आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२४ ऑक्टोबर
२०१८ सकाळी ११.०० वाजता
****
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग - सीबीआय प्रमुख आलोक
वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. आलोक
वर्मा यांच्या जागी सहसंचालक एम नागेश्वर राव यांच्याकडे तत्काळ प्रभावानं, सीबीआय
प्रभारी संचालकपद सोपवण्यात आलं आहे. दरम्यान, सीबीआय मुख्यालयाला सील करण्यात आलं
असून, अधिकारी कर्मचाऱ्यांसह सर्वांनाच कार्यालयात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
अधिकाऱ्यांचं एक पथक इमारतीतल्या सर्व कार्यालयांची
झडती घेत असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज माहिती
तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्मिती क्षेत्रातल्या व्यावसायिकांशी तसंच महत्वाच्या
उद्योग प्रमुखांशी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. देशभरात
सुमारे शंभर ठिकाणचे व्यावसायिक या संवादात सहभागी होणार आहेत. यावेळी ते ‘मै नही हम’
या पोर्टल आणि अॅपचं उद्घाटन करतील, ‘व्यक्ती समष्टीसाठी’ ही संकल्पना असलेल्या या
पोर्टलव्दारे सामाजिक प्रश्नांसाठीचे आपले प्रयत्न आणि समाजसेवा संघटित करण्यासाठी
आयटी व्यावसायिकांना एक मंच उपलब्ध होणार आहे.
****
चालू वर्षात
राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त आणि किफायतशीर दर - एफआरपी मिळावा, अशी मागणी
सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिल्लीत आयोजित एका उच्चस्तरीय बैठकीत केली
आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसदर्भात केंद्रीय परिवहन मंत्री नितीन
गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली. ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर बँकेचं
कर्ज आहे, त्यांच्या कर्जाचं पुर्नगठन व्हावं तसंच गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही साखरेला
अधिक भाव मिळावा, अशी मागणीही बैठकीत करण्यात आली.
****
जालना जिल्ह्यात औरंगाबाद सोलापूर राष्ट्रीय मार्गावर
डोणगाव फाट्याजवळ काल रात्री एका अपघातात दोन मजूर ठार झाले. कार आणि दुचाकीची समोरासमोर
धडक होवून हा अपघात झाला.
दरम्यान, जालना पोलिसांच्या वाहनाला भरधाव ट्रॅक्टरनं
धडक दिल्यानं झालेल्या अपघातात पाच पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले़. जालना-औरंगाबाद
मार्गावर काल सायंकाळी ही दुर्घटना घडली.
*****
***
No comments:
Post a Comment