आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२० ऑगस्ट २०१८
सकाळी ११.०० वाजता
****
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज ७४वी जयंती.
त्यानिमित्त देशभर त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
राजीव गांधी यांचं स्मरण करुन त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या
अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, प्रियंका गांधी, माजी पंतप्रधान
मनमोहन सिंग, काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी आज दिल्लीतल्या राजीव गांधी यांच्या
समाधीवर पुष्प अर्पण करुन अभिवादन केलं.
****
नांदेड जिल्ह्यात दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाचं
जोरदार पुनरागमन झालं. रात्रभर नांदेड शहरात मुसळधार पाऊस झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे. बुलडाणा जिल्ह्यातही काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणातला
पाणीसाठा ३१ टक्क्यांवर पोहोचला आहे. काल सायंकाळी धरणात साडे बारा हजार घनफूट प्रतिसेकंद
वेगानं पाण्याची आवक सुरू होती.
नाशिक जिल्ह्यात अनेक भागात पाऊस सुरू आहे. गेल्या
दहा दिवसांत झालेल्या पावसानं जिल्ह्यातल्या धरणात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे
जिल्ह्यातल्या बहुतांशी भागात पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. सध्या जिल्ह्यातल्या
सर्व धरणात मिळून सरासरीच्या ७३ टक्के इतका साठा असून एकूण २४ पैकी १५ धरणातून कमी
अधिक प्रमाणात विसर्ग सुरू आहे.
****
येत्या छत्तीस तासांत दक्षिण
मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकणातल्या घाट प्रदेशात, दक्षिण
कोकण तसंच मराठवाडयात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. या काळात विदर्भातही
तुरळक ठिकाणी जोरदार पावासाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मुंबई शहर, उपनगर
आणि आसपासच्या प्रदेशात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळतील असा अंदाज आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात बिडकीन इथं लाचखोर पोलिस हवालदाराला
काल दीड हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. राजेंद्र कीर्तिशाही असं या
हवालदाराचं नाव असून, त्यानं, कारवाई टाळण्यासाठी एका व्यापाऱ्याकडून लाच मागितली होती.
*****
***
No comments:
Post a Comment