आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०९ सप्टेंबर २०१९ सकाळी
११.०० वाजता
****
राज्यातला महापूर आणि
दुष्काळ या पार्श्वभूमीवर यंदाचा ऊस गाळप हंगाम एक महिनाभर उशीराने म्हणजेच ऑक्टोबर
ऐवजी नोव्हेंबर महिन्यात सुरू केला जाणार आहे. गाळप परवान्यासाठी आत्तापर्यंत २६ साखर
कारखान्यांनी साखर आयुक्त कार्यालयाकडे ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत. यावर्षीचा गाळप
हंगाम साठ दिवस चालणार असून ५० लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन होईल, अशी शक्यता वर्तवण्यात
आली आहे.
****
बाजार समितीनं शेतमालाला अधिक भाव देण्याचा प्रयत्न
करावा असं आवाहन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केलं आहे. औरंगाबाद कृषी उत्पन्न
बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते काल बोलत होते. यावेळी बाजार समितीचे आदर्श
शेतकरी, आडतीदार, खरेदीदार, व्यापारी, बाजार समितीच्या आदर्श संचालिका, कर्मचारी आणि
हमाल यांचा गौरव बागडेंच्या हस्ते करण्यात आला.
****
.
लाभार्थ्यांना निर्धारित वेळेत-पारदर्शक पद्धतीनं
धान्य वितरण होण्यासाठी नवी संगणकीकृत सार्वजनिक वितरण व्यवस्था राज्याभर राबवण्यात
येत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गंत एकूण एकशे त्रेचाळीस लाखांहून अधिक शिधापत्रिकांची
आधार जोडणी झाली. रास्त भाव दुकानात आधार संलग्न व्यवस्था कार्यान्वित केल्यानं लाभार्थ्यांना
निवासी क्षेत्राखेरीज राज्यात कोणत्याही रास्त भाव दुकानांत अन्नधान्य मिळणार आहे.
सध्या एक कोटींहून अधिक कुटुंब जैवमीतीय -बायोमेट्रिक प्रमाणीकरण शिधापत्रिका वापरत आहेत.
****
भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीच्या प्रवाहात मोठ्या
प्रमाणात वाढ झाली आहे. नागरिकांना याची काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनानं
केलं आहे.
दरम्यान, गोसेखुर्द धरणाचे
३३ दरवाज़े २ मीटरने उघडण्यात आले आहेत.
****
समाजातल्या सर्व प्रवर्गातल्या नागरिकांचं जीवनमान
उंचावण्यासाठी, मूलभूत अधिकारांची प्रत्यक्ष अंमलबजावणी आवश्यक असल्याचं, मुंबई उच्च
न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रवी देशपांडे यांनी म्हटलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment