Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 07 July 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ७ जुलै २०१७ सकाळी ६.५० मि.
****
शिक्षण तसंच नोकरी मिळवण्यासाठी खोट्या जात प्रमाणपत्राचा वापर केल्याचं निष्पन्न
झाल्यास, संबंधीत व्यक्तीची सेवा आणि पदवी दोन्ही संपुष्टात येतील, असा महत्त्वपूर्ण
निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. काल यासंदर्भात झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं,
अशा व्यक्तीला शिक्षादेखील सुनावली जाऊ शकते असं नमूद केलं. अशी व्यक्ती किती काळापासून
नोकरीवर आहे, ही बाब यात महत्त्वाची ठरणार
नाही, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.
बोगस जात प्रमाणपत्रांचा वापर करुन नोकरी मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची
घोषणा केंद्र सरकारनं गेल्या महिन्यात केली होती. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान, लोकसभेत याविषयीची आकडेवारीदेखील सादर केली
होती.
****
शेतकरी आत्महत्या या समस्येचं
निराकरण एका रात्रीत होणं शक्य नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. काल यासंदर्भात
एका याचिकेवर झालेल्या सुनावणी दरम्यान, पीक विमा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी
सरकारनं मागितलेल्या एका वर्षाच्या मुदतीस आपण सहमत असल्याचं सरन्यायाधीश जे. एस. खेहर
यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं नमूद केलं. महाधिवक्ता के.के.वेणुगोपाल यांनी सरकारच्या
विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणखी वेळ देण्याची मागणी न्यायालयानं मान्य
केली आहे.
****
दूरदर्शनच्या प्रादेशिक वृत्तविभागांनी
बातम्यांच्या गुणवत्तेवर भर द्यावा अशी सूचना, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री
एम.व्यंकय्या नायडू यांनी केली आहे. काल नवी दिल्ली इथं आयोजित प्रादेशिक वृत्त विभाग
प्रमुखांच्या परिषदेत ते बोलत होते. प्रादेशिक वृत्त विभाग हे प्रादेशिक भाषांमधील
स्थानिक बातम्या देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यात महत्वाची भूमिका बजावतात असं नायडू
यावेळी म्हणाले. दूरदर्शन समाचारच्या डिडिन्युज डॉट जीओव्ही डॉट इन या नव्या संकेतस्थळाचं
लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आलं.
****
मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी काल मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना
दिलासा देणारी कर्जमाफी जाहीर केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ४० लाख शेतकऱ्यांचा
सातबारा कोरा करण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगतानाच मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या
उत्पन्नवाढीसाठी विविध उपाययोजना राबवण्यासह कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यावर भर
दिला जात असल्याचं सांगितलं. शेतमालाला हमी भाव आणि बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी
प्रयत्न करत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
****
दहिहंडी
आणि गणेशोत्सव साजरा करताना येणाऱ्या अडचणींसंदर्भात काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या
उपस्थितीत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचं मुंबई भाजपचे
अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. विविध गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत
मुख्यमंत्र्यांनी यावेळी चर्चा केली.
दरम्यान,
या संदर्भात एका मंडळाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर येत्या १० जुलैला
सुनावणी होणार आहे.
****
राज्यातल्या
उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेवर आणण्याच्या दृष्टीने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करुन
त्याबाबतचा प्रस्ताव महानिर्मिती कंपनीकडे पाठवण्याची सूचना ऊर्जामंत्री चंद्रशेखर
बावनकुळे यांनी जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना केली आहे. नागपूर जिल्ह्यातल्या
सिंचन समस्यांबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी
योजनेत हे प्रस्ताव मंजूर करावेत, असं सांगताना ऊर्जामंत्र्यांनी. उपसा सिंचन योजनांना
२४ तास वीज पुरवठा देण्याच्या मागणीवर शासन सकारात्मक विचार करत असल्याचं सांगितलं.
****
महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी
करावी, असं आवाहन राज्याचे मुख्य सेवा हक्क आयुक्त
स्वाधीन क्षत्रिय यांनी केलं आहे. काल मुंबईत राज्य लोक सेवा हक्क आयोगाच्या
कामकाजासंदर्भात आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.
जनतेचे हक्क जपणाऱ्या या कायद्याच्या माध्यमातून शासनाची जनमानसातली
प्रतिमा उंचावण्यास मदत होत असल्याचं क्षत्रिय म्हणाले.
****
एकाच प्रकारच्या पॅकबंद वस्तूंवर आता दुहेरी कमाल किरकोळ
किंमत छापता येणार नाही. यासंदर्भात राज्य शासनानं केलेल्या मागणीनुसार केंद्र
शासनाच्या ग्राहक संरक्षण मंत्रालयानं, वैधमापन
शास्त्र नियमात बदल केले आहेत, त्यामुळे आता एक जानेवारी
२०१८ पासून कोणत्याही पॅकबंद वस्तूंवर दोन एमआरपी छापण्यास आळा बसणार असून
ग्राहकांची फसवणूक टळणार आहे.
****
बनावट कागदपत्रांच्या आधारे शेतकऱ्यांच्या
नावे ३२८ कोटी रुपये कर्ज उचलून फसवणूक केल्याप्रकरणी गंगाखेड शुगर इंडस्ट्रीजचे अध्यक्ष
रत्नाकर गुट्टे यांच्यासह संचालक मंडळ तसंच कर्मचाऱ्यांविरुद्ध परभणी जिल्ह्याच्या
गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कागदपत्रांच्या आधारे कर्ज
देणाऱ्या आंध्रा बँक, युको बँक, युनायटेड बँक, बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक, तसंच रत्नाकर
बँकेच्या अधिकाऱ्यांविरूद्धही गुन्हा दाखल झाला आहे़.
गंगाखेड पोलिसांच्या पथकानं गुट्टे
यांच्या औरंगाबाद इथल्या घरी येऊन नोटीस बजावत आज परभणी इथं हजर होण्यास सांगितलं आहे.
दरम्यान, ही कारवाई राजकीय हेतुनं प्रेरित असल्याचं गुट्टे यांनी म्हटलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात प्रशासनात समन्वय नसून, त्यात सुधारणा होणं
आवश्यक असल्याचं मत, विधीमंडळ अंदाज समितीचे प्रमुख, आमदार उदय सामंत यांनी व्यक्त
केलं आहे, ते काल परभणीत पत्रकार परिषदेत बोलत होते. जिल्ह्यातली अपूर्ण विकासकामं पूर्ण करण्यासाठी शासनाकडे शिफारस
करण्यात येईल, असं सामंत यांनी सांगितलं.
दरम्यान, ही अंदाज समिती परभणी जिल्ह्याचा दौरा आटोपून
काल हिंगोली इथं दाखल झाली. अंदाज समितीचे सदस्य आज हिंगोली जिल्ह्यात विविध ठिकाणी
दौरे करून, विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी करतील.
****
शेतीच्या वादातून एकाला जिवंत जाळणाऱ्या चार आरोपींना
औरंगाबादच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयानं जन्मठेप आणि प्रत्येकी दहा हजार रुपये दंड
ठोठावला आहे. सुमारे पाच वर्षांपूर्वी पैठण तालुक्यात लोहगाव शिवारात या आरोपींनी डॉ
विठ्ठल लघाने यांना डिझेल टाकून पेटवून दिलं होतं, त्यात त्यांचा मृत्यू झाला होता.
****
लातूर आणि परिसरात सुमारे १५ दिवसांच्या विश्रांतीनंतर काल सायंकाळी
सुमारे पाऊण तास जोरदार पाऊस झाला. आर्द्रा नक्षत्र कोरडं गेल्यामुळे दुबार पेरणीच्या
भीतीने शेतकरी चिंतातूर झाला होता. कालच्या या पावसामुळे काही अंशी दिलासा मिळाला आहे.
****
क्रिकेट
वेस्ट इंडीजविरुद्ध पाचवा एकदिवसीय सामना आठ गडी राखून
जिंकत भारतानं मालिका ३-१ च्या फरकानं जिंकली.
काल झालेल्या शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडीज संघानं भारतासमोर २०६ धावांचं लक्ष्य ठेवलं
होतं. कर्णधार विराट कोहलीने शतकी खेळी करत, अजिंक्य रहाणे आणि दिनेश कार्तिकच्या साथीने
३७ व्या षटकांत हे लक्ष्य साध्य केलं. सामनावीर पुरस्कार कोहलीनं तर मालिकावीर पुरस्कार
अजिंक्य रहाणेनं पटकावला. या दौऱ्यातला एकमेव टी ट्वेंटी सामना परवा रविवारी होणार
आहे.
****
नांदेड
वाघाळा शहर महानगर पालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षणाची सोडत काल काढण्यात आली. मतदारांना
२० प्रभागातून एकूण ८१ नगरसेवक निवडून द्यायचे
आहेत. प्रभाग क्रमांक एक ते १९ मधून प्रत्येकी चार, तर प्रभाग क्रमांक २० मधून पाच
नगरसेवक निवडले जाणार आहेत. या २० प्रभागांचं भौगोलिक क्षेत्र आणि नकाशे जिल्हा प्रशासनानं
काल जाहीर केले.
****
चार कोटी वृक्ष लागवड मोहिमेचं उद्दीष्ट वनविभागानं पूर्ण केलं आहे. आज समारोप होत असलेल्या या अभियानात काल सहा जुलैच्या दुपारपर्यंत राज्यात चार कोटी पंधरा लाख ४४ हजार ३३० वृक्ष लावले गेल्याची नोंद वन विभागाच्या संकेत स्थळावर नोंदवली गेली. आज सायंकाळपर्यंत होणारी वृक्ष लागवड लक्षात घेता, यावर्षी राज्यात वृक्ष लागवडीचा एक नवीन उच्चांक प्रस्थापित होईल, असा विश्वास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.
****
शिर्डी इथल्या श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवानिमित्त शासनानं
मंजूर केलेल्या आराखड्यानुसार मान्यता मिळालेली कामं प्राधान्यानं
पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यासंदर्भात
काल झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. शिर्डी आणि परिसरात स्वच्छतेला सर्वाधिक
प्राधान्य देण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं. एक ऑक्टोबर २०१७ ते १८ ऑक्टोबर
२०१८ या कालावधीत हे समाधी शताब्दी महोत्सवी वर्ष साजरं होणार आहे.
****
No comments:
Post a Comment