Sunday, 26 March 2017

AIR News Aurangabad - Mann Ki Baat 26.03.2017


प्रसारभारती

प्रादेशिक वृत्त विभाग

आकाशवाणी, औरंगाबाद

*****



पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी दि. २६ मार्च २०१७ रोजी आकाशवाणीच्यामन की बातया कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला.

त्यांच्या या संवादाचा हा मराठी स्वैरानुवाद

******



माझ्या प्रिय देशवासियांनो,



आपणा सर्वांना नमस्कार. देशाच्या बहुतेक भागात बरीच कुटुंब आपल्या मुलांच्या परीक्षेत व्यस्त असतील.  ज्यांच्या परीक्षा झाल्या आहेत, तिथे थोडं तणाव मुक्त वातावरण असेल आणि ज्यांच्या परीक्षा अजूनही सुरू आहेत, त्या घरांमध्ये थोडा-फार तणाव असेलच, यावेळी मी हेच सांगेन, की मागच्या वेळी मी, मन की बात मधून विद्यार्थ्यांना  जे सांगितलं  होतं, ते पुन्हा ऐका. परीक्षेच्या वेळी त्या गोष्टी नक्कीच आपल्याला उपयोगी पडतील.

आज २६ मार्च. २६ मार्च हा बांगला देशाचा स्वातंत्र्यदिन आहे. अन्यायाविरुद्ध एक ऐतिहासिक लढाई, वंग-बंधुंच्या नेतृत्वात बांगला देशातील जनतेचा अभुतपूर्व विजय. आजच्या या महत्वपूर्ण दिवशी, मी बांगला देशातील नागरिक बंधु-भगिनींना स्वातंत्र्य दिनाच्या अनेक-अनेक शुभेच्छा देतो. आणि अशी इच्छा करतो की, बांगला देशाची प्रगती व्हावी, विकास व्हावा, आणि बांगला देशवासियांना मी विश्वास देतो, की भारत, बांगला देशाचा एक समर्थ सहकारी आहे. एक चांगला मित्र आहे आणि आम्ही खांद्याला खांदा मिळवून या संपूर्ण विभागात शांतता, सुरक्षा आणि विकासात आपला सहभाग देत राहू. आम्हा सर्वांना या गोष्टीचा अभिमान आहे की, रविंद्रनाथ टागोर, त्यांच्या आठवणी हा आपला एक सामायिक वारसा आहे. बांगला देशाचं राष्ट्रगीत ही देखील गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांची रचना आहे. गुरुदेव टागोरांच्या बाबतीत एक रोचक गोष्ट अशीही आहे की, १९१३ मध्ये नोबेल पुरस्कार मिळवणारे ते पहिले  अशियाई व्यक्तीच नव्हते, तर इंग्रजांनी त्यांना नाईटहूड हा किताबही दिला होता. आणि जेव्हा १९१९मध्ये जालियनवाला बागेत इंग्रजांनी नागरिकांची मोठ्या प्रमाणात निर्घृण हत्त्या केली, तेव्हा रविंद्रनाथ टागोर त्या महापुरुषांपैकी होते, ज्यांनी या घटनेविरुद्ध आपला आवाज बुलंद केला होता, आणि हा तोच कालखंड होता, जेव्हा १२ वर्ष वयाच्या एका मुलाच्या  मनावर या घटनेचा विलक्षण परिणाम झाला होता. किशोरावस्थेत शेतात- मळ्यात हसणाऱ्या, बागडणाऱ्या त्या मुलाला जालियनवाला बागेतील नृशंस नरसंहाराने, जीवनाची एक नवी प्रेरणा दिली होती आणि १९१९ मध्ये १२ वर्षं वयाचा तो बालक भगत, म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके, आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान शहीद भगतसिंग. आजपासून तीन दिवसांपूर्वी २३ मार्च या तारखेला भगतसिंगजी, आणि त्यांचे सहकारी सुखदेव आणि राजगुरु यांना इंग्रजांनी फासावर चढवलं होतं आणि २३ मार्चच्या त्या घटनेबद्दल आपण सारे जाणतो. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांच्या चेहऱ्यावर त्या वेळी भारत मातेच्या सेवेचं  समाधान होतं, मरणाचं भय नव्हतं. आयुष्याच्या साऱ्या स्वप्नांचा त्यांनी भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी त्याग केला होता आणि हे तीन वीर आजही आपल्यासाठी प्रेरणास्थान आहेत. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांच्या बलिदानाच्या गाथेला शब्दांचे अलंकार अपुरे पडतील आणि सारं ब्रिटीश साम्राज्य या तिघांना घाबरत असे. ते तुरुंगात होते, फ़ाशी होणार हे निश्चित होतं, तरीही या तिघांच काय करायचं याची चिंता इंग्रजांना सतावत असे. आणि म्हणूनच २४ मार्च ही फाशीची तारीख ठरलेली असताना, २३ मार्च रोजी
त्यांना फासावर चढवलं गेलं. लपून-छपून हे करण्यात आलं. उघडपणे करणं अशक्य होतं. नंतर त्यांचे मृतदेह, आज आपण ज्याला पंजाब प्रांत म्हणून ओळखतो, तिथे आणून गुप्तपणे त्यांचं दहन करण्यात आलं. काही दिवसांपूर्वी त्या जागी जाण्याची संधी मला मिळाली, त्या भूमीत विशिष्ट स्पंदनं आहेत असा मला अनुभव आला. देशातल्या तरुणांना मी सांगेन की, जेव्हा संधी
मिळेल, जेव्हा पंजाबला जाल, तेव्हा भगतसिंग, सुखदेव आणि
राजगुरु, भगतसिंगांच्या मातोश्री, आणि बटुकेश्वर दत्त यांच्या समाधीस्थळी आपण अवश्य जा. हा तोच काळ होता, जेव्हा स्वातंत्र्याची आस, त्याची तीव्रता, त्याचा व्याप वाढतच चालला होता. एकीकडे भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांच्यासारख्या वीरांनी सशस्त्र क्रांतीसाठी युवकांना प्रॆरणा दिली होती. आजपासून बरोबर शंभर
वर्षांपूर्वी १० एप्रिल १९१७, महात्मा गांधीजींनी चंपारण्य सत्याग्रह
केला होता. चंपारण्य सत्याग्रहाचं हे शताब्दी वर्ष आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात, गांधी विचार, गांधी शैली यांचं प्रकट रूप चंपारण्य सत्याग्रहाच्या वेळी पहायला मिळालं. स्वातंत्र्य लढ्याच्या संपूर्ण प्रवासात हे एक महत्वाचं वळण होतं, विशेषतः संघर्षाच्या पद्धतीच्या नजरेतून. हाच तो काळ होता, चंपारण्य सत्याग्रह, खेडा सत्याग्रह आणि अहमदाबाद इथल्या मिल कामगारांचा संप, या सर्वात महात्मा गांधीजींचे विचार आणि कार्यशैली यांचा खोलवर परिणाम झाल्याचं दिसून येतं. १९१५ साली गांधीजी परदेशातून परत आले आणि १९१७ साली बिहारमधल्या एका छोट्या गावात जाऊन त्यांनी देशाला नवी प्रेरणा दिली. आज आपल्या मनात गांधीजींची जी प्रतिमा आहे, त्या प्रतिमेच्या आधारे आपण चंपारण्य सत्याग्रहाचं मूल्यांकन करू शकत नाही. कल्पना करा एक व्यक्ती १९१५ साली भारतात परत येते आणि केवळ दोन वर्षांचा कार्यकाळ. देश त्यांना ओळखत नव्हता, त्यांचा प्रभावही नव्हता, ही तर केवळ सुरुवात होती. त्यावेळी त्यांना किती कष्ट सोसावे लागले असतील, किती परिश्रम घ्यावे लागले असतील, याची आपण कल्पना करू शकतो, आणि चंपारण्य सत्याग्रह म्हणजे अशी घटना होती की, ज्यात महात्मा गांधीजींचं संघटन कौशल्य, महात्मा गांधीजींची भारतीय समाजाची नाडी ओळखण्याची शक्ती, महात्मा गांधीजींचं आपल्या वागण्यातून ब्रिटीश राजवटीविरुद्ध गरीबातल्या गरीब, अशिक्षित व्यक्तीला संघर्ष करण्यासाठी संघटित करणं, प्रेरित करणं, लढण्यासाठी मैदानात आणणं, हे सारं अदभुत शक्तीचं दर्शन घडवतं. आणि म्हणूनच अशा रुपात आपल्याला महात्मा गांधीजींच्या विराटतेचा अनुभव घेतो. पण शंभर वर्षांपूर्वीच्या गांधीजींबद्दल आपण विचार करू लागलो, त्या चंपारण्य सत्याग्रह करणाऱ्या गांधीजींबद्दल, तर आपल्या असं लक्षात येईल की, सार्वजनिक जीवनाची सुरुवात करणारऱ्या कुणाही  व्यक्तीसाठी चंपारण्य सत्याग्रह हा एक निश्चितच अभ्यासाचा विषय आहे. सार्वजनिक जीवनाचा कसा आरंभ करावा? स्वतः किती कष्ट करावे लागतात?, आणि गांधीजींनी हे कसं केलं होतं? हे आपण त्यांच्याकडून शिकू शकतो. तो काळ असा होता की ज्या ज्या मोठ्या नेत्यांची नावं आपण ऐकतो, गांधीजींनी,  त्यावेळी राजेंद्रबाबू असोत, की आचार्य कृपलानी सर्वांना खेड्यात पाठवलं होतं. लोकांमध्ये मिसळून, लोक जे काम करत आहेत, त्याला स्वातंत्र्याच्या रंगात कसं रंगवता येईल? हे शिकवलं. आणि इंग्रज हे ओळखू शकले नाहीत की गांधीजींच्या कामाची पद्धत काय आहे? संघर्षही होत होता आणि नव -निर्मितीही होत होती. दोन्ही एकाच वेळी सुरु होतं. जणू गांधीजींनी ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू केल्या होत्या. एक बाजू होती संघर्ष आणि दुसरी निर्मिती. एकीकडे कारावास पत्करायचा आणि दुसरीकडे  रचनात्मक कार्यात स्वतःला झोकून द्यायचं. एक विलक्षण समतोल गांधीजींच्या कार्यशैलीत होता. सत्याग्रह म्हणजे काय?, असहमति म्हणजे काय?, इतक्या मोठ्या राजवटीपुढे
असहकार म्हणजे काय? एक पूर्णतः नवा अनुभव गांधीजींनी शब्दातून नव्हे, तर एका यशस्वी प्रयोगातून सिद्ध करून दाखवला होता. आज ज्यावेळी देश चंपारण्य सत्याग्रहाची शताब्दी साजरी करत आहे, त्या वेळी भारतातल्या सामान्य माणसाची शक्ती किती अपार आहे? या अपार शक्तीला स्वातंत्र्य आंदोलनाप्रमाणे स्वराज्याकडून सुराज्याकडे या प्रवासासाठी वापरतानाच, सव्वाशे कोटी देशवासियांच्या संकल्पाची शक्ती, परिश्रमाची पराकाष्ठा, बहुजन हिताय- बहुजन सुखाय हा मूलमंत्र घेऊन, देशासाठी, समाजासाठी, काहीतरी करून दाखवण्याचा निरंतर प्रयत्नच, स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या महापुरुषांच्या
स्वप्नांना साकार करेल. आज आपण २१व्या शतकात जगत आहोत. अशा वेळी कोण भारतीय असा असेल बरं, जो भारताला बदलू इच्छित नाही? देशात होत असलेल्या बदलांचा भागीदार होऊ इच्छित नाही? सव्वाशे कोटी देशवसियांची बदल घडवण्याची इच्छा, बदल घडवण्याचा प्रयत्न, यामुळेच तर नव्या भारताचा, न्यू इंडीयाचा, पाया घातला जाणार आहे. न्यू इंडीया हा काही सरकारी कार्यक्रम नाही किंवा कोणत्याही राजकीय पक्षाचा जाहीरनामा नाही. न्यू इंडीया हे सव्वाशे कोटी देशवासियांना केलेलं आवाहन आहे. सव्वाशे कोटी भारतीय मिळून भव्य भारताची उभारणी कशी करता येईल? हा त्या मागचा भाव आहे, उद्देश आहे. सव्व्वाशे कोटी देशवासियांच्या मनातली एक आशा आहे, एक उत्साह आहे, एक संकल्प आहे, एक इच्छा आहे.



माझ्या प्रिय देशवासियांनो,



जर आपण आपल्या वैयक्तीक आयुष्यातून बाजूला होऊन, संवेदनापूर्ण नजरेने समाजाकडे आपल्या आजूबाजूला काय घडतंय? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तर लक्षावधी लोक निस्वार्थ भावनेने, त्यांच्या व्यक्तिगत जबाबदाऱ्यांच्या पलिकडे
जाऊन, समाजासाठी, शोषितांसाठी, पिडीतांसाठी, गरीबांसाठी काही - ना- काही करताना दिसतात, हे पाहून आपण आश्चर्यचकित होतो. आणि एखाद्या मूक सेवकाप्रमाणे जणू तपस्या करावी, साधना करावी, त्याप्रमाणे काम करतात. अनेक जण असे असतात जे नेहमी रुग्णालयात जातात, रुग्णांची सेवा करतात, अनेक जण असे असतात जे गरज लागताच रक्तदानासाठी धावून जातात. अनेक जण भुकेल्या लोकांच्या पोटाची चिंता करतात. आपला देश बहुरत्ना वसुंधरा आहे. जनसेवा म्हणजेच प्रभुसेवा हे आमच्या नसांमध्ये भिनलं आहे. जर आपण त्याकडे सामुहिक रुपात पाहिलं, संघटित रूपात पाहिलं तर ही केवढी महान शक्ती आहे. जेव्हा न्यू इंडीयाचा मुद्दा निघेल तेव्हा त्यावर टीका होईल, वेगळ्या नजरेने त्याकडे बघितलं जाईल, हे साहजिकच आहे, आणि लोकशाहीत ते आवश्यकही आहे. पण ही गोष्ट खरी आहॆ की सव्व्वाशे कोटी देशवासीयांनी जर संकल्प केला, आणि संकल्प सिद्ध करण्यासाठी मार्ग तयार करायचा असं ठरवलं, एका मागून एक पावलं उचलली, तर न्यू इण्डीया, सव्व्वाशे कोटी देशवासियांचं स्वप्न आपल्या डोळ्यासमोर साकार होऊ शकेल. आणि प्रत्येक गोष्ट सरकारी अंदाजपत्रकातूनच झाली पहिजे, सरकारी प्रकल्पातूनच झाली पाहिजे, सरकारच्या पैशानेच झाली पाहिजे असं नाही. जर प्रत्येक नागरिकाने संकल्प केला की, मी वाहतुकीच्या नियमांचं पालन करेन, जर प्रत्येक नागरिकाने ठरवलं की माझ्या जबाबदाऱ्या मी प्रामाणिकपणे पार पाडेन, जर प्रत्येक नागरिकाने ठरवलं की, आठवड्यातून एक दिवस मी पेट्रोल -डिझेल वापरणार नाही, दिसायला गोष्टी तशा लहान दिसतात. आपण बघाल, या देशाचं, न्यू इण्डीयाचं स्वप्न, सव्व्वाशे कोटी देशवासी पहात आहेत, ते आपल्या डोळ्यांसमोर पूर्ण होईल. सांगण्याचं तात्पर्य हे की प्रत्येक नागरिकाने  आपल्या नागरिक धर्माचे पालन करावं, कर्तव्याचं पालन करावं. हीच न्यू इंडीयाची चांगली सुरुवात ठरेल. येत्या, २०२२मध्ये भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षं पूर्ण  होत आहेत. भगत सिंग, सुखदेव, राजगुरु यांच स्मरण करुया, चंपारण्य सत्याग्रहाचं स्मरण करुया. स्वराज्य ते सुराज्य या प्रवासात आपलं जीवन शिस्तबद्ध रितीने, संकल्पपूर्वक आपण का बरं जोडू नये? या, मी आपल्याला आमंत्रण  देतो.



माझ्या प्रिय देशवासियांनो,



मी आज आपले आभार व्यक्त करू ईच्छीतो. गेल्या काही दिवसात आपल्या देशात असं एक वातावरण तयार झालं आहे की डिजिटल पेमेण्ट, डिजिधन आंदोलन यात लोक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. रोख रक्क्कम न वापरता देवाण-घेवाण कशी करता येते? या बद्दल कुतूहल वाढलं आहे. गरीबातला गरीबही शिकण्याचा प्रयत्न करतो आहे आणि हळू हळू रोकड- रहित व्यवहाराकडे वळत आहेत. विमुद्रीकरणानंतर डिजिटल पेमेंट्च्या वेगवेगळ्या प्रकारात वाढ झाल्याचं पहायला मिळालं. भीम ॲप सुरु होऊन फक्त दोन-अडीच महिनेच झाले आहेत, पण आतपर्यंत जवळ जवळ दीड कोटी लोकांनी ते डाऊन लोड केलं आहे.



माझ्या प्रिय देशवासियांनो,



काळा पैसा आणि भ्रष्टाचार या विरुद्धची लढाई आपल्याला पुढे न्यायची आहे. सव्वाशे कोटी देशवाशी, या एका वर्षात अडीच हजार
कोटी डिजिटल देवाण-घेवाण करण्याचा संकल्प करतील का? आम्ही अर्थसंकल्पात घोषणा केली आहे. सव्वाशे कोटी देशवासियांसाठी हे काम जर त्यांनी मनावर घेतलं तर, एक वर्ष वाट पहायची गरज नाही. सहा महिन्यात हे काम होऊ शकेल. अडीच हजार कोटी डिजिटल व्यवहार, आपण शाळेत फी भरणार असू तर  रोखीत न भरता, डिजिटल पद्धतीने भरू. रेल्वे प्रवासात, विमान प्रवासात डिजिटल पेमेण्ट करू. औषधं खरेदी करताना डिजिटल पेमेंट करू. आपण स्वस्त धान्य दुकान चालवत असाल तर, डिजिटल व्यवस्था उपयोगात आणू. रोजच्या जीवनात हे आपण करू शकतो. आपल्याला कल्पना नसेल पण या माध्यमातून आपण देशाची फार मोठी सेवा करू शकता. आणि  काळा पैसा, भ्रष्टाचार या विरुद्ध सुरु असलेल्या लढाईत आपण शूर सैनिक बनू शकता. गेल्या काही दिवसात लोक शिक्षणासाठी, लोक-जागृतीसाठी अनेक डिजिधन मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं. देशभरात १०० कार्यक्रम करण्याचा संकल्प आहे. ८०-८५ कार्यक्रम झाले आहेत. त्यात बक्षीस योजनासुद्धा होती. जवळ जवळ साडेबारा लाख लोकांना भाग्यवान ग्राहक योजनेत बक्षीस मिळालं
आहे. ७० हजार व्यापाऱ्यांनी त्यांच्यासाठी असलेलं बक्षिस मिळवलं आहे. आणि प्रत्येकाने हे काम पुढे नेण्याचा संकल्पही केला आहे. १४ एप्रिल बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. आणि ज्याप्रमाणे फार आधी ठरलं आहे त्या प्रमाणे १४ एप्रिल रोजी ह्या डिजिधन मेळाव्याची सांगता होईल. शंभर दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शेवटी एक मोठा कार्यक्रम होणार आहे. मोठ्या सोडतीची
त्यात व्यवस्था आहे. मला विश्वास आहे की बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी जितके दिवस अजून आपल्या हातात आहेत, त्यात आपण भीम ॲपचा प्रचार करू. रोख रक्क्कम कमी कशी वापरता येईल, नोटांचा वापर कमी कसा करता येईल, यासाठी आपण सहभागी होऊ या.



माझ्या प्रिय देशवासियांनो,



मला हे सांगताना आनंद होतो की, प्रत्येक वेळी जेव्हा मन की बात साठी मी जनतेकडून सूचना मागवतॊ, तेव्हा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना येतात, पण मी बघितलं आहे की स्वच्छता या विषयी प्रत्येक वेळी सूचना असतातच. डेहराडूनच्या गायत्री नावाच्या इयत्ता अकरावीत शिकणाऱ्या मुलीने दूरध्वनीवरून एक संदेश पाठवला आहे.


हे बघा बन्धू-भगिनींनो,अकरावीत शिकणाऱ्या मुलीला किती त्रास होतो आहे. नदीत केर- कचरा पाहून तिला किती राग येतो आहे. मी हे एक चांगल लक्षण मानतो. मला हेच तर हवं आहे, सव्वाशे कोटी देशवासियांच्या मनात घाणीविषयी  तिरस्कार निर्माण व्हायला हवा. एकदा राग निर्माण झाला, त्याबद्दल रोष निर्माण झाला की आपण अस्वच्छ्तेविरुद्ध काही ना काही करू. आणि हे चांगलं आहे की गायत्री स्वतः तिचा राग व्यक्त करते आहे. मला सूचना पाठवते आहे. पण त्याच वेळी तिने स्वतः खूप प्रयत्न केले हेही ती सांगते आहे. पण यश मिळालं नाही. जेव्हापासून स्वच्छता आंदोलनाला सुरुवात झाली आहे, लोकांमध्ये जागरुकता
आली आहे. प्रत्येक जण सकारात्मक रीतीने यात जोडला गेला आहे. आता या मोहीमेने एका आंदोलनाचे रूप घेतले आहे. अस्वच्छतेविषयी तिरस्कार वाढतो आहे. जागृती व्हावी, सक्रीय सहभाग वाढावा, याला एक वेगळंच महत्व आहे. पण स्वच्छता ही गोष्ट चळवळीपेक्षा सवयीशी अधिक संबंधीत आहे. ही चळवळ सवयीमध्ये बदलण्याची चळवळ आहे. स्वच्छतेची सवय निर्माण करण्यासाठी ही चळवळ आहे. हे आंदोलन सामुहिक रूपात होऊ शकतं. काम कठीण आहे, पण करायचं आहे. मला विश्वास वाटतॊ की, देशाची नवी पिढी, मुलं, विद्यार्थी, युवक, यांच्यात जी भावना जागृत झाली आहे, ती स्वतः चांगल्या परिणामांचे संकेत देणारी आहे. आज मन की बात मधून गायत्रीने सांगितलेली व्यथा जे ऐकत आहेत, त्या साऱ्या देशवासियांना मी सांगेन की, गायत्रीचा संदेश हा आपल्या प्रत्येकाचा संदेश व्हायला हवा.



माझ्या प्रिय देशवासियांनो,





जेव्हा पासून मी हा मन की बात कार्यक्रम करतो आहे, मला सुरुवातीपासूनच एका विषयावर खूप लोकांनी सूचना पाठवल्या. अनेक जणांनी चिंता व्यक्त केली तो विषय म्हणजे अन्नाची नासाडी. आपल्याला हे माहित आहे की, घरी किंवा सामूहिक भोजन समारंभात आपण गरजेपेक्षा जास्त अन्न वाढून घेतो. ज्या गोष्टी समोर दिसतील त्या सर्व ताटात घेतो. पण ते सगळेच पदार्थ आपण खात नाही. जितकं ताटामध्ये वाढून घेतो, त्याच्या अर्ध अन्न सुद्धा आपण पोटात घालत नाही. ते तसंच टाकून निघून जातो. आपण कधी विचार केला आहे का, की हे खरकटं अन्न जे आपण टाकून देतो, त्यात आपण किती नासाडी करतो. कधी असा विचार केला आहे का की, हे असं खरकटं टाकलं नाही, अन्न वाया घालवलं नाही तर किती गरीबांचं पोट त्यात भरू शकतं. हा असा विषय नाही जो समजावून द्यावा लागेल. आपल्या घरी जेव्हा आई मुलाला अन्न वाढते तेव्हा ती म्हणते की मुला, जेवढं हवं आहे, तेवढंच घे. काहीना काही प्रयत्न होतच असतात. पण याबद्दल असणारी उदासीनता एक समाजद्रोह आहे. गरीबांवर हा अन्याय आहे. दुसरा मुद्दा असा की बचत झाली, तर कुटूंबाचा आर्थिक फायदा होईल. समाजासाठी विचार केला तर नक्कीच एक चांगली बाब आहे. पण हा विषय असा आहे की ज्यात कुटुंबाचाही फायदा आहे. या विषयी मला जास्त काही बोलायचं नाही, पण जागरुकता वाढायला हवी असं मला वाटतं. असे काही युवक मला माहित आहेत जे अशा प्रकारची मोहीम चालवतात. त्यांनी मोबाइल ॲप तयार केलं आहे. आणि जिथे असं अन्न वाया जातं किंवा उरतं तिथे ते इतर लोकांना बोलावून घेतात आणि त्या अन्नाचा सदुपयोग करतात. आमच्या देशातील युवक अशी मेहनत करत आहेत. हिन्दुस्तानातल्या प्रत्येक राज्यात असे लोक आपल्याला आढळतील. त्यांच जीवनही आपल्याला प्रेरणा देतं, की अन्न वाया घालवू नका, जेवढं हवं आहे तेवढंच अन्न वाढून घ्या. बघा बदल होण्यासाठी मार्ग असतातच. आणि जे लोक आरोग्याच्या बाबतीत जागरुक असतात ते नेहमी सांगतात की पोट थोडं रिकामं ठेवा. ताटंही थोडं रिकामं ठेवा. आणि आता आरोग्याचा विषय निघालाच आहे, तर सात एप्रिल या दिवशी आहे जागतिक आरोग्य दिन. संयुक्त राष्ट्रांनी २०३० पर्यन्त युनिवर्सल हेल्थ कव्हरेज, म्हणजे सर्वांना आरोग्य हे ध्येय निश्चित केलं आहे. या वेळी संयुक्त राष्ट्रांनी सात एप्रिल या जागतिक आरोग्य दिनानिमित्त डिप्रेशन म्हणजे उदासीनता यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. उदासीनता हीच यावेळची संकल्पना आहे. आपणही हा विषय जाणता. पण शाब्दिक अर्थ घ्यायचा झाला तर काही जण त्याला विषाद, शक्तीपात असंही म्हणतात. एका अंदाजानुसार जगभरात
पस्तीस कोटीपेक्षा अधिक लोक या आजाराने, मानसिक विकाराने पिडीत
आहेत. समस्या ही आहे की आपल्या आजूबाजूची ही गोष्ट आपल्याला माहित नसते, आणि या वर बोलणं आपण टाळतो. जो स्वतः या आजाराने त्रस्त आहे तो सुद्धा काही बोलत नाही, कारण त्याला काहीसा संकोच वाटत असतो. मी देशवासियांना सांगेन, उदासीनता असाध्य विकार नाही. एक मानसशास्त्रीय वातावरण निर्माण करावं लागतं, आणि मग उपचारांना सुरुवात होते. त्याचा पहिला मंत्र आहे उदासीनता दाबून टाकण्याऐवजी प्रगट व्हा, मोकळे व्हा. आपल्या सहकाऱ्यांना, मित्रांना, आई-वडीलांना, भावांना, शिक्षकांना मोकळे पणाने सांगा, तुम्हाला काय होतंय ते. कधी कधी एकटेपणाचा त्रास होस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक होतो. आपल्या देशाचं हे भाग्य म्हणावं लागेल की,  आपण एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलो, मोठं कुटुंब असतं, सारे मिळून मिसळून राहतात. त्यामुळे उदासीनता येण्याची शक्यता नष्ट होते. पण तरीही मी आई-वडिलांना सांगू इच्छितो की, घरात तुमचा मुलगा किंवा मुलगी किंवा कुटुंबातील अन्य कोणी सदस्य, पूर्वी सगळ्यांबरोबर जेवायला बसत असे पण आता तो म्हणतो, नको, मी नंतर जेवेन. तो जेवणाच्या टेबलापाशी येत नाही. घरातले सगळे लोक जेव्हा बाहेर जायला निघतात, तेव्हा तो म्हणतो की मी नाही येणार आज. त्याला एकटं राहायला आवडतं. तो असं का करतो याकडे आपलं लक्ष गेलं आहे का कधी? उदासीनतेच्या दिशेने हे पहिलं पाऊल आहे, हे आपण ओळखा. जर तो साऱ्या परिवाराबरोबर राहणं टाळत असेल, एकटाच कोपऱ्यात जात असेल तर हे होणार नाही याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. ज्यांच्या बरोबर तो मोकळेपणाने वागतो अशा लोकांच्या संगतीत तो राहील हे पहा. हास्यविनोद करून, त्याला व्यक्त होण्यासाठी प्रेरित करा. त्याच्या मनात कुठे गाठ बसली आहे ती मोकळी करा. हा उत्तम उपाय आहे. उदासीनता मानसिक आणि शारीरिक आजारांचं कारण ठरू शकते. ज्या प्रमाणे मधुमेह सर्व रोगांना आमंत्रण देतो, त्या प्रमाणे लढण्याच्या, साहस करण्याच्या, निर्णय घेण्याच्या क्षमतेवर उदासीनता हल्ला करते, आणि या क्षमता नष्ट करते. तुमचे मित्र, तुमचा परिवार, तुमचं वातावरण हे सगळे तुम्हाला उदासिनता येण्यापासून दूर ठेवू  शकतात. आणि आपण उदास झाला असाल तर त्या मनोवृत्तीमधून तुम्हाला बाहेरही काढू शकतात. अजून एक उपाय आहे. जर आपल्या जवळच्या माणसांजवळ आपण मोकळे होऊ शकत नसाल तर, एक काम करा, आजूबाजूला जिथे सेवा- भावानॆ मदतीचं काम चालतं, अशा ठिकाणी जा. मदत करा. मन लावून मदत करा. त्यांची सुखं- दुःखं वाटून घ्या. तुम्ही बघाल, तुमच्या मनातलं दुःख आपॊआप नष्ट होईल. त्यांच दुःख समजून घेण्याचा आपण जर प्रयत्न केलात, सेवा भावाने केलात तर आपल्या मनात एक नवीन आत्मविश्वास निर्माण होईल. इतरांशी जुळवून घेतल्याने, कुणाची तरी सेवा केल्याने आणि निस्वार्थ भावनेनं सेवा केल्याने मनावरचा ताण सहज हलका होतो.
तसं पाहिलं  तर योग हा सुद्धा  मन निरोगी ठेवण्याचा चांगला मार्ग
आहे. तणावापासून मुक्ती, दबावापासून मुक्ती, प्रसन्न चित्त यासाठी
योगसाधनेचा खूप उपयोग होतो.२१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. हे तिसरं वर्ष आहे. आपणही आत्तापासून तयारी करा, आणि लाखोंच्या संख्येनं सामुहिक योग उत्सव साजरा करा. योग दिनाबद्दल आपल्याला काही सूचना करायच्या असतील, तर आपण माझ्या मोबाइल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोचवा, मार्गदर्शन करा. योग या विषयी आपण गीत, कविता तयार करू शकता, असं करायला हवं, जेणेकरून हा विषय लोकांपर्यंत सहज पोहचू शकेल.
माता आणि भगिनींशी आज मी मुद्दाम बोलू इच्छितो. कारण आज आरोग्याची चर्चा खूप झाली, त्याबद्दलच जास्त बोललं गेलं. तर गेल्या काही दिवसात भारत सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आपल्या देशात काम करणाऱ्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. पण महिलांवर काही विशेष जबाबदाऱ्या सुद्धा असतात. कुटुंबाची जबाबदारी ती
सांभाळते, घराच्या आर्थिक जबाबदारीतही तिचा हात असतॊ. यामुळे कधीकधी नवजात अर्भकावर अन्याय होतो. भारत सरकारने याबद्दल एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. नोकरी करणाऱ्या स्त्रियांना प्रसूतीच्या वेळी, गरोदरपणाच्या काळात मातृत्व रजा जी या आधी १२ आठवडे मिळत असे, ती आता २६ आठवडे दिली जाईल. या बाबतीत जगात दोन किंवा तीनच देश आपल्या पुढे आहेत. भारताने एक महत्त्वाचा निर्णय आपल्या या भगिनींसाठी घेतला आहे. आणि त्याचा मूळ उद्देश त्या नवजात बाळाची देखभाल व्हावी, जो या भारताचा भावी नागरिक आहे. शिशुअवस्थेत त्याची नीट काळजी घेतली गेली, त्याला मातेचं प्रेम मिळालं तर उद्या हीच बालकं देशाचं वैभव ठरतील. यामुळॆ मातांचं आरोग्यही चांगलं राहील. आणि म्हणून या महत्वपूर्ण निर्णयाचा फायदा जवळजवळ १८ लाख महिलांना
हॊईल.



माझ्या प्रिय देशवासियांनो,



५ एप्रिल रोजी रामनवमीचा पवित्र दिवस आहे. ९ एप्रिल रोजी महावीर जयंती आहे. १४ एप्रिल रोजी बाबासाहेब  आंबेडकरांची जयंती आहे. या सर्व महापुरुषांच्या जीवनापासून आपल्याला प्रेरणा मिळत राहो, न्यू इंडियासाठी संकल्प करण्याची शक्ती मिळॊ. दोन दिवसानंतर चैत्र शुक्ल प्रतिपदा आहे, वर्ष प्रतिपदा, नव संवत्सर, या नवीन वर्षाच्या आपल्याला शुभेच्छा. वसंत ऋतुनंतर पीक तयार व्हायला सुरुवात आणि शेतकऱ्याला त्याच्या मेहनतीचं फळ हाती येण्याची वेळ आहे. आपल्या देशाच्या वेगवेगळ्या भागात नववर्षाचं स्वागत वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं. महाराष्ट्रात गुडीपाडवा, आंध्र आणि कर्नाटकात उगादी, सिंधी
चेटी -चान्द, कश्मीरी नवरेह, अवध प्रांतात संवत्सर पूजा, बिहारमधल्या मिथिला प्रांतात जुड-शीतल, मगध प्रांतात सतुवानी असं नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. भारत हा अगणित विविधतेनं नटलेला देश आहे. आपणा सर्वांना या नववर्षाच्या माझ्याकडून अनेक अनेक शुभेच्छा.

अनेक अनेक धन्यवाद.



******


No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...