Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21
July 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ जुलै २०१९ दुपारी १.०० वा.
****
देशाच्या सात कोटी
३२ लाख शेतकरी कुटुंबांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत १४ हजार ६४६ कोटी रुपयांच्या
पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याची प्रत्येकी दोन हजार रुपये रक्कम अदा करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये दोन कोटी वीस लाख, आंध्रप्रदेशात ७२ लाख आणि महाराष्ट्रात ५० लाख
शेतकऱ्यांचा यात समावेश आहे. या योजनेमध्ये देशभरातील सुमारे १४ कोटी ५० लाख लाभार्थींचा
समावेश करण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं आहे.
****
भारताच्या चांद्रयान - दोन मोहिमच्या प्रक्षेपणाची
तयारी अंतिम टप्प्यात पोहचली आहे. आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोट्टा इथल्या सतीश धवन
अंतराळ केंद्रामधून आज संध्याकाळी काऊंटडाऊन सुरू होण्याची शक्यता आहे. या अभियानाच्या
यशस्वीतेनंतर चंद्राच्या पृष्ठभूमीवर पाऊल ठेवणारा भारत हा चौथा देश ठरेल.
****
जम्मू कश्मीर इथं एक जुलै पासून सुरू झालेल्या अमरनाथ यात्रेत काल संध्याकाळपर्यंत
दोन लाख ५९ हजार आठशेपेक्षा अधिक यात्रेकरुंनी हिम शिवलिंगाचे दर्शन घेतले. बालटाल आणि पहलगाम मार्गावर ४६ दिवस चालणाऱ्या या यात्रेची सांगता १५ ऑगस्टला
श्रावण पौर्णिमेच्या दिवशी होणार आहे.
****
हिमाचल प्रदेशच्या कांगडा जिल्ह्यात भूस्खलनाच्या घटनेत
एका आठ महिन्याच्या मुलीचा मृत्यू झाला, तर अन्य पाच जण जखमी झाले आहेत. धरमशाला जवळच्या भागसू नाग मंदिराच्या धबधब्याजवळ पर्यटक पायी चालत असतांना ही घटना घडली, असं पोलिसांनी सांगितलं आहे. जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालायात
दाखल करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी, २८ जुलैला होणाऱ्या 'मन
की बात' या कार्यक्रमातून, देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. दर महिन्याच्या शेवटच्या
रविवारी प्रसारित होणाऱ्या या मालिकेचा या सत्रातील हा दुसरा भाग असेल. या कार्यक्रमासाठी
नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या
निःशुल्क क्रमांकावर, किंवा माय जीओव्ही ओपन फोरमवर नोंदवाव्यात, असं आवाहन करण्यात
आलं आहे.
****
पालघर जिल्ह्यातल्या डहाणू, तळासरी, बोर्डी, दापचरी,
धुंदलवाडी या गावांसह गुजरातमधल्या उंबरगाव परिसरात आज सकाळी पुन्हा भूकंपाचा धक्का
बसला. काल सकाळपासून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवू लागल्याने नागरिकांमध्ये
भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. हवामान विभागाच्या नोंदीनुसार आज सकाळी नऊ वाजून
१७ मिनिटांनी झालेल्या भूकंपाची तीव्रता तीन पूर्णांक पाच रिश्टर स्केल इतकी होती.
****
शेतकऱ्यांना शेतीमध्ये विविध प्रयोग करण्यासाठी तंत्रज्ञान
स्वातंत्र्य आवश्यक असल्याचं मत, ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. चारूदत्त मायी यांनी
केलं आहे. औरंगाबाद इथं शेतकरी संघटना आणि देवगिरी महाविद्याच्या वतीनं आयोजित 'शेती
- झिरो बजेट'ची, की 'बी.टी.ची' या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचं उद्घाटन
त्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते.
जीएम अर्थात जनुक बदल तंत्रज्ञान शेतीसाठी फायदेशीर
असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर यामध्ये खूप संशोधन होत असल्याचं त्यांनी सांगितलं. एचटीबीटी
तंत्रज्ञानाच्या कापसाला चाचणी पध्दतीनं लागवडी करिता शासनानं मान्यता देण्याची मागणीही
डॉ. मायी यांनी यावेळी केली.
****
औरंगाबाद इथल्या महात्मा गांधी मिशनच्या एपीजे अब्दुल
कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्रात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या चांद्र महोत्सवाचा
आज समाररोप झाला. यावेळी सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ डॉक्टर रंजन गर्गे यांनी विद्यार्थ्यांना
मार्गदर्शन केलं. या तीन दिवसांच्या चांद्र महोत्सवात विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी
उत्साहाने सहभाग घेतल्याचं विज्ञान केंद्र संचालक श्रीनिवास औंधकर यांनी सांगितलं.
****
मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं दरवर्षी देण्यात
येणाऱ्या ग्रंथ पुरस्कारांचं वितरण आज प्रसिद्ध समीक्षक डॉक्टर वसंत पाटणकर यांच्या
हस्ते होणार आहे. परिषदेच्या डॉक्टर ना. गो. नांदापूरकर सभागृहात सायंकाळी सहा वाजता
होणाऱ्या या कार्यक्रमात सु. भि. वराडे, डॉक्टर दत्ता घोलप, प्रेमानंद गज्वी, किरण
गुरव, सुचिता खल्लाळ आणि अनिल कुलकर्णी यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात येणार असल्याचं
परिषदेनं कळवलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment