Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 April
2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ एप्रिल
२०२० दुपारी १.०० वा.
****
कोरोना
विषाणू बाधितांची संख्या १८ हजार ६०१ झाली आहे. आतापर्यंत तीन हजार २५० रुग्णांना उपचारानंतर
प्रकृतीत सुधार झाल्यानं रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. गेल्या चोवीस तासात ४७
रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत देशभरात ५९० जणांचा मृत्यू झाला आहे.
****
राष्ट्रपती
भवनातल्या एका सफाई कामगाराच्या नातलगाचा कोरोना विषाणूची बाधा झाल्यानं मृत्यू झाल्याचं
निदर्शनास आल्यानंतर राष्ट्रपती भवन परिसरातली शंभर कुटुंबं स्वयं विलगीकरणात रहात
आहेत. एका कर्मचाऱ्याची आई या आजारानं मरण पावली, ही महिला या परिसरात राहत नव्हती,
मात्र खबरदारीचा उपाय म्हणून तिच्या सर्व नातलगांची कोरोना तपासणी करण्यात आली असून
त्यांचे अहवाला निगेटीव्ह आले आहेत. मात्र प्रतिबंधक उपाययोजना म्हणून हे सर्व लोक
विलगीकरणात राहत असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राष्ट्रपती
रामनाथ कोविंद यांनी कोरोना संसर्गाची स्थिती अतिशय संवेदनशील आणि व्यावसायिकपणे हातळण्याऱ्या सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांचं
कौतुक केलं आहे.नागरी सेवा दिनाच्या निमित्तानं त्यांनी आज आपल्या संदेशात, लोककल्याणासाठी
धोरण आणि कार्यक्रम राबवण्यात नागरी सेवांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचं सांगितलं.
शासकिय सेवा कर्मचारी कोरोना संसर्गाच्या काळात संवेदनशील आणि व्यावसायिकपणे हाताळत
असलेली स्थिती अशीच भक्कमपणे हाताळून शासकीय सेवेची परंपरा अशीच कायम ठेवतील असा विश्वास
त्यांनी यावेळी व्यक्त केला.
****
कोरोना
संसर्गामुळे राज्यातला मृतांचा आकडा चिंताजनक असून, हे प्रमाण शून्यावर आणण्याचं आव्हानाला
आपण सर्वांनी सामोरे जायचं आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी
म्हटलं आहे. ते आज सामाजिक संपर्क माध्यमावरून जनतेशी बोलत होते. मुंबई आणि पुण्यात
लॉकडाऊन नियमांची काटेकोर अंमलबजावणी आवश्यक असल्याचं पवार यांनी नमूद केलं. डॉक्टर,
पोलिस आणि शासकीय यंत्रणेचा लोकांनी आदर राखावा, असं आवाहनही पवार यांनी केलं. पालघर
जिल्ह्यात झालेलं जमावाच्या मारहाणीत साधुंच्या मृत्यूचं प्रकरण निषेधार्ह आहे. या
प्रकरणी सरकारने तातडीने पावलं उचलली, मात्र असा प्रकार घडायला नको होता, असं मतही
पवार यांनी व्यक्त केलं. मुस्लिम धर्मियांचा रमजान महिना सुरू होणार आहे, रमजानच्या
काळात मुस्लिम नागरिकांनी घरातच राहावं, नमाज किंवा इफ्तारसाठी एकत्र येऊ नये, असंही
पवार यांनी आवाहन केलं आहे.
****
नागरिकांनी
लॉकडाऊनच्या नियमांचं काटेकोर पालन केलं, त्याचं यश म्हणूनच नांदेड जिल्हा अद्याप कोरोना
संसर्गापासून मुक्त असल्याचं, नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे, ते
एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. प्रशासनाने नागरिकांना जीवनावश्यक
वस्तू उपलब्ध करून दिल्या, तसंच समाजिक संस्था-संघटना, लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या
कामाचाही चव्हाण यांनी उल्लेख केला.
****
अखिल
भारतीय सत्यशोधक समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, माजी कोषाध्यक्ष आणि तरवडीच्या दीनमित्र
विश्वस्त मंडळा चे संचालक नारायण धोंडिराम शिंत्रे यांच काल औरंगाबाद इथं निधन झालं.
ते ८५ वर्षांचे होते. शिंत्रे यांच्या अंतिम इच्छेनुसार औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयाच्या घाटी रुग्णालयात त्यांचा पार्थिव देह दान करण्यात आला. त्यांच्या
निधनाबद्दल सत्यशोधक समाजाच्या सर्व माजी पदाधिकारी,
कार्यकारिणी सदस्य आणि कार्यकर्त्यांनी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.
****
सहकारमहर्षी
स्वर्गीय श्यामराव पाटील यड्रावकर यांच्या सुविद्य पत्नी सावित्री शामराव पाटील यड्रावकर
यांचं आज सकाळी कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यात यड्राव गावी निधन झालं. त्या ८३
वर्षांच्या होत्या. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या त्या आई होत. त्यांच्या पार्थिव देहावर
यड्राव इथं मोजक्या नातलगांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
जालना
शहरात विविध शासकीय कार्यालयांमध्ये काम करणारे अनेक अधिकारी, कर्मचारी औरंगाबादहून
दररोज ये-जा करतात. मात्र, औरंगाबाद जिल्हा हा कोरोना बाधित रुग्णांच्या लाल क्षेत्रात
असल्यामुळे या अधिकारी कर्मचाऱ्यांना कुठल्याच चेकपोस्टवरून जालना जिल्ह्यात प्रवेश
देऊ नये, असे आदेश जालन्याचे पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या
प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. विशेषत: बदनापूर हद्दीतील वरुडी नाक्यावर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी
ओळखपत्र किंवा पास दाखवल्यानंतरही त्यांना प्रवेश देऊ नये, असं चैतन्य यांनी सांगितलं
आहे.
****
No comments:
Post a Comment