Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 29
June 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ जून
२०१९ दुपारी १.०० वा.
****
आपत्ती निवारण करण्यासाठी `जी ट्वेन्टी` राष्ट्रांनी
एकत्र यावं, असं अवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. जपानच्या ओसाका इथं सुरू असलेल्या जी
ट्वेंटी देशांच्या बैठकीत ते बोलंत होते. आपत्ती निवारणाला सर्वाधिक महत्त्व दिलं जावं,
अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. पंतप्रधानांनी इंडोनेशीया, ब्राझील आणि तुर्कीच्या
राष्ट्राध्यक्षांशी स्वतंत्र बैठक घेऊन चर्चा केली. या बैठकांमध्ये व्यापार आणि गुंतवणूक
तसंच संरक्षण क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर निर्णय झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी `जी ट्वेंटी` देशांची तीन दिवसीय बैठक आटोपून दिल्लीला
परतत आहेत.
****
‘स्टार्टअप इंडिया’योजने अंतर्गत गेल्या चार वर्षात
देशभरात एकोणीस हजार ३५१ स्टार्टअप उद्योगांची नोंदणी झाली असून सर्वाधिक तीन हजार ६६१
`स्टार्टअप` उद्योगांची नोंदणी एकट्या महाराष्ट्रात झाली असल्याची माहिती केंद्रीय
उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. त्यांनी काल राज्यसभेत एका प्रश्नाच्या
लिखित उत्तरात ही माहिती दिली आहे. वैकल्पिक गुंतवणुकीतही महाराष्ट्रानं आघाडी घेत
देशात दुसरा क्रमांक पटकवला असून राज्यात एकूण
अडूसष्ट `स्टार्टअप`मध्ये ४४० कोटी ३८ लाख रुपयांची वैकल्पिक गुंतवणूक झाली असल्याचं
त्यांनी नमुद केलं.
****
सहा आठवड्यांच्या उन्हाळी
सुट्यांनंतर, सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज सोमवारपासून सुरू होत आहे. अयोध्या राम जन्मभूमी वाद, राफेल खरेदी प्रकरण आणि
राहुल गांधींचा न्यायालय अवमान खटला आदी अतीशय संवेदनशील खटल्यांवर सर्वोच्च न्यायालय
सुरू झाल्यानंतर सुनावणी अपेक्षित आहे. सर्वोच्च
न्यायालयाचं कामकाज सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या संपूर्ण
क्षमतेसह म्हणजे सर्व ३१ न्यायमूर्तींसह सुरू होईल, असं पीटीआय वृत्तसंस्थेनं नमुद
केलं आहे.
****
सरकारनं जुलै ते सप्टेंबर
या तिमाहीसाठी एनएससी अर्थात राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र आणि पीपीएफ अर्थात सार्वजनिक
भाविष्य निर्वाहनिधीसह छोट्या बचत योजनांवरच्या व्याजदरात एक दशांश टक्क्यांनी कपात
केली आहे. बचत खात्यांवरचा व्याज दर मात्र वार्षिक चार टक्के इतका कायम ठेवण्यात आला
आहे. पीपीएफ आणि एनएससी वर आता सात पूर्णांक नऊ दशांश टक्के व्याज दर राहील तर ११३
महिन्यांची मुदत किसान विकासपत्रावर सात पूर्णांक सहा दशांश टक्के व्याज दर असेल.
****
ठेकेदाराची तांत्रिक पात्रता पूर्ण नसताना कंत्राट
देण्यात आलं तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती राज्याचे नगरविकास राज्यमंत्री
योगेश सागर यांनी दिली आहे. महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत परळी-वैजनाथ
या शहराच्या मलनिस्सारण प्रकल्पाला १०१ कोटी ८६ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात
आली आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीनं निविदा मागविण्यात आली होती. मात्र, ठेकेदाराची तांत्रिक
पात्रता पूर्ण होत नसताना नियुक्ती करण्यात आली असल्यास संबंधित प्रकरणाची चौकशी करून
कारवाई करण्यात येणार असल्याचं त्यांनी काल विधानसभेत सांगितलं. परळी वैजनाथ शहराच्या मलनिस्सारण प्रकल्पासंदर्भात
सदस्य संगिता ठोंबरे यांनी लक्षवेधी मांडली होती त्याला उत्तर देताना सागर बोलत होते.
परळी शहराचा सहा कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयांचा घनकचरा
व्यवस्थापनाचा सविस्तर प्रकल्प अहवाल मंजूर करण्यात आला असल्याचंही नगरविकास राज्यमंत्र्यांनी
यावेळी सांगितलं.
****
पुण्याच्या कोंडवा इथं काल रात्री पावसामुळं एक संरक्षण भिंत
कोसळून पंधरा मजूर ठार झाल्याच्या दूर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री
देवेंद्र फडणविस यांनी दिले आहेत. या दुर्घटनेमुळं आपल्याला अत्यंत दु;ख झालं आहे,
असं मुख्यमंत्र्यांनी एका संदेशात म्हटलं आहे. कॉग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण
यांनीही दुर्घटनेबद्दल दु;ख व्यक्त केलं आहे. दुर्घटनाग्रस्त कुटूंबीयांना राज्य सरकारनं
सर्वतोपरी मदत करावी, चौकशी करून गुन्हेगारांना शिक्षा करावी अशी मागणी अशोक चव्हाण
यांनी केली आहे.
****
नांदेड जिल्ह्यात
उमरी इथं एका महिलेसह तिच्या सहा वर्षीय मुलाचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. औरंगाबाद,
नांदेडसह जालना तसंच उस्मानाबाद जिल्ह्यात काल
चांगला पाऊस झाला.
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुका वगळता इतर
सर्व तालुक्यांमध्ये सरासरी ८० मिलिमीटर पाऊस पडला. रायगड जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही सर्वत्र पाऊस पडत
असल्याचं वृत्त आहे. महाड, अलिबाग, पेणमध्ये रिमझिम सुरू आहे. त्यामुळे सावित्री, गंधारी
या नद्यांना पुर आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आज सलग
तिसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस पडत आहे, काल सकाळी आठ वाजेपासून आज सकाळी आठ पर्यंत
संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी ११२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही जोरदार पाऊस कोसळत आहे.
पावसामुळे मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळित झाली आहे.
*****
***
No comments:
Post a Comment