आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१७ सप्टेंबर
२०१९ सकाळी ११.००
वाजता
****
७२ वा हैदराबाद मुक्तिसंग्राम
दिन आज साजरा होत आहे. मराठवाड्यात या निमित्तानं ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांचं
आयोजन करण्यात आलं आहे. मराठवाड्यातलं मुख्य शासकीय ध्वजारोहण औरंगाबाद इथं मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. शहरातल्या सिद्धार्थ उद्यानात हुतात्मा स्मृतिस्तंभाला
मानवंदना दिल्यावर मुख्यमंत्र्यांनी ध्वजारोहण केलं. यावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी,
मराठवाडा वॉटरग्रीड प्रकल्प, १६५०
कोटी रुपयांची औरंगाबाद पाणीपुरवठा
योजना, आदींचा आढावा घेतला. वॉटर
ग्रीड प्रकल्पाच्या माध्यमातून सरकारनं मराठवाड्याच्या दुसऱ्या मुक्तीचा म्हणजेच दुष्काळमुक्तीचा संकल्प केला असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
या प्रकल्पांतर्गत मराठवाड्यातल्या
चार जिल्ह्यांसाठी निविदा काढण्यात आल्या असून उर्वरित चार जिल्ह्यांच्या निविदा लवकरच काढण्यात येणार
असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. औरंगाबाद पाणी पुरवठा योजनेमुळे येत्या
५० वर्षात या शहरात पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. दिल्ली
मुंबई औद्योगिक मार्गिकेमुळे येत्या काळात औद्योगिक क्षेत्रातही
मराठवाड्याचा विकास होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
जालना इथं, पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या
हस्ते हुतात्मा स्मारक परिसरात ध्वजारोहण झालं. नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, जिल्हाधिकारी
रवींद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक एस. चैतन्य आदींनी यावेळी राष्ट्रध्वजाला सलामी दिली.
उस्मानाबाद
इथं पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. जिल्हाधिकारी
डॉक्टर दीपा मुधोळ मुंडे, खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्यासह प्रशासकीय अधिकारी
आणि कर्मचारी यावेळी उपस्थित
होते. मान्यवरांनी स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना अभिवादन केलं.
परभणी
इथं, राजगोपालाचारी उद्यानात जिल्हाधिकारी
पी.शिवशंकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. जिल्हाधिकाऱ्यांनी स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली. त्यानंतर
पोलीस दलाच्या पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना दिली.
****
तिरंगा यात्रा, व्याख्यान
आदी कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठवाडा मुक्तिदिनानिमित्त आज सर्वत्र साजरा केला
जात आहे.
*****
***
No comments:
Post a Comment