आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०३ नोव्हेंबर २०१८ सकाळी
११.०० वाजता
****
दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातल्या
वाहतुकीत सकाळी आठ वाजेपासून संध्याकाळी सहा
वाजेपर्यंत बदल करण्यात आला आहे. अंबड चौफुली ते सिटीजन टी पॉईंट या मार्गावरील वाहतूक
भोकरदन चौफुली, मंठा चौफुली मार्गावर वळवण्यात येत असल्याचं पोलीस प्रशासनातर्फे कळवण्यात
आलं आहे.
****
सूक्ष्म, लघू आणि मध्यम
उद्योगांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या विविध सहाय्यकारी
योजनांचं उद्योग जगतानं स्वागत केलं आहे. या उद्योगांच्या अडचणी दूर करून त्यांना
नवा उत्साह मिळेल, अशी प्रतिक्रिया ॲसोचॅमचे सरचिटणीस उदय कुमार वर्मा
यांनी काल नवी दिल्ली इथं दिली. उद्योगांसाठी ही दिवाळी भेट आहे असं ते म्हणाले.
भारतीय व्यापार महासंघाचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनीही या उपाययोजनांचं
स्वागत केलं आहे. व्याजावरच्या अनुदानात तीन टक्के वाढ झाल्यानं निकोप स्पर्धा
वाढीला लागेल, असं भारतीय निर्यातक महासंघानं
म्हटलं आहे.
****
राज्यातल्या तीन शिक्षकांना मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून
दिला जाणारा यंदाचा आयसीटी पुरस्कार जाहीर
झाला आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातल्या दोन आणि बीड जिल्ह्यातल्या एका शिक्षकाचा
समावेश आहे. येत्या २१ नोव्हेंबरला मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते
नवे दिल्ली इथं हे पुरस्कार दिले जाणार आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांचा
चारा जिल्ह्याच्या बाहेर विकण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्यातल्या जवळपास ११
लाख जनावरांना पुरेसा चारा मिळावा यासाठी कालपासून
ही बंदी घालण्यात आली.
****
अखिल भारतीय आंतर विद्यापीठ महिला कुस्ती स्पर्धेला
कालपासून औरंगाबाद इथं प्रारंभ झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या
भारतीय क्रिडा प्राधिकरण- साई केंद्राच्या परिसरात प्रकुलगुरु अशोक तेजनकर यांच्या
हस्ते स्पर्धेचं उद्घाटन झालं. देशभरातून ८७ विद्यापीठांचे ७५० खेळाडू या स्पर्धेत
सहभागी झाले आहेत.
*****
***
No comments:
Post a Comment