Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 18 August
2019
Time 18.00 to
18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ ऑगस्ट २०१९ सायंकाळी ६.००
****
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते
आज राजभवन इथल्या भूमिगत बंकर संग्रहालयाचं उद्घाटन झालं. राजभवन परिसरातलं
हे बंकर पहिल्यांदा २०१६ मध्ये उजेडात आलं. हे भूमिगत बंकरसंग्रहालय पंधराशे चौरस फुटांचं आहे. या बंकरविषयी
माहिती देण्यासाठी आभासी वास्तवतादर्शकतेचा वापर करण्यात आला आहे. हे संग्रहालय लवकरच सामान्य नागरिकांसाठी
खुलं केलं जाणार आहे.
****
जम्मू काश्मीर मधली संचारबंदी अधिक शिथिल करण्यात आली आहे. काश्मीर
खोऱ्यात कालपासून दूरध्वनी
सेवा पूर्ववत करण्यात आली असून इतर ठिकाणी टप्प्या टप्प्यानं सेवा पूर्ववत करण्यात येईल,
अशी माहिती जम्मू काश्मिर सरकारचे प्रवक्ते रोहित कंसल यांनी दिली आहे. उद्यापासून
प्राथमिक शाळाही पुन्हा
सुरु करण्यात येणार आहेत.
****
राष्ट्रवादी
काँग्रेस आणि काँग्रेसनं तयार केलेले नेते भाजप पळवून नेत असल्याची टीका राष्ट्रवादी
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. ते आज मुंबईत पक्षाच्या राज्यस्तरीय
बैठकीवेळी अनुपस्थित राहिलेले काही नेते सत्ताधारी शिवसेना- भाजपमध्ये प्रवेश करणार
असल्याच्या शक्यतेसंदर्भात प्रतिक्रीया नोंदवत होते. भाजपनं आमच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना
सहभागी करून घेण्याऐवजी त्यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी, असं आवाहन
करताना त्यांनी भाजपचं काँग्रेसीकरण होत असल्याची टीकाही यावेळी केली. विधानसभा निवडणुकीपुर्वी
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षांच्या आघाडीसंदर्भात चर्चा सुरू असल्याचं जयंत
पाटील यांनी सांगितलं.
****
भाजपचे
आगामी निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार देवेंद्र फडणवीस हेच
असतील असं वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं पक्षातल्या सुत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे.
पक्ष अध्यक्ष अमित शाह यांनी हरयाणाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार सध्याचे मुख्यमंत्री
मनोहर लाल खट्टर हे असतील, असे स्पष्ट संकेत दिलेले आहेत. त्या बरोबरच पक्षातल्या वरिष्ठ
सूत्रांनी राज्यात पुन्हा फडणवीस तसंच झारखंडमध्ये पुन्हा रघुबर दास मुख्यमंत्रीपदाचे
उमेदवार असतील, असं स्पष्ट केलं आहे.
****
हिंगोली
जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातल्या सेनगाव ते वरुड चक्रपान रस्त्यावर लोणारच्या भाविकांचं
वाहन उलटून झालेल्या भीषण अपघातामध्ये तेरा जण जखमी झाले आहेत. जखमींमधले पाच जण गंभीर
असून त्यांना उपचारांसाठी हिंगोलीला हलवण्यात आलं आहे. आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास
वाहन रस्त्याच्या खाली उलटून झाडावर आदळल्यानं हा अपघात झाला. ग्रामस्थांनी तातडीनं
घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णवाहिकेद्वारे प्रथम सेनगावच्या ग्रामीण रुग्णालयात
दाखल केलं. तिथं डॉक्टर नसल्यानं जखमींचे नातेवाईक तसंच शिवसेना कार्यकर्त्यांनी ठिय्या
आंदोलन केलं.
****
जालना
जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या चाळीस टक्क्यांहून कमी पाऊस झाल्यामुळे बहुतांश लघू आणि
मध्यम प्रकल्प अद्याप कोरडेच आहेत. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ६८८ पूर्णांक
२१ मिलीमीटर असून, आजपर्यंत केवळ २७३ पूर्णांक २५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. खरीपातल्या
पिकांसाठी जिल्ह्यात सर्वदूर दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, जायकवाडी धरणातून
पाणी सोडण्यात आल्यामुळे अंबड आणि घनसावंगी तालुक्यातल्या गोदावरी नदीकाठच्या गावांना
काहीसा दिलासा मिळाला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मुख्यमंत्री
ग्रामसडक योजनेतून बीड जिल्ह्यातल्या नवीन
रस्ते कामांच्या आणि गोरक्षनाथ टेकडी इथल्या रस्ते सुधारणा कामांच्या एकूण चार कोटी
१७ लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ राज्याचे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन
मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते काल झाला. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ढेकणमोहा
-कराळवाडी- निर्मळवाडी या सुमारे सात किलोमीटर लांबीच्या आणि तीन कोटी ९९ लाख रुपयांच्या
कामाचा प्रारंभ तसंच गोरक्षनाथ टेकडी इथं अठरा लाख रुपये खर्चाच्या बीड परळी मार्ग
ते गोरक्षनाथ टेकडी रस्ता सुधारणा कामाचा प्रारंभ यावेळी क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात
आला.
****
जपान इथं सुरु असलेल्या ऑलिम्पिक चाचणी
हॉकी स्पर्धेत आज भारतीय पुरुष संघाचा सामना न्यूझीलंडविरुद्ध आणि महिला संघाचा
सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. भारतीय पुरुष संघानं काल पहिल्या सामन्यात मलेशियाचा ६-० असा मोठा पराभव करुन दणदणीत विजय मिळविला आहे.
****
No comments:
Post a Comment