Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 June 2018
Time 1.00pm to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ जून २०१८ दुपारी
१.०० वा.
****
देशात पायाभूत सुविधांची निर्मिती करणं, हे एक आव्हान
असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मुंबईत आज आशियाई पायाभूत सुविधा
गुंतवणूक बँक - ए आय आय बी च्या तिसऱ्या वार्षिक बैठकीच्या उद्घाटना
वेळी ते बोलत होते. पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ए आय आय बी
महत्वाची भुमिका बजावू शकते, जागतिक अर्थ व्यवस्थेत भारत एक महत्वाचा आर्थिक देश म्हणून
उद्याला आला असून, भारतात गुंतवणुकी साठी अनुकूल वातावरण असल्याचं त्यांनी नमूद केलं.
देशातली आर्थिक स्थिती नियंत्रणात असून, आपलं सरकार हे आर्थिक एकत्रिकरणासाठी कटीबद्ध
असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.
****
१९७५ साली तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी
घोषित केलेल्या आणी बाणीच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज काळा दिवस पाळण्यात
येत आहे. त्या निमित्त मुंबईत आयोजित आणी बाणी – लोक शाहीवर घाला या चर्चा सत्रात पंतप्रधान सहभागी झाले होते. लोक शाहीप्रती आपल्या कटीबद्धतेचं
स्मरण करण्यासाठी हा दिवस पाळण्यात येत असल्याचं ते यावेळी
म्हणाले. देशातल्या वर्तमान आणि भावी पिढीला लोकशाही आणि घटने प्रती
जागरुक करण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली. आणी बाणीद्वारे काँग्रेसनं
घटनेला मोठा धक्का
दिल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.
****
आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ सेवन विरोधी दिन आज पाळला
जात आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज नवी दिल्लीत मादक पदार्थांचं सेवन थांबवण्यासाठी
कार्य करणाऱ्यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले. अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या
व्यक्तींच्या तसंच त्यांच्या कुटुंबियांच्या मदती साठी सरकारनं, एक आठ शून्य शून्य
एक एक शून्य शून्य तीन तीन एक, हा नि:शुल्क क्रमांक सुरु केला असल्याचं सामाजिक न्याय
आणि सक्षमीकरण मंत्रालयानं सांगितलं आहे. या निमित्त औरंगाबाद शहरातल्या भडकलगेट इथल्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पासून व्यसन मुक्ती फेरी काढण्यात आली.
****
देशात गेल्या आठ महिन्यात ४१
लाख नवीन रोजगार निर्माण झाले आहेत. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या वेतन पट माहितीच्या आधारे, केंद्रीय
सांख्यिकी कार्यालयानं ही माहिती जाहीर केली. सप्टेंबर २०१७ ते एप्रिल २०१८ या काळात
औपचारिक क्षेत्रात ४१ लाख २६ हजार नवीन नोकऱ्या मिळाल्याचं कार्यालयानं कळवलं आहे.
****
वन
उत्पादनं अधिक समृद्ध करण्याच्या दृष्टीनं देशभरात तीन हजार वन धन केंद्रं सुरु करण्याचा
सरकारचा प्रस्ताव आहे. वन उत्पादनांना चांगला भाव मिळावा या करता कौशल्य विकास आणि
क्षमता संवर्धनाचं काम ३० हजार स्वयं सहायता गटांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
हे गट वन उत्पादनांना बाजार पेठ मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली व्यापक पातळीवर काम करणार आहेत.
****
राज्याच्या
सत्तेत भारतीय रिपब्लिकन पक्षाला किमान पाच टक्के वाटा हवा असून, त्या
दृष्टीनं मंत्रीमंडळात एक मंत्रीपद मिळावं अशी मागणी पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली
आहे. त्या साठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत, असं
त्यांनी काल मुंबईत सांगितलं. सरकारनं १६ जुलैला
होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत किमान
एक जागा रिपाईंला द्यावी, राज्यातल्या तीन महामंडळांची अध्यक्ष पदं, तसंच
पक्षाच्या चाळीस कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या संस्थांमध्ये सदस्यपदं द्यावीत, अशी
मागणीही आठवले यांनी केली आहे.
****
केंद्र आणि राज्य शासनाच्या विकासा साठी विविध योजना
प्रभावी पणे राबवून विकास कामांना गती तसंच शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज उपलब्ध करून
देण्याचे निर्देश खासदार चंद्रकांत खैरे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. औरंगाबाद जिल्हा
दक्षता, आणि संनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी महात्मा गांधी राष्ट्रीय
ग्रामीण रोजगार हमी योजना, दीन दयाळ उपाध्याय अंत्योदय योजना, या सह शासनाच्या कल्याणकारी
योजनांचा आढावा घेण्यात आला.
****
आसाम
मध्ये गुवाहाटी इथं आज पासून ५८ व्या राष्ट्रीय आंतरराज्य वरीष्ठ अँथलेटिक्स स्पर्धेला
सुरूवात होत आहे. आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते संध्याकाळी या
स्पर्धेचं उद्घाटन होईल. चार दिवसांच्या या स्पर्धेत देश भरातले ८०० हून अधिक खेळाडू सहभागी होत आहेत. या स्पर्धेतून, जकार्ता
इथं होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघ निवडला जाणार आहे.
****
आयसीसी महिला टीट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा
नऊ ते चोवीस नोव्हेंबर दरम्यान वेस्ट इंडीज मध्ये होणार आहे. भारताचा पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध
नऊ नोव्हेंबर रोजी होणार आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका
आणि यजमान वेस्ट इंडीज या सह दहा संघ स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
नेदरलँड मध्ये सात ते चौदा जुलै दरम्यान होणाऱ्या
पात्रता फेरीत दोन संघ विश्र्वचषक महिला क्रिकेट स्पर्धेसाठी निवडले जाणार आहेत.
*****
***
No comments:
Post a Comment