिकवावं,
असं आवाहन त्यांनी केलं.
यंदा देशात विक्रमी धान्य उत्पादन झालं असून, ते आपल्या
शेतकरी बांधवांच्या कष्टाचं फळ असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं.
पेयजल आणि स्वच्छता योजना, स्वच्छता पंधरवडा आदी उपक्रमांची
त्यांनी माहिती दिली.
अंधांच्या ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत
भारतीय संघानं अजिंक्यपद मिळवल्याबद्दल आपल्याला अभिमान असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
येत्या आठ मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय
महिला दिनाच्या अनुषंगानं देशात महिलांप्रती संवेदनशीलता आणि जागरुकता वाढावी असं आवाहन
त्यांनी केलं. महिला सक्षमीकरणासाठी विविध राज्यांमध्ये राबवल्या जाणाऱ्या योजना आणि
उपक्रमांचा आढावा त्यांनी घेतला. महिलांनी सर्व क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला
असून त्यांना सर्व बाबतीत समान हक्क असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं.
****
देशातल्या दहा हजार अभियांत्रिकी महाविद्यालयातल्या
कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना आता त्यांच्या तक्रारी ऑनलाईन दाखल करता येणार आहेत.
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद - ए आय सी टी इनं संलग्न सर्व महाविद्यालयांना तातडीनं
ऑनलाईन यंत्रणा सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. देशातल्या तांत्रिक शिक्षणाचे नियम
ही संस्था निश्चित करते. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना
तक्रार नोंदवण्यासाठी ऑनलाईन प्रणालीची गरज व्यक्त केली होती. सर्व संस्थांनी ऑनलाईन
तक्रारी प्राप्त करुन त्याचं निवारण करणं गरजेचं असल्याचं परिषदेचे अध्यक्ष अनिल सहस्त्रबुद्धे
यांनी म्हटलं आहे. महाविद्यालयांनी ऑनलाईन तक्रारी आणि त्याच्या निवारणाचा अहवाल दर
महिन्याला सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. अभियांत्रिकी महाविद्यालयांना
देण्यात येणाऱ्या वार्षिक मान्यता प्रक्रियेदरम्यान ही सुविधा लक्षात घेतली जाणार आहे.
****
लोकशाही
व्यवस्था बळकट करण्यात माध्यमांचं मोलाचं योगदान असल्याचं राज्याचे पाणी पुरवठा आणि
स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं राज्य अधिस्वीकृती समितीच्या
सदस्यांची लोणीकर यांनी भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. सर्वसामान्यांच्या प्रश्नांला
वाचा फोडण्याबरोबरच शासन राबवत असलेल्या विविध योजना त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचं
कामही माध्यमं करत असल्याचं ते यावेळी म्हणाले.
****
तेराव्या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेला उद्यापासून
ठाणे इथं सुरुवात होत आहे. दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव महासंघाचे सरचिटणीस चेतन पाठारे
यांनी ठाणे इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. येत्या दोन ते चार मार्च दरम्यान
हरियाणात गुरगाव इथं होणाऱ्या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ
निवडण्याच्या हेतूनं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. महिला आणि
पुरुष गटातून एकूण २३ सदस्यांच्या संघाची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी करण्यात येणार
आहे.
****
बहरीन
इथं सुरु असलेल्या सहाव्या आशियाई सायकलिंग स्पर्धेत पहिल्या दिवशी भारतानं तीन पदकं
मिळवली आहेत. चंदीगढच्या अभिषेकनं सुवर्ण पदक, पश्चिम बंगालच्या दीविज शहानं रौप्य
पदक आणि हरींदर सिंगनं कांस्य पदक पटकावलं. भारताकडून नऊ खेळाडू या स्पर्धेत सहभागी
झाले आहेत.
****
No comments:
Post a Comment