आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२५ ऑगस्ट २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
देशभरातल्या न्यायालयांमध्ये
खासदार, आमदार आणि विधानपरिषदेच्या सदस्यांना वकील म्हणून काम करण्यावर
बंदी घालण्याची मागणी करणा-या एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज निर्णय देणार आहे. सरन्यायाधीश
दीपक मिश्रा, न्यायमूर्ती ए. एम खानविलकर आणि न्यायमूर्ती डी.वाय.चंद्रचूड
यांच्या पीठानं भाजपाचे नेते आणि वकील अश्विनी उपाध्याय यांच्या या जनहित याचिकेवरचा
निर्णय नऊ जुलै रोजी राखून ठेवला होता. विविध
न्यायालयांमध्ये लोकप्रतिनिधी वकील म्हणून काम करतात आणि हे संविधानाच्या अनुच्छेद-१४ चं
उल्लंघन आहे, असं न्यायालयानं म्हटलं आहे.
****
फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष फ्रांस्वा ओलांद यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर राफेल विमान खरेदी प्रकरणात
आता कसलाही गैरसमज किंवा संशय राहिलेला नाही, असं
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं आहे. विरोधकांकडे आता बोलण्यासाठी कोणताही
मुद्दा राहिला नसल्यामुळे ते राफेल खरेदीचा मुद्दा उचलून धरत आहेत, असा
आरोपही त्यांनी केला.
****
२०१८-१९ या करनिर्धारण वर्षासाठी काही वर्गांच्या
करदात्यांकरता आयकर विवरण पत्र भरण्याची तसंच अंकेक्षण अहवाल भरण्याची मुदत वाढवण्यात
आली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या १५ तारखेपर्यंत हे विवरणपत्र तसंच अंकेक्षण अहवाल आता
सादर करता येणार आहे. याआधी ही मुदत येत्या ३० सप्टेंबरला संपणार होती.
****
राष्ट्रवादी
काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भारिप बहूजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासंदर्भात
केलेला दावा आंबेडकर यांनी फेटाळून लावला आहे. १९९८ मध्ये आंबेडकर यांनी अकोला मतदार
संघातून लढवलेल्या लोकसभा निवडणुकीत जिकंण्यासाठी आपण मदत केल्याचा दावा पवार यांनी
केला होता, त्याबद्दल मुंबईत वार्ताहरांसमोर स्पष्टीकरण देताना आंबेडकर यांनी, पवार
खोटं बोलत असल्याचा आरोप केला आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस
झाला आहे, सगळ्या प्रकल्पांमधली पाणी पातळी खालावली असून, खरिपाची पिकं वाया गेल्यात
जमा आहेत, असं जनता दल सेक्युलर या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेवण भोसले यांनी
म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी
भोसले यांनी उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
*****
***
No comments:
Post a Comment