Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 July 2019
Time 18.00 to 18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ जुलै २०१९ सायंकाळी ६.००
****
औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यातल्या पिशोर परिसरात
भारंबा तांडा इथं ओढ्याला आलेल्या पुरात काल रात्री दोन वनरक्षक दुचाकीसह वाहून गेल्याची
घटना आज सकाळी उघडकीस आली. यातील एका वनरक्षकाचा मृतदेह हाती लागला आहे. राहुल दामोदर
जाधव असं त्याचं नाव असून, तो बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेडराजा इथला रहिवासी आहे.
तर दुसरा अजय संतोष भोई अद्याप बेपत्ता आहे. वन अधिकारी, पोलिस, महसूल कर्मचारी त्याचा
शोध घेत आहेत.
****
मजुरांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे
ठाणे शहरातल्या साकेत पुलावर अपघात झाला. मुंबई महापालिकेच्या हद्दीत वृक्षांच्या फांद्या
तोडणाऱ्या ठेकेदाराचा टेम्पो उलटून झालेल्या या अपघातात एका मजुराचा मृत्यू झाला. नाशिक-मुंबई
मार्गावर झालेल्या या अपघातात अन्य २१ मजूर जखमी झाले आहेत. यातील १६ जणांना जिल्हा
शासकीय रुग्णालयात, तर उर्वरित पाच जणांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
टेम्पो ताब्यात घेण्यात आला असून, चालकाचा शोध सुरू असल्याचं कापुरबावडी पोलिसांनी
सांगितलं आहे.
****
राज्यातल्या नद्यांची प्रदूषणाच्या विळख्यातून सुटका करण्यासाठी
सरकारनं ईशा फाऊंडेशनच्या सहकार्यानं नदी पुनरुज्जीवन कार्यक्रम हाती घेतला आहे. यात
नदीच्या दोन्ही किनाऱ्यांपासून १ किलोमीटर अंतरावर वन, शासकीय आणि खाजगी जमिनीवर वृक्षलागवडीचा
कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यासाठी नदीकाठच्या जागांची निश्चिती करण्यात आली आहे.
त्यानुसार ३ हजार हेक्टरवर आणि १४० कि.मी अंतरावर वृक्षलागवड कार्यक्रम राबवण्याचं
नियोजन करण्यात आल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
****
शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली, तर तिच्या जन्माचं
स्वागत म्हणून तिच्या नावाने शेतात, शेतबांधावर १० वृक्षांची लागवड करण्याचा संस्कार
वन विभागाने ‘कन्या वनसमृद्धी योजने’त घालून दिला. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या
नेतृत्वाखाली ही योजना सुरू झाली असून, २०१७ पासून अशी सुमारे २ लाख १५ हजार ९५३ झाडं
लावण्यात आली आहेत. ३३ कोटी वृक्षलागवडीतही २१ लाख ५९ हजार ५३० झाडं शेतकऱ्यांच्या
लेकींच्या नावानं लावली जाणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ तालुक्यातल्या शेतकऱ्यांना
खरीप हंगाम २०१८ मधील दुष्काळ अनुदानाचं वाटप
करण्यात आलं असून, संपूर्ण तालुक्यातलं वाटपाचं काम शंभर टक्के पूर्ण झाल्याची माहिती
तहसिलदार डॉ. आशिष बिरादार यांनी दिली. १९ जुलै २०१९च्या आदेशानुसार सोनपेठ तालुक्यातल्या
शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदान मदतीपोटी ५४ लाख ५७ हजार ९४४ एवढा निधी मिळाला आहे. यापैकी
४७ लाख ८५ हजार ४२१ रुपयांचा निधी २० जुलै पर्यंत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर
जमा करण्यात आला आहे. तर ६ लाख ७२ हजार एवढं अनुदान शिल्लक असल्याचं तहसिलदारांनी सांगितलं.
****
लातुर जिल्ह्यात सामाजिक समरसता मंच आणि दारिद्र्द्र्य
विरोधी अभियानातर्फे युवा उद्योजक परिषद घेण्यात आली. निलंगा तालुक्यातल्या अंबुलगा
या खेड्यात झालेल्या परिषदेचं उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अशोक कुकडे
यांनी केलं. ग्रामीण भागातील अनुसूचित जाती-जमातीतील तरुणांना उद्योग, व्यवसाय मार्गदर्शन
करण्यासाठी या परिषदेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक अभंग सुर्यवंशी यांनी
दिली.
****
परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यात भोगाव देवी इथं
७० एकर जमिनीवर वृक्ष लागवडीचा प्रारंभ वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु
डॉ. अशोक ढवण यांच्या हस्ते आज झाला.
****
भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं वेस्टइंडीज दौऱ्यासाठी
भारतीय संघाची निवड केली आहे. तीन ट्वेंटी-ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघात
कर्णधार विराट कोहली, तर उपकर्णधार अजिंक्य रहाणे असतील. ॠषभ पंत आणि वृद्धिमान शहा
या दोन यष्टीरक्षकांसह रोहित शर्मा, शिखर धवन, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, आणि नवदीप
सैनी यांचा समावेश करण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment