Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 August 2018
Time 18.00 to 18.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ ऑगस्ट २०१८ सायंकाळी ६.०० वा.
****
पंतप्रधान जनआरोग्य योजनेला येत्या
२५ सप्टेंबरपासून प्रारंभ होणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी आज
नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ही योजना लागू करण्यासाठी २९ राज्य आणि
केंद्रशासित प्रदेशांनी संबंधित करारावर स्वाक्षरी केली असून, या योजनेअंतर्गत लाभार्थींना
नाव नोंदणी करण्याची आवश्यकता नसल्याचं, नड्डा यांनी सांगितलं. आयुष्यमान भारत कार्यक्रमांतर्गत
ही योजना राबवली जाणार असून, ही जगभरातली सर्वात मोठी आरोग्य योजना असल्याचं, याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
२००२ साली घडलेल्या गोध्रा रेल्वे
जळीत कांडप्रकरणी दोन आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली असून, तिघांची
निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या विशेष न्यायालयानं
आज हा निर्णय सुनावला. २००२ मध्ये गुजरातमध्ये गोध्रा इथं साबरमती जलद रेल्वेच्या एका
डब्याला लावलेल्या आगीत ७२ कारसेवकांचा होरपळून मृत्यू झाला होता.
****
औरंगाबाद इथले राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे
माजी नगरसेवक, रॉक्सी चित्रपटगृहाचे मालक सलीम कुरेशी यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी
मुख्य आरोपी इम्रान मेहंदी याच्यासह आठ दोषींना, औरंगाबाद जिल्हा आणि सत्र न्यायालयानं आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पाच मार्च
२०१२ रोजी कुरेशी यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. तत्कालीन सहायक
पोलिस आयुक्त संदीप भाजीभाकरे यांच्या पथकानं इम्रान मेहंदीला राहत्या घरातून अटक करुन,
गुन्हा दाखल केला होता. इम्रान मेहंदी आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या चौकशीतून या टोळीनं
सलीम कुरेशी यांच्यापूर्वी अशा अनेक हत्या केल्याची माहिती समोर आली. आज जिल्हा आणि सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी या सर्वांना जन्मठेपेची शिक्षा
सुनावली.
****
राज्य शासनानं उस्मानाबाद सह
नंदूरबार, गडचिरोली आणि वाशिम या चार जिल्ह्यांसाठी १२१ कोटी रुपये अतिरिक्त निधी जाहीर
केला आहे. या चार जिल्ह्यांमधल्या विकास कामांच्या प्रगतीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी आज दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे आढावा घेतला. या चार जिल्ह्यांमध्ये आरोग्य,
शिक्षण, कृषी, जलसंधारण, पोषण आहार, आर्थिक समावेशन, कौशल्य विकास आणि मूळ पायाभूत
सुविधा आदी क्षेत्रात विविध विकास कामं सुरु असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं.
****
औरंगाबाद जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यात बाबतरा इथं, दोन मुलं गोदावरी नदीपात्रात
बुडाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास
घडली. नदीपात्रात अंघोळीसाठी उतरलेली ही मुलं, पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं बुडाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. ही दोन्ही मुलं सुमारे १४ वर्ष वयाची आहेत. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून, दोन नौका आणि गावकऱ्यांच्या सहाय्यानं नदीपात्रात शोध मोहीम सुरू
असल्याची माहिती वीरगाव पोलिसांकडून देण्यात आली.
****
परभणी जिल्ह्यात जिंतूर इथं उर्दू प्राथमिक शाळेची भिंत कोसळून सात विद्यार्थी जखमी झाले. आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास
ही घटना घडली. जखमी विद्यार्थ्यांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले, मात्र पालकांत भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सुदैवानं मोठी दुर्घटना टळली असली तरी, या प्रकरणी चौकशी करून शाळेची मान्यता रद्द करण्याची
मागणी पालकांनी केली आहे.
****
धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करून घेण्याच्या मागणीसाठी
औरंगाबाद, हिंगोली तसंच उस्मानाबाद
इथं ढोल जागर आंदोलन करण्यात आलं. औरंगाबाद इथं आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या
मागण्यांचं निवेदन सादर केलं.
हिंगोली इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
आंदोलक युवकांनी घोषणाबाजी केली. जिल्ह्यात वसमत, कळमनुरी, सेनगाव, औंढा इथंही आंदोलन करून, प्रशासनाला निवेदन देण्यात
आलं.
उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धनगरी ढोल जागर आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात, धनगर समाजाला अनुसूचित
जमातीचं आरक्षण मिळावं, सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्याच्या निर्णयाची
अंमलबजावणी करावी, आदी मागण्यांचा समावेश आहे.
****
नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात स्थायी समितीच्या १५ सदस्यांनी आज अविश्वास ठराव दाखल केला. सभागृह नेता
दिनकर पाटील यांच्यासह या सदस्यांनी ३१ तारखेच्या आत विशेष महासभा बोलवण्याच्या मागणीसाठी
नगरसचिवांना पत्र दिल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
इंडोनेशियात सुरू असलेल्या अठराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत
आज अडथळ्याच्या चारशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारताचा धावपटू धरुन अय्यस्वामी यानं
रौप्य पदक पटकावलं. स्पर्धेत आतापर्यंत सात सुवर्ण, अकरा रौप्य आणि २० कांस्यपदकासह
भारत पदकतालिकेत नवव्या क्रमांकावर आहे.
//************//
No comments:
Post a Comment