Tuesday, 2 May 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 02.05.2017 - 05.25pm


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 02 May 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २ मे  २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी शिवसेनेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. शेतकरी कर्जमाफी, आत्महत्या रोखणं यासारख्या महत्वाच्या मुद्यावर चर्चा करण्याची गरज असल्याचं शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात सकारात्मक विचार करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं ते म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर कायदा पारित करण्यासाठी राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाची तारीख पुढे ढलकण्यात आली आहे. १७ मे ला होणारं हे अधिवेशन आता २० ते २२ मे दरम्यान होणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. या अधिवेशनात आणखी दोन दिवस वाढवून शेतकऱ्यांच्या मुद्यांवर चर्चा व्हावी, अशी मागणी शिवसेनेनं केली आहे.
राज्यातील धरणे आणि जलसाठ्यांच्या साठवण क्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीनं धरणांमधला गाळ काढून तो शेतामध्ये वापरण्यासाठी गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना राबविण्याचा निर्णयही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

****

राज्यांच्या विरोधी पक्षांनीही शेतकरी आत्महत्या तातडीनं नियंत्रणात आणण्याकरता सरकारनं कर्ज माफीची घोषणा करावी, याकरता विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी केली आहे. विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळानं आज राज्यपाल सी विद्यासागर राव यांची भेट घेऊन, आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते.   

****

जम्मू काश्मीरमधल्या वाढत्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल एन एन व्होरा यांनी आज नवी दिल्ली इथं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेऊन सुरक्षिततेच्या मुद्यावर चर्चा केली.

काश्मीरमध्ये सीमेपलिकडून सतत सुरु असलेली घुसखोरी, फुटीरतावाद्यांच्या कारवाया, दगडफेक आणि निदर्शनं या सर्व मुद्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली. भारत- पाकिस्तान सीमेवर पूंछ इथं काल पाकिस्तानच्या सैन्यानं दोन भारतीय जवानांची हत्या करुन त्यांच्या देहाची विटंबना केली. त्यामुळे काश्मीर खोऱ्यात तणावाचं वातावरण आहे. या घटनेबद्दल भारताचे लष्करी कारवायांचे महासंचालक लेफ्टनंट जनरल ए के भट यांनी पाकिस्तानच्या लष्करी महासंचालकांशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. 
दरम्यान, या दोन्ही जवानांच्या पार्थिव देहावर आज त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

****

नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आर्थिक विकास खेड्यांपर्यंत पोहोचत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं शंभर आय सी आय सी आय डिजिटल गावं राष्ट्राला समर्पित करताना बोलत होते. डिजिटल अभियानामुळे नवीन तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक व्यवहाराच्या नवनवीन पद्धती समोर येत असून, याचा ग्रामीण भागासाठी जास्त उपयोग होत असल्याचं ते म्हणाले. आय सी आय सी आय समूहानं १७ राज्यातल्या शंभर गावांमध्ये संगणक सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारनं जाहीर केलेला निधी लवकरात लवकर उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पालकमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे केली आहे. यासंदर्भातल्या मागण्यांचं निवेदन आज पालकमंत्री रावते यांना देण्यात आलं. स्त्री रुग्णालयात योग्य त्या व्यवस्था करणं, जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत झालेल्या कामांचं मूल्यमापन करणं, तसंच उस्मानाबाद बसस्थानकाच्या आधुनिकीकरणाचा प्रश्न मार्गी लावावा, आदी मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे. 

****

नाशिक जिल्ह्यातल्या निफाड आणि लासलगाव बाजार समितीत गेल्या अकरा दिवसांपासून बंद असलेले कांदा लिलाव आज पूर्ववत सुरु झाले. कांद्याच्या विक्रीबद्दल शेतकऱ्यांना व्यापारी देत असलेले धनादेश वटन्यास विलंब होत असल्यानं रोख स्वरूपात रक्कम मिळावी यावरून मतभेद झाल्यानं २० एप्रिल पासून लिलाव बंद होते. या संदर्भात बाजार समिती पदाधिकारी आणि व्यापारी यांची बैठक होऊन कांदा खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना पाच हजार रुपये रोख आणि उर्वरित रक्कम धनादेशाद्वारे देण्याचं ठरल्यानं आजपासून लिलाव पुर्ववत सुरू झाले.

****

मलेशियातल्या इपोह इथं सुरु असलेल्या सुलतान अजलान शहा हॉकी स्पर्धेत तिसऱ्या फेरीत आज भारताला ऑस्ट्रेलियाकडून तीन - एक असा पराभव पत्करावा लागला. पहिल्या फेरीत ब्रिटनबरोबर दोन -दोन अशी बरोबरी केल्यानंतर, दुसऱ्या फेरीत भारतीय संघानं न्यूझीलंडचा तीन -शून्य असा पराभव केला होता. चौथ्या फेरीत भारताचा सामना उद्या जपान बरोबर होणार आहे. 

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 31.05.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 31 May 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रप...